Sunday, June 27, 2021

ठेविले अनंते *(Thevile Anante)

                                                                    

                                                                ।। श्री शंकर ।।

                                                            ठेविले अनंते 


            Morning Walk साठी  कपडे आणि शूज ची खरेदी करून मी घरी आले. चला ! आता नियमितपणे सकाळी मस्त फेरफटका मारायचा.राधिकाशी फोन वर वेळ ठरवली. संसाराच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या.आता आपले छंद ,हौस -मौज ह्यांचा विचार करायचा. निवृत्तीनंतर राहिलेली स्वप्ने पुरी करायचे    बेत मनाशी आखत होते. मन आता अगदी realax होतं .

           निसर्ग केव्हढा मोठा कलाकार !आपले मन रिझवणारा !मनाला प्रसन्नता बहाल करणारा !थोड्या दूरवर असलेल्या निसर्गरम्य Airport कॉलनीत फिरायला जाणं म्हणूनच  माझ्या खूपच आवडीचं .मोकळ्या आकाशांत दूरवर दिसणारा एअरपोर्ट चा उंच ट्रॅफिक कंट्रोल टॉवर ,जमिनीवर झेप घ्यायला आतुर असलेली विमाने तर कधी आकाशात उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानांची झेप न्याहाळणे इथे नेहेमीचेच. कॉलनीत असलेली दुमजली छोटी छोटी बंगलेवजा घरे ,वळणदार रस्ते ,स्वच्छ परिसर ,रस्त्याच्या दुतर्फा विविध वेली,झाडे,विविध रंगांची उधळण करणारी फुले ,डेरेदार वृक्षांवर किलबिलणारे तऱ्हे -तऱ्हेचे  पक्षी ,सकाळच्या प्रसन्नतेत भर घालीत.  शांतअगदी मोकळे.रस्ते,त्यामुळे बिंधास्त कसेही फिरा. खरंच आपण मुंबईत आहोत की कुठल्या पिकनिक स्पॉटवर ? येणाऱ्या -जाणाऱ्या ओळखीच्या मंडळींशी Hi ,Hello...कोणाशी गप्पा ,तर कधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा.तिथेच असलेल्या सोमेश्वराच्या देवळात जाऊन दर्शन आणि क्षणभर विसावा.अनेकविध activities तिथे वयोमानानुसार सुरु असायच्या. एक वेगळा उत्साह त्यामुळे अंगात संचरायचा आणि दिवसभर हा तजेला टिकून राहायचा.  दिवसअगदी मस्त चालले होते. छान routine set झाले होते. 

 रोजच्या शिरस्त्यानुसार सकाळी प्रभातफेरीसाठी पावलं कॉलनी कडे वळली.कॉलनीच्या मेन गेट बाहेर "इथे फिरायला बंदी आहे" असा बोर्ड लागलेला  बघितला आणि माघारी फिरले. मन हिरमुसलं. आज दीड वर्षानंतरही गेटवर  बोर्ड तसाच आहे. तिथली प्रभातफेरी बंद झाली आणि उत्साहावर मस्त विरजण. अहो फिरणंच काय ह्या विषाणूने अगदी घरातच डांबून ठेवले की !कसलं realaxation आणि कसलं काय !उलट रोजच्या ताण तणावात जास्तच भर.जीवन पार उलटे सुलटे झाले की ! .ह्या महामारीच्या लाटेने सगळेच रुटीन बदलले.रोजच्या जीवनाचा ताळेबंद जमवताना जीव मेटाकुटीला आला. .

कधीतरी अनपेक्षितपणे जीवनांत असा एखादा turning point येतो.असं काही घडेलअसा विचारही आपण केलेला नसतो. पण विपरीत काही घडले कि मग मात्र गाडी अगदी मार्ग सोडून भरकटते .तिला आवर घालणे कठीण होते. विचारांची दिशा बदलते मग.अपने , पराये होतात. मनाचा तोल ढळतो.   विनाकारणच आपण देवाला /दैवाला दोष देतो. खरं तर काही वेळा हे आपण केलेल्या कर्मांचेच बरे वाईट परिणाम असतात.

