Wednesday, March 24, 2021

Girnar Yatra ( गिरनार यात्रा )

                                             ll श्री शंकर   ll                          

                       गिरनार यात्रा 

मूकं करोति वाचालं, पंगुम लंघयते गिरिम ।

यत्कृपा तमहं वंदे परमानंद माधवं   ।।

सर्व जग हे परमेश्वरी सत्तेने चालते. परमेश्वराची कृपा असेल आणि आपल्या मनांत तेव्हढीच उत्कटता असेल तर अशक्य ही  शक्य होते ह्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येतो. .

 भरतवर्षात निसर्गाचे वैविध्य अनेक ठिकाणी अनुभविता येते. अनेक तीर्थक्षेत्रं ह्या विविधतेचा साक्षात्कार घडवत  असतात. आपण भारतीय खरंच भाग्यवान,अशी अनेक तीर्थक्षेत्रे इथे आहेत. प्रत्येक स्थानाचे काही माहात्म्य आहे.भौगोलिक वैशिष्ट्यही आहे. त्यासाठी स्वतः ह्या क्षेत्रांना भेट द्यायला हवी.

काही यात्रा विनासायास घडतात. काही यात्रा मात्र आपल्या सगळ्याच क्षमतांची कसोटी घेतात. हिमालयातील चारधाम यात्रा ही अशीच एक अवघड यात्रा. काश्मिरमधील अमरनाथ आणि वैष्णोदेवी आणि कैलास मानसरोवर ह्या यात्राही अद्भुत, विलक्षण अनुभव देणाऱ्या. हेच तर खरे जीवनाचे सार्थक अशी अनुभूती देणाऱ्या. ह्या सर्व प्रवासांत तन -मन -धन अर्पावे लागते. 

" देखणी जीवने जी तृप्तीची तीर्थोदके l चांदणे ज्यातून फाके शुभ्र पाऱ्यासारखे ll 

कवी बा. भ. बोरकरांच्या नजरेतून एका वेगळ्या तीर्थाचा परिचय आपल्याला होतो. अत्युच्य, ध्येयवादी जीवन जगल्यावर येणारी जी तृप्तता असते त्यामुळे ते जीवनच देखणें  होते. .  

 निसर्गाच्या शक्तीपुढे माणसाचे खुजेपण प्रकर्षाने जाणवते. प्रवासाच्या अथवा तीर्थाटनाच्या निमित्ताने हा निसर्गाचा चमत्कार अनुभविता  येतो. निसर्ग म्हणजेच ब्रह्म. ब्रह्म हा शब्द बृहत आणि महान ह्या शब्दांनी बनला आहे. निसर्गही महान आहे. ब्रह्मज्ञान घडविणारा. म्हणूनच निसर्गाच्या सानिध्यात शक्य असेल तेव्हढे राहून हा अनुभव घ्यायचा, तीर्थयात्रेच्या निमित्ताने निसर्ग शक्ती आणि ईश्वरी शक्तीचा साक्षात्कार अनुभवता येतो. गिरनार यात्रेत निसर्गाचे कणखर रूप बघता येते. ही  यात्रा  खडतरच. ही  बिकट वाट दत्तगुरु " चालविसी हाती धरूनिया " पार करून घेतात आणि आपल्याला सामर्थ्य प्रदान करतात. त्यामुळे मनाचे पंगुत्व नष्ट होऊन आत्मविश्वास  प्राप्त होतो. .  

गुजरात राज्यांतील सौराष्ट्र प्रांतात जुनागढ जवळ  गिरनार हे दत्तक्षेत्र प्रसिद्ध आहे. गिरनार पर्वतरांगांच्या सभोवताली गीरचे घनदाट जंगल आहे. हिंस्र प्राण्यांचा इथे वावर असतो. कार्तिकी एकादशी ते पौर्णिमा ह्या जंगलात चालत ( ३५ ते ३८ कि,मी,) परिक्रमा करण्याची संधी प्राप्त होते.

हिमालयापेक्षाही जुना पर्वत रेवतक पर्वत म्हणजेच गिरनार. शिवपुराणांत, स्कंदपुराणात ह्या पर्वताचा उल्लेख आढळतो. प्रभूश्रीराम, पांडव ह्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेली भूमी अनेक सिद्धयोग्यांच्या तपाने पावन झाली आहे. साधारण १२ हजार वर्षांपूर्वीचा इतिहास ह्या स्थानाला  लाभला आहे. अशा निसर्गरम्य, परमपवित्र  गिरनार क्षेत्री निवास करणे हा एक विलक्षण अनुभव असतो. 


आत्ताच १ मार्चला हा गिरनार पर्वत चढण्याचे भाग्य दुसऱ्यांदा लाभले. आम्ही पहाटे ४.३० वाजता पहिल्या पायरीवर नतमस्तक होऊन दत्तगुरूंना " तुमचे मनासारखे दर्शन होऊन  यात्रा सुफळ, संपूर्ण होऊ दे " अशी  प्रार्थना केली. हनुमानजींचे दर्शन घेऊन यात्रेसाठी  लागणारी  शक्ती प्रदान करावी अशी विनंती केली. 

