Sunday, August 15, 2021

मधुर - माधुरी ( Madhur - Madhuri )

।। श्री शंकर ।। 

मधुर  - माधुरी 

भारतीय स्वातंत्र्य दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष. भारतीय मनामनांत स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळांतील कडू गोड आठवणी ह्या निमित्ताने जाग्या होत असतील. अनेक व्यक्तींच्या बलिदानाने देशाला मिळालेले  हे स्वातंत्र्य  ७५ वर्षं अबाधित ठेवण्यात भारतीय लष्कराचे महत्वाचे योगदान आहे.  ही  गोष्ट अतिशय अवघड. आपले भारतीय जवान कर्तव्यपूर्ती साठी प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती द्यायलाही मागे पुढे पाहत नाहीत. ही अवघड जबाबदारी पार पाडताना अनेक संकटांचा सामना करावा लागतो. घरादाराचा त्याग करावा लागतो. पण देशप्रेमाच्या भावनेने हे कर्तव्य ते लीलया पार पाडतात . 

भारतीय वीरांबरोबरच अनेक वीरांगना  सैन्यांत त्यांच्या खांद्याला खांदा लावून स्वतःची प्रापंचिक कर्तव्ये पार पाडत असतानाच,देशसेवेचे व्रत ही मोठ्या जबाबदारीने निभावून नेत  आहेत. आपल्या सर्वासाठी ही कौतुकाची अभिमानास्पद आणि प्रेरणादायी बाब  आहे.

अशाच एका कर्तृत्वशालीन लष्करी उच्च पदाधिकारी महिलेचा हा अल्प परिचय ह्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने करण्याचा हा छोटासा  प्रयत्न. 

आधी AFMC मधे वैद्यकीय शिक्षणाबरोबरच सेनेचे खडतर प्रशिक्षण, पदव्युत्तर शिक्षण घेऊन  M .D . ( बालरोगतज्ञ ) ही  पदवी संपादन. मग Nephrology तील  विशेष प्रशिक्षणासाठी परदेशांत वास्तव्य.  हा दीर्घ, कठीण प्रवास अतिशय जिद्दीने स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केला. त्याच कॉलेज मधे विद्यार्थी प्रिय  प्राध्यापक , संशोधक, डीन हा प्रवास आणि मग लेफ्टनंट जनरल ह्या सर्वोच्च पदापर्यंतचा प्रवास. गेली ४० वर्षं सातत्याने हा खडतर प्रवास करूनही चेहेऱ्यावर असलेले मधुर हास्य तसेच जपणाऱ्या.  आज सेनेतून निवृत्त झाल्यावरही पुढच्या कारकिर्दीसाठी तेव्हढ्याच उत्साहाने सज्ज असणाऱ्या नावाप्रमाणेच मधु -मधुर   ले. जनरल माधुरी कानिटकरांचे कौतुक करावे तेव्हढे कमीच.  ह्या सर्वोच्च पदापर्यंत पोचणाऱ्या त्या भारतांतील तिसऱ्या महिला तर महाराष्ट्रातील हा मान  मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी. त्यांना मिळालेले तीन स्टार्स दिमाखात मिरवणाऱ्या, ह्या माधुरीताईंच्या कर्तृत्वाने आकाशातील स्टार्स चे तेजही फिके पडावे.  

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नुकत्याच आभासी माध्यमांतून झालेल्या एका गप्पांच्या मैफिलीत ह्या "तेजस्विनी" ला जवळून ऐकता आले. तिचे विचार ,अनुभवविश्व समजून घेता  आले. तिच्या हिंमतीचे , जिद्दीचे दर्शन घडले.

 आपल्या आजीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला. शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील आजीच्या  कर्तृत्वाचा त्या अगदी अभिमानाने उल्लेख करतात. 

ह्या गप्पांच्या निमित्ताने त्यांच्या सहजीवनाचा, मातृत्वाचा, कर्तव्यकठोर लष्करी अधिकाराचा, एक शिक्षिका  म्हणून विद्यार्थ्यांबरोबर असलेल्या नात्याचा उलगडत गेलेला प्रवास खूप काही शिकवून गेला. हुशारी,सौन्दर्य,शालीनता ह्या मृदू व्यक्तिमत्वामागे असलेला एक अतिशय धाडसी, सेवाभावी, देशभक्ताचा चेहरा, ह्या दोन्ही गोष्टीचा सुंदर मिलाफ त्यांच्या व्यक्तिमत्वाला खूप मोठ्या उंचीवर घेऊन गेला. उच्च पदावर असूनही पाय भक्कमपणे जमिनीवर रोवलेले, दिलखुलास आणि सदाबहार अशा ह्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्यांच्याशी झालेल्या गप्पांमुळे प्रकाशमान झाले. ह्या यंग आजीच्या स्मितहास्याने गप्पांचा सर्व माहोल अगदी जिवंत झाला. 

त्यांच्या बरोबर झालेल्या संवादातून त्यांचे फुललेले परिपक्व सहजीवन खूप काही सांगून गेले. आर्मी मधेच त्यांचे पती कार्यरत असूनही दोघांची पोस्टिंग वेगवेगळ्या ठिकाणी असल्यामुळे फार कमी काळ एकमेकांचा सहवास त्यांना लाभला. पण राजीवजींच्या पाठिंब्यामुळे, सहकार्यामुळे, प्रोत्साहनामुळे त्याही विकसित होत राहिल्या आणि राजीवजींच्या पावलावर पाऊल  ठेऊन ले. जनरल झाल्या. त्यावेळी  राजीवजींची लष्करी कॅप  परिधान करताना झालेला आनंद आत्ताही  त्यांच्या चेहेऱ्यावर ओसंडून वाहत होता. राजीवजीं विषयी बोलताना त्यांच्या डोळ्यांत चमकणारे स्नेहभाव त्यांच्या नात्यातील मार्दवाची साक्ष देतात. भारतीय सैन्यात ह्या पदावर पोचलेले हे एकमेव जोडपे. त्यांचे साहचर्य आम्हांला आदर्शभूत असणारे  .

जीवनांत अनेक कठीण प्रसंग आले पण आहे त्या परिस्थितीचा हसत हसत स्वीकार करायच्या वृत्तीमुळे त्यांचे निर्मळ हसू कायम फुललेले राहिले.जिथे पोस्टिंग असेल तिथे नवनवीन कलागुण त्या आत्मसात करत राहिल्या. मग ते नृत्य असेल.सायकलिंग किंवा horse riding . सुखोई विमानातून प्रवास असेल. एकदा त्या जिद्दीला पेटल्या कि मग माघार नाही.   मुलांना त्यांच्या वाढत्या वयांत पाहिजे तेव्हा वेळ देता आला नाही हे सांगताना त्यांच्यातली माता संवेदनाशील होते.पण त्याच वेळी लष्करांतील जोडल्या गेलेल्या विस्तारित परिवाराचा , त्यांच्या सहकार्याचा  त्या आवर्जून उल्लेखही  करतात. किती,किती गोष्टी ? त्यांची रोमहर्षक  जीवनकहाणी ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात.

कोणत्याही उच्च ध्येयाप्रती तुमच्या मनांत आस्था असेल तर जिद्दीने आणि चिकाटीने तुम्ही त्या ध्येयापर्यंत निश्चित पोहोचू शकता हा आत्मविश्वास माधुरीताईंमुळे आपल्या मनांत जागृत होतो.  

मनात येतं ,आपण खरंतर किती आरामशीर ,सुरक्षित आयुष्य जगतो ! तरीही परिस्थिति वर सतत करवादत राहतो. आनंदाचे क्षण उपभोगायचे सोडूनआपलेच दुःख कुरवाळत बसतो. अशा कर्तृत्ववान महिलांचा जीवनपट नजरेसमोर ठेवून, एखादे पाऊल  तरीआपल्या देशाप्रती  पुढे पडले तर ह्या महिलांच्या कार्याला आमच्या सिव्हिलिअन्स कडून केलेला खरा  सलाम असेल. 

मॅडम आता MUHS ( Maharashtra University of Health Science ) ह्या संस्थेच्या डीन म्हणून सूत्रे हाती घेत आहेत. ही "सौदामिनी" ज्या क्षेत्रांत पाय  ठेवेल तिथे विजेसारखी तळपेल ह्यांत शंका नाही. त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आणि कारकिर्दीसाठी अनंत शुभेच्छा .


Courtsey : डॉ .उपेंद्र किंजवडेकर ( M.D.Peditrician )


स्नेहा भाटवडेकर ( snaha8562@gmail.com)

१५ ऑगस्ट २०२१ 

Sunday, June 27, 2021

ठेविले अनंते *(Thevile Anante)

                                                                    

                                                                ।। श्री शंकर ।।

                                                            ठेविले अनंते 


            Morning Walk साठी  कपडे आणि शूज ची खरेदी करून मी घरी आले. चला ! आता नियमितपणे सकाळी मस्त फेरफटका मारायचा.राधिकाशी फोन वर वेळ ठरवली. संसाराच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या.आता आपले छंद ,हौस -मौज ह्यांचा विचार करायचा. निवृत्तीनंतर राहिलेली स्वप्ने पुरी करायचे    बेत मनाशी आखत होते. मन आता अगदी realax होतं .

           निसर्ग केव्हढा मोठा कलाकार !आपले मन रिझवणारा !मनाला प्रसन्नता बहाल करणारा !थोड्या दूरवर असलेल्या निसर्गरम्य Airport कॉलनीत फिरायला जाणं म्हणूनच  माझ्या खूपच आवडीचं .मोकळ्या आकाशांत दूरवर दिसणारा एअरपोर्ट चा उंच ट्रॅफिक कंट्रोल टॉवर ,जमिनीवर झेप घ्यायला आतुर असलेली विमाने तर कधी आकाशात उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानांची झेप न्याहाळणे इथे नेहेमीचेच. कॉलनीत असलेली दुमजली छोटी छोटी बंगलेवजा घरे ,वळणदार रस्ते ,स्वच्छ परिसर ,रस्त्याच्या दुतर्फा विविध वेली,झाडे,विविध रंगांची उधळण करणारी फुले ,डेरेदार वृक्षांवर किलबिलणारे तऱ्हे -तऱ्हेचे  पक्षी ,सकाळच्या प्रसन्नतेत भर घालीत.  शांतअगदी मोकळे.रस्ते,त्यामुळे बिंधास्त कसेही फिरा. खरंच आपण मुंबईत आहोत की कुठल्या पिकनिक स्पॉटवर ? येणाऱ्या -जाणाऱ्या ओळखीच्या मंडळींशी Hi ,Hello...कोणाशी गप्पा ,तर कधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा.तिथेच असलेल्या सोमेश्वराच्या देवळात जाऊन दर्शन आणि क्षणभर विसावा.अनेकविध activities तिथे वयोमानानुसार सुरु असायच्या. एक वेगळा उत्साह त्यामुळे अंगात संचरायचा आणि दिवसभर हा तजेला टिकून राहायचा.  दिवसअगदी मस्त चालले होते. छान routine set झाले होते. 

 रोजच्या शिरस्त्यानुसार सकाळी प्रभातफेरीसाठी पावलं कॉलनी कडे वळली.कॉलनीच्या मेन गेट बाहेर "इथे फिरायला बंदी आहे" असा बोर्ड लागलेला  बघितला आणि माघारी फिरले. मन हिरमुसलं. आज दीड वर्षानंतरही गेटवर  बोर्ड तसाच आहे. तिथली प्रभातफेरी बंद झाली आणि उत्साहावर मस्त विरजण. अहो फिरणंच काय ह्या विषाणूने अगदी घरातच डांबून ठेवले की !कसलं realaxation आणि कसलं काय !उलट रोजच्या ताण तणावात जास्तच भर.जीवन पार उलटे सुलटे झाले की ! .ह्या महामारीच्या लाटेने सगळेच रुटीन बदलले.रोजच्या जीवनाचा ताळेबंद जमवताना जीव मेटाकुटीला आला. .

कधीतरी अनपेक्षितपणे जीवनांत असा एखादा turning point येतो.असं काही घडेलअसा विचारही आपण केलेला नसतो. पण विपरीत काही घडले कि मग मात्र गाडी अगदी मार्ग सोडून भरकटते .तिला आवर घालणे कठीण होते. विचारांची दिशा बदलते मग.अपने , पराये होतात. मनाचा तोल ढळतो.   विनाकारणच आपण देवाला /दैवाला दोष देतो. खरं तर काही वेळा हे आपण केलेल्या कर्मांचेच बरे वाईट परिणाम असतात.

शांत ,स्थिर जलाशयावर कोणीतरी दगड भिरकावावा आणि त्यातील पाणी उसळी मारून वर यावं ,तसं काहीसं माझं स्थिरावलेलं  मनही डुचमळत होतं . असं  का ? आपल्याच बाबतीत हे का घडावं ? आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच. मन बेचैन ,उदास होते. 

अचानक एक उद्बोधक कविता वाचनात आली  आणि त्यातला आशय मनांत उमटू लागला . मन हळूहळू शांत स्थिर होऊ लागले.  

" जाही विधी राखे राम । ताही विधि रहियेविधाता सृष्टीचा रचनाकार . सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच तिचे संगोपन करण्याची जबाबदारीही आलीच. त्यासाठी लागतात ते नियम.समाज योग्य रीतीने चालावा म्हणून नियम संहिता आणि त्याचे पालन करणे खरं तर अनिवार्य .ही  बंधने पाळल्यावरच सुरक्षितता येते. समतोल साधता येतो. " विधी " म्हणजे नियम / कायदा .ह्या कायद्यानुसार गेलात कि सुख शांती मिळतेच.  नियतीचा कायदा सर्वांसाठी सारखा. पण अलीकडे स्वैराचार वाढला, नियमांचे उल्लंघन होऊ लागले. माणसांच्या वागण्याला काही धरबंध उरला नाही. निसर्गावरच अतिक्रमण झाले. बेबंद व्यवहार,हौसमौज ...अर्थातच "अति तेथे माती " ... निसर्गानेच लॉक डाऊन चा बडगा उगारून माणसाला स्थानबद्ध केले. स्वातंत्र्यावर बंधने आली अगदी सरळमार्गी, निष्पाप लोकांचाही बळी  गेला. सुक्याबरोबर ओलंही जळतं ,नाही का ?

         " महालोमे राखे चाहे ,झोपडी में बास  दे ।जिंदगी कि डोर सौप रामजी के हाथ में ।।कवी पुढे म्हणतो ... तुम्ही गरीब,श्रीमंत ,उच्च नीच ,शिक्षित ,अडाणी कसेही असलात तरी राम कर्ता हि भावना ठेवूनच व्यवहार केला तर समाधान लाभते . त्यासाठी परमात्म्याची भक्ती करायला हवी,त्यामुळे दृढ विश्वास निर्माण होईल आणि आहे त्या कठीण परिस्थितीत सुद्धा समाधानी राहता येईल . 