शांत ,स्थिर जलाशयावर कोणीतरी दगड भिरकावावा आणि त्यातील पाणी उसळी मारून वर यावं ,तसं काहीसं माझं स्थिरावलेलं  मनही डुचमळत होतं . असं  का ? आपल्याच बाबतीत हे का घडावं ? आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच. मन बेचैन ,उदास होते. 

अचानक एक उद्बोधक कविता वाचनात आली  आणि त्यातला आशय मनांत उमटू लागला . मन हळूहळू शांत स्थिर होऊ लागले.  

" जाही विधी राखे राम । ताही विधि रहियेविधाता सृष्टीचा रचनाकार . सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच तिचे संगोपन करण्याची जबाबदारीही आलीच. त्यासाठी लागतात ते नियम.समाज योग्य रीतीने चालावा म्हणून नियम संहिता आणि त्याचे पालन करणे खरं तर अनिवार्य .ही  बंधने पाळल्यावरच सुरक्षितता येते. समतोल साधता येतो. " विधी " म्हणजे नियम / कायदा .ह्या कायद्यानुसार गेलात कि सुख शांती मिळतेच.  नियतीचा कायदा सर्वांसाठी सारखा. पण अलीकडे स्वैराचार वाढला, नियमांचे उल्लंघन होऊ लागले. माणसांच्या वागण्याला काही धरबंध उरला नाही. निसर्गावरच अतिक्रमण झाले. बेबंद व्यवहार,हौसमौज ...अर्थातच "अति तेथे माती " ... निसर्गानेच लॉक डाऊन चा बडगा उगारून माणसाला स्थानबद्ध केले. स्वातंत्र्यावर बंधने आली अगदी सरळमार्गी, निष्पाप लोकांचाही बळी  गेला. सुक्याबरोबर ओलंही जळतं ,नाही का ?

         " महालोमे राखे चाहे ,झोपडी में बास  दे ।जिंदगी कि डोर सौप रामजी के हाथ में ।।कवी पुढे म्हणतो ... तुम्ही गरीब,श्रीमंत ,उच्च नीच ,शिक्षित ,अडाणी कसेही असलात तरी राम कर्ता हि भावना ठेवूनच व्यवहार केला तर समाधान लाभते . त्यासाठी परमात्म्याची भक्ती करायला हवी,त्यामुळे दृढ विश्वास निर्माण होईल आणि आहे त्या कठीण परिस्थितीत सुद्धा समाधानी राहता येईल . 

आता हेच उदाहरण बघा ना .... खरं तर ती लावण्यवती .एक राजकुमारी .राजमहालात राहणारी . लौकिकार्थाने तिला कसलीच उणीव नव्हती.पण मीराबाईला होता तो पारलौकिकाचा ध्यास.कृष्णाच्या मधुर भक्तित ती आकंठ बुडली होती.त्यामुळेच सर्व सुख पायापाशी लोळण घेत असूनही तिला मात्र भक्तिरसातच चिंब भिजायचे होते.लग्नानंतर तिचे हे कृष्ण प्रेम तिच्या सासरच्यांना कसे मानवणार ? तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्या भक्तीमार्गात अनेक अडथळे आणण्यात आले. तिला विषाचा  प्याला हि देण्यात आला. पण तिने मात्र तिची अतूट भक्ती काही सोडली नाही. तिच्या ह्या भक्तीने कृष्ण प्रसन्न न होता तरच नवल. तिचा विषाचा प्याला अमृतमयी झाला तिचे संपूर्ण जीवनच तिने कृष्णाला समर्पित केले. अशी अनन्य मधुराभक्ती विरळाच. तिच्या अलौकिक भक्तिमुळेच मीराबाई संत पदाला पोहोचली आणि परमार्थमार्गात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायमचा उमटविला 

त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती संत तुकाराम महाराजांची. अगदी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा विठ्ठल नामाच्या मात्रेने त्यांनी चित्तात कायम समाधान ठेवले. 

