Wednesday, May 27, 2020

Aum Namoji Vitthala ॐ नमोजी विठ्ठला

                                   

                                                    ||  श्री शंकर  ||                                                          


                             

                          नमोजी  विठ्ठला

 

सकाळची प्रसन्न वेळ.घंटेचा नाद सभागृहांत घुमतो. सूर्याची चमचमणारी कोवळी किरणे अलगद मंदिराच्या प्रवेशद्वाराशी थबकतात.बाहेर लागूनच उभा असलेला सर्वसाक्षी पिंपळ आपल्या पानांची सळसळ थांबवून सज्ज होतो आणि सर्व भाविक सभागृहात शिस्तबद्ध रीतीने आसनस्थ होतात.अगदी वेळेत ,एकसुरात प्रातःस्मरणाला सुरवात होते.गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरु असलेली हि परंपरा. नांदेड जवळील उमरी पासून काही अंतरावर असलेले गोरठा. ह्या छोट्याश्या खेडेगावांतली मंडळी बहुतांशी अक्षर ओळखही नसलेली, शाळकरी मुलं, नित्यनेमाने सकाळी इथे येऊन दासगणू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन , प्रातःस्मरणाने आपल्या दिवसाची मंगलमय सुरवात करतात आणि मगच कामाला लागतात.

आधुनिक महिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत कवी दासगणू महाराजांची हि कर्मभूमी. आणि आता महाराजांची वस्त्र समाधी तिथे आहे.ह्या खेड्याचे भाग्य थोर म्हणूनच इथे संतपरंपरा रुजली, वाढली आणि त्याचा सुगंध आजही आसमंतात दरवळतो आहे.आपल्या प्रसादमय, भक्ती रसाने चिंब भिजलेल्या काव्याने महाराजांनी जनमानसात भक्तिप्रेमाची गुढी उभारली. भक्ती- सामर्थ्याने प्रेरित असलेली हि चळवळ आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.

विठ्ठलाच्या नावाचा गजर होतो आणि महाराजांनी रचलेल्या रसाळ स्तोत्रांची मालिकाच सुरु होते. घनगंभीर आवाज सभागृहांत निनादत राहतो. आपण हि त्या प्रवाहात कधी मिसळून जातो समजत नाही.

आता पांडुरंग स्तोत्राला सुरवात होते. मंगलाचरण होऊन, सद्गुरू आणि संतसज्जनाचे आशीर्वाद घेऊन महाराज विठ्ठलाला साद घालतात.

हे चराचरव्यापक उदारा , पांडुरंगा , रुक्मिणीपती ...

महाराजांच्या डोळ्यासमोर पांडुरंग स्तोत्र रचताना पंढरपूरचा विठ्ठल तर होताच ,त्याचबरोबर परमेश्वराचे व्यापक रूप ते ह्या पांडुरंगात पाहत होते.

मत्स्य कच्छ,वराह नरहरी | वामन ,परशुराम रावणारी |

कृष्ण ,बौद्ध ,कलंकी या परी | नाना रूपे धरिलींस  ||

महाराज वर्णन करतात , भक्तांच्या रक्षणासाठी युगांनयुगे विविध अवतार धारण करून , वेगवेगळ्या  लीला करणारा तूच.

पुढे ते म्हणतात ...

नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात | परी अवघ्यांचे सार सत्य एक तूच अससी कि ||

शैव असो किंवा वैष्णव हे पंथ दिसताना वेगळे दिसले तरी त्यामध्ये सामावलेला तूच आहेस.अद्वैत सिद्धांत महाराजांनी इथे अगदी सहजपणे मांडलेला आहे.

विठ्ठल ,परमेश्वराचा हा "नववा अवतार" भक्तांचा उद्धार करण्यासाठीच झालेला आहे. तरी महाराज म्हणतात, "जगदारंभापासून भक्त तुझे गाती गुण", यातून त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजेच त्याचे सगुण रूप " पांडुरंग" अभिप्रेत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेला हा पंढरपुरी निवास करणारा चित्तचोर. ज्यांनी ज्यांनी आपल्या अनन्य भक्तीने त्या पांडुरंगावर प्रेम केले त्या भक्तांसाठी हा धावून जातो.

ह्या लडिवाळ भक्तांची नांवे तरी किती सांगावीत ? दामाजीपंत,नरसी मेहेता, बोधले बुवा किंवा जनाबाई ,कान्होपात्रा.भगवंताशी आपुलकीच्या नात्याने  जोडल्या गेलेल्या आपल्या भक्तांचा तारणहार हाच. निजभक्तांच्या रक्षणासाठी हाच कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

हा विठ्ठल आहे तरी कसा ?