पहाटेची निरव शांतता. वातावरणांत भरून राहिलेला गारठा.आकाशाचे विभ्रम अनुभवीत, दत्तगुरूंचे नाव घेत  एकेक पायरी चढायला सुरवात होते. थोड्या थोड्या अंतराने  क्षणभर विसावा घेत मजल -दरमजल करत वाटचाल सुरु होते. सुरवातीची वाट ही बऱ्यापैकी सुसह्य. दोन्ही बाजूला असलेली दुकानांची जाग, झाडे, ह्यामुळे रस्ता अंधारातही भीतीदायक वाटत नाही. तीन -साडेतीन हजार पायऱ्यांपर्यंत जैन लोकांची बऱ्यापैकी वर्दळ असते . तिथे नेमिनाथांचे दर्शन घेऊन थोडे ताजेतवाने होऊन पुढच्या दोन हजार पायऱ्या चढून ५१ शक्तिपीठांपैकी एक असलेल्या अंबामातेचे दर्शन घ्यायचे.अंबामातेचे दर्शन घेण्यापूर्वी ह्या मधल्या टप्प्यावर पोहोचल्यावर आता पुढे जायचे कि थांबायचे अशी मनाची व्दिधा अवस्था होते..हळूहळू सूर्याची प्रभा ही आकाशात फाकलेली असते. दूरवरची शिखरे आणि वारंवार चढत जाणाऱ्या पायऱ्या मार्गाचे काठिण्य अधोरेखित करत असतात पुढची चढाई करण्यासाठी "सामर्थ्य दे आई ! " अशी प्रार्थना अंबामातेला करायची आणि पुढची अवघड वाट निश्चयपूर्वक चालण्याचा संकल्प मनोमन करायचा. अंबा माता जादूची कांडी फिरविते. अद्भुत शक्तीचा संचार होतो आणि  पुढचे अंतर त्यामानाने लवकर पार होते. वाटेत ह्या  पर्वतशिखरांच्या श्रुंखलेतील ५५०० हजार पायऱ्यांवर सर्वोच्चशिखर असलेले  गोरक्षनाथांचे दर्शन घ्यायचे. गोरक्षनाथांनी तपःसामर्थ्याने दत्तगुरूंना प्रसन्न केले आणि मला तुमच्या पादुकांचे सदैव दर्शन घडू दे अशी प्रार्थना केली .दत्तगुरु आपल्या भक्तावर प्रसन्न झाले. गोरखनाथांची धुनी सर्वात उंचावर ( ३६६६ फूट ) आणि दत्त पादुका त्यामानाने  थोड्या खाली आहेत.

 ९९९९ पायऱ्या चढून  परमगुरु  दत्तात्रयांचे वास्तव्य असलेल्या " गुरुशिखर "  सुळक्यावर चढून जाणे आणि त्यांच्या पादुकांचे दर्शन घेणे हा असाच केवळ अशक्य वाटणारा प्रवास केवळ आणि केवळ " अशक्य ही शक्य करतील स्वामी " ह्याची प्रचिती देणारा.  सलग सहा तास आपण तीव्र चढाच्या पायऱ्या चढत / उतरत असतो आणि बापरे कधी ही वाट संपणार! ह्याचा अंदाज घेत घेत पायऱ्या चढताना  कधी त्या उंचीवर येऊन दत्तगुरुंपुढे नतमस्तक होतो हे कळतही नाही. १०X १९ चौ .फुटात दत्त पादुका (जिथे दत्तगुरूंचा अक्षय निवास असतो), सुबक त्रिमूर्ती, प्राचीन गणेश, हनुमानाची मूर्ती आणि शिवलिंग आहे. बसण्यासाठी अगदी बेताची जागा असल्यामुळे अगदी थोडावेळच थांबून  दर्शन घेऊन, तिथले वातावरण मनाच्या गाभाऱ्यात भरून घ्यायचे. तिथला परिमळ अनुभवायचा आणि तुमची इच्छा असेल तर पुन्हा परत येऊ  असे म्हणत अश्रुपूर्ण नयनांनी निरोप घेत, परतीचा प्रवास सुरु करायचा. एव्हढे श्रम करून वर पोचल्यावर अगदी कमी अवधीच्या दर्शनाने मनाला चुटपूट लागते. मग बाहेरच्या पायरीवर बसून  स्तोत्रपठण  -नाम जप करून पुन्हा पुन्हा ते रूप आठवायचे.   

दत्तगुरूंचे दर्शन घेऊन जड पावलांनी ३०० पायऱ्या खाली उतरून कमंडलू स्थान येथील सोमवारीच प्रज्वलित होणाऱ्या धुनीचे दर्शन घेतले. ५००० वर्षांपूर्वीच्या ह्या धुनीत दत्तगुरु अग्निरूपांत निवास करतात अशी भावना आहे. तेथील स्वादिष्ट प्रसाद भक्षण केला. चढाईच्या अतिश्रमानंतर हा प्रसाद अमृततुल्य वाटतो. परत पायऱ्या चढण्या- उतरण्याचा पाय थकविणारा प्रवास. परतीच्या प्रवासात ह्या वेळी रोप-वे चा अनुभव घेतला. अंबामातेच्या मंदिराबाहेर ही  नवीन,आकर्षक आणि सुखदायी सोय भक्तांसाठी करण्यात आली आहे. 

           " जय गिरनारी " असा घोष करत चालताना आपल्याला सोबत करणारे      "अब थोडाही बाकी है" असा  धीर देतात. काही मौलिक सूचना करतात. त्यांच्याशी चार शब्द बोलताना आपला शीण थोडा हलका होतो. दत्तगुरूंच्या दर्शनाने शांत झालेले मन ,परतीच्या प्रवासांत निवांतपणे आजूबाजूच्या निसर्गाचा अविष्कार अनुभवू शकते.   कठीण राकट  असे हे सुळके ऊन पाण्याला तोंड देत वर्षानुवर्षे तसेच उभे आहेत. पावसांत विहरणाऱ्या ढगांचे दृश्य अनुभविता  येते तर थंडीत धुक्याने वेढलेले निसर्गसोंदर्य वेड लावते. भक्तांच्या उपासनेनुसार त्यांना काही विलक्षण अनुभव आल्याचे काही साधक सांगतात. पौर्णिमा किंवा इतर काही प्रसंगानुरूप  नियमितपणे येणारे काही साधक बघितले कि त्यांची सद्गुरूपाशी असलेली निष्ठा जाणवते. त्या बळावरच हि अवघड यात्रा ते अव्याहतपणे करतात . 

