Friday, August 21, 2020

गणपती : एक स्मरणरंजन ( Down The Memory Lane : Celebration of Ganesh Festival )

                                                            ।।  श्री शंकर ।।

                                              गणपती : एक स्मरणरंजन 

माणूस मुळातच उत्सवप्रिय. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातही आपल्या सणासमारंभासाठी आवर्जून वेळ काढून, आनंदाने सण  साजरा करायला तो उत्सुक असतो . घरांत त्या निमित्ताने होणारी तयारी असो, कि गणपती निमित्ताने कोणाकडे जाणे असो, एक वेगळाच उत्साह त्याच्या ठिकाणी अवतरतो . 

ह्या वर्षी सगळ्या परिस्थितीत  आमूलाग्र बदल झालाय. नेहेमीचा उत्साह मावळलाय.माहेरी जायची तयारी नाही.  कि कोणाकडे जाणे येणे नाही 

हा बदल स्वीकारणं अपरिहार्य आहे ,पण प्रत्यक्षांत मात्र मन व्याकुळ झालंय ...गेल्या अनेक वर्षांच्या आठवणी फेर धरून नाचतायतं ...  

 ह्या एकाकी दिवसांत  स्मरणरंजनातूनच ही बीते हूए यादोंकी बारात ... 

माझ्या माहेरी आधी  गणपती बसवला जात नसे. गावीच काकांकडे गणपती असायचा, पण गाव लांब ,आणि शाळा चुकवून जाणे कधीच झाले नाही. इतर मैत्रिणींकडे गणपती असायचा आणि आपल्याकडे नाही ह्या विचाराने त्यावेळी  वाईट वाटायचे. गणपती बाप्पाने माझा रुसवा दूर करायचे बहुधा ठरवले असावे. गावाचे काका आजारी झाले आणि त्यांना सगळी जबाबदारी पेलणे  शक्य नसल्यामुळे, सर्व सण माझ्या बाबांनी स्वतः जबाबदारी घेऊन साजरे करायचे ठरविले. त्यांचा सळसळता उत्साह अजूनही आठवतो. केवढी हौस त्यांना सगळ्याची.  कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी सगळ्यांना ह्या गणपतीउत्सवाची आमंत्रणे जात, त्यांत प्रेमाची धमकीच असायची. एवढे मोठे आमचे कुटुंब. पण बाबांच्या आग्रहाने दिलेल्या आमंत्रणाला  मान देऊन अगदी लांबून लांबून  नातेवाईक ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत. ह्या निमित्ताने शनिवार-रविवार असे जोडून एक स्नेह संमेलन असे. जवळ जवळ ७०-७५ नातेवाईक एकत्र जमत. सगळ्यांची राहायची, जेवणा- खाण्याची , अगदी चोख व्यवस्था.आलेल्या पाहुण्यांचा सर्व कार्यक्रमांत सहभाग असे. एक काका आर्टिस्ट, ते सुंदर मखर बनवीत तर दुसरे काका नेत्रदीपक रोषणाई करत.  तबल्याच्या साथीबरोबर होणारी आरती तासभर देहभान हरपून चढ्या आवाजात  गायली जात असे. 

त्यातही काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन. सगळ्या बालगोपाल, तरुण मंडळींचा परफॉर्मन्स must.अनेक जणांनी इथे आपली कला सादर करून ,पुढील आयुष्यात ह्याचा खूप फायदा झाल्याचे नेहमीच नमूद केले.  वर्षभरात  विशेष कौतुकास्पद कामगिरी केली असेल तर त्यांचा घरातील सर्वात वयोवृद्ध आजीच्या हस्ते सत्कार . 

धार्मिक प्रथेप्रमाणे पूजा अर्चा, सहस्रावर्तने, मंत्रपुष्प हे सगळं यथोचित व्हायलाच हवे. कुठेही  शॉर्टकट नाही. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही उणीव नाही. प्रेम, आपुलकी, आग्रह अगदी ओथंबलेला आणि सर्वांवर त्याचा सारखाच वर्षाव. मायेचा ओलावा जपताना व्यवहार कधीच आड आल्याचं,किंवा मतभेद झाल्याचे , मला इतक्या वर्षांत जाणवलं नाही. 