 जे काही घडतंय ते रामाच्या इच्छेनेच.संसार करताना हा विचार अवश्य करावाच. त्याचे स्मरण कायम असावे .कवी पुढे म्हणतो , कामरसाऐवजी रामरसाचे  ग्रहण केले ,सत्संगतीचा आश्रय केला रामाशीच सख्यत्व भावाने नाते जोडले तर कितीही बिकट परिस्थितीतही आपण हा भवसागर नक्की समर्थपणे पार करू असा विश्वास मनात निर्माण होतो.

" ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ।।गोंदवलेकर महाराज म्हणतात ,पांडवांना वनवासात राहावे लागले पण त्यांना प्रत्यक्ष परमात्म्याचा,श्रीकृष्णाचा सहवास लाभला. प्रभू श्रीरामांनाही राजमहाल सोडून बारा वर्षे वनवास पत्करावा लागलाच की !

तर मंडळी! असे झाले असते तर बरे झाले असते असे म्हणण्यापेक्षा जे घडले ते माझ्या हितासाठीच घडले, असे म्हणून त्या परमात्म्याप्रती  कृतज्ञता भाव ठेवला तर ? शेवटी तूच कर्ता आणि करविता । शरण तुला भगवंता ... 

सज्जनांचे रक्षण करणे हे तर परमेश्वराचे ब्रीद. समर्थ रामदास म्हणतात" नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी "..मनापासून भक्ती करणाऱ्या साधकाचे तो रक्षण करतोच. नव्हे नव्हे त्यांच्या रक्षणासाठी तो धावून जातो. जिथे समर्पण आहे तिथे भगवंताची करुणा आहे. 

आपले स्वास्थ्य आपल्याच हाती असते अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत " ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असू द्यावे समाधान । हाच आयुष्याचा मूलमंत्र हवा .बरोबर ना ?


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

             


Thursday, June 10, 2021

गंगा दशहरा ( GANGA DASHHARA )

।। श्री   शंकर  ।।

 गंगा दशहरा  

आजपासून सुरु होणाऱ्या गंगा दशहरा (जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी )उत्सवाच्या निमित्ताने नद्यांचे आपल्या जीवनातील जे महत्वाचे स्थान आहे त्याचा थोडक्यात घेतलेला वेध. 

पृथ्वी ,आप,तेज,वायू ,आकाश ही क्रमाने अधिकाधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जाणारी पंचमहाभूते. ह्या  पंचभूतांचा परस्परांशी ,सृष्टीतील व्यवस्थेशी आणि समस्त मानव जातीशी कायमचा घनिष्ठ संबंध.हे सगळे घटक जीवनावश्यक. निसर्गाने मुक्त हस्ताने उधळलेले हे धन मानवाला विपुल प्रमाणात दिले आहे आणि तेही अगदी मोफत. म्हणूनच कदाचित त्याचे महत्व आपल्याला कळत नाही.  

 पंचमहाभूतांपैकी एक " आप " म्हणजेच पाणी म्हणजेच जीवन. नदी हा पाण्याचा मुख्य स्रोत. आपल्या भारतवर्षांत गंगा,यमुना, नर्मदा, कावेरी, गोदावरी इ. मोठ्या नद्या  पाण्याच्या उप्लब्धतेबरोबरच अनेक दृष्टींनी महत्वाच्या.  गंगा नदी भारतात  प्रथम  क्रमांकाची नदी आहे.  ती अनादी ,अनंत आहे.भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी गंगा हे साक्षात माझेच रूप आहे असे सांगितले आहे. " स्रोतसामस्मि जान्हवी ". 

भारतीय संस्कृतीचं वैशिट्य हेच आहे की निसर्गातील शक्तीविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी  देवत्व बहाल करून त्यांना पूजनीय मानतात. म्हणूनच नदीचे आपल्या जीवनातील महत्व लक्षात घेऊन तिला देवीस्वरूप मानले आहे. गंगा नदी ही  जशी भगवद्स्वरूप आहे  तशीच ती सर्वाना वत्सल मातेच्या रूपांतही दिसते.  ती पवित्र आणि पूजनीय आहेच तशीच माणसाचे पापक्षालन करणारी सुद्धा आहे. तिची भक्ती केल्यास मोक्षाची प्राप्ती होते असाही समज आहे.म्हणूनच गंगेचे महत्व अनन्यसाधारण आहे. 

