Friday, November 13, 2020

Jyotis Milalya Jyoti ( ज्योतीस मिळाल्या ज्योती )

                                                       ।। श्री शंकर ।।

                                           ज्योतीस मिळाल्या ज्योती 

लीस ग बाई तू ... यावर्षी थोड्या उशीरानेच आलीस खरी ...आम्हां सर्वांच्या अंतःकरणात लावायला आशेचा दीप घेऊनच आलीस ... घनतमी मनामनांत प्रकाशाची ज्योत उजळायचे सामर्थ्य तुझेच ... आबालवृद्ध सर्वांचीच तर तू लाडकी.. सर्वावर तुझी मोहिनी स्वार  होते ... अशी तू मनमोहिनी .. सर्वानाच  रिझवणारी  !

ह्यावर्षी खरं तर सगळी जीवनघडी पार विस्कटलेली ! त्यामुळे तुझं स्वागत कसं होतयं ह्याची खरं तर चिंताच होती .पण आम्ही सर्व उत्सवप्रिय. सणवार ,परंपरा उत्साहाने सांभाळतो . तो उत्साह आता वातावरणांत  जाणवतोय . हे उत्फुल्ल वातावरण पाहिलं कि जगायला एक वेगळच बळ मिळतं .  

अगं केव्हढं तुझं ते जोरदार स्वागत !आम्ही  घराघराचा कोपरा आणि कोपरा झाडून पुसून लखलखीत करतो. दुकानांत हिsss गर्दी करून खरेदी. वेगवेगळे गोड तिखटाचे फराळाचे  पदार्थ. केव्हढी हौसेने सगळी तयारी . घराच्या सारवलेल्या अंगणात नक्षीदार रंगीबेरंगी रांगोळीचे ठिपके. नाजूक हाताने काढलेल्या रेषा आणि भरलेले रंग ,जणू नात्यातलेच  मधुर भावबंध.सुगंधी अत्तर ,तेल उटणे लावून केलेली अंघोळ सगळा  शीण  घालवणारी  , मला माझ्या आजीची तीव्रतेने आठवण करून देणारी हि पहाटेची अंघोळ. अगदी थरथरता  हात कसा मायेने फिरायचा  अंगावर ,तेल उटणं लावताना.  ह्या सणाच्या दिवसांत  पाहुण्यांची उठबस ,गोडधोड पक्वानांचे जेवण ,भेटवस्तूंची देवाणघेवाण . 

नरकासुराचा वध  करून आनंद साजरा करायचा,सुगृहिणीच्या पाककौशल्याचा आस्वाद घ्यायचा .  घरीदारी वसणाऱ्या वैभवाची ,धनाची पूजा करून, अलक्ष्मीला दूर लोटायचे. हे करताना मनाला हि निर्मळ करायचे . नवरा बायकोतला स्नेह वाढवायचा आणि भाऊ- बहिणीच्या मायेचा गोडवा गायचा हि करामत तूच करू शकतेस बाई .. चार दिवस कसे आनंदाचे , मौजमजेचे .. चिंता, क्लेश ,दुःख सारे काही  विसरायचे ,जीवनातली लौकिक आणि पारलौकिक कसरत सांभाळणारी तर तूच. 

लवकर पडणाऱ्या गडद अंधाराच्या पार्श्वभूमीवर आकाशांत हळुवार ,मंद हेलकावे खाणारा आकाशदिवा आपल्या मनातही आनंदाचे कितीतरी तरंग उमटवीत असतो नाही. आणि त्याच्या जोडीला काळोखाचा छेद घेणारी तेजाची ज्योत , पणत्या ,मेणबत्या , त्यातही आता किती नाविन्य ..रंगीबेरंगी दारूकाम ..  हौसेला मोल नाही हेच अगदी खरं ... एकेका ज्योतीने दुसरी ज्योत लावून ओळीने लावलेले दिवे हीच तर तुझी खासियत . दिपावली ... 


आत्ता मला कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आठवली. आकाशातल्या चांदण्या हि परमेश्वराचीच पाऊलचिन्ह आहेत. तो सतत फिरणारा प्रवासी. दिवाळीच्या दिवसांत पृथ्वीवरील सौन्दर्य टिपण्यासाठी दिवे बनून हि प्रकाशाची वाट दाखवायला तर तो येत  नसेल ना ?  तुझी भुरळ त्यालाही पडतेच तर !मग आम्हां सामान्यांची काय कथा ! 