या गडावर निवासाची सोय नाही. अन्य सोयींचाही अभावच आहे.एरव्ही आपल्या घराचे दोन मजले चढ़तानाही धाप लागते.मग ही खडतर वाट चालण्याचे सामर्थ्य कशामुळे प्राप्त  होते? खाली आल्यावर मागे वळून बघतांना  तहान भूक ,शरीरधर्म एव्हढ्या वेळात विसरून आपण इतक्या उंचीवर जाऊन आलो ,ह्यावर विश्वास ठेवणे कठीण होते. दहा हजार पायऱ्या चढण्याच्या कठीण परीक्षेत आपण यशस्वी झालो ह्याचे अप्रूप वाटते. स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची ही कसोटी असते. ही अवघड परीक्षा दिली कि मग बाकी ठिकाणे  त्यामानाने सोपी वाटतात. 

सरकारतर्फे आता गिरनार क्षेत्रीं हळूहळू सोयी होत आहेत. उडन खटोलाची ( Ropeway) सोय झाल्यामुळे निम्मे अंतर आता कमी श्रमांत आणि वेळेत पार करणे शक्य झाले आहे.पायऱ्यांशिवाय गिरनारला जायचा अन्य मार्ग नाही. त्यामुळे दुकानदारांना आणि बाकी ओझी  वाहून नेणाऱ्यांना रोज पायऱ्या चढण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. कष्टकरी लोकांचे पाय चालताना बघितले की वाईट वाटते. पोटाची इवलीशी खळगी भरण्यासाठी माणसाला  किती आटापिटा करावा लागतो ! ४० KG. चे गॅस सिलेंडर १०००० पायऱ्या वर/ खाली वाहून नेणाऱ्यांविषयी मनांत कणव दाटून येते. डोलीवालेही आपला भार उचलून आपल्याला देवदर्शन घडवितात. मनांत प्रश्न येतो इतकी वर्षे ह्या क्षेत्री राहूनही ह्यांचे कष्ट संपत का नाहीत ?

 सुखसाधने मिळविण्यासाठी आपणही असेच कष्ट  सदैव करीत असतो.ध्येयाचे  शिखर गाठेपर्यंत ही चढाई कायम सुरूच असते. सतत भीती आणि दडपणाचा सामना करत ही  वाट आपण चालत असतो. शिखर गाठले की  मग उतारही आलाच. उतारावर  मनाचा ब्रेक उत्तम प्रकारे लावून व्यवहार करावे लागतात तरच तोल सांभाळता येतो. उर्वरित आयुष्य सुखासमाधानाने व्यतीत करता येते.  

आदि शंकराचार्य, स्वामी विवेकानंद,समर्थ रामदास ह्या आणि अनेक सत्पुरुषांनी भारतभ्रमण केले ,अनेक तीर्थयात्रा केल्या.  काय असेल ह्यामागचे कारण ?  भगवद्गीतेतील सोळाव्या अध्यायांत भगवान म्हणतात ,

परमात्म्याच्या स्वरूपाचे ज्ञान करून घ्यायचे असेल तर दैवी गुणांत वृद्धी व्हायला  हवी.

     अभयं सत्वसंशुध्दिर्ज्ञानयोगव्यवस्थिती : l दानं दमश्च यज्ञश्च  स्वाध्यायस्तप आर्जवम ll 

अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी दान,इंद्रियांचे दमन ,यज्ञ म्हणजेच उत्तम कर्माचे आचरण ,भगवंताचे नामसंकीर्तन  ( स्वाध्याय ) आणि तप ( कष्ट सोसणे )ह्या सर्व गोष्टींची आवश्यकता असते. 

 तीर्थयात्रेतून हे सर्व साध्य होते. कायिक ,वाचिक आणि मानसिक तपाचा उत्तम समतोल यात्रेतून घडत असतो.  हा अनुभव ह्या गिरनार यात्रेत आला. आत्मस्वरूप प्रदान करणाऱ्या त्या त्रिगुणात्मक शक्तीला मी मनोमन प्रणिपात केला. 

                        ll अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ll 



स्नेहा भाटवडेकर , मुंबई 

sneha8562@gmail.com



Wednesday, March 17, 2021

आमच्या मावशी ( Tribute to Smt.Asha Joglekar)

                                                   ।। श्री शंकर ।।

       आमच्या मावशी                                                  

डोंबाऱ्याचा खेळ अगदी ऐन रंगात आला होता. छोटी दोन माकडं अप्रतिम अभिनयाने सारा रंगमंच जिवंत करीत होती. जत्रेच्या त्या कथानकात सगळे प्रेक्षक अगदी एकरूप झाले होते. कार्यक्रम संपला. माकडांचा रोल करणाऱ्या त्या छोट्या दोन विद्यार्थिनी रंगमंचावर आल्या आणि टाळ्यांच्या गजरात सर्वानी त्यांचे खूप कौतुक केले. हा SHOW अगदी बारी-सारीक तपशिलासह जिवंत करणाऱ्या " मावशी " मग अदबशीर पावले टाकत रंगमंचावर आल्या आणि सर्वच प्रेक्षकांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. अतिशय संयत भावाने, विनम्रपणे त्यांनी त्याचा स्वीकार केला. अर्चना नृत्यालयाच्या वार्षिक गुरुपौर्णिमेच्या उत्सवांत सादर झालेला हा कार्यक्रम त्याची चिरंतन स्मृती हृदयांत कोरून गेला. असे अनेक दर्जेदार कार्यक्रम, बॅले मावशींनी त्यांच्या स्वतःच्या प्रतिभेने अजरामर केले आणि रसिकांना एका अनोख्या अनुभूतीची सफर घडविली. 