आता हेच उदाहरण बघा ना .... खरं तर ती लावण्यवती .एक राजकुमारी .राजमहालात राहणारी . लौकिकार्थाने तिला कसलीच उणीव नव्हती.पण मीराबाईला होता तो पारलौकिकाचा ध्यास.कृष्णाच्या मधुर भक्तित ती आकंठ बुडली होती.त्यामुळेच सर्व सुख पायापाशी लोळण घेत असूनही तिला मात्र भक्तिरसातच चिंब भिजायचे होते.लग्नानंतर तिचे हे कृष्ण प्रेम तिच्या सासरच्यांना कसे मानवणार ? तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्या भक्तीमार्गात अनेक अडथळे आणण्यात आले. तिला विषाचा  प्याला हि देण्यात आला. पण तिने मात्र तिची अतूट भक्ती काही सोडली नाही. तिच्या ह्या भक्तीने कृष्ण प्रसन्न न होता तरच नवल. तिचा विषाचा प्याला अमृतमयी झाला तिचे संपूर्ण जीवनच तिने कृष्णाला समर्पित केले. अशी अनन्य मधुराभक्ती विरळाच. तिच्या अलौकिक भक्तिमुळेच मीराबाई संत पदाला पोहोचली आणि परमार्थमार्गात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायमचा उमटविला 

त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती संत तुकाराम महाराजांची. अगदी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा विठ्ठल नामाच्या मात्रेने त्यांनी चित्तात कायम समाधान ठेवले. 

 जे काही घडतंय ते रामाच्या इच्छेनेच.संसार करताना हा विचार अवश्य करावाच. त्याचे स्मरण कायम असावे .कवी पुढे म्हणतो , कामरसाऐवजी रामरसाचे  ग्रहण केले ,सत्संगतीचा आश्रय केला रामाशीच सख्यत्व भावाने नाते जोडले तर कितीही बिकट परिस्थितीतही आपण हा भवसागर नक्की समर्थपणे पार करू असा विश्वास मनात निर्माण होतो.

" ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ।।गोंदवलेकर महाराज म्हणतात ,पांडवांना वनवासात राहावे लागले पण त्यांना प्रत्यक्ष परमात्म्याचा,श्रीकृष्णाचा सहवास लाभला. प्रभू श्रीरामांनाही राजमहाल सोडून बारा वर्षे वनवास पत्करावा लागलाच की !

तर मंडळी! असे झाले असते तर बरे झाले असते असे म्हणण्यापेक्षा जे घडले ते माझ्या हितासाठीच घडले, असे म्हणून त्या परमात्म्याप्रती  कृतज्ञता भाव ठेवला तर ? शेवटी तूच कर्ता आणि करविता । शरण तुला भगवंता ... 

सज्जनांचे रक्षण करणे हे तर परमेश्वराचे ब्रीद. समर्थ रामदास म्हणतात" नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी "..मनापासून भक्ती करणाऱ्या साधकाचे तो रक्षण करतोच. नव्हे नव्हे त्यांच्या रक्षणासाठी तो धावून जातो. जिथे समर्पण आहे तिथे भगवंताची करुणा आहे. 

आपले स्वास्थ्य आपल्याच हाती असते अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत " ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असू द्यावे समाधान । हाच आयुष्याचा मूलमंत्र हवा .बरोबर ना ?


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

             


Thursday, June 10, 2021

गंगा दशहरा ( GANGA DASHHARA )

।। श्री   शंकर  ।।

 गंगा दशहरा  

आजपासून सुरु होणाऱ्या गंगा दशहरा (जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी )उत्सवाच्या निमित्ताने नद्यांचे आपल्या जीवनातील जे महत्वाचे स्थान आहे त्याचा थोडक्यात घेतलेला वेध. 

पृथ्वी ,आप,तेज,वायू ,आकाश ही क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जाणारी पंचमहाभूते. ह्या  पंचभूतांचा परस्परांशी ,सृष्टीतील व्यवस्थेशी आणि समस्त मानव जातीशी कायमचा घनिष्ठ संबंध.हे सगळे घटक जीवनावश्यक. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले हे धन मानवाला विपुल प्रमाणात दिले आहे आणि तेही अगदी मोफत. म्हणूनच कदाचित त्याचे महत्व आपल्याला कळत नाही.  

 पंचमहाभूतांपैकी एक " आप " म्हणजेच पाणी म्हणजेच जीवन. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत. आपल्या भारतवर्षांत गंगा,यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी इ. मोठ्या नद्या  पाण्याच्या उप्लब्धतेबरोबरच अनेक दृष्टींनी महत्वाच्या.  गंगा नदी भारतात  प्रथम  क्रमांकाची नदी आहे.  ती अनादी ,अनंत आहे.भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी गंगा हे साक्षात माझेच रूप आहे असे सांगितले आहे. " स्रोतसामस्मि जान्हवी ". 

भारतीय संस्कृतीचं वैशिट्य हेच आहे की निसर्गातील शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  देवत्व बहाल करून त्यांना पूजनीय मानतात. म्हणूनच नदीचे आपल्या जीवनातील महत्व लक्षात घेऊन तिला देवीस्वरूप मानले आहे. गंगा नदी ही  जशी भगवद्स्वरूप आहे  तशीच ती सर्वाना वत्सल मातेच्या रूपांतही दिसते.  ती पवित्र आणि पूजनीय आहेच तशीच माणसाचे पापक्षालन करणारी सुद्धा आहे. तिची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते असाही समज आहे.म्हणूनच गंगेचे महत्व अनन्यसाधारण आहे. 

विष्णूच्या पायापासून निघालेली ही  गंगा भगवान शंकराने डोक्यावर धारण केली आहे. भगीरथ प्रयत्नाने ही  गंगा पृथ्वीवर अवतरली. स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत गंगा विहार करते. म्हणूनच तिला त्रिपथगामिनी म्हणतात. 

गंगा नदीचे शुभ्र धवल स्फटिकाप्रमाणे असलेले पाणी अतिशय निर्मळ आहे .गंगेचा वाहता ओघ नेत्रसुखद असतो. हा प्रवाह बघून मनामध्ये  आनंदाच्या लहरी उमटतात.  गंगेच्या प्रवाहांत चंद्राची शीतलता आहे.  हे पाणी जणू काही अमृतच . राष्ट्रीय महातीर्थ असा गंगेचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता आणि संस्कृतीचा उदय गंगेच्या काठावर झाला आहे.  वेदांची रचना गंगेच्या काठावरच झालेली आहे. अनेक संत आणि सत्पुरुषांनी  गंगेच्या तटावर आपले जीवन व्यतीत केले आहे.


ह्या  मनुष्यजन्मात एकदा तरी  गंगास्नान करावे अशी समजूत जनमानसांत दृढ आहे. ह्या स्नानामुळे पापांचा नाश होतो. जसे पापी लोक पापक्षालन करतात ,तसेच अनेक सत्पुरुषही  गंगेत स्नान करतात. त्यांच्या पुण्यामुळे नदी पुन्हा पावन होते. तिच्या पाण्याचे तीर्थ होते. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ह्या पाण्याचे महत्व सिद्ध झाले आहे. गंगाजल हे एक औषध आहे. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. 

पुराणकथांत गंगेचा उगम कसा ,कधी, कुठे झाला ह्याच्या रोचक कथा आहेत. गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले ते अक्षय्य तृतीयेला असा काही कथांत उल्लेख आहे.काही ठिकाणी वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच गंगा सप्तमीला गंगा नदी पृथ्वीवर  अवतरली असे म्हणतात तर जेष्ठ शुद्ध दशमीला गंगा नदी चा उगम झाला असे म्हणतात. भारतात अनेक ठिकाणी जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी ( गंगा दशहरा ) गंगा उत्सव संपन्न होतो. निसर्गाविषयीची आपली भावना आपण ह्या कृतीतून प्रगट  करतो आणि पूज्यभाव जपतो. 

 गंगेच्या प्रित्यर्थ "गंगा दशहरा" हे व्रत करतात. ह्या व्रताचे पालन केले की दहा पापे नष्ट होतात म्हणून ह्या व्रताला  " दशहरा " म्हणतात. स्नान आणि दानाचे विशेष महत्व ह्या व्रतांत सांगितले आहे. ह्या दिवशी गंगेत दहा वेळा बुड्या मारून गंगास्नान करतात. गंगेच्या पाण्यांत उभे राहून गंगास्तोत्राचे पठण करतात.  मंदिरात आणि  गंगेच्या काठांवर पुष्प ,धूप,दीप ,नवेद्य हे उपचार दहाच्या पटीत अर्पण करून गंगा मैयाचे पूजन करतात. गंगेची आरती करून तिच्या प्रवाहांत दिवे सोडतात. हे सर्व दृश्य अतिशय मनोहारी दिसते.उत्तराखंडात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा गंगोत्सव साजरा केला जातो. ह्याच दिवशी पितृतर्पणही करतात. 

ह्या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मण ,सुवासिनींचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे , दान द्यावे अशीही रीत आहे. १० आंब्यांचे दानही विशेषत्वाने केले जाते. विविध ठिकाणी गंगेची प्रतिमा स्थापन करून तिचे विधिवत  पूजन करतात. दहा दिवस कथा -कीर्तनांचे आयोजन करतात. 

आपल्या दासगणू परंपरेत हा गंगा -दशहरा उत्सव गेली अनेक वर्षे उत्साहानें साजरा होत आहे. प. पू .दादा अनेक वर्षे लोणावळ्याला हा उत्सव साजरा करीत असत. तीच परंपरा प. पू. अप्पानीही चालू ठेवली. हा उत्सव दहा दिवस साजरा होतो. सद्गुरू दासगणू महाराजांच्या गोदा - माहात्म्य ह्या पोथीचे पारायण तसेच कथा -कीर्तनांनी हा उत्सव संपन्न होतो. प. पू .दादांच्या समाधीस पवमान ,अभिषेक होतो. दशमीचे दिवशी श्री जगन्नाथ पंडित  चरित्र सांगितले जाते. कीर्तनानंतर आरती व महाप्रसाद होतो व उत्सवाची सांगता होते. आजही हीच परंपरा अतिशय श्रद्धेने पुढे सुरु आहे. 

दक्षिण तेलंगणात एक प्रसिद्ध महाकवी होऊन गेला. सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेला हा रससिद्ध कवी. त्याचे गंगेवर अतोनात प्रेम होते. " गंगालहरी " ह्या गंगेला समर्पित संस्कृत श्लोकांतून त्याने गंगेची स्तुती केलेली आहे. आपल्या हातून घडलेल्या चुका  गंगामाता समजून घेईल आणि मला आपल्या पदरात घेईल असा  भरवसा  त्याला होता. त्याच्या काव्यातून त्याने जसजशी गंगेची आळवणी केली तसतशी गंगामाई एकेक पायरी वर चढत आली  आणि ह्या तिच्या सुपुत्राला तिने आपल्या उदरांत सामावून घेतले.  गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने गंगा लहरी स्तोत्राचे पठण करून आणि आख्यान रूपाने  ह्या महाकवीची स्मृती जागविली  जाते. 

 .सद्गुरू दासगणू महाराजांचे कार्य गोदातीरावरच बहरले.गोदामायवर त्यांचे अलोट प्रेम.दादांनी प. पू. अप्पाना त्यांच्या जन्मानंतर पाळण्यांत घालून ह्या गोदामातेला अर्पण केले होते.  आणि गोदामातेची ठेव म्हणूनच पुढे त्यांचे  संगोपन केले. गोदेनेच लडिवाळपणे अप्पाना  आपल्या अंगाखांद्यावर वाढवले. अप्पा तिच्याविषयी कृतज्ञता  व्यक्त करताना  तिच्या वत्सलतेचे वर्णन करतात आणि गोदामातेने पदरांत घ्यावे अशी प्रेमळ विनंती करतात. 

" परम दयाघन दुसरी तुजविण नाही ह्या भूवरी ग । उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग "

गोदावरी प्रमाणेच प. पू  अप्पाना गंगेचेही प्रचंड आकर्षण होते.प. पू .अप्पानी जीवनातील विविध टप्पे ह्या गंगेच्या साक्षीने  पार केले.अनेक ग्रंथांचे लिखाण गंगातीरावरच झाले.अनेक वर्षे पारमार्थिक साधना गंगेच्या काठावरच केली.गंगोत्रीला अप्पाना वरद नारायणाचे साक्षांत दर्शन झाले. अप्पा वरद नारायणाचे ध्यान करत गंगातटावर बसले आहेत आणि मुखाने सतत विष्णुसहस्रनामाचा उद्घोष.चालू आहे हा अद्भुत संगम उत्तरकाशीच्या वास्तव्यात आम्हांला अनुभवता आला. चतुर्थाश्रमांतील संन्यास दीक्षा ह्या गंगा किनाऱ्यावरच झाली आणि शेवटी समाधिस्थ होऊन गंगामातेच्या प्रवाहांत  स्वतःचे देह विसर्जन केले.आपले कृतार्थ जीवन नारायणाच्या चरणी समर्पित केले.      

प. पू. दादा व अप्पा दोघांनीही ह्या महानद्यांचे प्रचंड आकर्षण होते. नदीच्या रूपाने सतत प्रवाही आणि विशुद्ध ब्रह्मतत्वाची अनुभूती घेता येते. व्रते आणि उत्सवांच्या निमित्ताने हा शोध आपल्यालाही घेता यावा हीच त्यामागची खरी प्रेरणा. 

"जय संजीवनी ,जननी  पयोदे श्री गोदे भवतापहरी ।"हीच ह्या गंगा दशहरा व्रताच्या निमित्ताने गंगा/गोदा  मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना .... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com


Saturday, June 5, 2021

आजोळची भेट ( Ajolachi Bhet )

                                ।। श्री शंकर  ।।

                 आजोळची भेट 


" आज कुछ धारदार हो जाये " , लेकीची फर्माइश ... ठीक है ,कोशिश करती हूँ  ... 

लेखणी सरसावली ...काय बरं लिहावं ? चलो शुरू तो करें ...  देखते हैं ... लेखणीची धार अजमावताना माझा मोर्चा वळला मात्र दुसरीकडेच ... 

जमिनीवर हातांनी जोर देतच मी उठले.गुडघ्यांचे कुरकुरणारे सांधे आता तू वरिष्ठ नागरिक झालीस , ह्याची जाणीव करून देणारे !पण हाडीमासी खिळलेल्या सवयी आता थोड्याच बदलणार ? मळलेली वाट सोडणं आता ह्या वयांत तर  खूपच कठीण! हं sss , मी आतल्या आत दीर्घ सुस्कारा सोडला.नारळाचं खोवलेलं एकसारखं ,पांढरं शुभ्र ओलं खोबरं डब्यात भरतानाच मी कौतुक भरल्या नजरेने तिच्याकडे पाहिले . धारदार ती ,पण मी मात्र प्रेमाने एकवार तिच्या पात्यावर हात फिरवला ,स्वच्छ पुसून तिला जागेवर ठेवून दिलं . 