आईवर केव्हढी मोट्ठी जबाबदारी असायची ते त्या वयात नाही कळले.  नंतर मी संसारात पडल्यावर तिच्या शांत राहून स्वयंपाक घरांतील  सर्व कामे  नेटाने पार पाडण्याच्या हिंमतीचे कौतुक वाटले. 


ह्या उत्सवाच्या निमित्ताने इतके मोठं कुटुंब एकदिलाने एकत्र यायचं. चाळीस वर्षांनंतरही ही गणेशोत्सवाची  आठवण नेहमीच चर्चेचे  मुख्य आकर्षण असते. कुटुंबातील सर्व  व्यक्तींच्या हा उत्सव म्हणजे मर्मबंधातील ठेव आहे.

खरंतर हा आमचा कौटुंबिक गणपती, पण त्याचं स्वरूप मात्र भव्य -दिव्य, एखाद्या सार्वजनिक गणपती सारखं . नातेवाईकांशिवाय इतर अनेक स्नेहीजन आमच्या गणपतीला आवर्जून भेट देत असत.  

कार्यक्रमांची सर्व तयारी करताना  बाबांच्या तालमीत मीही अगदी तयार झाले.  हा कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनॅजमेण्ट चा ( त्या वेळी असे शब्द सुद्धा माहित नव्हते ) अगदी योग्य वस्तुपाठ होता. आमंत्रणे, खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी, आलेल्या नातेवाईक मंडळींशी संवाद कसा साधायचा , किती म्हणून सांगावे ? अगदी आजही ह्या सर्व गोष्टींचा व्यवहारांत खूप फायदा होतोय.आयुष्यभराची हि शिदोरीच ... 

सलग २५ वर्षे हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा झाला. बाबांनी निवृत्तीनंतर कोकणांत वास्तव्य करायचे ठरवले आणि  ह्या उत्सवाचे स्वरूप बदलले. 

माझ्या मुलींनी हा उत्सव बघायला हवा होता असे मला नेहमी वाटते, त्यांच्यासाठी ह्या आठवणीच आहेत. वर्षभरात काहीतरी चांगलं काम करून कुटुंबीयांची प्रोत्साहनपर थाप पाठीवर पडावी असं खरं तर नेहेमीच वाटे पण मला तशी संधी मिळाली नाही, निदान मुलींचे कौतुक व्हावे असे वाटत असे पण तीही सुप्त इच्छा  मनातच विरून गेली. 

 आता गणपतीसाठी गावी जायला सुरवात झाली . ह्या  दिवसांत सगळीकडे गर्दी, प्रवास कठीण. तरीसुद्धा गणपती आणि माहेरच्या ओढीने जाणे व्हायचे. प्रवासाचा सगळा शीण घरी गेलं की  निघून जायचा आणि उत्साहाने बाप्पाचं स्वागत करायचं. गावच्या वातावरणाचा वेगळा उत्साह मनावर स्वार व्हायचा.आनंद मनांत काठोकाठ भरलेला असायचा . 

ह्या वर्षी ह्या आनंदाला आपण मुकणार म्हणून मन भरून आलं . इतक्या वर्षाचा मनावर  झालेल्या संस्कारांचा विसर पडणे कठीणच. 

 आणि मग मनानेच मला समजावलं ... अगं तो गणपती सुख देणारा ,तुझ्या दुःखाचं हरण तोच करणार ... त्याच्या पूजेअर्चेत मन रमले कि तो आनंद देणारच आहे.

सर्वं जगदिदंत्वत्तोजायते,सर्वं जगदिदंत्वयिप्रत्येति , त्वं भूमिरापोनलोनिलोनभः , अथर्वशीर्षांत गणपतीचं गुणवर्णन करताना म्हटलंच आहे, सर्व जगात तो व्याप्त आहे, मनातली भक्ती आपण कुठेही असलो तरी त्याच्यापर्यंत  पोचतेच. त्याचा प्रत्यय येतोच  .. मन एकदम शांत शांत झाले ..     