श्रीमती आशा  अनंत जोगळेकर .... 

 कलेची सुंदर अभिव्यक्ती म्हणजे आमच्या " मावशी ".... होय सगळा  परिवार त्यांना मावशी म्हणूनच ओळखतो ... मावशी म्हणजे रुबाब, मावशी म्हणजे सौन्दर्य आणि सात्विकतेचा पवित्र संगम .  मावशी म्हणजेच प्रेमाचा उत्कट अविष्कार...एक जातिवंत कलाकार.. पंडित गोपीकृष्णांच्या आदर्श शिष्या ...  आदर्श गुरु  ... उत्तम कलाकार- विद्यार्थी घडविणारी एक प्रतिभावान संस्था ...किती किती लिहावे ? तरी शब्द थिटेच पडतील असे मावशीचे कर्तृत्व ... 

मावशींच्या खऱ्या कर्तृत्वाची ओळख प्रकर्षाने झाली ती त्यांनी सादर केलेल्या विविध कार्यक्रमांतून .. त्यांच्या स्वभावाचे अनेक पैलू ह्यावेळी उलगडत गेले आणि त्यांच्यातील कलाकाराचे तेज आमच्यासाठी  प्रकाशमान होत गेले. कोणताही कार्यक्रम हा सर्व अंगाने परिपूर्णच झाला पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे आणि त्यासाठी त्यांच्या शिष्यांकडून अतिशय मेहेनतीने त्या बहारदार नृत्यप्रस्तुती करवून घेत आणि सर्वाना मंत्रमुग्ध करत. मुलींनी केलेला कोणताही ढिसाळपणा त्यांना खपत नसे आणि न बोलता केवळ नेत्रकटाक्षाने मुलींना त्यांच्या चुकांची जाणीव करून देत. ह्या शिस्तीतच त्यांच्या विद्यार्थिनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली  तयार झाल्या. केवळ नृत्यापुरतीच ही शिस्त मर्यादित नव्हती तर त्यांत आईचे संस्कार होते. " माझ्या मुली "कुठेही मागे राहता काम नयेत. हा सतत ध्यास त्यांना होता. मुलींच्या सुरक्षेविषयी त्या कायम जागरूक असत. त्यामुळे क्लासचे कार्यक्रम नेहेमी सकाळी असत. क्लासची पहिली बॅच सकाळी सातची असे आणि त्या स्वतः वेळेपूर्वी क्लासमध्ये हजर असत. त्यामध्ये सातत्य, नियमितपणा, कलेविषयीची तळमळ आणि विद्यार्थ्यांविषयी वाटणारी आत्मियता ह्या सर्वाचा सुंदर मिलाफ असे. 

२००३ साली माझी मुलगी भक्ती हिने अर्चना नृत्यालयात नृत्य शिकण्यास प्रारंभ केला. सुरवातीच्या काळातील त्या सर्व गोड स्मृती आजही आमच्या मनावर हलकेच मोरपीस फिरवितात. तिला कथक नृत्यातच पारंगत करायचे आणि तेही मावशींच्याच हाताखाली, ह्यावर तिचे बाबा अगदी ठाम होते. त्यासाठी २ वर्षे आम्हाला वाट बघावी लागली. पण प्रवेश नक्की झाला आणि आम्हां दोघांनाही योग्य गुरूच्या मार्गदर्शनाखाली भक्तीला शिकता येणार ह्याचा खूपच आनंद झाला. हा आनंद दिवसेंदिवस द्विगुणित होत आहे ह्याचे कारण मावशींनी ज्या तयारीने तिच्यातल्या कलाकाराला घडविले, तसेच कलाकार शिष्य आज भक्ती घडवीत आहे. अगदी मनापासून मावशीचे संस्कार पुढच्या पिढीच्या हातात सोपवत आहे आणि  त्यातून स्वतःला घडवीत उत्तमोत्तम कलाकृती सादर करीत आहे. कलेची ही जोपासना, वृद्धी खूपच आनंददायी  आहे. ह्याचे सर्व श्रेय मावशींच्या मेहेनतीला आहे. 