आम्ही नवीन जागेत राहायला आलो आणि काही दिवसांतच कोकणांतून नाना आजोबा आमचे नवीन घर बघण्याच्या निमित्ताने आमच्या कडे राहायला आले. आईच्या माहेरी मीच सर्वात मोठी नात . साहजिकच आजी ,आजोबा ,मामा ,मावश्या सगळ्यांचीच लाडकी. लाड करणारे आजोबा आल्यावर मी खुश झाले. आजोबा तिकडून येताना कोकणचा मेवा नेहमीच घेऊन येत. आमच्या शेतातले लाल तांदूळ,नाचणी,कुळथाचे घरी चुलीवर भाजलेले खमंग पीठ,त्याचा गंध अगदी आरपार आजोबांच्या  बॅगेतील  सगळ्या सामानाला तर यायचाच पण घरातही दीर्घकाळ रेंगाळायचा. फणसाचे तळलेले गरे ,आंब्याची- फणसाची पोळी  आणि आजीच्या/ मामीच्या  हातचे मला आवडणारे खास रव्याचे लाडू,कधीतरी नारळाच्या किंवा कोहोळ्याच्या वडया ,हे पदार्थ इतके चविष्ट कि गावच्या मातीचा कस आणि आजोळच्या मायेचा ओलावा   ... 

एवढं सगळं सामान आजोबानीं आता अगदी त्र्याऐशी च्या घरात असून सुद्धा हौसेने उचलून आणलं.बाकीही कोणाकोणाचे वाटे त्यात असायचे. मग सगळ्यांच्या घरी जाऊन तो खाऊ पोचवणे आणि त्यासोबत खमंग गप्पा मारणे ,हा आजोबांचा वर्षानुवर्षे चाललेला आवडीचा उपक्रम .आजोबांना माणसांची खूपच आवड होती ,त्यांनी नाती जपली होती. त्यांच्याशी  गप्पा मारायला तर त्यांना कोणताही विषय चालायचा. ह्या गप्पांना वेळेचेही बंधन नसायचे."तुझेआजोबा म्हणजे फणस!एक नंबर कोकणी हीरा "माझे सासरे नेहेमी म्हणत.आजोबा बोलायला काहीसे फटकळ पण  सर्वांविषयी आपुलकी , प्रेमभाव जपणारे. आजोबा कोकणातल्या  त्यांच्या घरी यायचे निमंत्रण सर्वांना अगदी आग्रहाने देत. आणि त्यांचा हा प्रेमळ आग्रह कोणाला मोडता येत नसे.पाहुणेमंडळी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य उत्तम करायचे .  

 प्रवासाचा शीण थोडा हलका झाल्यावर आजोबांनी त्यांच्या पोतडीतल्या भेटवस्तू काढायला सुरवात केली." आजोबा , आज सामान जरा जास्तच वाटतंय ,जड ही आहे खूप. काय आणलंत एव्हढं ओझं?कसा प्रवास करता ह्या वयांत एवढे सामान घेऊन?आधी हा तुला खाऊ! खाऊची  पिशवी हातात दिल्यावर एक जाडी-भरडी गोणपाटाची जड पिशवी त्यांनी  माझ्या हातात दिली. त्या पिशवीकडे मी  बघत राहिले. अगं ,तुझ्या नवीन घरासाठी खास भेट घेऊन आलोय. बघ उघडून.काय असेल ह्या  पिशवीत ? माझं कुतूहल चाळवलं .ती पिशवी उघडताच आत निघाली एक धारदार वस्तू. बसायला ऐसपैस पाट ,मोठं लोखंडी पातं अगदी धारदार,तळपणारं .नारळ खोवण्यासाठी मोठी खवणी ...  हि कसली भेट ? खरं तर माझं मन जरा हिरमुसलं . आणि हा एवढा मोठा विळोबा कोकणांत ठीक आहे हो वापरायला !.इथे मुंबईत आमच्या एवढ्या टीचभर जागेत ठेवायचं कुठे हे धूड ? माझ्या  चेहेऱ्यावर उमटलेली नाराजी चाणाक्ष आजोबानी नेमकी हेरली. 

आजोबा माझी समजूत घालू लागले. मागच्याच आठवड्यात अंगणातील जुनं फणसाचं झाड पडलं . अगं ,हे लाकूड पाटासाठी अगदी उत्तम. सुताराला बोलवून मस्त मोठ्ठा पाट करवून घेतला. मग खारेपाटणातून लोहाराला सांगून हे असं खास जाड पातं बनवलं . तुला उपगोगी होईल म्हणून मुद्दाम बनवून घेतली हो , अगदी स्वतः लक्ष घालून. त्या विळीसाठी आजोबांनी घेतलेली मेहनत बघूनच माझा जीव कासावीस झाला. " अगदी छान उपयोगी  आहे भेट " रोज मला तुमची आणि कोकणातली आठवण नक्की येईल. आजोबानाही माझं बोलणं ऐकून बरं वाटलं आणि केलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले . 


सुरवातीला ह्या विळीची सवय व्हायला जरा वेळच लागला.माझी वापरातली पहिली विळी अगदी नाजूक साजूक.बोथट धारेची. नव्या विळीची धार एव्हढी की बोट अगदी कापायचंच .खूप लक्षपूर्वक चिरायला लागे .आज ३० वर्षं झाली पण ही  भेट धारदार असली तरीही मला खूप आनंद देतेय. विळीवर बसून भाजी  चिरताना मी रोजच कोकणांत फेरफटका मारून येते. कोकणातलं आमचं कौलारू टुमदार ,चौसोपी,नीटनेटकं घर,एकाकी ,निवांत ,निसर्गाच्या सानिध्यात पहुडलेलं. आजी -आजोबा ,मामा-मामी ,मामेभावंडं ,कायम आला-गेला पै-पाहुणा ,भरलेलं गोकुळच ,बाजूचा गाई -म्हशींनी भरलेला गोठा,त्या मुक्या जनावरांचीही माया,  परसातला ,लेकुरवाळा फणस ,गच्च लगडलेलं आंब्याचं झाड ,सुगंधाने बहरलेली मागच्या पडवीतली  फुलबाग, आणि हो माझं आवडतं वरच्या रस्त्याच्या बाजूचं सुरुंगीचं झाड .आमच्या घराची ओळख ह्या झाडामुळेच व्हायची ह्या फुलांच्या बहराने. आसमंत दरवळायचा  .सारवलेल्या अंगणातलं तुळशी वृंदावन,त्यासमोर रेखाटलेली रांगोळी ,माजघरातलं पायऱ्या -पायऱ्यांच देवघर आणि गुरुचरित्र पारायणात मग्न असलेली आजोबांची शांत मूर्ती. 

आजोबांनी दिलेल्या ह्या अमूल्य भेटीचं महत्व कळायला मला जरा वेळच लागला. " अहर्निशम सेवामहे "  ही विळी मला अखंड सेवा देतेय.आतापर्यंत एकदाही धार  काढावी लागली नाही की दुरुस्ती नाही. गंजाची पुटं तिच्यावर चढलेली नाहीत. दिवसेंदिवस तिच्यावरचं माझं प्रेम वाढतच आहे. "जुनं ते सोन ", ह्याची प्रचिती देणारी ही भेट !  

" Neighbour's envy, owners' pride "  ही विळी. आमच्या घरी आलेल्या पाहुण्याना ही आकर्षित करते. कुठे मिळाली  हो ही विळी? नाही बाजारातून नाही आणली ती, स्पेशल आहे,आजोळची भेट ..मी कॊतुकाने सांगते. काही नातेवाईक मंडळींनी ही विळी बघून आजोबाना तशीच विळी हवी म्हणून ऑर्डर देऊन, करवून घेतली. 

आजोबांचे माझ्याकडचे ते  शेवटचेच वास्तव्य असेल हेही मला त्यावेळी कुठे माहित होते? आजोबानी अगदी शम्भरी गाठली पण वयोमानानुसार नंतर मुंबईच्या धावपळीत येणे त्यांना जमले नाही .

आज खरं तर खाली बसून चिराचिरी करण,मलाही जरा अवघड जातं .पण ह्या विळीवर बसून चिरण्यातला आनंद वेगळाच.चिरणं ही  कसं अगदी बारीक ,हवं तसं .आणखी एक सिक्रेट , तुमच्या माझ्यातच हं ,हिने मला अगदी फिट N फाईन ठेवलंय . शरीराला छान व्यायाम .   

आजच्या काळांत स्त्रियांना किचन मध्ये वेळेच्या मर्यादेतच सर्व कामं उरकावी लागतात.त्यामुळे  साधनंही तशीच लागतात. पुढच्या पिढीच्या चाकू सुऱ्या ,चॉपिंग बोर्ड बरोबरच मी माझी ही जुनी  ठेव जपतेय . मुलीचा माझा वाद-संवाद नेहेमीचाच ," आई आता कशाला हवीये ती जुनी विळी ?" हसून तो विषय मी तिथेच संपवते "अशी विळी सुरेख बाई ,भाजी ती चिरावी " .ओठावर आलेल्या ओळी गुणगुणतांना सकाळचे किचन वर्क पुन्हा सुरु होते. 

आजोळच्या घराच्या आता आहेत फक्त आठवणी.काळाच्याओघात हे जून-जाणतं घर नामशेष झालं ,पण ह्या विळीच्या रूपाने त्या घराचा एक अंश मी जपतेय हाच आनंद. 

माझ्या आजोळी निर्मळ,सतत खळखळ वाहणारे पाटाचे पाणी होते. ह्या पाण्याची संततधार पडत असायची. ह्या पाण्याची गाज ऐकण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. त्या पाण्याची सोबतही असायची. 

ह्या पाटाच्या पाण्याच्या धारेसारखीच आजोळची प्रेमधारा माझ्यावर सतत बरसू दे,अशी माझ्या आजोळच्या ग्रामदैवताला " आदिनाथाला "मी नेहमी  मनोमन प्रार्थना करते. 


स्नेहा भाटवडेकर ,

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

Friday, May 14, 2021

आमची कुलदेवी : श्री महालसा नारायणी ( Shri Mahalasa Narayani )

                                                       ।। श्री   शंकर  ।।                      


                            आमची कुलदेवी : श्री   महालसा   नारायणी 


 घराच्या बागेत लावलेलं अबोलीचं रोपटं आता छान फोफावलंय. हिरव्या तजेलदार पानापानांतून आपली मान बाहेर काढून हळूच डोकावणारी अबोली! तिचा केशरी रंग मनाला मोहविणारा. सकाळी सकाळी तिच्या जवळ गेलं कि भरभरून उमललेली फुलं... अबोला सोडून आपल्याशी बोलू लागतात. देठापासून विलग होऊन ही फुले माझी ओंजळ भरून टाकतात. अबोलीचा गजरा, भरगच्च काळ्या केसांवर शालीन सौन्दर्यवतीने माळलेला  तिच्या नैसर्गिक सौन्दर्यात भर घालणारा...आत्ताच्या काळांत दुर्मिळ पण तरीही मला आवडणारे हे  दृश्य ...  मी त्यांत हरवून जाते... . 

रोज सकाळी अबोलीचा हार गुंफताना मी थेट गोव्यात पोहोचते. खरं तर मे महिना आणि गोवा...  आमचं  अगदी अतुट नातं. गोव्यातली यच्चयावत स्वच्छ, सुंदर, भलीमोठी आकर्षक मंदिरे. दरवर्षी आमच्या कुलदेवीच्या दर्शनाच्या निमित्ताने गोव्याची वारी ठरलेली. सध्या दोन वर्षं आलेल्या परिस्थिजन्य संकटामुळे हि वारी जरी टळली तरी "शब्दांच्या वारीने" मी अगदी थेट आमच्या कुलस्वामिनीच्या मंदिरात पोहोचले. 

फेसाळलेल्या शुभ्र,धवल,समृद्ध सागरकिनारे लाभलेल्या, गोव्याच्या लाल मातींत, नारळी-पोफळींच्या आगारात, निसर्ग सौन्दर्याच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव, म्हार्दोळ. ह्या परमपवित्र धर्मक्षेत्रांत आमच्या कुलदेवीचे "महालसा नारायणीचे" कायम वास्तव्य आहे. देवीचे हे जागृत देवस्थान.इथे आल्यावर आपुलकीच्या नात्याने माहेरी आल्यासारखी मनाची अवस्था   होते. लेकरू होऊन ह्या जगन्मातेला उराउरी भेटण्याची आस दाटून येते. 

मुख्य  प्रवेशदारातून प्रवेश करतांनाच मंदिराचा विशाल  परिसर आपण आपल्या नजरेत सामावण्याचा प्रयत्न करतो. देवळाबाहेर बसलेल्या माळकर्णीकडे असलेल्या ताज्या, टवटवीत, विविधरंगी पुषमालांकडे आपण आकर्षित होतो. अबोली, मोगरा,सोनचाफा, बकुळ, सुरंगी ह्यांचे हार, त्याबरोबरीनेच हिरव्यागार, भरगच्च तुळशीच्या माळा किती घेऊ...  असा मोह होतो. ह्या संमिश्र दरवळाने आपले अंतरंगही सुगंधी होते. ह्या परिमळाने भारलेला मनरूपी भुंगा  दर्शनाच्या ओढीनं मंदिरात प्रवेश करण्यास उत्सुक असतो. देवीच्या चरणांवर नतमस्तक व्हायला हातातील   फुलेही  किती आतुर असतात आणि आपण ही फुले आणि इतर पूजासाहित्य देवीला अर्पण करूनच  तर देवीशी सख्यभाव जोडतो नाही !

मंदिराभोवतीच्या प्रांगणातील भलामोठा पितळी ज्ञानदीप  हे ह्या मंदिराचे खास वैशिष्ट्य. हा ज्ञानदीप, दीपमाळ आणि उंचच उंच गरुडस्तंभ वरपर्यंत न्याहाळातच आपण देवळाच्या मुख्य सभामंडपात प्रवेश करतो. द्वारपाल आपले स्वागत करायला उत्सुक असतात. मधलं दालन ओलांडून आपण पुढच्या सभागृहांत पोहोचतो. लांबूनच आपल्या देवीची मूर्ती समयांच्या मंद, सौम्य प्रकाशात दिसू लागताच अनन्य  भावाने तिला शरण जातो. सकाळच्या प्रसन्न वातावरणांत देवीची पूजा,अभिषेक चालू असताना मंदिरातील त्या वातावरणांत अगदी समरस होतो. दर्शनाला आलेल्या भक्तांची एकच लगबग सुरु असते. हे दृश्य टिपत असतानाच आपल्या मनांत देवीचा नामजप, स्तोत्र इ.आवर्तने सुरु होतात. आपला अभिषेक, पूजा झाल्यावर गुरुजी मंदिराच्या आतल्या भागांत,गर्भगृहांत आपल्याला बोलवून घेतात. देवीचा अधिक निकट सहवास मिळाल्याचा आनंद मनांत दाटून येतो. आपल्या कुटुंबासाठी मग गुरुजी देवीला साकडं घालतात. कोकणी हेल काढून देवीपुढे घातलेले गाऱ्हाणे, आपल्या सगळ्या अडचणी आता नक्की दूर होणार ह्या भावनेने आपण निःशंक होतो. हात जोडून मनोभावे तिची प्रार्थना करतो. त्या भारलेल्या वातावरणांतून पाय खरं तर बाहेर निघतच नाही. 