 आब्रह्मस्तंबपर्यंत तूच एक रुक्मिणीकांत " चराचरांत व्यापलेला ,घटाघटांत सामावलेला विविध रूपांत वावरणारा तो हाच. आकाशासारखे  अमर्याद,विशाल असे हे परब्रह्म प्रत्यक्षात जरी निर्गुण असले तरी जडमूढ जीवांसाठी ते सगुण झाले." रूप पाहता लोचनी ,सुख झाले हो साजणी

त्याच्या रूपाचे वर्णन करताना शब्द अपुरेच पडतात,

ते हे रुपडे मनोहर | 
  गळा घवघवीत तुळसीहार ||


हा  विठ्ठल जणू मदनाचा पुतळाच.मनोमन विठ्ठलाचे हे देखणे रूप मनःपटलावर कोरले जाते.
शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध हि भुतांची तन्मात्रे.त्याचे प्रतीक म्हणजेच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला. त्या तुलसीदलांचा सुवास आसमंत भारून टाकतो.आपल्या मनाचा गाभाराही व्यापून टाकतो. मूर्तीत प्रगटलेलें चैतन्य भक्तांची चेतना जागृत करते.

आता साक्षात हा विठ्ठल समोर उभा ठाकलाय, पण त्याची पूजा करू तरी कशाने ? सगळ्या निसर्गावर मालकी तर त्याचीच. मग माझे बोलणे, हिंडणे- फिरणे सर्व काही त्याच्याच पायाशी अर्पण करतो.माझी प्रत्येक कृती हि त्याच्याच प्रेरणेने झाली आहे. विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले महाराजांचे मन सतत त्याचा धावा करतेय.माझ्या गुणदोषांसकट माझा स्वीकार कर,म्हणून महाराज त्या  विठू  माऊलीला आर्ततेने हाक मारतात. महाराज  " अक्षर रुपी" वाङ्मयसेवा " अक्षर " विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला समर्पित करतात.

अर्थात माऊलीच ती. भक्ताचा भाव जाणून इच्छित फळ त्याला देतेच.संसार तापाने पोळलेल्या सामान्य जनांना हवे असेल ते सर्व ह्या विठ्ठलाची भक्ती आणि ह्या स्तोत्राचे पठण केल्यास प्राप्त होते.फक्त हवा प्रामाणिकपणा,श्रद्धा , निष्ठा. तो परमेश्वर  मग तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो.

महाराजांनी सुमारे एकशेदहा वर्षांपूर्वी रचलेले हे पांडुरंग स्तोत्र. ह्या स्तोत्राचे मनोभावे केलेले पारायण तुमच्या देहबुद्धीचा नाश करून त्या वैकुंठनायकाची भेट नक्की घडवील असा विश्वास महाराज व्यक्त करतात .

हे स्तोत्र त्यातील शब्द जिव्हाळ्यामुळे भाविकांना आकर्षित करते.दिवसभर त्यातील शब्दांचे गुंजन मनांत चालू राहते.वेदांत तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत इथे प्रगट होते. अवीट गोडीचे हे स्तोत्र  सामान्य भक्तालाही आपले वाटते.

माझ्यासारख्या प्रापंचिक गृहिणीला महाराजांचे शब्दवैभव,तत्वज्ञान,काव्याची ओघवती भाषा,त्यातील प्रसाद गुण,लालित्य सर्वच मोहात पाडते.आजही ते स्तोत्र म्हणताना नित्यनूतनच भासते.

ह्या भक्तिरसात डुंबण्यासाठी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ….

                                       पारायण हीच वारी | करा अत्यादरे निर्धारी |

                   भक्तिपताका स्कंधावरी |  घेऊनिया भाविक हो ||

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल....

 


Sunday, May 17, 2020

HELLO...HELLO..... हॅलो ... हॅलो ...

                                  ।।      श्री   शंकर   ।।

                                         हॅलो  .... हॅलो .... 



        आज जागतिक दूरसंचार दिन.  त्या निमित्ताने काही स्मृती सचेतन झाल्या.