पालकांच्याही पालक : मावशी --- आम्हा पालकांना मावशी कायम क्लास सुरु असताना क्लास मधेच बसायला सांगत. त्यामुळे मुलांची तयारी कशी होतेय ते कळत असे. त्याप्रमाणे पालकांनी घरीही तशी तयारी करून घ्यावी असा मावशीचा  आग्रह असे.फक्त नृत्य शिकताना नाही तर एरवी वावरताना सुद्धा अगदी उभे राहण्यापासून , चालणे-बोलणे, वागणे, लकबी, खाणेपिणे  ह्या सर्वावर मावशीचे बारीक लक्ष असे आणि योग्य वेळी त्या ही जाणीव मुलांबरोबरच पालकांनाही करून देत. मुलांनी क्लासला दांडी मारलेली त्यांना बिलकुल खपत नसे. कलावंताची कलेवर निष्ठा हवीच म्हणून त्या मुलांना उपदेश करीत असत. अगदी सुरवाती सुरवातीला नृत्यवर्गाचे  हे सर्व वातावरण मलाही  नवीनच होते. त्यात रूळायलाही वेळ लागला. एका कार्यक्रमात भक्तीचा गजरा पडला. तेव्हा मावशींनी प्रेमाने रागवतानाच , कार्यक्रमाला कसे तयार व्हायचे ह्याच्या अनेक बारीकसारीक उपयुक्त टिप्स दिल्या . सिनिअर कलाकारांच्या तुलनेत भक्तीचा perfomance कमी वाटतोय असे म्हटले कि त्या म्हणत, अहो मातीचा गोळा आहे तो. आकार द्यायला वेळ लागणारच. थोडी वर्षे जाऊ देत मग बघा कशी तयार होतेय, हा दिलासा मिळायचा. 

  सुरवातीला मावशींबरोबर  बोलायची मला  खूप भीती वाटत असे. होताच तसा  त्यांचा आदरयुक्त दरारा. एक कलाकार म्हणून मानही होता. त्यामुळे त्यांच्या बरोबर संवाद कमीच साधला जाई. एक दिवस त्यांनी मला त्याची जाणीव करून दिली. तुम्ही खूप गंभीर असता, हसत नाही. मग भक्ती तरी कशी हसणार ? नृत्य करायचे म्हणजे चेहेरा हसरा हवा तरच लोकांना आवडेल. तेव्हापासून माझ्यातील आणि त्यांच्यातील अंतर हळूहळू कमी होत गेले आणि नंतर नंतर तर आम्ही अगदी त्यांच्या परिवारातीलच एक सदस्य झालो. अतिशय मायेने आणि आपुलकीने मावशींनी आम्हाला कळात -नकळत खूप गोष्टी शिकविल्या. त्याचे ऋण न फेडता येण्यासारखे आहे. त्यांच्या आदर्श व्यक्तिमत्वाचा ठसा आजही आमच्या मनावर खोलवर उमटलेला आहे. 

मावशी जश्या परंपरावादी होत्या तशाच परंपरेत अनेक सुधारणाही त्यांनी अतिशय धिटाईने केल्या. एक उत्तम पायंडा त्यानिमित्ताने पाडला. दरवर्षी नृत्यालयाची सत्यनारायण पूजा सांगायला महिला पुरोहितांना त्या आमंत्रित  करीत. पूजेलाही विशेष गुण मिळवणाऱ्या विद्यर्थिनीना किंवा त्या वर्षी नवीन लग्न झालेल्या जोडप्याला बसायचा मान  मिळे. १ मे च्या दिवशी श्रमदानाने सर्व विद्यार्थिनी क्लास चे वर्ग स्वछ करीत असत. अगदी बारीक-सारीक घटनांतून गुरु शिष्याना  घडवीत असतो. तशी नजर असणे आणि गुरुप्रती मनांत आदर असणे महत्वाचे. 

मावशीचे राहणे अतिशय नीटनेटके. त्यांच्याकडे बघितले कि अगदी प्रसन्न वाटे. बरेचदा  कलाकार लहरी ,आत्ममग्न  असतात. काहीवेळा वागण्यातही काहीसा उद्दामपणा असतो. पण मावशींच्या ठिकाणी ह्याचा लवलेशही नव्हता. अगदी नितळ आणि पारदर्शी स्वभाव .नीतीमूल्यांची जपणूक त्यांच्या वागण्यात असे आणि म्हणूनच त्यांच्या विषयी एकप्रकारचा आदरभाव मनांत दाटून येई . नुसते मावशींचे नाव उच्चारले  तरी समोरची व्यक्ती नतमस्तक होते . उत्तम कलाकार, गुरु आणि व्यक्ती असा नावलौकिक त्यांनी कमावला होता.   मावशीचा जो काही सहवास आम्हा  सर्वाना लाभला त्यामुळे आमचे जीवन समृद्ध झाले. काही व्यक्तिमत्व असतातच  लोभस. त्यांच्या स्नेहाचा परिमल आपले अंतरंग सुवासिक करतो. 

मावशींच्या पश्चात त्यांची सुकन्या आणि  शिष्योत्तमा पंडिता अर्चना जोगळेकर  मावशींचे कार्य समर्थपणे  पुढे नेत आहे . बाकीही अनेक जेष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार हा वारसा जोपासत आहेत आणि मावशींविषयी अतिशय कृतज्ञ आहेत. 

बघता बघता वर्षे लोटतात .हव्याहव्याशा वाटणाऱ्या व्यक्तीसुद्धा काळाच्या पडद्याआड जातात पण त्यांची कला चिरंतन असते. वर्षे लोटली तरी काही ऋणानुबंध हे ताजे टवटवीत तसेच राहतात. 

आज १८ मार्च. मावशीचा  पाचवा स्मृतीदिन. ह्या लेखनाच्या माध्यमातून त्यांना विनम्र श्रद्धांजली समर्पित करते . 