विष्णूच्या पायापासून निघालेली ही  गंगा भगवान शंकराने डोक्यावर धारण केली आहे. भगीरथ प्रयत्नाने ही  गंगा पृथ्वीवर अवतरली. स्वर्ग, मृत्यु आणि पाताळ ह्या तिन्ही लोकांत गंगा विहार करते. म्हणूनच तिला त्रिपथगामिनी म्हणतात. 

गंगा नदीचे शुभ्र धवल स्फटिकाप्रमाणे असलेले पाणी अतिशय निर्मळ आहे .गंगेचा वाहता ओघ नेत्रसुखद असतो. हा प्रवाह बघून मनामध्ये  आनंदाच्या लहरी उमटतात.  गंगेच्या प्रवाहांत चंद्राची शीतलता आहे.  हे पाणी जणू काही अमृतच . राष्ट्रीय महातीर्थ असा गंगेचा गौरवपूर्वक उल्लेख केला जातो. सभ्यता आणि संस्कृतीचा उदय गंगेच्या काठावर झाला आहे.  वेदांची रचना गंगेच्या काठावरच झालेली आहे. अनेक संत आणि सत्पुरुषांनी  गंगेच्या तटावर आपले जीवन व्यतीत केले आहे.


ह्या  मनुष्यजन्मात एकदा तरी  गंगास्नान करावे अशी समजूत जनमानसांत दृढ आहे. ह्या स्नानामुळे पापांचा नाश होतो. जसे पापी लोक पापक्षालन करतात ,तसेच अनेक सत्पुरुषही  गंगेत स्नान करतात. त्यांच्या पुण्यामुळे नदी पुन्हा पावन होते. तिच्या पाण्याचे तीर्थ होते. वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा ह्या पाण्याचे महत्व सिद्ध झाले आहे. गंगाजल हे एक औषध आहे. त्यात रोगप्रतिकारक शक्ती आहे. 

पुराणकथांत गंगेचा उगम कसा ,कधी, कुठे झाला ह्याच्या रोचक कथा आहेत. गंगेचे स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झाले ते अक्षय्य तृतीयेला असा काही कथांत उल्लेख आहे.काही ठिकाणी वैशाख शुद्ध सप्तमी म्हणजेच गंगा सप्तमीला गंगा नदी पृथ्वीवर  अवतरली असे म्हणतात तर जेष्ठ शुद्ध दशमीला गंगा नदी चा उगम झाला असे म्हणतात. भारतात अनेक ठिकाणी जेष्ठ  शुद्ध प्रतिपदा ते जेष्ठ  शुद्ध दशमी ( गंगा दशहरा ) गंगा उत्सव संपन्न होतो. निसर्गाविषयीची आपली भावना आपण ह्या कृतीतून प्रगट  करतो आणि पूज्यभाव जपतो. 

 गंगेच्या प्रित्यर्थ "गंगा दशहरा" हे व्रत करतात. ह्या व्रताचे पालन केले की दहा पापे नष्ट होतात म्हणून ह्या व्रताला  " दशहरा " म्हणतात. स्नान आणि दानाचे विशेष महत्व ह्या व्रतांत सांगितले आहे. ह्या दिवशी गंगेत दहा वेळा बुड्या मारून गंगास्नान करतात. गंगेच्या पाण्यांत उभे राहून गंगास्तोत्राचे पठण करतात.  मंदिरात आणि  गंगेच्या काठांवर पुष्प ,धूप,दीप ,नवेद्य हे उपचार दहाच्या पटीत अर्पण करून गंगा मैयाचे पूजन करतात. गंगेची आरती करून तिच्या प्रवाहांत दिवे सोडतात. हे सर्व दृश्य अतिशय मनोहारी दिसते.उत्तराखंडात आणि महाराष्ट्रात विविध ठिकाणी हा गंगोत्सव साजरा केला जातो. ह्याच दिवशी पितृतर्पणही करतात. 

ह्या व्रताच्या निमित्ताने ब्राह्मण ,सुवासिनींचे पूजन करून त्यांना भोजन द्यावे , दान द्यावे अशीही रीत आहे. १० आंब्यांचे दानही विशेषत्वाने केले जाते. विविध ठिकाणी गंगेची प्रतिमा स्थापन करून तिचे विधिवत  पूजन करतात. दहा दिवस कथा -कीर्तनांचे आयोजन करतात. 