साक्षांत विष्णूचा अवतार म्हणजे देवी " महालसा  नारायणी " परब्रम्ह स्वरूपिणी ..

शाळीग्राम शिलेवर स्थित महालसा  देवीची  मूर्ती सूर्याप्रमाणे प्रकाशमान आहे. भगवान विष्णूचे हे मायारूप. अमृतमंथनातून निर्माण झालेले अमृत दैत्यांना न मिळता फक्त देवांना मिळावे ह्या हेतूने विष्णूने हे रूप धारण केले. हे मोहिनी रूप अलौकिक सुंदर आहे. चेहेऱ्यावर मंद हास्य विलसत आहे. दैत्यांच्या निर्दालनासाठी हातात खड्ग, त्रिशूल धारण केले आहे. कौशल्याने कारभार सांभाळणारी "धुरंधर" अशी ही देवी. देवीचे सकाळी कन्यारूपांत, माध्याह्नकाळी नवयौवन रूपात तर सूर्यास्तसमयीं वृद्ध सौभाग्यवती स्त्रीरूपांत दर्शन होते. विविध वस्त्र प्रावर्णानी  आणि अलंकारांनी वेगवेगळ्या रूपांतील देवीचे अविष्कार मनमोहक असतात. चंपाषष्ठी आणि  इतर महत्वाच्या दिवशी देवीची विशेष अलंकारसेवा करून पूजा बांधली जाते. 

भक्तांच्या सेवेने प्रसन्न होऊन शरण आलेल्या भक्तांचे सर्व क्लेश, रोगबाधा ही जगन्मोहिनी  हरण  करते, सुखसौभाग्य देऊन, भुक्ति-मुक्ती प्रदान करते तिच्या भक्तीने ज्ञानाची प्राप्ती होते. त्यासाठी लागतो तो अनन्य भाव

दुपारच्या आरती नंतर मिळणारे भोजन,देवीचा प्रसाद म्हणजे अमृतमयी  चव. वाफाळलेला गरम भात, आमटी, अननसाची कढी, गोड पायस... अहाहा... मन अगदी तृप्त होतं . मंदिराभोवतीच असणाऱ्या धर्मशाळेत क्षणभर विसावून संध्याकाळच्या पालखीसेवेसाठी पुन्हा हजार व्हायचे. देवीला प्रिय असलेला रविवार हा देवीच्या सेवेचा मुख्य दिवस. त्या दिवशी संध्याकाळी निघणाऱ्या देवीच्या पालखीत सहभागी होणं हा एक आनंद-सोहोळाच असतो. विविध प्रकारच्या फुलांनी, माळांनी सजवलेली पालखी, त्यांत हातांत ढाल तलवार ह्या आयुधांनी लढवय्या रूपांत विराजमान झालेली देवीची तेजस्वी मूर्ती. वाद्यांच्या गजरात ही  पालखी मंदिराबाहेर एक प्रदक्षिणा घालते. भान हरपून टाळ  मृदूंगाच्या  गजरात  भक्तजन ह्या पालखी प्रदक्षिणेत सहभागी होतात. वाटेत मधेमधे थांबून भजनसेवा, गायनसेवा अर्पण करतात. हा सर्व अनुपम्य सोहोळा ह्याची देही, ह्याची डोळा अनुभविणे म्हणजे इहलोकीवरील स्वर्गसुखच. पालखी सेवेत सामील झाल्यामुळे भक्तिभाव उदित होऊन मनाला सुख ,शांती,प्रसन्नता लाभते. विशेष प्रसंगी किंवा उत्सवाच्या निमित्ताने  मंदिराबाहेरील  ज्ञानदीप काही भक्त इच्छित फ़लप्राप्तीनंतर प्रज्वलित करतात. रात्रीच्या गडद अंधाऱ्या पार्श्वभूमीवर उजळून निघालेला हा "ज्ञानदीप" आपल्या अंतःकरणातील तेजाची ज्योतही प्रज्वलित करतो आणि अज्ञान अंध:काराचा काही अंशाने विनाश होतो. पौर्णिमेच्या धवल चंद्रप्रकाशात मंदिराचा सोन्याचा गोल घुमटाकार  मोठ्ठा कळस न्हाहून निघतो, हे दृश्य बघताना होणारा आनंद सुद्धा मनीमानसी  दीर्घ काळ रेंगाळणारा. 

पालखीनंतर होणारा आणखी एक प्रसंग अनुभवण्यासारखा. तो  म्हणजे देवीच्या पालखीतील गुच्छाचा लिलाव. बोली लावून जास्तीत-जास्त बोली लावणाऱ्या भक्ताला हा पुष्पगुच्छ मिळतो. आरती-प्रसादानंतर देवीला गाऱ्हाणे घालतात मग त्या दिवसाची सांगता होते. कुलदेवीची अल्प का होईना सेवा घडली हा आनंद मनात साठवत, तिच्या आशीर्वादाचे पाथेय बरोबर घेऊन परतीची वाट नाईलाजाने धरावी लागते. संसारातील  पुढच्या वाटचालीसाठी बळ मिळावे म्हणून देवीची प्रार्थना करून परतीचा प्रवास सुरु होतो.  

आपल्या कुलदेवीचे दर्शन, पूजन, उपासना तसेच  कुलधर्म, कुलाचाराला अनुसरुन रितीरिवाजांचे यथाशक्ती पालन करणे प्रचंड ऊर्जादायी आहे.ही यात्रा नित्यनेमाने घडल्यास भक्तांचे नक्कीच कल्याण होते.  .  

शब्द-दिंडीच्या माध्यमातून ही सेवा कुलदेवीच्या चरणकमळाशी समर्पित करताना, मनांत दडलेल्या प्रत्यक्ष दर्शनाची अभिलाषा पूर्ण व्हावी म्हणून त्या सर्वशक्तिमान "नारायणीला" साकडे घालते. 

                        या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता   ।

                        नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥


स्नेहा भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई 

अक्षय्य तृतीया शके १९४३ ( १४/०५/२०२१)

sneha8562@gmail.com



Wednesday, April 28, 2021

ऋण मैत्रीचे

                                            ।। श्री शंकर ।।

                                  ऋण  मैत्रीचे  


प्रिय १९७६ बॅच ,

सन १९६१ ते  २०२१ ....  आताआपण सर्वच वरिष्ठ नागरिक झालो (आपणअजूनही हे खरं मानायला तयार नाही , तरीही ) , आपल्या जीवन प्रवासातील  पुढचा टप्पा , उत्तरायण , सुरु झालंय  . ...ह्या निमित्ताने सर्वांशीच   हितगुज करतांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा ही  देते. 

अंबरनाथ: आटपाट नगरांतील आमचं  एक छोटंसं गांव . गाव जरी छोटं ,तरी कर्तृत्वाने  मोठं . आकाशाच्या देवाची , शिव शंकराची वर्षानुवर्षे आपल्याला लाभलेली कृपादृष्टी ... आमचा अंबरनाथकरांचा अभिमान असलेलं प्राचीन लेणं ,पुरातन हिंदूसंस्कृतीचा वारसा जोपासणारं" शिवमंदिर  "... ... आमच्या गावाच्या नावलौकिकात भर घालणारे विमको कंपनी सारखे अनेक प्रसिद्ध  कारखाने.   आमच्या ह्या गावाला निसर्गाचाही वरदहस्त लाभलेला... एखाद्या  हिलस्टेशन सारखं सौन्दर्य ... नागमोडी, उंचसखल रस्ते,हिरवाई ,आमराई ,टुमदार बैठी घरे ... मर्यादित लोकवस्ती ,त्यामुळे शांतता ... गर्दी -गोंधळ कमीच ... आणि हो ... सगळ्यांत महत्वाचं म्हणजे साधी- भोळी माणसं .अगदी त्या भोळ्या शंकरासारखीच ... परस्परांतील जिव्हाळा जपणारी ... सच्या दिलाची ... अनौपचारिक नात्यागोत्यांनी बांधलेली .  

ह्याच गावातील आमची शाळा " महात्मा गांधी विद्यालय " भाग्यवशात आम्ही ह्या शाळेचे विद्यार्थी .. शाळेची केव्हढी प्रशस्त इमारत ,मोठे क्रीडांगण ,भव्य खुले नाट्यगृह ,शाळेच्या स्नेह संमेलनाच्या निमित्ताने त्या मॊठ्या स्टेजवर  केलेली नाटक ( इंग्रजी च्या देशपांडे मॅडमनी एक इंग्लिश नाटक बसवलं होतं ,त्यात मी सतीश अत्तरदे आणि मला वाटतं किशोर देशपांडे ह्यांनी काम केलं होतं ,निम्मे संवाद इंग्रजीत बोलायचे असल्याने बहुतेक आम्ही विसरलोच ).विद्यार्थ्यांच्या समूह प्रार्थनेत " बलसागर भारत होवो " चे पटांगणात घुमणारे सूर ,पी .टी ./खेळाचा तास ( खेळांत मी अगदी ढ ) विद्यार्थ्यांच्या ज्ञानांत भर घालणाऱ्या अद्ययावत विज्ञान -प्रयोगशाळा, संगीत -शिवणकला( शिवण शिकवणाऱ्या देसाई मॅडम,त्यांचे माझे धागे कधीच जुळले नाहीत, कायम त्यांच्याकडून ओरडाच खाल्ला ) ,चित्रकला ह्याचे स्वतंत्र कक्ष . शाळेच्या भल्यामोठ्या,खुल्या  आवारांत ,आजूबाजूला मोठाले वृक्ष , डुलणारी हिरवी शेते ,उसाचे पांढरे तुरे .. .किती सुंदर होती नाही आपली शाळा !!!.. शाळेचं वातावरण त्यामुळे  प्रसन्न असायचे .  आमच्या सर्व शिक्षक /शिक्षिकाही उत्तम शिकवणाऱ्या ..आणि मुख्याध्यापक  नवांगुळ सर ( आडनावावरुन कायम टर उडवणारी मुले, सॉरी संध्या  )... .शालेय जीवन हा एक आनंददायी अनुभव होता. 

इथेच तर आपण  सर्व एकत्र आलो .. आणि   एकमेकांशी मैत्रीच्या नात्याने घट्ट बांधले  गेलो  नाही ?त्या निरागस वयांत कोणाच्याही मनांत  असूया , द्वेष -मत्सर हे भावही नव्हते कधीच  ..त्यामुळे कधी कोणाशी भांडण झालेलेही आठवत नाही .वातावरण अगदी मोकळं-ढाकळं आणि त्यावेळी अभ्यासाचा ताण नव्हता ,आजच्यासारखी जीवघेणी स्पर्धाही नव्हती. .  अभ्यासाच्या निमित्ताने एकमेकांच्या घरी जाणे-येणे ... कधीही ,केव्हाही..आजच्या सारखं फोन करून अपॉइंटमेंट नाही की व्हाट्सअँप मेसेज नाही .मी मंगल आणि आरती .आमराईत झाडाखाली बसून आमचा अभ्यास चालायचा ,निसर्गाच्या शाळेत. ... अगदी अनौपचारिक वातावरणातच वाढलो . मैत्रिणीचे घर तेही  आपलंच दुसरं घर आणि तिच्या घरच्यांशी सुद्धा तेव्हढ्याच गप्पा गोष्टी ...   अशी आपुलकीची नाती. कोणाला काही अडलेले अभ्यासाचे  प्रश्न विचारतांना कधी संकोच वाटतच नसे. त्या न कळत्या वयांत तयार झालेले हे बंध आजही त्याची वीण अगदी तशीच घट्ट.पुढच्या प्रवासांत अनेकांशी मैत्री झाली पण लहान वयांत झालेली ही  मैत्री ,त्यातील आपलेपणा ह्या पुढच्या मैत्रीत  आढळत नाही बहुधा. 

आपल्या सगळ्या मैत्रीणींत , स्मिता देवस्थळी अभ्यासात  खूप हुशार. कायम पहिला नंबर . दहावीलासुद्धा तिने उत्तम गुण मिळवून , तिचा पहिला नंबर सोडला नाही. अतिशय साधी ,नम्र स्मिता.नावाप्रमाणेच तिच्या मुखावर स्मितहास्य विलसत असे ,आजही हे स्मितहास्य संसार आणि करिअर व्यवस्थित सांभाळून अगदी तसेच आहे. तिला कधी जोरात, मोठ्या आवाजांत बोलताना ऐकलेले नाही. अगदी मृदू स्वभाव . आज एका प्रथितयश कॉलेज मधून गणिताची प्राध्यापक म्हणून निवृत्त झाली तरीही स्मिता अगदी तशीच आहे शालेय जीवनांत होती तशीच.

हुशार स्मिताच्या अवती-भोवती आम्ही सर्व मैत्रिणी असायचो . तिच्या सहवासामुळे आमचाही बुध्यांक वाढेल अशी काहीशी माझी भाबडी समजूत होती.  गणित शिकायच्या निमित्ताने आणि एरवी सुद्धा तिच्या घरी कायम जाणे-येणे असायचे.स्मिता अगदी मनापासून आमच्या अभ्यासाच्या अडचणी सोडवायची. स्मिताचे एकत्र ,मोठे कुटुंब .  तिच्या आजी पासून सर्वांशीच मनमोकळ्या गप्पा व्हायच्या. विद्यार्थी  परिषदेचे  कार्यक्रम त्यांच्या  घराच्या  मोठ्या  गच्चीवरच  होत. त्यामुळे स्मिता आणि  देवस्थळी परिवाराशी आम्हा मैत्रिणींचा कायम संबंध यायचा . माझे  कुटुंबही काही ना काही निमित्ताने संपूर्ण देवस्थळी परिवाराशी  चांगले जोडले गेले होते. आमचे ऋणानुबंध घट्ट होते .  

मी पदव्युत्तर शिक्षण घेत असताना  मला गणित विषय खूप अवघड जात होता. मैत्रीच्या नात्याने स्मिताने त्यावेळी मला खूपच मदत केली होती . त्यावेळी तिच्या मार्गदर्शनामुळे मी ही  परीक्षा पास झाले होते.स्मिता , आपल्या नात्यांत कधीच औपचारिकता नव्हती नाही का ? त्यात मैत्री , प्रेमच अधिक  होते. 