"STAY CONNECTED " ह्या भावनेंत  Telecommunication चे सामर्थ्य दडलेलं  आहे. आज घराबाहेर पडायची बंदी असतांना समाजांशी प्रत्यक्ष जोडण्याचे काम ह्या Communication Network मुळे शक्य झाले.
घरातला बंदिवास सुसह्य झाला. " Thanks World Telecommunication "

मुंबई महानगरावर  अधिराज्य गाजवणाऱ्या आणि संपूर्ण जगाशीं संपर्क असलेल्या M.T.N.L. ची आज प्रकर्षाने आठवण झाली. सुरवातीला बॉम्बे टेलिफोन्स ह्या नावाने असलेल्या संस्थेचे रूपांतर पुढे महानगर टेलिफोन लि .मुंबई मध्ये झाले.ते वर्षं होतं १९८६.

सुमारे १८८२  मध्ये स्थापन झालेली " पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन" च्या सेवेअंतर्गत सामावणारी टेलिफोन सेवा मुंबईच्या जडघडणीत एक महत्वाचा टप्पा ठरली. मुंबईनंतर दिल्लीत हि सेवा सुरु झाली. ब्रिटिशांनी मुंबई बंदराचे व्यापारी महत्व चाणाक्ष नजरेने केव्हाच हेरले होते. त्यामुळेच बॉम्बे टेलिफोन्स  ची घोडदौड इथे सुरु झाली. जनसंपर्क आणि अर्थातच पुढे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हे जाळे वाढू लागले.आणि पुढे त्याचे महाजालात रूपांतर कधी झाले ते समजलेच नाही. विस्तारणाऱ्या  अफाट मुंबईला सेवा पुरविण्यासाठी अनेक दूरभाष केंद्रांची स्थापना झाली. ह्या केंद्रात कामकाजासाठी असलेला ऑपरेटर आणि इतर कर्मचारी वर्ग वाढत होता. लाईनमन" फिल्ड वर्क" साठी नियुक्त केले गेले. हि संख्या हजारोंच्या घरात पोहोचली.

मला आठवतं ,मी स्वतः फोन  साठी अर्ज केला तेव्हा मला ७ वर्षे फोनची वाट बघावी लागली होती. नंबर लागल्यावर कोण आनंद झाला होता. तेव्हा मुंबई बाहेर फोन  लावायचा म्हणजे एक दिव्यच असे. परदेशात फोन करण्यासाठी मग विदेश संचार निगम ची स्थापना झाली. ह्या सगळ्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला उत्तम चालना  मिळाली.  १ Rs .ची टेलिफोन बूथची त्या वेळेला खूपच चलती  होती आणि सर्वसाधारण जनतेला ह्या फोनचा खूप आधार वाटत असे. अनेक अपंग व्यक्तींना ह्याद्वारे रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले होते.

सर्व जगांत तंत्रज्ञानाची क्रांती झाली ती २००० सालच्या आगमनाबरोबरच  . १९९५ साली संगणक अवतरले.त्या पाठोपाठ इंटरनेट .आणि आता तर मोबाईल मुळे सर्व जगच 'अपनी मुठ्ठीमें ' अशी परिस्थिती आहे.

अनेक खाजगी कम्पन्यांनी globalisation policy ला अनुसरून टेलिफोन विश्वात धडक मारली ;स्पर्धा वाढू लागली .बाहेरच्या जगांत घडणाऱ्या अफाट घडामोडीना  तोंड देण्याचे सामर्थ्य कदाचित कमी पडले असावे. ह्या आक्रमणाने  M.T.N.L.ची हळूहळू घडी विस्कटत  गेली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांचा अवलंब करूनही फारसे यश मिळाले नाही आणि हळूहळू नवरत्नांपैकी एक असलेली हि कंपनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडू लागली." कालाय तस्मै नमः "

जानेवारी २०२० मध्ये आलेल्या Compulsory  Retirment Scheme  मुळे आज अगदी अपुऱ्या मनुष्य बळावर Telephone Ex. चालवली जात आहेत.

आजवर अनेक कुटुंबाना पोसणारी  MTNL " कुणी फोन घेता का फोन" असा आर्त सवाल करतेय भारतीय अर्थव्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या निम सरकारी कंपन्यांपैकी हि एक आघाडीची कंपनी, अहोरात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांपकी एक. अवघ्या मुंबापुरीची हेल्पलाइन

परवा  कामानिमीत्त टेलिफोन केंद्रात  जायची वेळ आली.  MTNL चे  पूर्वीचं वैभव आठवून जीव कासावीस झाला. सगळी इमारत अगदी शांत ,स्तब्ध .