त्याचं स्वागत इथे घरीच उत्साहाने करायचे असा मनाशी शुभ संकल्प करून मी जोरदार  तयारीला लागले. मन आनंदाने त्याची आळवणी करू लागलं ,सर्वत्र  नाद निनादू लागला ....

मंगलमूर्ती  मोरया ,गणपती बाप्पा मोरया ...  


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

sneha bhatawadekar sneha8562@gmail.com

10:19 PM (2 minutes ago)



Tuesday, August 18, 2020

mainkar kaka - ek athwan (माईणकर काका - एक आठवण )


 | | श्री शंकर | |


आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे. आजचे लिखाण आहे आईसाठी तिच्या मुलीकडून आणि निमित्त आहे मातृदिनाचे. 

हल्ली आपल्यावर असलेला पाश्चत्य संस्कृतीचा पगडा बघता mothers day मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र भारतीय परंपरेत महत्त्व आहे ते श्रावण अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या मातृदिनाचे. 

आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही...

आईने मला काय दिले हे शब्दात सांगता येणार नाही कारण माझ्या अस्तित्वाचा  प्रत्येक पैलू तिने घडवलेला आहे, अगदी काळजीपूर्वक आकार दिला आहे... लहानपणापासूनच कळतनकळत तिच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण मी करत गेले, शिकत गेले, प्रेरणा घेत गेले..  

सध्याच्या lockdown मध्ये आईने तिची लिखाणाची आवड जोपासली आणि विविध विषयांवर लेखन चालू केले. तिच्याकडून आलेल्या प्रेरणेने मीही माझ्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे ...

हे लेखन आई वर नाही किंवा लेखनाचा विषय आई हा नाही.. तर हा मनावर प्रभाव पडलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध आहे...

 

१४ ऑगस्ट ची सकाळ... सकाळीच एक बातमी कानावर आली. तबला क्षेत्रातील विचारवंत पंडित सुधीर माईणकर यांचे निधन झाले. बातमी कळली आणि मनात विचारांचे काहूर माजले.

माईणकर काकांशी माझी ओळख अगदी अलीकडची, गेल्या वर्ष दीड वर्षातली. माझे लग्न ठरले आणि माझा होणारा नवरा चिन्मय व माईणकर काकांचा चांगला परिचय होता. काही वर्षांपूर्वी काकांच्या लिखाणाच्या कामात त्यांना मदत करण्याच्या निमित्ताने चिन्मयचे काकांकडे जाणे झाले व गुरु शिष्याचे नाते कधी तयार झाले कळलेच नाही. चिन्मयच्या मनात होते की आपल्या होणाऱ्या बायकोची काकांशी भेट घडवावी आणि पुढील प्रवासासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही चारकोपला त्यांच्या राहत्या घरी गेलो. एवढ्या मोठ्या गुरूंकडे भेटायला जायचे मनावर खूप  दडपण होते मात्र काकांशी भेट झाली आणि मनातली भीती अगदी पळून गेली. इतकं प्रेमळ व्यक्तिमत्त्व. त्यांनी माझी इतकी आपुलकीने चौकशी केली, कथक नृत्यसंबंधी त्यांचे किस्से ऐकवलेच शिवाय संसारोपयोगी काही कानमंत्र देखील दिले. विचारांची शिदोरी घेऊनच आम्ही दोघं घरी परतलो.

पुढे तब्येत बरी नसतानाही काका आमच्या लग्नाला आले व आम्हाला शुभाशीर्वाद दिले.

एका प्रोजेक्ट संदर्भात काकांचे 'तबला वादन में निहित सौंदर्य' हे पुस्तक वाचनात आले व त्यावेळेस काकांच्या पांडित्याची खरी ओळख पटली. भाषा व तबला यांचा सखोल अभ्यास करून त्यावरील त्यांचे चिंतन थक्क करणारे होते. त्यानंतर कला विहार मासिकातील काकांचे इतर लेखही वाचले.