स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

18/03/2021


 

Wednesday, March 10, 2021

ओंजळ ( Onjal )

                                                                ।। श्री शंकर  ।।

                                                          ओंजळ 

परवाच एका कार्यक्रमाला आम्ही दोघे उपस्थित राहिलो होतो. मूळ लता दीदींनी गायलेले सुंदर गीत .  मनाच्या गाभाऱ्यात खोलवर रुतणारे , ज्ञानेश्वर माऊलींचे आर्त ,व्याकुळ करणारे शब्द. नाट्यगृहात गायिका हे गाणे मनोमन, सुरेल  आळवीत होती.  मी मात्र कितीतरी योजने दूर पोहोचलेल्या बाबांचा चेहेरा आठवीत होते. " भेटीलागी जीवा  लागलीसे आस ,  पाहे रात्रंदिवस वाट तुझी "... शब्दाशब्दागणिक मनात आठवण  दाटून आली होती . कित्येक दिवसांत ना भेट , ना बोलणे ... किती आठवणी ...मनांत कोंदाटलेले आर्त ! लेखणी सरसावली ... मनातले भाव उमटू लागले.... 

महाशिवरात्र ! तिथीने बाबांचा जन्मदिवस. आज ८५ वर्षे पूर्ण झाली असती .जन्म महाशिवरात्रीचा असला तरीही नाव मात्र " विष्णु " विष्णु पांडुरंग किंजवडेकर .... नावाप्रमाणेच सर्वांचा प्रेमाने , आपुलकीने  सांभाळ करणारे बाबा ... लहान -थोर सगळ्यांमध्येच समरस होणारे प्रेमळ, रसिक बाबा ... जीवनाचा आनंद स्वतः घेणारे आणि इतरांनाही त्यांत सामावून घेणारे बाबा ...  त्यांच्या प्रेमाचा धाक सगळ्यांनाच असायचा ... 

धार्मिक ,परोपकारी वृत्तीचे बाबा ... दासनवमीच्या उत्सवाला दरवर्षी गोरंट्याला , सद्गुरू दासगणु महाराजांच्या कर्मभूमीत ,बाबांसोबत  एकत्रच जाणे व्हायचे. परतताना बाबा मुंबईला आमच्या घरी ३/४ दिवस मुक्काम करून मगच रोह्याला परत  जात असत. त्यामुळे त्यांचा वाढदिवस ( महाशिवरात्र ) आमच्या घरीच साजरा व्हायचा. एकत्र बसून शिवमहिम्नाचे पठण व्हायचे .काही वेळा त्यांचे प्रवचन मोजक्या मंडळींसमोर सादर करायचे. ते हौशी , तर मी त्यांच्यापेक्षा काकणभर अधिक उत्साहाने ह्या  कार्यक्रमाचे नियोजन करीत असे. त्यांच्यामुळे माझ्याही घरांत अशा कार्यक्रमांमुळे  एक वेगळेच चैतन्य प्रगट  होत असे. अगदी अखेरपर्यंत त्यांचा उत्साह अगदी असाच टिकून होता. आज त्यांना जाऊन  १० वर्षं झाली , पण सोफ्यावर बसून नामसाधनेत दंग  असलेली त्यांची मूर्ती डोळ्यासमोरून हालत नाही. बाबा गेले पण कन्येसाठी कल्पवृक्ष लावून गेले. केवळ मलाच  नाही तर अनेक पुत्र आणि कन्यांना त्यांनी आपुलकीने , जिव्हाळ्याने प्रेमाच्या धाग्यात बांधून ठेवले.बाबांच्या आठवणीने अनेकांचे डोळे  आजही पाणावतात  ,कदाचित आयुष्यात मिळवलेलं खरं धन, श्रीमंती ती हीच. सर्व कुटुंबियांवर ,आप्त-स्नेही, शेजारीपाजारी सर्वांवर बाबांनी  मनापासून प्रेम केले .पुढे सद्गुरूंची ( प.पु स्वामी वरदानंद भारती ) भेट झाल्यावर निष्ठेने त्यांची जमेल तशी सेवा केली .त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून पारमार्थिक घडी बसवून ईश्वराला सर्वस्व अर्पण केले.अंबरनाथ चे वास्तव्य सोडून , रोह्यासारख्या नवीन ठिकाणी आयुष्याचा उत्तरार्ध व्यतीत करताना " दासगणू मंडळाची " स्थापना करून अनेकांच्या मनांत भक्तिभाव रुजविला. अनेकांना विष्णुसहस्रनाम , गीता , शिवमहिम्न , श्रीसूक्त शिकविले. नियमितपणे गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध ह्या ग्रंथांवर अभ्यासपूर्ण प्रवचने  दिली.  त्यांची  चिकाटी , जिद्द ,धडाडी  बघितली  कि मन विनम्र होते.  माझ्यातील  उणिवांची जाणीव प्रकर्षाने होते. 

गंगौघाप्रमाणे त्यांच्या अनेक आठवणी मनाच्या तटावर आदळत  आहेत.कुटुंबावरील प्रेमापोटी त्यांनी आम्हा दोघा भावंडांना उत्तमोत्तम सर्व देण्याचा त्यांच्या परीने प्रयत्न केला. कधीच कोणती उणीव भासू दिली नाही. त्यामुळे आमचे  बालपण  अतिशय आनंदात व्यतीत झाले. नुसते लाड नाही तर शिस्तही होती. चांगले विचार आणि संस्कारांचे पाथेयही दिले.प्रत्येक सण  आनंदाचा उपभोग घेऊन कसा साजरा करायचा हे त्यांनीच शिकविले. आजही प्रत्येक सणाला त्यांची  होते. अभ्यासाबरोबरच जीवन व्यवहाराचे धडे त्यांनी दिले. अगदी लहानपणापासून बाजारहाट, पोस्ट , बँक आणि इतर कामे  करायला प्रोत्साहन दिले. पुढील आयुष्यात ह्या सर्व गोष्टींचा खूप फायदा झाला. 

