Sunday, June 27, 2021

ठेविले अनंते *(Thevile Anante)

                                                                    

                                                                ।। श्री शंकर ।।

                                                            ठेविले अनंते 


            Morning Walk साठी  कपडे आणि शूज ची खरेदी करून मी घरी आले. चला ! आता नियमितपणे सकाळी मस्त फेरफटका मारायचा.राधिकाशी फोन वर वेळ ठरवली. संसाराच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या होत्या.आता आपले छंद ,हौस -मौज ह्यांचा विचार करायचा. निवृत्तीनंतर राहिलेली स्वप्ने पुरी करायचे    बेत मनाशी आखत होते. मन आता अगदी realax होतं .

           निसर्ग केव्हढा मोठा कलाकार !आपले मन रिझवणारा !मनाला प्रसन्नता बहाल करणारा !थोड्या दूरवर असलेल्या निसर्गरम्य Airport कॉलनीत फिरायला जाणं म्हणूनच  माझ्या खूपच आवडीचं .मोकळ्या आकाशांत दूरवर दिसणारा एअरपोर्ट चा उंच ट्रॅफिक कंट्रोल टॉवर ,जमिनीवर झेप घ्यायला आतुर असलेली विमाने तर कधी आकाशात उड्डाणासाठी सज्ज असलेल्या विमानांची झेप न्याहाळणे इथे नेहेमीचेच. कॉलनीत असलेली दुमजली छोटी छोटी बंगलेवजा घरे ,वळणदार रस्ते ,स्वच्छ परिसर ,रस्त्याच्या दुतर्फा विविध वेली,झाडे,विविध रंगांची उधळण करणारी फुले ,डेरेदार वृक्षांवर किलबिलणारे तऱ्हे -तऱ्हेचे  पक्षी ,सकाळच्या प्रसन्नतेत भर घालीत.  शांतअगदी मोकळे.रस्ते,त्यामुळे बिंधास्त कसेही फिरा. खरंच आपण मुंबईत आहोत की कुठल्या पिकनिक स्पॉटवर ? येणाऱ्या -जाणाऱ्या ओळखीच्या मंडळींशी Hi ,Hello...कोणाशी गप्पा ,तर कधी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा.तिथेच असलेल्या सोमेश्वराच्या देवळात जाऊन दर्शन आणि क्षणभर विसावा.अनेकविध activities तिथे वयोमानानुसार सुरु असायच्या. एक वेगळा उत्साह त्यामुळे अंगात संचरायचा आणि दिवसभर हा तजेला टिकून राहायचा.  दिवसअगदी मस्त चालले होते. छान routine set झाले होते. 

 रोजच्या शिरस्त्यानुसार सकाळी प्रभातफेरीसाठी पावलं कॉलनी कडे वळली.कॉलनीच्या मेन गेट बाहेर "इथे फिरायला बंदी आहे" असा बोर्ड लागलेला  बघितला आणि माघारी फिरले. मन हिरमुसलं. आज दीड वर्षानंतरही गेटवर  बोर्ड तसाच आहे. तिथली प्रभातफेरी बंद झाली आणि उत्साहावर मस्त विरजण. अहो फिरणंच काय ह्या विषाणूने अगदी घरातच डांबून ठेवले की !कसलं realaxation आणि कसलं काय !उलट रोजच्या ताण तणावात जास्तच भर.जीवन पार उलटे सुलटे झाले की ! .ह्या महामारीच्या लाटेने सगळेच रुटीन बदलले.रोजच्या जीवनाचा ताळेबंद जमवताना जीव मेटाकुटीला आला. .

कधीतरी अनपेक्षितपणे जीवनांत असा एखादा turning point येतो.असं काही घडेलअसा विचारही आपण केलेला नसतो. पण विपरीत काही घडले कि मग मात्र गाडी अगदी मार्ग सोडून भरकटते .तिला आवर घालणे कठीण होते. विचारांची दिशा बदलते मग.अपने , पराये होतात. मनाचा तोल ढळतो.   विनाकारणच आपण देवाला /दैवाला दोष देतो. खरं तर काही वेळा हे आपण केलेल्या कर्मांचेच बरे वाईट परिणाम असतात.

शांत ,स्थिर जलाशयावर कोणीतरी दगड भिरकावावा आणि त्यातील पाणी उसळी मारून वर यावं ,तसं काहीसं माझं स्थिरावलेलं  मनही डुचमळत होतं . असं  का ? आपल्याच बाबतीत हे का घडावं ? आपण ठरवतो एक आणि घडते भलतेच. मन बेचैन ,उदास होते. 

अचानक एक उद्बोधक कविता वाचनात आली  आणि त्यातला आशय मनांत उमटू लागला . मन हळूहळू शांत स्थिर होऊ लागले.  

