Saturday, January 23, 2021

संतकवि दासगणू महाराज( SANTKAVI DASGANU MAHARAJ )

                                                                  ।। श्री शंकर  ।।

                                                                                                               पौष शु. एकादशी ,शके १९४२

                                                    संतकवि  दासगणू  महाराज 


संतकवि दासगणू महाराज ह्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील शैलीचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न करून त्यांची स्मृती ह्या लेखातून  जागविली आहे.  

प.पू अप्पांनी भावमुक्तावलीत सद्गुरू प्रार्थनेत, दासगणू महाराजांच्या लेखणीचे महत्व अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केले आहे. हृदयातील भक्तिभाव, अलौकिक बुद्धिमत्ता, सद्गुणांची खाण आणि सदा परमेश्वर चरणाशी लीन झालेला भाव, ह्यामुळेच महाराजांचे सर्व काव्य हे तुळशीच्या मंजिऱ्यांप्रमाणे अतिशय पवित्र आहे. त्यांत्च्या साहित्याचा उगम थेट हृदयांतून झालेला आहे. त्याचा प्रत्यय त्यांचे साहित्य वाचतांना भाविकांना अनुभविता येतो.

प.पू . साईबाबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने दासगणू महाराजांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरवात केली आणि विपुल साहित्याची निर्मिती केली. सर्व संत हे जणू परमेश्वराचा दुसरा अंशच आहेत. अशा अनेकविध परिचित आणि अपरिचित संतांच्या चरित्रांचा वेध अपार मेहनत घेऊन महाराजांनी आपल्या भक्ती लिलामृत आणि भक्तीसारामृत ह्या ग्रंथांत घेतला आहे. 

दादांच्या कीर्तन आणि इतर काव्यातील उत्कटता रसिकांच्या मनाचा ठाव घेते  ती  त्यातील विलक्षण भावामुळेच. म्हणूनच त्यांच्या शब्दांचा परिमळ सतत अवतीभोवती पसरलेला असतो. इतकी अवीट गोडी ह्या सर्व साहित्यात चाखायला मिळते. आणि हे सर्व अगदी सोप्या सहज भाषेत. ह्या प्रसाद गुणामुळेच हे सर्व लेखन आपल्याला अगदी जवळचे वाटते. पांडुरंग स्तोत्र हे ह्या दृष्टीने सर्वांच्याच नित्य पठनात असल्याने परिचयाचे आहे. 

भक्ती रसाबरोबरच करुण  रसाचा परिपोष त्यांनी रचलेल्या  कीर्तनातून अनुभविता  येतो. अनेक वर्षे वारंवार हि कीर्तने ऐकूनही त्यातील समरसता जराही कमी होत नाही हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. शुचिता, वैराग्य, मधुर, सात्विक भाव त्यांच्या व्यक्तिमत्वातील ह्या गुणांचा परिपोष त्यांच्या लेखणीतून झिरपला नाही तर नवलच. 

महाराजांच्या अप्रकाशित वाङ्मयातील पुरवणी खंड जेव्हा मला  वाचनासाठी मिळाला, तेव्हा त्यांतील त्यांनी हाताळलेल्या  विविध साहित्य प्रकारांनी मन अचंबित झाले. कीर्तनातील पूर्वरंगासाठी उपयुक्त अशी उपदेशपर पदे  विविध वृत्तांत  आणि चालीत बांधलेली आहेत. रसाळ आणि भक्तिरसपूर्ण अशी हि पदे वाचायला आणि ऐकायलाही गोड वाटतात. त्याला दिलेल्या चालीही कर्णमधुर आहेत.  ह्या पदांप्रमाणेच फटके, कटाव, पोवाडा अशी विविध काव्य प्रकारांची रचना त्यांनी केली आहे. स्तवने, अभंग, आरत्या ह्यांचीही रचना आढळते. सगळ्या साहित्य प्रकारांत  त्यांच्या शब्द सामर्थ्याचा प्रत्यय येतो. 

वेगळ्या विषयावरील चहाचे अष्टक आपले लक्ष वेधून घेते. " चहा ना  बरा हा महा दुःखकरी । करी हाच उत्पन्न रोगां  शरीरी ।।" ह्या पेयाच्या प्राशनाचे विविध तोटे महाराज आपल्याला सांगतात. लोकांना सद्बुद्धी मिळावी आणि  चहापासून लांब राहावे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना त्यांनी केली आहे. 