शालेय जीवनानंतर पुढचे उच्च शिक्षण,नोकरी व्यवसाय हा जीवनातील महत्वाचा टप्पा आपण ओलांडून आता यंग सिनिअर ची सेकंड इनिंग खेळण्यासाठी " तैयार " आहोत. आजपर्यंतच्याआयुष्यात आपण अनेक आनंदाचे क्षण अनुभवले असतील.तसेच काही दुःखाचे,अडचणींचे  प्रसंगही आले असतील . आता  निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य  शांत , स्थिर असेल अशी आशा आपण करूया. सध्याची प्रतिकूल परिस्थिती काही काळानंतर पूर्ववत  होऊन जीवन लवकरच सुरळीत होईल ,नाही का ?आजपर्यंतची  राहिलेली स्वप्ने पूर्णत्वाला न्यायची   कोणाची तयारी सुरु असेल.स्वप्नपूर्तीच्या वाटेवरच प्राप्त परिस्थितीत स्वतः आनंद मिळवायचा  आणि दुसर्यांनाही आनंदाचं देणं भरभरून द्यायचा प्रयत्न करूया ,झपाट्याने बदलत असलेल्या technology शी नाते अधिक घट्ट करताना  . नव्या पिढीच्या  नव्या तराण्याशी सूर जुळवत आपली वाटचाल चालू ठेवू. आता मिळालेल्या मोकळ्या  वेळेचेही.( व्हाट्स अँप आणि इतर सोशल मीडिया बघून मग जो उरेल तो वेळ )  योग्य  नियोजन करून आयुष्याचे सार्थक करू..   

चला तर मग .... अशा नव्या बदलांना  समर्थपणे सामोरं जाऊन  उर्वरित आयुष्य  सुखासमाधानाने व्यतीत करूया. हो आपले मैत्रीचे नातंही अधिक दृढ करूया. 

कवयित्री शांताबाई शेळक्यांच्या शब्दांत : 

मला वाटते गं नवा जन्म घेऊ । नवे श्वास गुंफू ,नवे गीत गाऊ 

जुना गांव राही कुठे दूर मागे । नव्या पावलांना नवा मार्ग देऊ ।।  नवा जन्म घेऊ... नवा जन्म घेऊ... 


तुमचीच  बालमैत्रीण ,

किशोरी विष्णु किंजवडेकर ( स्नेहा भाटवडेकर )

विलेपार्ले ,मुंबई 

११/०६/२०२१ 


Friday, April 23, 2021

Sevu Nenatil Rasa ( सेवू नेणतिल रसा )

।। श्री शंकर ।।


सेवू नेणतिल रसा 

वस्त्र सुंदर केशरी । चपलेपरी तळपे कटि ।रत्न कौस्तुभ राजते हृदयावरी रवि हिंपुटी ।

शन्ख चक्र गदा करीं कमलासवे अभयास दे । रम्य रूप असे अनंत हृदांत  संतत राहू दे ।।

आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद भारती ह्यांनी त्यांच्या काव्य पंक्तीत रेखाटलेली वरद नारायणाची भव्य आणि रम्य प्रतिमा आपण ध्यानमंदिरांत प्रवेश करता क्षणीच आपल्या हृदयाचा ठाव घेते. निळ्या आकाशाच्या आणि आकाशाला गवसणी घालणाऱ्या हिमशिखरांच्या पार्श्वभूमीवर अर्धपद्मासनातील ही विराजमान मूर्ती ... आपली नजर अगदी खिळवून ठेवते. हिमशिखरांवरून नारायण भेटीसाठी अनिवार ओढीने धावत आलेला गंगेचा प्रवाह ...ह्या प्रसन्नतेत भर घालतो.आकाशांत उगवलेली चंद्रकोर आपल्या मनालाही शीतलता प्रदान करते. प.पूज्य स्वामी वरदानंद भारती (आपले अप्पा ) ह्यांना पूर्णत्वाने लाभलेला ह्या वरदनारायणाचा आशीर्वाद... त्याची दिव्य प्रभावळ ... त्या तेजोमय प्रकाशात  आपणही  तेजाचा  कवडसा शोधण्याचा प्रयत्न करतो. . किंबहुना ह्या तेजाची अनुभूती भाविकांना घेता यावी ह्यासाठीच हे ध्यानमंदिर. 

नांदेड जवळील गोरटे येथे संतकवी दासगणु महाराजांच्या समाधीला आपण भेट देतो तेव्हां आवर्जून आपली पावले ह्या निःशब्द अशा ध्यानमंदिरांत वळतात. इथली शांत, निर्वात पोकळी ही नारायणाच्याच अस्तित्वाने भारलेली असते. वरद नारायणाची मोहिनी आपल्या मनावर अधिराज्य गाजवतानाच आपण त्याच्या चरणकमळाशी नतमस्तक होतो. थोड्या वेळाने भानावर आल्यावर ते अर्धोन्मिलीत नेत्र जणू काही आपलीच ख्यालीखुशाली विचारत आहेत असे वाटून नकळत मनांत संवाद सुरु होतो. हो ! इथे मोठ्या आवाजांत  बोलायला मनाई आहे ना !

सकाळी सातच्या ठोक्याला लगबगीने आवरून ध्यानमंदिराच्या पायऱ्या चढतांना नारायणाला भेटायची केवढी ओढ मनांत दाटलेली असते. शांत वातावरणांत सुरु झालेल्या ध्यानमंदिरातील प्रार्थनेमुळे मनाची प्रसन्नता, उत्साह वाढू लागतो. धीर गंभीर, संथ स्वरातील प्रार्थनेचे पडसाद मनांत उमटू  लागतात. नारायणाच्या नाम- जप आणि ध्यानामुळे  ते सगुण  रूप अंतर्यामी  साकारू लागते. 

मग संतश्रेष्ठ तुकाराम महाराज ह्या नारायणाच्या नामाचा महिमा आपल्याला त्यांच्या अभंगातून  समजावून सांगतात. त्यांच्या जनोद्धारासाठी तळमळणाऱ्या हितकर शब्दांच्या जाळ्यात आपण अगदी अलगद अडकतो. तुकाराम महाराजांचा विठ्ठल इथे आपल्याला नारायण रूपांत भेटतो 

नारायण ऐसा सेवूं नेणतिल रसा । जेणें भवव्याध तुटे, दुःख मागुते न भेटे ।।

न लगे काही आटी, बाधा राहू न शके पोटी । कैवल्य ते जोडे कृपा लौकरी घडे ।

जन्म मरण दुःख आटे, जाळे अवघेचि तुटे । तुका म्हणे झाला याचा गुण  बहुताला ।।

ह्या अभंगात तुकाराम महाराज सर्वसामान्य मनुष्याला संसारात दुःख भोगावे लागू नये , यासाठी उत्तम उपाय सांगत आहेत. . महाराज  म्हणतात, नारायणाच्या नामासारखे उत्तम औषध नाही.  पण लोक त्या औषधाचे सेवन करीत नाहीत. प्रेमाने केलेल्या नामस्मरणाने भक्तिरसाचे सेवन केले तर परमेश्वर अधिक संतुष्ट होतो. दुस्तर,अवघड असा हा भवसागर भक्तिमार्गाने अगदी सहज पार करता येतो. संसाराची आसक्ती कमी होऊन, ह्या संसाराशी असलेली नाळ तुटते. प्रत्येकाला सुखाची अभिलाषा असते आणि दुःख वाट्याला येऊ नये म्हणून सर्वजण धडपडत असतात.  नामस्मरणामुळे दुःखाचा मागमूसही तुमच्या जीवनात राहात नाही. प्रारब्ध भोग अटळ आहेत हे जरी खरं असलं, तरी त्या दुःखाची  तीव्रता नामजपामुळे कमी होते. जीवन मृत्यूच्या दुःखद चक्रातून सुटका होते, नारायणाची भक्ती फलद्रुप झाली तर शाश्वत सुखाची, आनंदाची प्राप्ती होते. असा विश्वास महाराजांना आहे. 

परमेश्वर प्राप्ती हे मनुष्यजन्माचे खरे सार्थक. त्यासाठी विविध साधने आहेत. त्यापैकीच एक  नाम / जप साधना. नामजप अगदी साधी सोपी, सहज साधना आहे. त्यासाठी  कोणतीही विशेष खटपट करावी लागत नाही. नामसाधनेत असामान्य शक्ती दडलेली आहे. भावना किंवा वासना हे संसाराचे मूळ आपल्यासारख्या सामान्य जनांसाठी. पण हीच वासना ईश्वराच्या ठिकाणी शुद्धसत्त्वात्मक स्वरूपात असते. त्यामुळे सृष्टीची बाधा ईश्वराला होत नाही. नामस्मरणामुळे आपल्या वासना क्षीण होतात. संसार निर्मूळ होतो. म्हणून नामानेच कैवल्य किंवा मोक्षप्राप्ती होते असे महाराज सांगतात. 

 ह्या मायाजाळाचा नाश करून जन्म मृत्यूच्या जाळ्यातून बाहेर पडायचंय ना ? मग भक्तिरसाला वरा ! ह्या रसमय परिपोषाने तुम्हाला नारायणाची भेट अगदी लवकर आणि नक्की घडेल. महाराज अगदी निःसंदिग्धपणे अज्ञानी जीवांना  त्यांच्या हिताचा मार्ग दाखवत आहेत. 

महाराष्ट्राचे संस्कृती पुरुष म्हणजे संत तुकाराम महाराज. महाराष्ट्रातील जनतेच्या मानसिकतेची अचूक नस त्यांना सापडली होती. महाराजांनी ह्या अभंगात अगदी थोडक्यात संपूर्ण जीवनाचे रहस्य उलगडून दाखविले आहे. त्यातील शब्द-सामर्थ्याने आपल्याला नेमके काय करायचे आहे त्याचा बोध होतो. संसार कोषातून बाहेर पडण्यासाठी मन आक्रन्दू लागते, वारंवार त्या नारायणाला साकडं घालते. 

तुकाराम महाराजांनी ह्या अभंगात  भक्तिरसाचा अनुभव घ्यायला सांगितले आहे.  आपल्या जीवनांत  " शृंगार ,वीर ,करुण ,हास्य ,भयानक, बीभत्स, रौद्र, अद्भुत आणि शांत " असे इतर अनेक रस आहेत  शरीर धारणेसाठी यातील काही रस आवश्यक आहेत. मानवी जीवन अशा विविध रस- रंगांनी  परिपूर्ण झाले  आहे. ह्या रस- रंगांमुळेच जीवनाची लज्जत वाढते. जीवन एकसुरी न होता, रंगीन होते, बहरते. नवरसांमुळे जीवन जगताना अनेकविध  अविष्कार अनुभवता येतात.  पण मिळणारे सुख शाश्वत नसते. शाश्वत सुख / आनंद मिळविण्यासाठी  भक्तिरसाचे प्रेमाने सेवन केले तर   आपले जगणे समृद्ध होते . ह्यातून जीवनाविषयी सखोल तत्वज्ञान, वैचारिक दृष्टी तयार होते. आपले जीवन ह्या सर्व परिस्थितीतून तावून सुलाखून निघते, तेव्हाच ब्रह्म-अनुभव घायची योग्यता निर्माण होते. मनुष्याचा स्वभाव असा आहे कि दुःखातच त्याला ईश्वराची आठवण होते म्हणून कुंतीनेहि नाही का परमेश्वराजवळ त्याची निरंतर आठवण राहावी म्हणून ,आपदा / दुःख मागून घेतले !  इतर रस आपल्याला अनुभवायला मिळतील ती ईश्वरेच्छा आहे असे मानून ते स्वीकारले तर दुःखाची तीव्रता  कमी होते. मग मन संसारापासून आपोआपच अलिप्त होते. देहबुद्धी गळून पडते. मन निर्लेप होऊन भगवंतापाशी स्थिरावते. .कैवल्याचे चांदणे आभाळभर पसरते. 

उपनिषदांत परमात्म्याचे वर्णन " रसो वै सः " असे केले आहे. परमात्मा हा आनंददायी आहे. आनंदाचा महासागराच..कष्टसाध्य प्रयत्नातूनच परमात्म्याची प्राप्ती होते आणि मग मिळणारा आनंद हा अवर्णनीय, चिरंतन असतो. हा आनंद एकदा  प्राप्त केला कि ह्या  जीवनाचे सार्थक होते .  

  " ऐसी कळवळ्याची  जाती " ... संत मंडळी ह्या नरजन्माचे सार्थक कशात आहे हे आपल्याला अगदी कळवळून सांगतात. जनता जनार्दनाला ह्या भवसागरातून  उद्धरून नेण्यासाठीच ते  जन्म घेतात, विविध माध्यमातून लोकांना उपदेश करून त्यांच्या हिताची काळजी सदा सर्वदा वाहतात. संतांचें मन अतिशय निर्मळ, सात्विक विचारांचा वाहणारा शुद्ध ,स्पष्ट झरा. म्हणूनच त्यांचे शब्द हे भाविकांच्या अंतःकरणला स्पर्श करतात.   

संतकवी दासगणु महाराज आणि स्वामी वरदानंद भारती ह्या संतांच्या तपःपूत आचरणातून आणि विविध संतांच्या मांदियाळीतून प्रगट झालेला भक्तिभाव आपण गोरट्यासारख्या तीर्थक्षेत्री अनुभवू शकतो. सर्व संतांच्या विचारसरणीचा समन्वय आपला विचार-विवेक इथल्या वास्तव्यात जागृत करतो. विष्णुसहस्रनामाच्या चौरस आहारामुळे आपला भक्तिमय कोष ही समृद्ध होतो. भक्ती रसाच्या प्रेमपान्ह्याचे पान सर्वसामान्य अज्ञानी जीवांसाठी इथे  मुक्तपणे खुले आहे. आपलंही संचित थोर म्हणून वरद नारायण आपल्याला ह्या रसाची गोडी चाखायला उद्युक्त करतो. 

नारायण ऐसा सेवू नेणतिल रसा ...... पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ....  



स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

चैत्र शु .एकादशी, शके १९४३ ( कामदा एकादशी )

संदर्भ ग्रंथ :

१ )  सार्थ श्री तुकाराम गाथा 

२)   मनोबोध : स्वामी वरदानंद  भारती ( प्राचार्य अनंत दामोदर आठवले )

Wednesday, March 24, 2021

Girnar Yatra ( गिरनार यात्रा )

                                             ll श्री शंकर   ll                          

                       गिरनार यात्रा 

मूकं करोति वाचालं, पंगुम लंघयते गिरिम ।

यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं   ।।

सर्व जग हे परमेश्वरी सत्तेने चालते. परमेश्वराची कृपा असेल आणि आपल्या मनांत तेव्हढीच उत्कटता असेल तर अशक्य ही  शक्य होते ह्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. .

 भरतवर्षात निसर्गाचे वैविध्य अनेक ठिकाणी अनुभविता येते. अनेक तीर्थक्षेत्रं ह्या विविधतेचा साक्षात्कार घडवत  असतात. आपण भारतीय खरंच भाग्यवान,अशी अनेक तीर्थक्षेत्रे इथे आहेत. प्रत्येक स्थानाचे काही माहात्म्य आहे.भौगोलिक वैशिष्ट्यही आहे. त्यासाठी स्वतः ह्या क्षेत्रांना भेट द्यायला हवी.