आपल्या दासगणू परंपरेत हा गंगा -दशहरा उत्सव गेली अनेक वर्षे उत्साहानें साजरा होत आहे. प. पू .दादा अनेक वर्षे लोणावळ्याला हा उत्सव साजरा करीत असत. तीच परंपरा प. पू. अप्पानीही चालू ठेवली. हा उत्सव दहा दिवस साजरा होतो. सद्गुरू दासगणू महाराजांच्या गोदा - माहात्म्य ह्या पोथीचे पारायण तसेच कथा -कीर्तनांनी हा उत्सव संपन्न होतो. प. पू .दादांच्या समाधीस पवमान ,अभिषेक होतो. दशमीचे दिवशी श्री जगन्नाथ पंडित  चरित्र सांगितले जाते. कीर्तनानंतर आरती व महाप्रसाद होतो व उत्सवाची सांगता होते. आजही हीच परंपरा अतिशय श्रद्धेने पुढे सुरु आहे. 

दक्षिण तेलंगणात एक प्रसिद्ध महाकवी होऊन गेला. सरस्वतीचा वरदहस्त  लाभलेला हा रससिद्ध कवी. त्याचे गंगेवर अतोनात प्रेम होते. " गंगालहरी " ह्या गंगेला समर्पित संस्कृत श्लोकांतून त्याने गंगेची स्तुती केलेली आहे. आपल्या हातून घडलेल्या चुका  गंगामाता समजून घेईल आणि मला आपल्या पदरात घेईल असा  भरवसा  त्याला होता. त्याच्या काव्यातून त्याने जसजशी गंगेची आळवणी केली तसतशी गंगामाई एकेक पायरी वर चढत आली  आणि ह्या तिच्या सुपुत्राला तिने आपल्या उदरांत सामावून घेतले.  गंगा दशहरा उत्सवाच्या निमित्ताने गंगा लहरी स्तोत्राचे पठण करून आणि आख्यान रूपाने  ह्या महाकवीची स्मृती जागविली  जाते. 

 .सद्गुरू दासगणू महाराजांचे कार्य गोदातीरावरच बहरले.गोदामायवर त्यांचे अलोट प्रेम.दादांनी प. पू. अप्पाना त्यांच्या जन्मानंतर पाळण्यांत घालून ह्या गोदामातेला अर्पण केले होते.  आणि गोदामातेची ठेव म्हणूनच पुढे त्यांचे  संगोपन केले. गोदेनेच लडिवाळपणे अप्पाना  आपल्या अंगाखांद्यावर वाढवले. अप्पा तिच्याविषयी कृतज्ञता  व्यक्त करताना  तिच्या वत्सलतेचे वर्णन करतात आणि गोदामातेने पदरांत घ्यावे अशी प्रेमळ विनंती करतात. 

" परम दयाघन दुसरी तुजविण नाही ह्या भूवरी ग । उचलून घे मज पदरी अंबे गंगे गोदावरी ग "

गोदावरी प्रमाणेच प. पू  अप्पाना गंगेचेही प्रचंड आकर्षण होते.प. पू .अप्पानी जीवनातील विविध टप्पे ह्या गंगेच्या साक्षीने  पार केले.अनेक ग्रंथांचे लिखाण गंगातीरावरच झाले.अनेक वर्षे पारमार्थिक साधना गंगेच्या काठावरच केली.गंगोत्रीला अप्पाना वरद नारायणाचे साक्षांत दर्शन झाले. अप्पा वरद नारायणाचे ध्यान करत गंगातटावर बसले आहेत आणि मुखाने सतत विष्णुसहस्रनामाचा उद्घोष.चालू आहे हा अद्भुत संगम उत्तरकाशीच्या वास्तव्यात आम्हांला अनुभवता आला. चतुर्थाश्रमांतील संन्यास दीक्षा ह्या गंगा किनाऱ्यावरच झाली आणि शेवटी समाधिस्थ होऊन गंगामातेच्या प्रवाहांत  स्वतःचे देह विसर्जन केले.आपले कृतार्थ जीवन नारायणाच्या चरणी समर्पित केले.      