बाबा स्वतः अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढले. ११ भावंडे , आई-वडील,काका एव्हढा मोठा परिवार. बाबा शेंडेफळ. पण घरातील अतिशय जबाबदार व्यक्तिमत्व.अनेकांचा आधार. गावच्या माझ्या ताई , दादाची शिक्षणाची गैरसोय दूर व्हावी म्हणून त्यांना आपल्या घरी  घेऊन आले आणि त्यांच्या लग्नापर्यंतची आणि पुढचीही जबाबदारी आनंदाने स्वीकारली. कुटुंबात कोणालाही कसलीही गरज असली तरी मदतीसाठी बाबांचा  हात नेहेमीच पुढे असे.  किंजवडेकर कुटुंबाचे सणवार, कुलाचार , कुलधर्म अगदी नेटाने अनेक वर्ष आनंदाने सांभाळले. आईनेही त्यांना मूकपणे त्यांच्या सर्व कार्यात साथ केली. ह्या तुफानाबरोबर प्रपंच करताना  तिची बोटही हेलकावे खात खात पुढे जात राहिली.  बाबांसारखी तिच्यात धडाडी नसली तरीही शांतपणे हा सर्व भार  तिने पेलला. २० वर्षे आमच्या घरात साजरा होणार गणपती उत्सव हा सर्वांच्या आजही स्मरणात आहे. बाबांच्या संकल्पनेतून साजरा होणार हा उत्सव म्हणजे " आनंदपर्व " सर्व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन .अनेकांच्या मनात ह्या उत्सवाच्या आठवणी ताज्या आहेत.. 

शिक्षणाविषयी त्यांना खूप ओढ होती.लग्नानंतर, नोकरी सांभाळून M.A./ M.Com.स्वतःच्या हिमतीवर केले. शिकवायची त्यांना खूप आवड.ते उत्तम शिक्षक होते. आमच्या अभ्यासाबरोबरच आजूबाजूच्या अनेक मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. स्वतः कॉलेज मध्ये शिकवायला सुवात केली. पुढे नातवंडानाही जमेल तेव्हढे मार्गदर्शन केले. अनेकांना नोकरी -व्यवसाय मिळवून देण्यातही त्यांचा पुढाकार असायचा. 

सामाजिक क्षेत्रातही ते अग्रेसर असत. Rotary Club, कऱ्हाडे ब्राहमण संघ आणि इतर अनेक संस्थांमध्ये त्यांनी अगदी जीव ओतून काम केले आणि आमच्यासमोरही आदर्श निर्माण केला. काम कोणतेही असो त्या विषयी वाटणारी तळमळ हा त्यांचा स्थायीभाव होता. त्याच ओढीने ते सर्वच क्षेत्रांत काम करीत. त्यामुळे त्यांच्या कामाचा ठसा दीर्घकाळ रेंगाळत  राही. आम्हालाही कोणत्याच बाबतीत त्यांनी कधी विरोध केला नाही. त्यामुळे मीही नाटक , विद्यार्थी परिषद अश्या अनेक आघाडयांवर काम करत राहिले. " Sky is the limit " हा त्यांचा मंत्र होता,जो कायम पुढे जायला प्रेरणा देत असे. 

बाबा एखाद्यावर जितके मनस्वीपणे प्रेम करत ,तेवढेच पटकन ते दुखावलेही जात. मग मात्र त्या व्यक्तीबरोबर संबंध पूर्णपणे तोडून टाकीत. त्यांचे अगदी जवळचे दोन तीन मित्र ह्यामुळे कायमचे दुरावले. माझ्या एका भावाचे लग्न त्यांना त्यांच्या मनातील एका मुलीशी लावायची इच्छा होती. काही कारणाने ते घडले नाही. ते इतके दुखावले कि त्या लग्नालाही मग ते हजर राहीले  नाहीत. अतिशय संवेदनशील असा त्यांचा स्वभाव जपणे हे काही वेळा खूपच अवघड काम असे. प्रत्येकाची काळजी करण्याचा त्यांचा स्वभाव. शेवटपर्यंत मुले , नातवंडे ह्यांची काळजी करता करता त्यांनी स्वतःकडे मात्र दुर्लक्ष केले आणि गंभीर आजारांना निमंत्रण दिले. 

विशुद्ध आनंदाचा निखळ झरा म्हणजे बाबा ... जीवनावर भरभरून प्रेम करणारे...दुसऱ्यांच्या आनंदात तितक्याच आनंदाने सहभागी होणारे  ,जेष्ठत्वाच्या नात्याने कोणत्याही  चांगल्या कार्याला पसंतीची दाद देणारे  ... हे सर्व बाबाच करू जाणे ... 

अगदी अखेरच्या श्वासापर्यंत ते आमच्या ओंजळीत दान टाकत राहिले. त्यांच्या दातृत्वाने भरलेली आमची ओंजळ , त्यांच्या नसण्यामुळे मात्र  रिक्त आहे ... बाबा हि ओंजळ भरलेली आहे म्हणून आनंद मानू कि रिक्त आहे ह्याचे दुःख करू ? माझ्या सर्व प्रश्नांची , समस्यांची उत्तरे द्यायला तुम्ही समर्थ होतात. आता उरलेत ते फक्त प्रश्नच . तुमच्यासारखी निरपेक्ष, जिवापाड -माया करणारी व्यक्तिच खरं तर हे मौलिक मार्गदर्शन करू शकते .ती जागा आजही रिक्तच आहे बाबा !