ह्याच ग्रंथातील एक पद मला आवडले. त्यातील साध्या सोप्या आशयाने मनाला आकर्षित केले. त्याचे थोडक्यात विवेचन  :

हे पद " फटका " ह्या काव्यप्रकारांत मोडते. एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत लोकांना समजावून सांगणे म्हणजे साहित्यांतून फटकारणे. अनंत फ़ंदी हे ह्या फटक्यांचे जनक. त्यानी रचलेले फटके सुप्रसिद्ध आहेत. ते लोकांना उपदेशपर आहेत. लोकांना अज्ञान  निद्रेतून जागे करण्यासाठी हा  फटका महाराजांनी रचलेला आहे.गाताना हा फटका जोशपूर्ण वाटतो. अवघ्या नऊ कडव्यांत आणि अतिशय थोडक्या शब्दात अतिशय प्रभावीपणे समाज मनाची नस ओळखून लोकांना , व्यवहारांत कसे वागावे, आचरण कसे असावे हे समजावून सांगितले आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला आहे. उत्तम नीतिमूल्यं अंगी बाणवावीत म्हणून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सुक्ष्म  निरीक्षण शक्तीचा प्रत्यय काव्य वाचताना अनुभविता  येतो. लोकांच्या समाजात मिरवण्याचा उपहास करतांना ते स्पष्ट शब्दात म्हणतात,  " मृण्मय देहा  घालुनी कपडे । बैलोबापरी सजू नको ।।

मुळात सज्जन असलेले हे मन अनेक विकारांमुळे स्व स्वरुपापासून दूर जाते. अहंकार, ममत्व, सद्वृत्तीचा विसर, वृथा अभिमान, वाणीवर नसलेले नियंत्रण ह्यामुळे भक्तीमार्गात रमत नाही. दुसर्यांचा द्वेष - मत्सर करण्यांत, निंदा करण्यात, अशुभ चिंतण्यात वेळ विनाकारण वाया जातो. महाराजांना दांभिकपणाची खूप चीड आहे. परमार्थमार्गात साधेपणाने जीवन जगावे असा मोलाचा सल्ला ते साधकांना देतात. 

नरदेहाचे महत्व प .पू .दादांनी वारंवार प्रकट केले आहे. पण ह्या नरदेहाचे खरे सार्थक कशात आहे हे आपल्याला कळत नाही. नरदेह परमेश्वराच्या भक्तीचे प्रमुख साधन आहे.  आपण प्रपंचात नको तेव्हढे गुंतत जातो आणि मग दुःख भोगावे लागते.दासगणु महाराजांसारखे  संत निःस्पृह आणि निस्वार्थी असतात. लोकहिताची तळमळ त्यांना असते. लोकांना भक्तिमार्गाला लावून शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणे, मनाची शक्ती वाढविणे हे काम ते आपल्या साहित्यातून करत असतात. 

" अमोल ऐशा नरदेहाला येऊनि वाया जाऊ नको । दासगणूचा ऐकुनी फटका तसे चालण्या चुकू नको ।। "'

महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासाने " आधुनिक महिपती " हि त्यांना दिलेली पदवी कशी सार्थ आहे हे समजून आपले मन त्यांच्या चरणाशी सहजच  नतमस्तक होते... 

( सोबत मूळ काव्य जोडले आहे .. )





                                                                                                                                   स्नेहा भाटवडेकर 
                                                                                                                                     ९८३३०१७०७४

Wednesday, January 13, 2021

MAKARSANKRAMAN ( गोड गोड बोला ..... )

                                                        ।। श्री शंकर ।।

                                                                                                           मकरसंक्रांती ,१४/०१/२०२१

                                                     गोड गोड बोला ..... 


                              भोगावया मकरराशीस सूर्य आला । तेणे आनंद अवघ्या जगतास झाला ।।

                                                                                                        संतकवि दासगणु महाराज ..

नमस्कार मंडळी ,

२०२१ ह्या कॅलेण्डर  वर्षातला पहिला सण " मकरसंक्रांत " ,वर्षाची  सुरवातच गोड बोलण्याचा संदेश देऊन  होते . व्यवहारांत गोड  बोलूनच कामे होतात ना  ? तर अशा ह्या मकरसंक्रांतीच्या सर्वाना गोड शुभेच्छा . 