काकांची सगळ्यात स्मरणात राहील ती आठवण म्हणजे लोणावळा खंडाळा महोत्सवाची. सप्टेंबर मध्ये लोणावळा खंडाळा महोत्सवात माझा एकल नृत्याचा कार्यक्रम होता. ग्रीन रूम मध्ये घुंगरू बांधताना announcement कानावर पडली कि पंडित सुधीर माईणकर कार्यक्रमाला हजार आहेत. माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. काकांसमोर माझी कला प्रस्तुत करायला मिळणार होती. कार्यक्रम छान झाला. कार्यक्रमानंतर नेमकी काकांची भेट घेता आली नाही. आपण त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलावे का असे सारखे मनात येत होते आणि दोन दिवसांनी काकांनी स्वतःहून मला फोन केला व माझ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. खासकरून चक्रीच्या बोलांची तारीफ केली. इतक्या बारकाईने त्यांनी माझा कार्यक्रम पाहिला व त्यावर अभिप्राय दिला हे माझे मोठे भाग्य.

आज त्यांचे वयोमान आणि आजारपण यामुळे शरीराने ते आपल्यासोबत नाहीत. कितीही वय झाला तरी माणूस आपल्यासोबत राहावं, आपल्याला सोडून जाऊ नये अशी मनाची वेडी आशा असते पण प्रकृतीचा नियमच तो, आलेला जायचा. काका देहानी नसले तरी त्यांच्या विचाराने कायम आपल्या सोबत राहतील. त्यांच्या प्रत्येक बंदिशी वाजवताना चिन्मयला त्यांचे स्मरण होईल व त्या ऐकताना मला काकांची आठवण होईल.

काकांच्या आठवणीत हे लेखन त्यांना समर्पित.


.०८.२०२०


Sunday, August 2, 2020

Bandh - Mukt ( बंध -- मुक्त )


                                                                  ।। श्री  शंकर  ।।

                                                               बंध -- मुक्त 
                                     

 रक्षाबंधनाचा सण . बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याला एक आगळं वेगळं परिमाण  लाभतं ते रक्षाबंधन आणि भाऊबीज ह्या दोन सणांमुळे. स्त्रीला नेहेमीच माहेरची वाटणारी ओढ आणि भाऊरायाविषयी वाटणारा जिव्हाळा. त्यामुळे आतुरतेने ह्या सणांची वाट ती बघत असते. मनगटावरच्या राखीने आणि ओवाळणीने भाऊ बहिणीला आश्वस्त करतो " मी आहे ना तुझ्या पाठीशी "आणि हे नातं फुलतं, बहरतं. त्यासाठी परस्परांत सामंजस्य, विश्वास असावा लागतो. 

ह्या परंपरेचे मूळ अगदी थेट महाभारतांत सापडते. श्रीकृष्ण आणि द्रौपदी ह्यांच्यातील नाते हे मानलेले असले तरी भावाबहिणीचे होते. सख्यत्वाचे होते. द्रौपदी जेव्हा भर सभेत तिच्यावर आलेल्या संकटाच्या वेळी कृष्णाचा धावा करते, तेव्हा पाठिराखा म्हणून कृष्ण तिचे लज्जारक्षण करतो आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून  द्रौपदी त्याला कंकण बांधते. हीच परंपरा आजही चालू आहे. त्यांच्याच नात्यातला असाच एक हृद्य प्रसंग सर्वांच्याच परिचयाचा आहे. कृष्णाचे बोट कापते आणि रक्ताची धार थांबत नाही तेव्हा द्रौपदी  क्षणाचाही विचार न करता तिचा  भरजरी पितांबर फाडून त्याची चिंधी त्याला बांधते , ह्या प्रसंगाने त्यांच्यातील नाते अधिक दृढ होते. 