प. पू. दादा व अप्पा दोघांनीही ह्या महानद्यांचे प्रचंड आकर्षण होते. नदीच्या रूपाने सतत प्रवाही आणि विशुद्ध ब्रह्मतत्वाची अनुभूती घेता येते. व्रते आणि उत्सवांच्या निमित्ताने हा शोध आपल्यालाही घेता यावा हीच त्यामागची खरी प्रेरणा. 

"जय संजीवनी ,जननी  पयोदे श्री गोदे भवतापहरी ।"हीच ह्या गंगा दशहरा व्रताच्या निमित्ताने गंगा/गोदा  मातेच्या चरणी विनम्र प्रार्थना .... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com


Saturday, June 5, 2021

आजोळची भेट ( Ajolachi Bhet )

                                ।। श्री शंकर  ।।

                 आजोळची भेट 


" आज कुछ धारदार हो जाये " , लेकीची फर्माइश ... ठीक है ,कोशिश करती हूँ  ... 

लेखणी सरसावली ...काय बरं लिहावं ? चलो शुरू तो करें ...  देखते हैं ... लेखणीची धार अजमावताना माझा मोर्चा वळला मात्र दुसरीकडेच ... 

जमिनीवर हातांनी जोर देतच मी उठले.गुडघ्यांचे कुरकुरणारे सांधे आता तू वरिष्ठ नागरिक झालीस , ह्याची जाणीव करून देणारे !पण हाडीमासी खिळलेल्या सवयी आता थोड्याच बदलणार ? मळलेली वाट सोडणं आता ह्या वयांत तर  खूपच कठीण! हं sss , मी आतल्या आत दीर्घ सुस्कारा सोडला.नारळाचं खोवलेलं एकसारखं ,पांढरं शुभ्र ओलं खोबरं डब्यात भरतानाच मी कौतुक भरल्या नजरेने तिच्याकडे पाहिले . धारदार ती ,पण मी मात्र प्रेमाने एकवार तिच्या पात्यावर हात फिरवला ,स्वच्छ पुसून तिला जागेवर ठेवून दिलं . 

आम्ही नवीन जागेत राहायला आलो आणि काही दिवसांतच कोकणांतून नाना आजोबा आमचे नवीन घर बघण्याच्या निमित्ताने आमच्या कडे राहायला आले. आईच्या माहेरी मीच सर्वात मोठी नात . साहजिकच आजी ,आजोबा ,मामा ,मावश्या सगळ्यांचीच लाडकी. लाड करणारे आजोबा आल्यावर मी खुश झाले. आजोबा तिकडून येताना कोकणचा मेवा नेहमीच घेऊन येत. आमच्या शेतातले लाल तांदूळ,नाचणी,कुळथाचे घरी चुलीवर भाजलेले खमंग पीठ,त्याचा गंध अगदी आरपार आजोबांच्या  बॅगेतील  सगळ्या सामानाला तर यायचाच पण घरातही दीर्घकाळ रेंगाळायचा. फणसाचे तळलेले गरे ,आंब्याची- फणसाची पोळी  आणि आजीच्या/ मामीच्या  हातचे मला आवडणारे खास रव्याचे लाडू,कधीतरी नारळाच्या किंवा कोहोळ्याच्या वडया ,हे पदार्थ इतके चविष्ट कि गावच्या मातीचा कस आणि आजोळच्या मायेचा ओलावा   ... 

एवढं सगळं सामान आजोबानीं आता अगदी त्र्याऐशी च्या घरात असून सुद्धा हौसेने उचलून आणलं.बाकीही कोणाकोणाचे वाटे त्यात असायचे. मग सगळ्यांच्या घरी जाऊन तो खाऊ पोचवणे आणि त्यासोबत खमंग गप्पा मारणे ,हा आजोबांचा वर्षानुवर्षे चाललेला आवडीचा उपक्रम .आजोबांना माणसांची खूपच आवड होती ,त्यांनी नाती जपली होती. त्यांच्याशी  गप्पा मारायला तर त्यांना कोणताही विषय चालायचा. ह्या गप्पांना वेळेचेही बंधन नसायचे."तुझेआजोबा म्हणजे फणस!एक नंबर कोकणी हीरा "माझे सासरे नेहेमी म्हणत.आजोबा बोलायला काहीसे फटकळ पण  सर्वांविषयी आपुलकी , प्रेमभाव जपणारे. आजोबा कोकणातल्या  त्यांच्या घरी यायचे निमंत्रण सर्वांना अगदी आग्रहाने देत. आणि त्यांचा हा प्रेमळ आग्रह कोणाला मोडता येत नसे.पाहुणेमंडळी आल्यावर त्यांचे आदरातिथ्य उत्तम करायचे .  