काही यात्रा विनासायास घडतात. काही यात्रा मात्र आपल्या सगळ्याच क्षमतांची कसोटी घेतात. हिमालयातील चारधाम यात्रा ही अशीच एक अवघड यात्रा. काश्मिरमधील अमरनाथ आणि वैष्णोदेवी आणि कैलास मानसरोवर ह्या यात्राही अद्भुत, विलक्षण अनुभव देणाऱ्या. हेच तर खरे जीवनाचे सार्थक अशी अनुभूती देणाऱ्या. ह्या सर्व प्रवासांत तन -मन -धन अर्पावे लागते. 

" देखणी जीवने जी तृप्तीची तीर्थोदके l चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे ll 

कवी बा. भ. बोरकरांच्या नजरेतून एका वेगळ्या तीर्थाचा परिचय आपल्याला होतो. अत्युच्य, ध्येयवादी जीवन जगल्यावर येणारी जी तृप्तता असते त्यामुळे ते जीवनच देखणें  होते. .  

 निसर्गाच्या शक्तीपुढे माणसाचे खुजेपण प्रकर्षाने जाणवते. प्रवासाच्या अथवा तीर्थाटनाच्या निमित्ताने हा निसर्गाचा चमत्कार अनुभविता  येतो. निसर्ग म्हणजेच ब्रह्म. ब्रह्म हा शब्द बृहत आणि महान ह्या शब्दांनी बनला आहे. निसर्गही महान आहे. ब्रह्मज्ञान घडविणारा. म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात शक्य असेल तेव्हढे राहून हा अनुभव घ्यायचा, तीर्थयात्रेच्या निमित्ताने निसर्ग शक्ती आणि ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार अनुभवता येतो. गिरनार यात्रेत निसर्गाचे कणखर रूप बघता येते. ही  यात्रा  खडतरच. ही  बिकट वाट दत्तगुरु " चालविसी हाती धरूनिया " पार करून घेतात आणि आपल्याला सामर्थ्य प्रदान करतात. त्यामुळे मनाचे पंगुत्व नष्ट होऊन आत्मविश्वास  प्राप्त होतो. .  

गुजरात राज्यांतील सौराष्ट्र प्रांतात जुनागढ जवळ  गिरनार हे दत्तक्षेत्र प्रसिद्ध आहे. गिरनार पर्वतरांगांच्या सभोवताली गीरचे घनदाट जंगल आहे. हिंस्र प्राण्यांचा इथे वावर असतो. कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा ह्या जंगलात चालत ( ३५ ते ३८ कि,मी,) परिक्रमा करण्याची संधी प्राप्त होते.

हिमालयापेक्षाही जुना पर्वत रेवतक पर्वत म्हणजेच गिरनार. शिवपुराणांत, स्कंदपुराणात ह्या पर्वताचा उल्लेख आढळतो. प्रभूश्रीराम, पांडव ह्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी अनेक सिद्धयोग्यांच्या तपाने पावन झाली आहे. साधारण १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास ह्या स्थानाला  लाभला आहे. अशा निसर्गरम्य, परमपवित्र  गिरनार क्षेत्री निवास करणे हा एक विलक्षण अनुभव असतो. 


आत्ताच १ मार्चला हा गिरनार पर्वत चढण्याचे भाग्य दुसऱ्यांदा लाभले. आम्ही पहाटे ४.३० वाजता पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दत्तगुरूंना " तुमचे मनासारखे दर्शन होऊन  यात्रा सुफळ, संपूर्ण होऊ दे " अशी  प्रार्थना केली. हनुमानजींचे दर्शन घेऊन यात्रेसाठी  लागणारी  शक्ती प्रदान करावी अशी विनंती केली. 

पहाटेची निरव शांतता. वातावरणांत भरून राहिलेला गारठा.आकाशाचे विभ्रम अनुभवीत, दत्तगुरूंचे नाव घेत  एकेक पायरी चढायला सुरवात होते. थोड्या थोड्या अंतराने  क्षणभर विसावा घेत मजल -दरमजल करत वाटचाल सुरु होते. सुरवातीची वाट ही बऱ्यापैकी सुसह्य. दोन्ही बाजूला असलेली दुकानांची जाग, झाडे, ह्यामुळे रस्ता अंधारातही भीतीदायक वाटत नाही. तीन -साडेतीन हजार पायऱ्यांपर्यंत जैन लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . तिथे नेमिनाथांचे दर्शन घेऊन थोडे ताजेतवाने होऊन पुढच्या दोन हजार पायऱ्या चढून ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबामातेचे दर्शन घ्यायचे.अंबामातेचे दर्शन घेण्यापूर्वी ह्या मधल्या टप्प्यावर पोहोचल्यावर आता पुढे जायचे कि थांबायचे अशी मनाची व्दिधा अवस्था होते..हळूहळू सूर्याची प्रभा ही आकाशात फाकलेली असते. दूरवरची शिखरे आणि वारंवार चढत जाणाऱ्या पायऱ्या मार्गाचे काठिण्य अधोरेखित करत असतात पुढची चढाई करण्यासाठी "सामर्थ्य दे आई ! " अशी प्रार्थना अंबामातेला करायची आणि पुढची अवघड वाट निश्चयपूर्वक चालण्याचा संकल्प मनोमन करायचा. अंबा माता जादूची कांडी फिरविते. अद्भुत शक्तीचा संचार होतो आणि  पुढचे अंतर त्यामानाने लवकर पार होते. वाटेत ह्या  पर्वतशिखरांच्या श्रुंखलेतील ५५०० हजार पायऱ्यांवर सर्वोच्चशिखर असलेले  गोरक्षनाथांचे दर्शन घ्यायचे. गोरक्षनाथांनी तपःसामर्थ्याने दत्तगुरूंना प्रसन्न केले आणि मला तुमच्या पादुकांचे सदैव दर्शन घडू दे अशी प्रार्थना केली .दत्तगुरु आपल्या भक्तावर प्रसन्न झाले. गोरखनाथांची धुनी सर्वात उंचावर ( ३६६६ फूट ) आणि दत्त पादुका त्यामानाने  थोड्या खाली आहेत.

 ९९९९ पायऱ्या चढून  परमगुरु  दत्तात्रयांचे वास्तव्य असलेल्या " गुरुशिखर "  सुळक्यावर चढून जाणे आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेणे हा असाच केवळ अशक्य वाटणारा प्रवास केवळ आणि केवळ " अशक्य ही शक्य करतील स्वामी " ह्याची प्रचिती देणारा.  सलग सहा तास आपण तीव्र चढाच्या पायऱ्या चढत / उतरत असतो आणि बापरे कधी ही वाट संपणार! ह्याचा अंदाज घेत घेत पायऱ्या चढताना  कधी त्या उंचीवर येऊन दत्तगुरुंपुढे नतमस्तक होतो हे कळतही नाही. १०X १९ चौ .फुटात दत्त पादुका (जिथे दत्तगुरूंचा अक्षय निवास असतो), सुबक त्रिमूर्ती, प्राचीन गणेश, हनुमानाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. बसण्यासाठी अगदी बेताची जागा असल्यामुळे अगदी थोडावेळच थांबून  दर्शन घेऊन, तिथले वातावरण मनाच्या गाभाऱ्यात भरून घ्यायचे. तिथला परिमळ अनुभवायचा आणि तुमची इच्छा असेल तर पुन्हा परत येऊ  असे म्हणत अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेत, परतीचा प्रवास सुरु करायचा. एव्हढे श्रम करून वर पोचल्यावर अगदी कमी अवधीच्या दर्शनाने मनाला चुटपूट लागते. मग बाहेरच्या पायरीवर बसून  स्तोत्रपठण  -नाम जप करून पुन्हा पुन्हा ते रूप आठवायचे.   

दत्तगुरूंचे दर्शन घेऊन जड पावलांनी ३०० पायऱ्या खाली उतरून कमंडलू स्थान येथील सोमवारीच प्रज्वलित होणाऱ्या धुनीचे दर्शन घेतले. ५००० वर्षांपूर्वीच्या ह्या धुनीत दत्तगुरु अग्निरूपांत निवास करतात अशी भावना आहे. तेथील स्वादिष्ट प्रसाद भक्षण केला. चढाईच्या अतिश्रमानंतर हा प्रसाद अमृततुल्य वाटतो. परत पायऱ्या चढण्या- उतरण्याचा पाय थकविणारा प्रवास. परतीच्या प्रवासात ह्या वेळी रोप-वे चा अनुभव घेतला. अंबामातेच्या मंदिराबाहेर ही  नवीन,आकर्षक आणि सुखदायी सोय भक्तांसाठी करण्यात आली आहे. 

           " जय गिरनारी " असा घोष करत चालताना आपल्याला सोबत करणारे      "अब थोडाही बाकी है" असा  धीर देतात. काही मौलिक सूचना करतात. त्यांच्याशी चार शब्द बोलताना आपला शीण थोडा हलका होतो. दत्तगुरूंच्या दर्शनाने शांत झालेले मन ,परतीच्या प्रवासांत निवांतपणे आजूबाजूच्या निसर्गाचा अविष्कार अनुभवू शकते.   कठीण राकट  असे हे सुळके ऊन पाण्याला तोंड देत वर्षानुवर्षे तसेच उभे आहेत. पावसांत विहरणाऱ्या ढगांचे दृश्य अनुभविता  येते तर थंडीत धुक्याने वेढलेले निसर्गसोंदर्य वेड लावते. भक्तांच्या उपासनेनुसार त्यांना काही विलक्षण अनुभव आल्याचे काही साधक सांगतात. पौर्णिमा किंवा इतर काही प्रसंगानुरूप  नियमितपणे येणारे काही साधक बघितले कि त्यांची सद्गुरूपाशी असलेली निष्ठा जाणवते. त्या बळावरच हि अवघड यात्रा ते अव्याहतपणे करतात . 

या गडावर निवासाची सोय नाही. अन्य सोयींचाही अभावच आहे.एरव्ही आपल्या घराचे दोन मजले चढ़तानाही धाप लागते.मग ही खडतर वाट चालण्याचे सामर्थ्य कशामुळे प्राप्त  होते? खाली आल्यावर मागे वळून बघतांना  तहान भूक ,शरीरधर्म एव्हढ्या वेळात विसरून आपण इतक्या उंचीवर जाऊन आलो ,ह्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. दहा हजार पायऱ्या चढण्याच्या कठीण परीक्षेत आपण यशस्वी झालो ह्याचे अप्रूप वाटते. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची ही कसोटी असते. ही अवघड परीक्षा दिली कि मग बाकी ठिकाणे  त्यामानाने सोपी वाटतात. 

सरकारतर्फे आता गिरनार क्षेत्रीं हळूहळू सोयी होत आहेत. उडन खटोलाची ( Ropeway) सोय झाल्यामुळे निम्मे अंतर आता कमी श्रमांत आणि वेळेत पार करणे शक्य झाले आहे.पायऱ्यांशिवाय गिरनारला जायचा अन्य मार्ग नाही. त्यामुळे दुकानदारांना आणि बाकी ओझी  वाहून नेणाऱ्यांना रोज पायऱ्या चढण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कष्टकरी लोकांचे पाय चालताना बघितले की वाईट वाटते. पोटाची इवलीशी खळगी भरण्यासाठी माणसाला  किती आटापिटा करावा लागतो ! ४० KG. चे गॅस सिलेंडर १०००० पायऱ्या वर/ खाली वाहून नेणाऱ्यांविषयी मनांत कणव दाटून येते. डोलीवालेही आपला भार उचलून आपल्याला देवदर्शन घडवितात. मनांत प्रश्न येतो इतकी वर्षे ह्या क्षेत्री राहूनही ह्यांचे कष्ट संपत का नाहीत ?

 सुखसाधने मिळविण्यासाठी आपणही असेच कष्ट  सदैव करीत असतो.ध्येयाचे  शिखर गाठेपर्यंत ही चढाई कायम सुरूच असते. सतत भीती आणि दडपणाचा सामना करत ही  वाट आपण चालत असतो. शिखर गाठले की  मग उतारही आलाच. उतारावर  मनाचा ब्रेक उत्तम प्रकारे लावून व्यवहार करावे लागतात तरच तोल सांभाळता येतो. उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करता येते.  

आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंद,समर्थ रामदास ह्या आणि अनेक सत्पुरुषांनी भारतभ्रमण केले ,अनेक तीर्थयात्रा केल्या.  काय असेल ह्यामागचे कारण ?  भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायांत भगवान म्हणतात ,

परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर दैवी गुणांत वृद्धी व्हायला  हवी.

     अभयं सत्वसंशुध्दिर्ज्ञानयोगव्यवस्थिती : l दानं दमश्च यज्ञश्च  स्वाध्यायस्तप आर्जवम ll 

अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी दान,इंद्रियांचे दमन ,यज्ञ म्हणजेच उत्तम कर्माचे आचरण ,भगवंताचे नामसंकीर्तन  ( स्वाध्याय ) आणि तप ( कष्ट सोसणे )ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. 

 तीर्थयात्रेतून हे सर्व साध्य होते. कायिक ,वाचिक आणि मानसिक तपाचा उत्तम समतोल यात्रेतून घडत असतो.  हा अनुभव ह्या गिरनार यात्रेत आला. आत्मस्वरूप प्रदान करणाऱ्या त्या त्रिगुणात्मक शक्तीला मी मनोमन प्रणिपात केला. 

                        ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 



स्नेहा भाटवडेकर , मुंबई 

sneha8562@gmail.com



Wednesday, March 17, 2021

आमच्या मावशी ( Tribute to Smt.Asha Joglekar)

                                                   ।। श्री शंकर ।।

       आमच्या मावशी                                                  

डोंबाऱ्याचा खेळ अगदी ऐन रंगात आला होता. छोटी दोन माकडं अप्रतिम अभिनयाने सारा रंगमंच जिवंत करीत होती. जत्रेच्या त्या कथानकात सगळे प्रेक्षक अगदी एकरूप झाले होते. कार्यक्रम संपला. माकडांचा रोल करणाऱ्या त्या छोट्या दोन विद्यार्थिनी रंगमंचावर आल्या आणि टाळ्यांच्या गजरात सर्वानी त्यांचे खूप कौतुक केले. हा SHOW अगदी बारी-सारीक तपशिलासह जिवंत करणाऱ्या " मावशी " मग अदबशीर पावले टाकत रंगमंचावर आल्या आणि सर्वच प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. अतिशय संयत भावाने, विनम्रपणे त्यांनी त्याचा स्वीकार केला. अर्चना नृत्यालयाच्या वार्षिक गुरुपौर्णिमेच्या उत्सवांत सादर झालेला हा कार्यक्रम त्याची चिरंतन स्मृती हृदयांत कोरून गेला. असे अनेक दर्जेदार कार्यक्रम, बॅले मावशींनी त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेने अजरामर केले आणि रसिकांना एका अनोख्या अनुभूतीची सफर घडविली. 

श्रीमती आशा  अनंत जोगळेकर .... 