ऋतूबदलामुळे वातावरणांत होणारे बदल,सुखावणारा गारवा आणि अश्या पहाटेच्या वेळी कानावर पडणारे मैफिलीतले सूर... अहाहा .. कलावंतांची कला अशा वेळी बहरते . कलाकारांना जसं प्रोत्सहन मिळतं तसंच अनेक उद्योग व्यवसायांना तुझ्या आगमनाने उर्जितावस्था येते. थोडक्यात काय सगळ्यांना अगदी भरभरून आनंद देतेस. आपलं मन ,वृत्ती तरल असली कि अगदी मनसोक्त हा आनंद लुटता येतो .

 हीच वृत्ती भगवंतापाशी स्थिरावली कि मग काय बारा महिने दिवाळीच. त्या आनंदाला ओहोटी लागतच नाही. त्यासाठी अंतरात्म्यांत दीप प्रज्वलीत करायचा सकारात्मतेचा . आणि ह्या ज्ञानदीपाने अज्ञानाचा अंधःकार दूर करायचा . देहाचा दीप करून तोच परमेश्वराच्या भक्तिसाठी जाळणाऱ्या आणि "क्षणभर उघड नयन देवा " अशी त्याची आळवणी करणाऱ्या साधिकेची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली बघ .  

इतकी वर्ष सातत्याने येतेस . तुझ्या  भरपूर आठवणी, भेटीदाखल मिळालेल्या वस्तूंचा,  खजिना जमा होतो    ह्या खजिन्याच्या मालकीच्या  भावनेनेच (  ( Pleasure of  possession ) आम्ही  सुखी, आनंदी होतो. एक प्रसंग आठवला बघ  ह्यावरून.... 

दिवाळीच्या  निमित्ताने काकासाहेब दीक्षित ह्यांच्या घरचं वातावरण आनंदाने फुलले होते. बरीच पाहुणे मंडळी त्यांच्याकडे आली होती. दासगणु  महाराज सुद्धा त्यांच्याच घरी उतरले होते. साईबाबांविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे , गुरुप्रेमाच्या ओढीने यांच्यात अनोखे स्नेहबंध निर्माण झाले होते. 

दिवाळीचा सण असल्यामुळे काकासाहेबांच्या  घरातील सर्व बायका नवे वस्त्र -अलंकार घालून मिरवित होत्या.  अंगावर जुनेर कसबसं गुंडाळलेली त्या घरांत काम करणारी पोरसवदा मुलगी कारुण्यपूर्ण आवाजात कोणतेतरी गाणे गुणगुणत होती. तिच्या स्वरातील कारुण्याने दासगणू महाराज अस्वस्थ झाले. महाराजांनी  त्या मुलींसाठी नवे कपडे आणवले आणि  दिवाळीची भेट म्हणून तिला दिले. . 

दुसऱ्या दिवशी ती मुलगी मोठ्या आनंदात कामाला  आली.अंगावर जुनीच वस्त्रे होती पण काल  मिळालेल्या भेटीचा आनंद आज  तिच्या गाण्यातून ओसंडून वाहत होता. आपल्याजवळ असलेल्या वस्तूच्या मालकीचा हा आनंद होता.   कालचा करूण  रस कुठच्याकुठे पळाला होता. 

आजूबाजूला असणाऱ्या आपल्याच बांधवांच्या आयुष्यात असाच तेजाचा एखादा दीप आपणही लावला तर त्या  छोट्याश्या कृतीने तुलाही आनंदच होईल ... जाता  जाता  तुही  मोहरून जाशील ... 

. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम कि गंगा बहाते चलो ... ह्याचा प्रत्यय घ्यायला मग  काय हरकत आहे ? 