 प्रवासाचा शीण थोडा हलका झाल्यावर आजोबांनी त्यांच्या पोतडीतल्या भेटवस्तू काढायला सुरवात केली." आजोबा , आज सामान जरा जास्तच वाटतंय ,जड ही आहे खूप. काय आणलंत एव्हढं ओझं?कसा प्रवास करता ह्या वयांत एवढे सामान घेऊन?आधी हा तुला खाऊ! खाऊची  पिशवी हातात दिल्यावर एक जाडी-भरडी गोणपाटाची जड पिशवी त्यांनी  माझ्या हातात दिली. त्या पिशवीकडे मी  बघत राहिले. अगं ,तुझ्या नवीन घरासाठी खास भेट घेऊन आलोय. बघ उघडून.काय असेल ह्या  पिशवीत ? माझं कुतूहल चाळवलं .ती पिशवी उघडताच आत निघाली एक धारदार वस्तू. बसायला ऐसपैस पाट ,मोठं लोखंडी पातं अगदी धारदार,तळपणारं .नारळ खोवण्यासाठी मोठी खवणी ...  हि कसली भेट ? खरं तर माझं मन जरा हिरमुसलं . आणि हा एवढा मोठा विळोबा कोकणांत ठीक आहे हो वापरायला !.इथे मुंबईत आमच्या एवढ्या टीचभर जागेत ठेवायचं कुठे हे धूड ? माझ्या  चेहेऱ्यावर उमटलेली नाराजी चाणाक्ष आजोबानी नेमकी हेरली. 

आजोबा माझी समजूत घालू लागले. मागच्याच आठवड्यात अंगणातील जुनं फणसाचं झाड पडलं . अगं ,हे लाकूड पाटासाठी अगदी उत्तम. सुताराला बोलवून मस्त मोठ्ठा पाट करवून घेतला. मग खारेपाटणातून लोहाराला सांगून हे असं खास जाड पातं बनवलं . तुला उपगोगी होईल म्हणून मुद्दाम बनवून घेतली हो , अगदी स्वतः लक्ष घालून. त्या विळीसाठी आजोबांनी घेतलेली मेहनत बघूनच माझा जीव कासावीस झाला. " अगदी छान उपयोगी  आहे भेट " रोज मला तुमची आणि कोकणातली आठवण नक्की येईल. आजोबानाही माझं बोलणं ऐकून बरं वाटलं आणि केलेल्या मेहनतीचे चीज झाल्यासारखे वाटले . 


सुरवातीला ह्या विळीची सवय व्हायला जरा वेळच लागला.माझी वापरातली पहिली विळी अगदी नाजूक साजूक.बोथट धारेची. नव्या विळीची धार एव्हढी की बोट अगदी कापायचंच .खूप लक्षपूर्वक चिरायला लागे .आज ३० वर्षं झाली पण ही  भेट धारदार असली तरीही मला खूप आनंद देतेय. विळीवर बसून भाजी  चिरताना मी रोजच कोकणांत फेरफटका मारून येते. कोकणातलं आमचं कौलारू टुमदार ,चौसोपी,नीटनेटकं घर,एकाकी ,निवांत ,निसर्गाच्या सानिध्यात पहुडलेलं. आजी -आजोबा ,मामा-मामी ,मामेभावंडं ,कायम आला-गेला पै-पाहुणा ,भरलेलं गोकुळच ,बाजूचा गाई -म्हशींनी भरलेला गोठा,त्या मुक्या जनावरांचीही माया,  परसातला ,लेकुरवाळा फणस ,गच्च लगडलेलं आंब्याचं झाड ,सुगंधाने बहरलेली मागच्या पडवीतली  फुलबाग, आणि हो माझं आवडतं वरच्या रस्त्याच्या बाजूचं सुरुंगीचं झाड .आमच्या घराची ओळख ह्या झाडामुळेच व्हायची ह्या फुलांच्या बहराने. आसमंत दरवळायचा  .सारवलेल्या अंगणातलं तुळशी वृंदावन,त्यासमोर रेखाटलेली रांगोळी ,माजघरातलं पायऱ्या -पायऱ्यांच देवघर आणि गुरुचरित्र पारायणात मग्न असलेली आजोबांची शांत मूर्ती. 