"  द्रौपदीसी बंधू शोभे नारायण "

रक्षाबंधनाच्या दिवशी वृंदावनात कृष्णाला राखी बांधण्याची प्रथा रूढ आहे, ज्यायोगे कृष्णाच्या भक्तिच्या बंधनात साधक स्वतःला अडकवून घेतात. 

राष्टीय स्वयंसेवक संघ किंवा प्रजापिता ब्रह्माकुमारी ह्यासारख्या सेवाभावी  संस्था ह्या दिवशी समाजामध्ये स्त्री पुरुषांना राखी बांधतात आणि समाजाशी असलेलं बंधूत्वाचं नातं दृढ करण्याचा  प्रयत्न करतात. 



ह्या निमित्ताने " बंधनावर " थोडासा विचार  ... 

मनुष्य जन्माला आला कि कळत नकळत विविध  बंधनात अडकतो. जन्मापासून कर्म बंधन, मौजी बंधन, विवाह बंधन अशी अनेक  बंधने पाठी लागतात. आई -वडील, भाऊ-बहीण, प्रियकर -प्रेयसी, नवरा-बायको, गुरु-शिष्य अशा नात्यांच्या  बंधनातून आपुलकीचे, जिव्हाळ्याचे बंध निर्माण होतात. 

अलीकडे तरुणाईत प्रचलित असलेला " Friendship Day " ...ह्या मैत्रीच्या नात्यात ते किती गुरफटलेले असतात ते त्या दिवशी हातात बांधलेल्या बँड वरून कळून येतं. अनेकदा हे बंध तात्पुरतेच असतात.  

हे प्रेमाचे बंध जेव्हा दोन्ही बाजूने जपले जातात, निःस्वार्थी असतात तेव्हा खूप आनंद देतात. एकमेकांसाठी देवाणघेवाण करताना किंवा शारीरिक कष्ट करताना यातना जाणवत नाहीत. पण त्यांत फसवणूक झाली, विश्वासाला तडा गेला की मग मात्र हे बंधन जाचक वाटू लागते आणि त्यातून मुक्त होण्यासाठी धडपड केली जाते. 

मन एव मनुष्याणां कारणं बंध मोक्षयो : -- मनुष्याला बंधनात अडकविणारे / बंधमुक्त करणारे हे मनच असते. मनांत ज्याप्रमाणे विचार येतात त्याप्रमाणे शरीर  सात्विक / राजसी / तामसी कर्म करते. बुद्धी सात्विक असेल तर बंध -मोक्षाचा विचार करते. केलेल्या कर्माच्या अभिमानाने किंवा अहंकाराने माणूस स्वतःच्याच कर्म बंधनात अडकतो. पण जर कर्म निष्काम भावनेने केले,ईश्वरार्पण वृत्तीने केले  तर मात्र ह्या बंधनातून मुक्त होऊन तो मोक्षापर्यंत जाऊ शकतो. कर्मावाचून कोणताही माणूस राहू शकत नाही.मनुष्याच्या वाट्याला आलेली  नैसर्गिक कर्मे  करणे अगदी योग्य आहे पण जर हि मर्यादा ओलांडली गेली तर स्वतःला, कुटुंबाला आणि समाजालाही घातक  ठरते. म्हणूनच शास्त्राची, नीती -नियमांची बंधने घातली जातात. बऱ्याच वेळा हि बंधने पाळणे जड वाटते पण समाज हितासाठी हि बंधने अगदी आवश्यक असतात. 

बंधन म्हटलं कि तिथे कर्तव्य येते, जबाबदारी येते, एकमेकांप्रती दायित्व येतं. बंधनात काही नियम पाळावेच लागतात. मुक्त वावरता येणे कठीण होते.  प्रत्येकाला वयाचे बंधन असते. जातीपातीचे बंधन मानवानेच  निर्माण केले आहे. ज्या देशात राहतो तिथली काही ठराविक बंधने, कायदे पाळून राष्ट्रधर्माचे पालन करावे लागते. 