एकेकाळी चैतन्याने सळसळणारी  आपली" संवादिनी "आज अशी मूक झालेली  बघून मन अबॊल झालं .
पुनःश्च हरिओम ह्या न्यायाने पुन्हा एकदा ह्या सेवेला झळाळी प्राप्त होईल आणि हि केंद्रे पुन्हा नवीन जोमाने कार्यरत होतील ... मन में हैं विश्वास ,पुरा है विश्वास ...

Wednesday, May 13, 2020

Akashashi Jadale Nate....( आकाशाशी जडले नाते )

                                                         
 ll श्री  शंकर  ll

आकाशाशी जडले नाते

                  

                 नीले गगन के तले ,धरती का प्यार पले ..... 


अगदी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपली कायम सोबत कोण करतं ? एक जमीन (पृथ्वी) आणि दुसरे आकाश  आपल्या  सर्वांना कायमच  साथ देणारं, छाया देणारं, माया देणारं.  

माणसाला नेहेमीच भव्य- दिव्य आवडते. अमर्याद, विशाल वस्तूंचे त्याला आकर्षण असते. अथांग समुद्राच्या किनारी जाऊन त्याच्या खोलीचा वेध घेणे त्याला आवडते तसेच विस्तीर्ण आकाश त्याला भुरळ घालते. ह्या निसर्ग रूपांत त्याला एक वेगळीच अनुभूती मिळते आणि काही क्षण शांतता लाभते. 


जगाच्या कोणत्याही टोकाला आपण असलो तरीं आकाश तेच, One & Only One. आपल्या जन्मांपासूनच ह्या आकाशाशी आपले नाते जोडले जाते. सध्याच्या शांत, निवांत वातावरणांत आकाशाचे अनेक विभ्रम मला न्याहाळता आले आणि आकाशाशी असलेले  हे नाते अधिक दृढ झाले. 

आकाश हि एक पोकळी आहे. ते स्थिर (अचल) विशाल, अनंत, अमर्याद आणि अलिप्त आहे. त्याच्यावर पसरणारे सर्व रंग सूर्य चंद्र,नक्षत्र चांदण्यांना आपल्यात विनातक्रार सामावून घेणारे.      

         घट घट मैं पंछी बोलता ..... प्रत्येक घटात हे आकाश स्थित असतं. अगदी आपल्या आजूबाजूला, घरांत सगळया पोकळींत हे आकाश तत्व भरून राहिलेलं असतं फक्त अतिपरिचयात अवज्ञा, ह्या न्यायाने आपल्याला त्याची जाणीव होत नाही.आपण उच्चारतो तो शब्दं ह्या आकाशाचाच गुण. त्यामुळे तो शब्द ह्या आकाशाच्या पोकळीत जाऊन, मग प्रतिध्वनीत होतो. आपलं शरीर हाही पंचतत्वांनी भरलेला एक घटच आहे. हा घट जेव्हा फुटतो तेव्हा तो आकाश तत्वाशी एकरूप होतो. 

आकाश आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत असले, तरीही ती एक अमूर्त कल्पना (Abstract)आहे. आकाश आणि धरणीचे मिलन होते असे आपण म्हणतो. ह्यालाच आपण क्षितिज म्हणतो. पण तीही  केवळ एक कल्पनाच आहे.

" आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ,स्वयंवर झाले सीतेचे , स्वयंवर झाले सीतेचे ।। "

  
     हे दृढ नाते रामायणांत दिसून येते. 

ह्या आकाशाची किती विविध रूपे आपण पाहतो?

     गगन सदन तेजोमय , तिमिर हरुनी दे प्रकाश, देई अभय .... 

रोजच्या दिनक्रमानुसार वेगवेगळ्या प्रहरांत, विविध रूपांचे, रंगछटांचे दर्शन आपल्याला आकाशांत  घडते. निसर्गचक्रानुसार, ऋतुमानाप्रमाणे हे आकाश विविध साज चढवते. 

पृथ्वी दिवसभर फिरून दमून जाते, पण आभाळ मात्र लांबूनच, स्थिर राहून, तिची गम्मत तटस्थ पणे बघत असते. हे नभ स्थितप्रज्ञ वाटले तरी मायाळू असते हं. सगळ्या जगावर त्यानें आपल्या मायेचे पांघरूण आच्छादलेले असते. 
        
       आकाश पांघरोनी,जग शांत झोपले हे । घेऊन एकतारी गातो कबीर दोहे ।।

पावसाळ्यात  ह्या नभाची आणखी विलोभनीय रूपे आपल्याला भुरळ घालतात. 