आजोबांनी दिलेल्या ह्या अमूल्य भेटीचं महत्व कळायला मला जरा वेळच लागला. " अहर्निशम सेवामहे "  ही विळी मला अखंड सेवा देतेय.आतापर्यंत एकदाही धार  काढावी लागली नाही की दुरुस्ती नाही. गंजाची पुटं तिच्यावर चढलेली नाहीत. दिवसेंदिवस तिच्यावरचं माझं प्रेम वाढतच आहे. "जुनं ते सोन ", ह्याची प्रचिती देणारी ही भेट !  

" Neighbour's envy, owners' pride "  ही विळी. आमच्या घरी आलेल्या पाहुण्याना ही आकर्षित करते. कुठे मिळाली  हो ही विळी? नाही बाजारातून नाही आणली ती, स्पेशल आहे,आजोळची भेट ..मी कॊतुकाने सांगते. काही नातेवाईक मंडळींनी ही विळी बघून आजोबाना तशीच विळी हवी म्हणून ऑर्डर देऊन, करवून घेतली. 

आजोबांचे माझ्याकडचे ते  शेवटचेच वास्तव्य असेल हेही मला त्यावेळी कुठे माहित होते? आजोबानी अगदी शम्भरी गाठली पण वयोमानानुसार नंतर मुंबईच्या धावपळीत येणे त्यांना जमले नाही .

आज खरं तर खाली बसून चिराचिरी करण,मलाही जरा अवघड जातं .पण ह्या विळीवर बसून चिरण्यातला आनंद वेगळाच.चिरणं ही  कसं अगदी बारीक ,हवं तसं .आणखी एक सिक्रेट , तुमच्या माझ्यातच हं ,हिने मला अगदी फिट N फाईन ठेवलंय . शरीराला छान व्यायाम .   

आजच्या काळांत स्त्रियांना किचन मध्ये वेळेच्या मर्यादेतच सर्व कामं उरकावी लागतात.त्यामुळे  साधनंही तशीच लागतात. पुढच्या पिढीच्या चाकू सुऱ्या ,चॉपिंग बोर्ड बरोबरच मी माझी ही जुनी  ठेव जपतेय . मुलीचा माझा वाद-संवाद नेहेमीचाच ," आई आता कशाला हवीये ती जुनी विळी ?" हसून तो विषय मी तिथेच संपवते "अशी विळी सुरेख बाई ,भाजी ती चिरावी " .ओठावर आलेल्या ओळी गुणगुणतांना सकाळचे किचन वर्क पुन्हा सुरु होते. 

आजोळच्या घराच्या आता आहेत फक्त आठवणी.काळाच्याओघात हे जून-जाणतं घर नामशेष झालं ,पण ह्या विळीच्या रूपाने त्या घराचा एक अंश मी जपतेय हाच आनंद. 

माझ्या आजोळी निर्मळ,सतत खळखळ वाहणारे पाटाचे पाणी होते. ह्या पाण्याची संततधार पडत असायची. ह्या पाण्याची गाज ऐकण्याचा एक वेगळाच आनंद असायचा. त्या पाण्याची सोबतही असायची. 

ह्या पाटाच्या पाण्याच्या धारेसारखीच आजोळची प्रेमधारा माझ्यावर सतत बरसू दे,अशी माझ्या आजोळच्या ग्रामदैवताला " आदिनाथाला "मी नेहमी  मनोमन प्रार्थना करते. 


स्नेहा भाटवडेकर ,

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com