एक महत्वाचे बंधन " वेळेचे बंधन " ... ठराविक वेळ प्रत्येकाला पाळावीच लागते. एकदा का हा क्षण निसटला कि तो परत येत नाही. अगदी घरातल्या रोजच्या कामांपासून, बाकी सर्व व्यवहारांत हे बंधन पाळले गेले नाही तर कोणतेच काम योग्य रीतीने पूर्ण होत  नाही. 
कलाकारांची कला बंधनातही छान फुलते. कोणत्याही कलाकृतीची एक ठराविक शास्त्रशुद्ध पाया तयार करून त्या आकृती बंधात केलेली मांडणीच शाश्वत असते आणि मनाला आनंद देते. कलाकारांना सूर,ताल ,लय ह्यांचे बंधन पाळावेच लागते. 
मूळात स्वतंत्र असलेल्या पशु पक्षांना माणूस स्वतःच्या हौशीसाठी हट्टाने स्वतःच्या घरांत ,पिंजऱ्यात अडकवतो. कधी त्यांची रवानगी प्राणी संग्रहालयात केली जाते. " तोडी सोन्याचा पिंजरा " अशीच  ह्या बंधनात सापडलेल्या मुक्या प्राण्यांची भावना असते. मोकळ्या वातावरणात झेप घ्यायला ते आतुर असतात . 

माणसाला इच्छा नसली तरीही बंधनावाचून जगता येणे कठीणच. काही बंडखोर व्यक्ति हि बंधने झुगारून देतात आणि स्वतःच्या स्वातंत्र्याचा पुरस्कार करतात. बंधनाची चौकट मोडणे तेव्हढे सोपे नाही आणि मग समाजाचा रोष ओढवून घेतला जातो. काही वेळा त्या व्यक्तींना वाळीतही  टाकले जाते. 

काही समाजसुधारकांनी समाज कल्याणासाठी विपरीत बंधनांतून लोकांची सुटका केली आणि चांगल्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली. ज्योतिबा फुले, महर्षी कर्वे, बाबा आमटे ह्यांनी प्रचलित बंधनांचा, रूढी परंपरांचा त्याग करून हिमालयाएवढे उत्तुंग समाज कार्य करून दाखविले . 

अनेक संत - महात्म्यांनीही ईश्वराशी जवळीक साधली  आणि ते  कर्मबंधनातून मुक्त झाले   " विसरे मीरा जनबंधना "... संत मीराबाईंनी मधुरा भक्तीने कृष्ण प्रेमाच्याच बंधनात अडकवून घेतले, बाकी सर्व बंधने आपोआपच गळून पडली .  तिच्या  भक्तीने प्रसन्न होऊन  कृष्णाने अगदी सहजपणे त्यांना आपल्यात सामावून घेतले. 

आपण सामान्य लोक संसार बंधनात इतके बांधले जातो की त्यातून बाहेर पडायचा मार्गच  दिसत नाही. तुकाराम महाराजांनी स्वतः  झाडालाच घट्ट विळखा घालून " मला सोडवा ,मला सोडवा " असा आक्रोश करणाऱ्या संसारी पुरुषांवर चांगलीच टीका केली आहे. हा विळखा आपणच सोडवायचा असतो, मोह, मायेला दूर सारून, ममत्वाचा त्याग करून ईश्वराच्या भक्ती प्रेमात रंगून गेले कि ह्या सर्व बंधनांचा माणसाला विसर पडतो खास.
भगवद्गीतेत भगवंत म्हणतात मी उदासीन असतो म्हणून कर्मे मला बाधत नाहीत,अनासक्त होऊन सगळ्या सृष्टीची मी रचना करतो त्यामुळे निर्माता असूनही मी त्या बंधनात अडकून पडत नाही. सर्व प्रकारच्या बंधनापासून अलिप्त अशा " निवृतात्मा " परमेश्वराला ,ज्याच्या केवळ स्मरणाने जन्म - मरण ,आणि संसार बंधनातून मनुष्याची सुटका होते त्या सर्वसमर्थ विष्णुला नमस्कार करून ह्या विचारांना  इथेच विराम देते. 


स्नेहा भाटवडेकर 
sneha8562@gmail.com