 कलेची सुंदर अभिव्यक्ती म्हणजे आमच्या " मावशी ".... होय सगळा  परिवार त्यांना मावशी म्हणूनच ओळखतो ... मावशी म्हणजे रुबाब, मावशी म्हणजे सौन्दर्य आणि सात्विकतेचा पवित्र संगम .  मावशी म्हणजेच प्रेमाचा उत्कट अविष्कार...एक जातिवंत कलाकार.. पंडित गोपीकृष्णांच्या आदर्श शिष्या ...  आदर्श गुरु  ... उत्तम कलाकार- विद्यार्थी घडविणारी एक प्रतिभावान संस्था ...किती किती लिहावे ? तरी शब्द थिटेच पडतील असे मावशीचे कर्तृत्व ... 

मावशींच्या खऱ्या कर्तृत्वाची ओळख प्रकर्षाने झाली ती त्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून .. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू ह्यावेळी उलगडत गेले आणि त्यांच्यातील कलाकाराचे तेज आमच्यासाठी  प्रकाशमान होत गेले. कोणताही कार्यक्रम हा सर्व अंगाने परिपूर्णच झाला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी त्यांच्या शिष्यांकडून अतिशय मेहेनतीने त्या बहारदार नृत्यप्रस्तुती करवून घेत आणि सर्वाना मंत्रमुग्ध करत. मुलींनी केलेला कोणताही ढिसाळपणा त्यांना खपत नसे आणि न बोलता केवळ नेत्रकटाक्षाने मुलींना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत. ह्या शिस्तीतच त्यांच्या विद्यार्थिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली  तयार झाल्या. केवळ नृत्यापुरतीच ही शिस्त मर्यादित नव्हती तर त्यांत आईचे संस्कार होते. " माझ्या मुली "कुठेही मागे राहता काम नयेत. हा सतत ध्यास त्यांना होता. मुलींच्या सुरक्षेविषयी त्या कायम जागरूक असत. त्यामुळे क्लासचे कार्यक्रम नेहेमी सकाळी असत. क्लासची पहिली बॅच सकाळी सातची असे आणि त्या स्वतः वेळेपूर्वी क्लासमध्ये हजर असत. त्यामध्ये सातत्य, नियमितपणा, कलेविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांविषयी वाटणारी आत्मियता ह्या सर्वाचा सुंदर मिलाफ असे. 

२००३ साली माझी मुलगी भक्ती हिने अर्चना नृत्यालयात नृत्य शिकण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या काळातील त्या सर्व गोड स्मृती आजही आमच्या मनावर हलकेच मोरपीस फिरवितात. तिला कथक नृत्यातच पारंगत करायचे आणि तेही मावशींच्याच हाताखाली, ह्यावर तिचे बाबा अगदी ठाम होते. त्यासाठी २ वर्षे आम्हाला वाट बघावी लागली. पण प्रवेश नक्की झाला आणि आम्हां दोघांनाही योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तीला शिकता येणार ह्याचा खूपच आनंद झाला. हा आनंद दिवसेंदिवस द्विगुणित होत आहे ह्याचे कारण मावशींनी ज्या तयारीने तिच्यातल्या कलाकाराला घडविले, तसेच कलाकार शिष्य आज भक्ती घडवीत आहे. अगदी मनापासून मावशीचे संस्कार पुढच्या पिढीच्या हातात सोपवत आहे आणि  त्यातून स्वतःला घडवीत उत्तमोत्तम कलाकृती सादर करीत आहे. कलेची ही जोपासना, वृद्धी खूपच आनंददायी  आहे. ह्याचे सर्व श्रेय मावशींच्या मेहेनतीला आहे. 

पालकांच्याही पालक : मावशी --- आम्हा पालकांना मावशी कायम क्लास सुरु असताना क्लास मधेच बसायला सांगत. त्यामुळे मुलांची तयारी कशी होतेय ते कळत असे. त्याप्रमाणे पालकांनी घरीही तशी तयारी करून घ्यावी असा मावशीचा  आग्रह असे.फक्त नृत्य शिकताना नाही तर एरवी वावरताना सुद्धा अगदी उभे राहण्यापासून , चालणे-बोलणे, वागणे, लकबी, खाणेपिणे  ह्या सर्वावर मावशीचे बारीक लक्ष असे आणि योग्य वेळी त्या ही जाणीव मुलांबरोबरच पालकांनाही करून देत. मुलांनी क्लासला दांडी मारलेली त्यांना बिलकुल खपत नसे. कलावंताची कलेवर निष्ठा हवीच म्हणून त्या मुलांना उपदेश करीत असत. अगदी सुरवाती सुरवातीला नृत्यवर्गाचे  हे सर्व वातावरण मलाही  नवीनच होते. त्यात रूळायलाही वेळ लागला. एका कार्यक्रमात भक्तीचा गजरा पडला. तेव्हा मावशींनी प्रेमाने रागवतानाच , कार्यक्रमाला कसे तयार व्हायचे ह्याच्या अनेक बारीकसारीक उपयुक्त टिप्स दिल्या . सिनिअर कलाकारांच्या तुलनेत भक्तीचा perfomance कमी वाटतोय असे म्हटले कि त्या म्हणत, अहो मातीचा गोळा आहे तो. आकार द्यायला वेळ लागणारच. थोडी वर्षे जाऊ देत मग बघा कशी तयार होतेय, हा दिलासा मिळायचा. 

  सुरवातीला मावशींबरोबर  बोलायची मला  खूप भीती वाटत असे. होताच तसा  त्यांचा आदरयुक्त दरारा. एक कलाकार म्हणून मानही होता. त्यामुळे त्यांच्या बरोबर संवाद कमीच साधला जाई. एक दिवस त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली. तुम्ही खूप गंभीर असता, हसत नाही. मग भक्ती तरी कशी हसणार ? नृत्य करायचे म्हणजे चेहेरा हसरा हवा तरच लोकांना आवडेल. तेव्हापासून माझ्यातील आणि त्यांच्यातील अंतर हळूहळू कमी होत गेले आणि नंतर नंतर तर आम्ही अगदी त्यांच्या परिवारातीलच एक सदस्य झालो. अतिशय मायेने आणि आपुलकीने मावशींनी आम्हाला कळात -नकळत खूप गोष्टी शिकविल्या. त्याचे ऋण न फेडता येण्यासारखे आहे. त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा ठसा आजही आमच्या मनावर खोलवर उमटलेला आहे. 

मावशी जश्या परंपरावादी होत्या तशाच परंपरेत अनेक सुधारणाही त्यांनी अतिशय धिटाईने केल्या. एक उत्तम पायंडा त्यानिमित्ताने पाडला. दरवर्षी नृत्यालयाची सत्यनारायण पूजा सांगायला महिला पुरोहितांना त्या आमंत्रित  करीत. पूजेलाही विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यर्थिनीना किंवा त्या वर्षी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला बसायचा मान  मिळे. १ मे च्या दिवशी श्रमदानाने सर्व विद्यार्थिनी क्लास चे वर्ग स्वछ करीत असत. अगदी बारीक-सारीक घटनांतून गुरु शिष्याना  घडवीत असतो. तशी नजर असणे आणि गुरुप्रती मनांत आदर असणे महत्वाचे. 

मावशीचे राहणे अतिशय नीटनेटके. त्यांच्याकडे बघितले कि अगदी प्रसन्न वाटे. बरेचदा  कलाकार लहरी ,आत्ममग्न  असतात. काहीवेळा वागण्यातही काहीसा उद्दामपणा असतो. पण मावशींच्या ठिकाणी ह्याचा लवलेशही नव्हता. अगदी नितळ आणि पारदर्शी स्वभाव .नीतीमूल्यांची जपणूक त्यांच्या वागण्यात असे आणि म्हणूनच त्यांच्या विषयी एकप्रकारचा आदरभाव मनांत दाटून येई . नुसते मावशींचे नाव उच्चारले  तरी समोरची व्यक्ती नतमस्तक होते . उत्तम कलाकार, गुरु आणि व्यक्ती असा नावलौकिक त्यांनी कमावला होता.   मावशीचा जो काही सहवास आम्हा  सर्वाना लाभला त्यामुळे आमचे जीवन समृद्ध झाले. काही व्यक्तिमत्व असतातच  लोभस. त्यांच्या स्नेहाचा परिमल आपले अंतरंग सुवासिक करतो. 

मावशींच्या पश्चात त्यांची सुकन्या आणि  शिष्योत्तमा पंडिता अर्चना जोगळेकर  मावशींचे कार्य समर्थपणे  पुढे नेत आहे . बाकीही अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हा वारसा जोपासत आहेत आणि मावशींविषयी अतिशय कृतज्ञ आहेत. 

बघता बघता वर्षे लोटतात .हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीसुद्धा काळाच्या पडद्याआड जातात पण त्यांची कला चिरंतन असते. वर्षे लोटली तरी काही ऋणानुबंध हे ताजे टवटवीत तसेच राहतात. 

आज १८ मार्च. मावशीचा  पाचवा स्मृतीदिन. ह्या लेखनाच्या माध्यमातून त्यांना विनम्र श्रद्धांजली समर्पित करते . 



स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

18/03/2021


 

Wednesday, March 10, 2021

ओंजळ ( Onjal )

                                                                ।। श्री शंकर  ।।

                                                          ओंजळ 

परवाच एका कार्यक्रमाला आम्ही दोघे उपस्थित राहिलो होतो. मूळ लता दीदींनी गायलेले सुंदर गीत .  मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतणारे , ज्ञानेश्वर माऊलींचे आर्त ,व्याकुळ करणारे शब्द. नाट्यगृहात गायिका हे गाणे मनोमन, सुरेल  आळवीत होती.  मी मात्र कितीतरी योजने दूर पोहोचलेल्या बाबांचा चेहेरा आठवीत होते. " भेटीलागी जीवा  लागलीसे आस ,  पाहे रात्रंदिवस वाट तुझी "... शब्दाशब्दागणिक मनात आठवण  दाटून आली होती . कित्येक दिवसांत ना भेट , ना बोलणे ... किती आठवणी ...मनांत कोंदाटलेले आर्त ! लेखणी सरसावली ... मनातले भाव उमटू लागले.... 

महाशिवरात्र ! तिथीने बाबांचा जन्मदिवस. आज ८५ वर्षे पूर्ण झाली असती .जन्म महाशिवरात्रीचा असला तरीही नाव मात्र " विष्णु " विष्णु पांडुरंग किंजवडेकर .... नावाप्रमाणेच सर्वांचा प्रेमाने , आपुलकीने  सांभाळ करणारे बाबा ... लहान -थोर सगळ्यांमध्येच समरस होणारे प्रेमळ, रसिक बाबा ... जीवनाचा आनंद स्वतः घेणारे आणि इतरांनाही त्यांत सामावून घेणारे बाबा ...  त्यांच्या प्रेमाचा धाक सगळ्यांनाच असायचा ... 

धार्मिक ,परोपकारी वृत्तीचे बाबा ... दासनवमीच्या उत्सवाला दरवर्षी गोरंट्याला , सद्गुरू दासगणु महाराजांच्या कर्मभूमीत ,बाबांसोबत  एकत्रच जाणे व्हायचे. परतताना बाबा मुंबईला आमच्या घरी ३/४ दिवस मुक्काम करून मगच रोह्याला परत  जात असत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस ( महाशिवरात्र ) आमच्या घरीच साजरा व्हायचा. एकत्र बसून शिवमहिम्नाचे पठण व्हायचे .काही वेळा त्यांचे प्रवचन मोजक्या मंडळींसमोर सादर करायचे. ते हौशी , तर मी त्यांच्यापेक्षा काकणभर अधिक उत्साहाने ह्या  कार्यक्रमाचे नियोजन करीत असे. त्यांच्यामुळे माझ्याही घरांत अशा कार्यक्रमांमुळे  एक वेगळेच चैतन्य प्रगट  होत असे. अगदी अखेरपर्यंत त्यांचा उत्साह अगदी असाच टिकून होता. आज त्यांना जाऊन  १० वर्षं झाली , पण सोफ्यावर बसून नामसाधनेत दंग  असलेली त्यांची मूर्ती डोळ्यासमोरून हालत नाही. बाबा गेले पण कन्येसाठी कल्पवृक्ष लावून गेले. केवळ मलाच  नाही तर अनेक पुत्र आणि कन्यांना त्यांनी आपुलकीने , जिव्हाळ्याने प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवले.बाबांच्या आठवणीने अनेकांचे डोळे  आजही पाणावतात  ,कदाचित आयुष्यात मिळवलेलं खरं धन, श्रीमंती ती हीच. सर्व कुटुंबियांवर ,आप्त-स्नेही, शेजारीपाजारी सर्वांवर बाबांनी  मनापासून प्रेम केले .पुढे सद्गुरूंची ( प.पु स्वामी वरदानंद भारती ) भेट झाल्यावर निष्ठेने त्यांची जमेल तशी सेवा केली .त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पारमार्थिक घडी बसवून ईश्वराला सर्वस्व अर्पण केले.अंबरनाथ चे वास्तव्य सोडून , रोह्यासारख्या नवीन ठिकाणी आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करताना " दासगणू मंडळाची " स्थापना करून अनेकांच्या मनांत भक्तिभाव रुजविला. अनेकांना विष्णुसहस्रनाम , गीता , शिवमहिम्न , श्रीसूक्त शिकविले. नियमितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या ग्रंथांवर अभ्यासपूर्ण प्रवचने  दिली.  त्यांची  चिकाटी , जिद्द ,धडाडी  बघितली  कि मन विनम्र होते.  माझ्यातील  उणिवांची जाणीव प्रकर्षाने होते. 

गंगौघाप्रमाणे त्यांच्या अनेक आठवणी मनाच्या तटावर आदळत  आहेत.कुटुंबावरील प्रेमापोटी त्यांनी आम्हा दोघा भावंडांना उत्तमोत्तम सर्व देण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. कधीच कोणती उणीव भासू दिली नाही. त्यामुळे आमचे  बालपण  अतिशय आनंदात व्यतीत झाले. नुसते लाड नाही तर शिस्तही होती. चांगले विचार आणि संस्कारांचे पाथेयही दिले.प्रत्येक सण  आनंदाचा उपभोग घेऊन कसा साजरा करायचा हे त्यांनीच शिकविले. आजही प्रत्येक सणाला त्यांची  होते. अभ्यासाबरोबरच जीवन व्यवहाराचे धडे त्यांनी दिले. अगदी लहानपणापासून बाजारहाट, पोस्ट , बँक आणि इतर कामे  करायला प्रोत्साहन दिले. पुढील आयुष्यात ह्या सर्व गोष्टींचा खूप फायदा झाला. 