" जाही विधी राखे राम । ताही विधि रहियेविधाता सृष्टीचा रचनाकार . सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच तिचे संगोपन करण्याची जबाबदारीही आलीच. त्यासाठी लागतात ते नियम.समाज योग्य रीतीने चालावा म्हणून नियम संहिता आणि त्याचे पालन करणे खरं तर अनिवार्य .ही  बंधने पाळल्यावरच सुरक्षितता येते. समतोल साधता येतो. " विधी " म्हणजे नियम / कायदा .ह्या कायद्यानुसार गेलात कि सुख शांती मिळतेच.  नियतीचा कायदा सर्वांसाठी सारखा. पण अलीकडे स्वैराचार वाढला, नियमांचे उल्लंघन होऊ लागले. माणसांच्या वागण्याला काही धरबंध उरला नाही. निसर्गावरच अतिक्रमण झाले. बेबंद व्यवहार,हौसमौज ...अर्थातच "अति तेथे माती " ... निसर्गानेच लॉक डाऊन चा बडगा उगारून माणसाला स्थानबद्ध केले. स्वातंत्र्यावर बंधने आली अगदी सरळमार्गी, निष्पाप लोकांचाही बळी  गेला. सुक्याबरोबर ओलंही जळतं ,नाही का ?

         " महालोमे राखे चाहे ,झोपडी में बास  दे ।जिंदगी कि डोर सौप रामजी के हाथ में ।।कवी पुढे म्हणतो ... तुम्ही गरीब,श्रीमंत ,उच्च नीच ,शिक्षित ,अडाणी कसेही असलात तरी राम कर्ता हि भावना ठेवूनच व्यवहार केला तर समाधान लाभते . त्यासाठी परमात्म्याची भक्ती करायला हवी,त्यामुळे दृढ विश्वास निर्माण होईल आणि आहे त्या कठीण परिस्थितीत सुद्धा समाधानी राहता येईल . 

आता हेच उदाहरण बघा ना .... खरं तर ती लावण्यवती .एक राजकुमारी .राजमहालात राहणारी . लौकिकार्थाने तिला कसलीच उणीव नव्हती.पण मीराबाईला होता तो पारलौकिकाचा ध्यास.कृष्णाच्या मधुर भक्तित ती आकंठ बुडली होती.त्यामुळेच सर्व सुख पायापाशी लोळण घेत असूनही तिला मात्र भक्तिरसातच चिंब भिजायचे होते.लग्नानंतर तिचे हे कृष्ण प्रेम तिच्या सासरच्यांना कसे मानवणार ? तिचा अतोनात छळ करण्यात आला. तिच्या भक्तीमार्गात अनेक अडथळे आणण्यात आले. तिला विषाचा  प्याला हि देण्यात आला. पण तिने मात्र तिची अतूट भक्ती काही सोडली नाही. तिच्या ह्या भक्तीने कृष्ण प्रसन्न न होता तरच नवल. तिचा विषाचा प्याला अमृतमयी झाला तिचे संपूर्ण जीवनच तिने कृष्णाला समर्पित केले. अशी अनन्य मधुराभक्ती विरळाच. तिच्या अलौकिक भक्तिमुळेच मीराबाई संत पदाला पोहोचली आणि परमार्थमार्गात आपल्या कर्तृत्वाचा ठसा कायमचा उमटविला 

त्याच्या बरोबर विरुद्ध परिस्थिती संत तुकाराम महाराजांची. अगदी प्रतिकूल परिस्थिती सुद्धा विठ्ठल नामाच्या मात्रेने त्यांनी चित्तात कायम समाधान ठेवले. 

 जे काही घडतंय ते रामाच्या इच्छेनेच.संसार करताना हा विचार अवश्य करावाच. त्याचे स्मरण कायम असावे .कवी पुढे म्हणतो , कामरसाऐवजी रामरसाचे  ग्रहण केले ,सत्संगतीचा आश्रय केला रामाशीच सख्यत्व भावाने नाते जोडले तर कितीही बिकट परिस्थितीतही आपण हा भवसागर नक्की समर्थपणे पार करू असा विश्वास मनात निर्माण होतो.

" ज्या स्थितीत ठेवील राम । त्यात राखावे समाधान ।।गोंदवलेकर महाराज म्हणतात ,पांडवांना वनवासात राहावे लागले पण त्यांना प्रत्यक्ष परमात्म्याचा,श्रीकृष्णाचा सहवास लाभला. प्रभू श्रीरामांनाही राजमहाल सोडून बारा वर्षे वनवास पत्करावा लागलाच की !

तर मंडळी! असे झाले असते तर बरे झाले असते असे म्हणण्यापेक्षा जे घडले ते माझ्या हितासाठीच घडले, असे म्हणून त्या परमात्म्याप्रती  कृतज्ञता भाव ठेवला तर ? शेवटी तूच कर्ता आणि करविता । शरण तुला भगवंता ... 

सज्जनांचे रक्षण करणे हे तर परमेश्वराचे ब्रीद. समर्थ रामदास म्हणतात" नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी "..मनापासून भक्ती करणाऱ्या साधकाचे तो रक्षण करतोच. नव्हे नव्हे त्यांच्या रक्षणासाठी तो धावून जातो. जिथे समर्पण आहे तिथे भगवंताची करुणा आहे. 

आपले स्वास्थ्य आपल्याच हाती असते अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीत " ठेविले अनंते तैसेचि राहावे । चित्ती असू द्यावे समाधान । हाच आयुष्याचा मूलमंत्र हवा .बरोबर ना ?


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

sneha8562@gmail.com

             


2 comments:

  1. सुंदर विचार आणि ओघवती भाषा !!!

    ReplyDelete