दीपावली आणि नूतन वर्षाचे अभिष्टचिंतन ... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर

sneha8562@gmail.com 




Thursday, November 5, 2020

                                                                ।।  श्री शंकर  ।।


                                                      परिस्थितीचे जरा भान ठेवा  


" जल्लोष  आहे आता उधाणलेला ! " ह्या मथळ्याची बातमी महाराष्ट्र टाइम्स च्या ५ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली. करोनाच्या वैश्विक  संकटाने  संपूर्ण देशाचे प्रकृतीमान  बिघडले आहे आणि अशा परिस्थितीत "जिवाची मुंबई" करण्यासाठी तरुण, तरुणींनी पर्यटनासाठी मुंबई बाहेर धाव घेतली आहे, ह्या  बातमीने मन विषण्ण झाले.  

करोनाचा प्रादुर्भाव होऊन निर्बंध लागू झाले त्याला आता  सहा महिने होऊन गेले. पायरीपायरीने लॉक डाउन  शिथिल होत आहे, जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण आगीची धग अजूनही जाणवतेय. अनेकांची उपजीविकेची साधनेच हिरावली गेली आहेत. त्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली आहे. अनेक उदयोगधंद्यांची वाताहत झाली आहे. . 

पर्यटन व्यवसायालाही अर्थातच मोठ्ठा फटका बसला आहे. त्यांचा सुगीचा काळ लॉक डाउनने हिरावला. राज्य शासनाने हॉटेल, रेस्टॉरंट्सना परवानगी दिल्यामुळे आता ह्या व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्पन्नाचे त्यांचे साधन चालू होणे अगदी गरजेचे आहे. त्या एका उद्योगावर बाकी अनेक लहान मोठे व्यावसायिक अवलंबून असतात. 

पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या कुटुंबीयांनी चेंज म्हणून घराबाहेर  पडताना सर्व परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.स्वतःचे आणि  कुटुंबाचे आरोग्य, सरकारी व्यवस्थेवर येणारा ताण, आर्थिक बाबींचा  विचार, मुलांची शाळा  (ऑनलाईन  असली तरी ), त्यांचे झालेले  शैक्षणिक नुकसान, ह्याचा जबाबदार पालक म्हणून विचार करणे गरजेचे  आहे. 

हॉटेलमालक स्वतःचा बुडलेला धंदा सावरण्यासाठी पर्यटकांना विविध प्रलोभनांचे आमिष दाखवत आहेत. ह्या प्रलोभनांना आपण बळी पडणार नाही ह्यासाठी पर्यटकांनी (ग्राहकांनी ) सतर्क राहणे गरजेचे आहे. 

तरुण, तरुणींचा पर्यटनाचा उत्साह ह्यावर काय बोलावे ? आजची  तरुण मंडळी ( काही अपवाद वगळता ) फारच बिंदास्त वावरत आहेत. विकेंड ला अनेक हॉटेल्स/ रिसॉर्ट्स फुल्ल असतात. आजचे  नकारात्मक वातावरण  केवळ पर्यटनाने दूर  होईल असा भाबडा विचार ते करतात का ? त्यांच्या  सळसळत्या उत्साही जीवनांत  विधायक कामे करून सकारात्मकता आणता  येणार नाही का ? ज्याची आज समाजाला खरी गरज आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव खाजगी वाहनाने प्रवास करण्याला पर्यटक पसंती देत आहेत. पण रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे  आधीच  प्रचंड ताण  असणाऱ्या पोलिसांवर/ आस्थापनांवर  अतिरिक्त कामाचा बोजा आपण टाकत तर नाही ना ह्याचा सुजाण पर्यटक विचार करतील का ? उपासमारीच्या संकटामुळे गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यांत  अनेकांना लुटल्याचे प्रकार वाचनात  येतात. तीही खबरदारी प्रवास करताना घेणे आवश्यक आहे.  

  अलीकडे  बातम्यांची शीर्षकं, नवनवीन तयार करण्यात येणारे शब्द, वाचकांच्या हळूहळू पचनी पडू लागले आहेत. ."उधाणलेला " शब्द त्याचेच छापील  उदाहरण.  बातम्या प्रसारित करताना भाषा शुद्ध असावी ह्याचा  विचार वार्ताहर करतील का ?

 नागरिकांनो तुमच्या उत्साहामुळे " आमचा जीव जातो " असे म्हणण्याची वेळ आणू नका.  बिघडलेल्या परिस्थितीचे  गांभीर्य ओळखून जरा जबाबदारीने वागा .... . 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर 

मेल : sneha8562@gmail.com

09/10/2020