हा उत्सव सूर्य देवतेचा. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरवात होते. शेताशेतांत पिके तयार झालेली असतात. हवा मस्त थंड असते. पूर्वजांनी ऋतुमान ,परंपरा आणि धर्म ह्यांची छान सांगड घालून अनेक सण ,उत्सवांची परंपरा निर्माण केली. रोजच्या जीवनमानात बदल आणि त्याबरोबरच धर्म ,आरोग्य ह्यांची जोपासना. भारतात प्रांतानुसार ह्या सणांचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही उद्देश एकच. नात्यातील कटुता कमी होऊन एकी निर्माण व्हावी ,स्नेहवृद्धी  व्हावी. तीळ आणि गुळ हे ह्या स्निग्धतेचे प्रतीक. थंडीच्या दिवसात ,तिळगुळ बल -ऊर्जा निर्माण करणारा .परस्परांना तिळगुळ देऊन नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा .  पोस्टाने घरोघरी तिळगुळ आणि शुभेच्छा संदेश पाठविणारी पूर्वापार परंपरा आज खंडित झाली आहे. पण आमच्या गोरट्याच्या आश्रमांतून न चुकता येणारा तिळगुळ आणि संदेश आमचे गुरुपरिवाराशी असलेले  नाते अधिक दृढ करणारा . अनेक वर्षे सातत्याने चालू असलेली हि परंपरा. 

संतकवि दासगणु महाराज त्यांच्या आर्येत म्हणतात : 

                         गोडी मधुर उपजे । जेवीं या तीळ नी गुळांठायी ।

                         तैसा मत्सर जाता आपणातील । तेच घडुनिया येई ।। 

पुढे ते म्हणतात परस्परांतील प्रेमामुळे सुखाचे भांडारच  लाभते . सुकीर्ती वाढते. 

ह्या पुण्य पर्वात नदीस्नानाचे ,दान धर्माचे ,पूजा- उपासनेचे महत्व सांगितले आहे. महिला ह्या दिवशी सुगडाची पूजा करतात. हळदीकुंकू करून वस्तू लुटतात. अशा रीतीने सामाजिक बंधही दृढ होतात. 


संक्रांतीच्या दिवशी सूर्य  उपासना विशेष फलदायी ठरते . सूर्यनारायणाच्या उपासनेचे अनेक फायदे आहेत. आरोग्य ,तेज,बल वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार ,गायत्री मंत्र उपासना केली जाते.

शारिरीक बलामुळेच जीवनधारणा होते. उन्नती होते. दुर्बल माणसाकडे शक्तीचा अभाव असल्यामुळे ,त्याला कायम अन्याय सहन करावा लागतो. त्याचे समाजाकडून शोषण होते. शारिरीक ,बौद्धिक,आर्थिक,चारित्रिक बळ सूर्य उपासनेमुळेच लाभते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने हा महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो . 

 सृष्टीतील चराचराचे संवर्धन सूर्यप्रकाशामुळे होते. आदित्य हे साक्षांत नारायणाचे रूपच आहे जे आपण स्वतः डोळ्यांनी बघू शकतो." नमः सवित्रे जगदेकचक्षु : " सूर्यनारायण  जगाचा अक्षु ,नेत्र आहे आणि जगाच्या सगळ्या व्यवहारांवर त्याचे लक्ष असते . लोकांना सन्मार्ग दाखविण्याचे काम हा  सूर्य आपला मित्र होऊन करतच असतो. 

महाराजांनी त्यांच्या आणखी एका श्लोकांत ह्या सणाचे महत्व प्रतिपादिले आहे. 

                               आला अजी मकर राशीस हा तमारि ।हा भर्गदेव सविता अशिवा निवारी ।।

                                    सूर्यासवे जशि प्रभा उदयास येते । हे भर्ग चिंतन कधी नच व्यर्थ जाते ।।

अंधःकाराचा तसेच वाईट वृत्तींचा नाश करणारी अशी परमात्म्याची  शक्ति म्हणजे " भर्ग  ". हि शक्ती मनुष्याचे आयुष्य प्रदीप्त ,उज्वल करून त्याला संतुष्ट करते .  आसुरी वृतीचे दमन  करणे, दुर्गुणांचा नाश  करणे मानव कल्याणासाठी हिताचे आहे. गायत्री उपासना आपण सर्वश्रेष्ठ उपासना मानतो. ह्या उपासनेद्वारे ईश्वराचा तेजस्वी ,श्रेष्ठ अंश आपल्यात धारण करून क्षात्रतेज वाढविता येते. 

हे तेज वृद्धिंगत करून अविद्येचा नाश होऊन हळूहळू ज्ञानाचा उगम होतो. ब्रह्मतेजाचा साक्षात्कार होतो. शांततेज वाढते."  नमः शान्ताय तेजसे "  हे शांततेज उग्र तेजाहून प्रभावी असते. शाकुन्तलात महाकवि कालिदासाने म्हटले आहे " शमप्रधानेषु  तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेजः " 

                मकरसंक्रमणाच्या पुण्यदायी पर्वात आपणा  सर्वांचे तेज वृद्धिंगत होवो हि त्या नारायणाला प्रार्थना .... 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com