बाबा स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढले. ११ भावंडे , आई-वडील,काका एव्हढा मोठा परिवार. बाबा शेंडेफळ. पण घरातील अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व.अनेकांचा आधार. गावच्या माझ्या ताई , दादाची शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांना आपल्या घरी  घेऊन आले आणि त्यांच्या लग्नापर्यंतची आणि पुढचीही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. कुटुंबात कोणालाही कसलीही गरज असली तरी मदतीसाठी बाबांचा  हात नेहेमीच पुढे असे.  किंजवडेकर कुटुंबाचे सणवार, कुलाचार , कुलधर्म अगदी नेटाने अनेक वर्ष आनंदाने सांभाळले. आईनेही त्यांना मूकपणे त्यांच्या सर्व कार्यात साथ केली. ह्या तुफानाबरोबर प्रपंच करताना  तिची बोटही हेलकावे खात खात पुढे जात राहिली.  बाबांसारखी तिच्यात धडाडी नसली तरीही शांतपणे हा सर्व भार  तिने पेलला. २० वर्षे आमच्या घरात साजरा होणार गणपती उत्सव हा सर्वांच्या आजही स्मरणात आहे. बाबांच्या संकल्पनेतून साजरा होणार हा उत्सव म्हणजे " आनंदपर्व " सर्व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन .अनेकांच्या मनात ह्या उत्सवाच्या आठवणी ताज्या आहेत.. 

शिक्षणाविषयी त्यांना खूप ओढ होती.लग्नानंतर, नोकरी सांभाळून M.A./ M.Com.स्वतःच्या हिमतीवर केले. शिकवायची त्यांना खूप आवड.ते उत्तम शिक्षक होते. आमच्या अभ्यासाबरोबरच आजूबाजूच्या अनेक मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. स्वतः कॉलेज मध्ये शिकवायला सुवात केली. पुढे नातवंडानाही जमेल तेव्हढे मार्गदर्शन केले. अनेकांना नोकरी -व्यवसाय मिळवून देण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. 

सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असत. Rotary Club, कऱ्हाडे ब्राहमण संघ आणि इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी अगदी जीव ओतून काम केले आणि आमच्यासमोरही आदर्श निर्माण केला. काम कोणतेही असो त्या विषयी वाटणारी तळमळ हा त्यांचा स्थायीभाव होता. त्याच ओढीने ते सर्वच क्षेत्रांत काम करीत. त्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा दीर्घकाळ रेंगाळत  राही. आम्हालाही कोणत्याच बाबतीत त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे मीही नाटक , विद्यार्थी परिषद अश्या अनेक आघाडयांवर काम करत राहिले. " Sky is the limit " हा त्यांचा मंत्र होता,जो कायम पुढे जायला प्रेरणा देत असे. 

बाबा एखाद्यावर जितके मनस्वीपणे प्रेम करत ,तेवढेच पटकन ते दुखावलेही जात. मग मात्र त्या व्यक्तीबरोबर संबंध पूर्णपणे तोडून टाकीत. त्यांचे अगदी जवळचे दोन तीन मित्र ह्यामुळे कायमचे दुरावले. माझ्या एका भावाचे लग्न त्यांना त्यांच्या मनातील एका मुलीशी लावायची इच्छा होती. काही कारणाने ते घडले नाही. ते इतके दुखावले कि त्या लग्नालाही मग ते हजर राहीले  नाहीत. अतिशय संवेदनशील असा त्यांचा स्वभाव जपणे हे काही वेळा खूपच अवघड काम असे. प्रत्येकाची काळजी करण्याचा त्यांचा स्वभाव. शेवटपर्यंत मुले , नातवंडे ह्यांची काळजी करता करता त्यांनी स्वतःकडे मात्र दुर्लक्ष केले आणि गंभीर आजारांना निमंत्रण दिले. 

विशुद्ध आनंदाचा निखळ झरा म्हणजे बाबा ... जीवनावर भरभरून प्रेम करणारे...दुसऱ्यांच्या आनंदात तितक्याच आनंदाने सहभागी होणारे  ,जेष्ठत्वाच्या नात्याने कोणत्याही  चांगल्या कार्याला पसंतीची दाद देणारे  ... हे सर्व बाबाच करू जाणे ... 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते आमच्या ओंजळीत दान टाकत राहिले. त्यांच्या दातृत्वाने भरलेली आमची ओंजळ , त्यांच्या नसण्यामुळे मात्र  रिक्त आहे ... बाबा हि ओंजळ भरलेली आहे म्हणून आनंद मानू कि रिक्त आहे ह्याचे दुःख करू ? माझ्या सर्व प्रश्नांची , समस्यांची उत्तरे द्यायला तुम्ही समर्थ होतात. आता उरलेत ते फक्त प्रश्नच . तुमच्यासारखी निरपेक्ष, जिवापाड -माया करणारी व्यक्तिच खरं तर हे मौलिक मार्गदर्शन करू शकते .ती जागा आजही रिक्तच आहे बाबा !

तुम्ही दिलेल्या संस्कारांची शिदोरी  घेऊनच आजपर्यंतची वाटचाल केली.त्यामुळे आज मनाच्या गाभाऱ्यात शांती . सुख, समाधान सर्व काही आहे त्याचे श्रेय  तुमचेच आहे .पण एकच उणीव आहे... 

तुम्हाविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला ... 

पाठीवरी फिरवा हात , याहो बाबा एकच वेळा, याहो  बाबा एकच वेळा... 


तुमचीच ताई ... 

महाशिवरात्री, २०२१ ( ११/०३/२०२१ )

Friday, February 26, 2021

मराठी असे आमुची मायबोली ( Marathi Ase Amuchi Mayboli )

।। श्री  शंकर  ।।

मराठी असे आमुची मायबोली 

२७ फेब्रुवारी हा" मराठी राजभाषा दिवस "

परवा एका शाळेत ह्या निमित्ताने  कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. पहिली ते चौथी ह्या वर्गांसाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. मराठी आणि अमराठी  माध्यमांत शिकणाऱ्या  मुलांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.  मुलांचे निरागस बोलणे, हावभाव, कथेत रंगून जाणे आणि मनमोकळा वावर , ह्यामुळे मीही ४ तास त्या वातावरणात अगदी रममाण झाले. मुलांना काही बोध करणे अपेक्षित होते. एवढ्या छोट्या दोस्ताना काय सांगायचे ? एका अर्थी हा मलाच बोध होता. आत्मपरीक्षणाची एक संधीच. 

विचार करताना भाषेचा  एकेक पैलू उलगडू लागला. अतिशय गोड, वळणदार अशी हि आपली मराठी राज्यभाषा आणि मातृभाषा. संस्कृत हि जग्ग्जननि असली तरी मराठी हि आपली माय. आणि मायच्या कुशीतच तर लेकरू निवांत असतं . 

 कोणतीही भाषा आत्मसात करायची म्हणजे सर्वसाधारण चार प्रक्रिया आवश्यक असतात. श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण. ह्या प्रक्रिया ज्या प्रमाणांत आत्मसात होतील तेव्हढी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. ह्या भाषेचा प्राण  म्हणजे" शब्द ."...                                               

कुठेतरी वाचनात आलं, " शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे, शब्द अक्षय्य आहे, शब्द निःशब्द पण आहे " ... 

  आपल्या भाषेचे महत्व म्हणजे त्यातील " शब्द भांडार " अक्षरांपासून शब्द ! अनेक शब्द एकत्रित करून तयार झालेली लडी म्हणजे वाक्य. संगीतात केवळ सात सुरांपासून अनेकविध सुंदर सुंदर राग तयार होतात. मनाला मोहवून टाकतात. तसेच शब्दांचे. शब्द कसे गुंफले जातात त्यावरून त्या लेखकाची श्रीमंती कळते. त्यामागे अर्थात साहित्यिकांची प्रतिभा असते. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ह्यांचा वापर करून चिरकाळ टिकणारी अशी साहित्यलेणी तयार होतात. अर्थगर्भ, रसाळ कविता कमीतकमी शब्दांत मनाचा ठाव घेतात. चिरंतन असणारी ही आपली साहित्य संस्कृती. वाचनामुळे समृद्ध होणारे आपले जीवन. 

ह्याच अनुषंगाने "  कथा " ..ह्या साहित्य प्रकाराचा घेतलेला शोध ... ह्या शोधातून  झालेला बोध  मांडण्याचा अल्पसा  प्रयत्न. 

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हि एक स्वतंत्र कथाच असते. जोपर्यंत  तीरावर असतो तोपर्यंत आपल्याला खोलीचा अंदाज येत नाही पण सहवासाने  प्रत्येक आयुष्याची कथा वेगवेगळं वळण घेते. कधी ह्या कथांच्या मागे लपलेल्या व्यथा दुःखी करतात तर कधी आदर्श जीवनपट नजरेसमोर साकारतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण चरित्रच उदात्ततेचे पैलू दर्शविणारे. काही काल्पनिक व्यक्तिमत्व सुद्धा अजरामर होतात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात साहित्यिक  वि .वा .शिरवाडकरांच्या" नटसम्राट " मधील अप्पा बेलवलकर  हे असेच एक अतिशय गाजलेले पात्र.  

.कथा , गोष्ट ... प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग ...   आबालवृद्धांना भुरळ घालणारी गोष्ट. अगदी जन्मालाआल्यापासून काऊ- चिऊ च्या गोष्टीपासून  आपण ह्या गोष्टीत रमतो ते अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत.  गोष्टीच्या स्वरूपात पालट होतो एवढाच काय तो फरक. कथांचे तरी किती विविध प्रकार. ऐतिहासिक, बोध कथा, नीतिकथा, चातुर्य कथा, शौर्यकथा, युद्ध कथा, प्रेमकथा, रहस्य कथा...  आपल्या वयानुसार आपली कथेविषयीची रुची बदलत जाते. मोठेपणी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब स्टोरी अशी कथांची वर्गवारी होते. पण मूळ कथा तीच. ह्या कथा काही विचार देणाऱ्या, बोध करणाऱ्या. त्यांतील अगदी आजचा पर्यावरण जागृती सारखा विषय सुद्दा ह्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचविता येतो. ह्या कथांतून सांगितलेले सार, तात्पर्य आचरणांत आणण्यासाठीच ह्या कथांचे प्रयोजन. जगण्याचे धडे देणाऱ्या ह्या कथा. अगदी लहान वयात ऐकलेली लाकूडतोड्याची गोष्ट जर आयुष्यभर  अंमलात आणली तरीही पुरे. जी वस्तू आपली नाही त्याचा प्रामाणिकपणे त्याग करायचा ह्यात हि खूप मोठे मूल्य आहे. 

 कथांमधून भाषा विकास साधता येतो. संवादाचे एक उत्कृष्ट साधन म्हणजे  कथा. मुलाप्रमाणेच मोठ्याना  खिळवून ठेवणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या. अनादी काळापासून सांगितल्या जाणाऱ्या रामायण - महाभारतातील कथा ह्या जीवन मूल्यांचे संवर्धन करतात. आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे दर्शन घडवितात. जिजाऊसाहेबांनी शिवबाना घडवले ते ह्या नीतिकथांतूनच. 

 भागवतात श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी वर्णन आहे.पुराणांत अनेक कथांचा समावेश आहे. कीर्तनातून समाज जागृती व्हावी ह्या उद्देशाने तत्वज्ञान सोप्या भाषेत कथांच्या माध्यमांतून पोचवले जाते. सद्गुरू दासगणू महाराज हे अलीकडील संतकवी. त्यांनी अनेक  रसाळ कीर्तनाची निर्मिती केली आणि त्यातून समाजाला बोध केला. त्यांचीच परंपरा  त्यांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद  भारतीनी सुद्धा पुढे चालू ठेवली. 

पूर्वी घरातील मोठी माणसे आजी-आजोबा, ताई-दादा गोष्ट सांगायचे. पुढे हि जागा कॅसेट ने घेतली. छान छान गोष्टीच्या अनेक ऑडिओ कॅसेट मुलांसाठी उपलब्ध होत्या. अगदी घरातील मंडळीच  गोष्टी सांगत आहेत असा भास व्हायचा. काही संस्कार वर्गातून गोष्टी सांगण्याचे उपक्रम सुरु झाले. आधुनिक काळांत छोट्या कुटुंब पध्दतीत  पालक मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ह्या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. साधने बदलली तरीही गोष्टींची आवड मात्र कायम आहे. 

दूरदर्शनवर  लागणाऱ्या कार्टून कथाही अशाच मुलांना वेड लावणाऱ्या. आता मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब इ. विविध आधुनिक साधने अगदी बालगोपाळांच्या हातात सामावलेली असतात कि त्यांना त्याचे व्यसनच लागते. त्यापासून दूर करणे कठीण जाते. अगदी दोन वर्षांपासूनची बालके सुद्धा सतत मोबाईल हातात धरून बसलेली असतात. 

काही वर्षांपूर्वी व.पु.काळे, गिरीजा कीर, माडगुळकर, मिरासदार ह्यांच्या कथाकथनाचे दर्जेदार कार्यक्रम खूपच लोकप्रिय होते. आज अभावानेच हे कार्यक्रम होतात. 

नृत्याच्या माध्यमातून कथा  लोकांपर्यंत पोचतात. " कथा कहे  सो कथक " कथक नृत्याचे मूळ ह्या कथाकथनातच दडलेले आहे. अनेक नृत्यशैलीतून विविध चरित्रआणि पौराणिक कथा रसिकांना मंत्रमुग्ध करतात.  

 बाकीच्या आक्रमणामुळे दिवसेंदिवस वाचन संस्कृती लोप पावत आहे असा ओरडा ऐकू येतो. माध्यम बदलले तरी मूळ कथा केंद्रस्थानी आहेच. 

मनुष्यप्राणी मुळातच गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला चघळायला आवडते. दुसऱ्यांच्या गुजगोष्टींत तर सर्वांना  भलताच रस. तिखटमीठ लावून, वर झणझणीत तडका  देऊन गावगॊष्टी वाऱ्यासारख्या  पसरायच्या. आज मोबाईल किंवा फेसबुक वर ह्याच गोष्टी क्षणांत जगभर पसरतात आणि व्हायरल होतात. आमचा एक मित्र भेटायला आला कि दोन तीन तासाची निश्चिन्ती. सगळ्या दुनियेचे विषय त्याच्या पोतडीत सामावलेले असत. मुंबई हिंदीत हातवारे करून, डोळे बारीक करून, हातावर टाळी देत, गडगडाटी हसत तो गप्पात इतकं अडकवून टाकायचा कि वेळ कसा जायचा समजायचेही  नाही.  

महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारी आपली मराठी भाषा.आपला स्वाभिमान जागृत करणारी. तिला  समृद्ध करणे हि तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी. बाकी भाषांचे अतिक्रमण थोपवून तिला प्रवाही ठेवणे हे आद्य कर्तव्य. खरंतर आपल्या श्वासाएव्हढीच महत्वाची आपली भाषा. तिला सन्मानित करणं आपल्याच हातात. पण हे होत नाही. बाकी भाषांचे महत्व व्यवहारांत नक्कीच आहे. पण इतर भाषांच्या आक्रमणापुढे तिची दुर्दशा  होऊ नये हेही खरे.  ह्या गौरव दिनाचे हेच महत्वाचे कारण . पण  केवळ एक दिवस हे करून न थांबता उत्तरोत्तर आपली भाषेची आवड  वृद्धिंगत व्हावी असे प्रयत्न करण्याची आण आपण ह्या निमित्ताने  वाहूया . मराठी पाऊल  पडते पुढे हे सर्वार्थाने सार्थ करूया. 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

२७ /०२/२०२१