नभ मेघांनी आक्रमिले  किंवा घनघन माला नभी दाटल्या , आकाशातून पडणाऱ्या जलधारांचा वर्षांव सुखविणारा, तर कधीतरी बिजलीचा चमचमाट आकाश उजळवून टाकणारा.  पण जेंव्हा पाऊस दडी  मारून बसतो तेव्हा सगळ्यांचेच डोळे, विशेषतः शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात आणि पावसाची चातकाप्रमाणे वाट बघतात. आपल्या पूर्वजांची स्मृती जागृत होते तेव्हा आपली नजर आकाशातच त्यांचा शोध घेते आणि तिथूनच  ते आपल्यावर मायेचा वर्षाव करतायत असे जाणवत राहते. आणि नकळत त्या आकाशाकडे बघून हात जोडले जातात. 

कवी कल्पनेने तर हे आभाळ इतकं भरून येतं, अगदी मायेचा पाझरचं फुटतो त्याला.. आभाळमाया .. आपली आई सुद्धा अशीच आभाळागत माया करणारी ... 

 पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूते क्रमाने अधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जातात. ह्या पांच भुतांचा परस्पर संबंध निसर्गाचा उत्तम समतोल साधत असतो. पंचमहाभूतांच्या संयोगातूनच सर्व वस्तुजात निर्माण होते. आणि आपले दैनंदिन जीवन ह्या रचनेमुळेच सुरळीत चालू असते आणि त्याही पुढे ह्या सर्व सृष्टीचा निर्माता, जो ह्या पंचमहाभूतांनाही नियंत्रित करतो, त्याचा शोध घेणे अनिवार्य आहे असे वाटते. 

आकाशांत पतितं तोयं ,यथा गच्छति सागरं... हे सर्व निसर्गचक्र अव्याहतपणे चालू राहते, ते परमेश्वराच्या अस्तित्वामुळे. तो परमेश्वर आहे कसा? तर अगदी आकाशसारखा, निळा, अनंत, अमर्याद ,अमूर्त . 

   मनाच्या श्लोकांत समर्थ रामदास म्हणतात  " नभासारिखे रूप ह्या राघवाचे " सर्वांना व्यापून असणारे हे ब्रह्म आकाशसारखेच व्यापक, आधारभूत. तिथे दुजाभाव नाहीच. विष्णूचे एक नांव  'विहायगती ' असं आहे. आकाश हेच ज्याचे आश्रय स्थान आहे किंवा आकाशही ज्याच्या मध्ये लिन होते असा तो. 

अशा परमात्म्याने आकाश निर्माण तरी कसं केलंय ? " स्तंभावांचूनि हे उभे नभ असे "

आकाश स्वतः कोणत्याही आधाराशिवाय उभे आहे, पण तरीही सर्वाना आधारभूत मात्र आहे. 

गरुड आकाशांत उंच भरारी मारतो. झाडें उंचच उंच आकाशात झेपावतात. हिमालयासारखें ऊत्तुंग पर्वत नभाला स्पर्श करतात. आपण जेव्हा ह्या पर्वतावर असतो तेव्हा आकाशाच्या अगदी जवळ गेल्याचा भास होतो. विमानांत बसून जेव्हा आपण आकाशात उड्डाण करतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. 

अनेक संत महात्म्यांचे चरित्र आपण वाचतो तेव्हा त्यांच्या कार्याचा विस्तार आपल्याला आकाशासारखा विशाल भासतो. ।। अणू रेणूहूनि थोकडा , तुका आकाशाएवढा ।।


निसर्गापेक्षा माणसाची क्षमता कमी असली तरी त्याच्या बुद्धीने तो आकाशालाही  गवसणी घालतो. अनेक थोर व्यक्तींचा आदर्श ठेऊन त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले तर नक्कीच तो आकाशापलीकडे (Beyond The Skies) पोहोचू शकतो हे अनेकांनी सिध्द केले आहे. त्यासाठी ध्येय मात्र उत्तुंग हवे.  

आकाशांत सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य आपल्याला दिसते. त्याचे दर्शन आपल्याला नेत्रसुख देते, आनंदीत करते. पुनःपुन्हा ते दृश्य आपल्याला बघावेसे वाटते. 
    
निसर्गातील सर्वच घटकांचे शुद्ध सात्विक निर्मल रूप जपले तरच पंचमहाभूतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील . आणि इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्याही जीवनांत सप्तरंगांची उधळण होईल ,नाही का ? 




स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com