तुम्ही दिलेल्या संस्कारांची शिदोरी  घेऊनच आजपर्यंतची वाटचाल केली.त्यामुळे आज मनाच्या गाभाऱ्यात शांती . सुख, समाधान सर्व काही आहे त्याचे श्रेय  तुमचेच आहे .पण एकच उणीव आहे... 

तुम्हाविना शोभा नाही वैभवाच्या देऊळाला ... 

पाठीवरी फिरवा हात , याहो बाबा एकच वेळा, याहो  बाबा एकच वेळा... 


तुमचीच ताई ... 

महाशिवरात्री, २०२१ ( ११/०३/२०२१ )

Friday, February 26, 2021

मराठी असे आमुची मायबोली ( Marathi Ase Amuchi Mayboli )

।। श्री  शंकर  ।।

मराठी असे आमुची मायबोली 

२७ फेब्रुवारी हा" मराठी राजभाषा दिवस "

परवा एका शाळेत ह्या निमित्ताने  कथाकथन स्पर्धेचे आयोजन केले होते. ह्या  स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून जाण्याचा योग आला. पहिली ते चौथी ह्या वर्गांसाठी हि स्पर्धा आयोजित केली होती. मराठी आणि अमराठी  माध्यमांत शिकणाऱ्या  मुलांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला.  मुलांचे निरागस बोलणे, हावभाव, कथेत रंगून जाणे आणि मनमोकळा वावर , ह्यामुळे मीही ४ तास त्या वातावरणात अगदी रममाण झाले. मुलांना काही बोध करणे अपेक्षित होते. एवढ्या छोट्या दोस्ताना काय सांगायचे ? एका अर्थी हा मलाच बोध होता. आत्मपरीक्षणाची एक संधीच. 

विचार करताना भाषेचा  एकेक पैलू उलगडू लागला. अतिशय गोड, वळणदार अशी हि आपली मराठी राज्यभाषा आणि मातृभाषा. संस्कृत हि जग्ग्जननि असली तरी मराठी हि आपली माय. आणि मायच्या कुशीतच तर लेकरू निवांत असतं . 

 कोणतीही भाषा आत्मसात करायची म्हणजे सर्वसाधारण चार प्रक्रिया आवश्यक असतात. श्रवण, वाचन, लेखन आणि संभाषण. ह्या प्रक्रिया ज्या प्रमाणांत आत्मसात होतील तेव्हढी भाषा अधिकाधिक समृद्ध होत जाते. ह्या भाषेचा प्राण  म्हणजे" शब्द ."...                                               

कुठेतरी वाचनात आलं, " शब्द शोधला तर अर्थ आहे, वाढला तर कलह आहे, सोसला तर सांत्वन आहे, झेलला तर आज्ञा आहे, टाकला तर वजनदार आहे, शब्द अक्षय्य आहे, शब्द निःशब्द पण आहे " ... 

  आपल्या भाषेचे महत्व म्हणजे त्यातील " शब्द भांडार " अक्षरांपासून शब्द ! अनेक शब्द एकत्रित करून तयार झालेली लडी म्हणजे वाक्य. संगीतात केवळ सात सुरांपासून अनेकविध सुंदर सुंदर राग तयार होतात. मनाला मोहवून टाकतात. तसेच शब्दांचे. शब्द कसे गुंफले जातात त्यावरून त्या लेखकाची श्रीमंती कळते. त्यामागे अर्थात साहित्यिकांची प्रतिभा असते. म्हणी, वाक्प्रचार, सुभाषिते ह्यांचा वापर करून चिरकाळ टिकणारी अशी साहित्यलेणी तयार होतात. अर्थगर्भ, रसाळ कविता कमीतकमी शब्दांत मनाचा ठाव घेतात. चिरंतन असणारी ही आपली साहित्य संस्कृती. वाचनामुळे समृद्ध होणारे आपले जीवन. 

ह्याच अनुषंगाने "  कथा " ..ह्या साहित्य प्रकाराचा घेतलेला शोध ... ह्या शोधातून  झालेला बोध  मांडण्याचा अल्पसा  प्रयत्न. 

प्रत्येक व्यक्तीचे आयुष्य हि एक स्वतंत्र कथाच असते. जोपर्यंत  तीरावर असतो तोपर्यंत आपल्याला खोलीचा अंदाज येत नाही पण सहवासाने  प्रत्येक आयुष्याची कथा वेगवेगळं वळण घेते. कधी ह्या कथांच्या मागे लपलेल्या व्यथा दुःखी करतात तर कधी आदर्श जीवनपट नजरेसमोर साकारतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण चरित्रच उदात्ततेचे पैलू दर्शविणारे. काही काल्पनिक व्यक्तिमत्व सुद्धा अजरामर होतात. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात साहित्यिक  वि .वा .शिरवाडकरांच्या" नटसम्राट " मधील अप्पा बेलवलकर  हे असेच एक अतिशय गाजलेले पात्र.  

.कथा , गोष्ट ... प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग ...   आबालवृद्धांना भुरळ घालणारी गोष्ट. अगदी जन्मालाआल्यापासून काऊ- चिऊ च्या गोष्टीपासून  आपण ह्या गोष्टीत रमतो ते अगदी जीवनाच्या अखेरपर्यंत.  गोष्टीच्या स्वरूपात पालट होतो एवढाच काय तो फरक. कथांचे तरी किती विविध प्रकार. ऐतिहासिक, बोध कथा, नीतिकथा, चातुर्य कथा, शौर्यकथा, युद्ध कथा, प्रेमकथा, रहस्य कथा...  आपल्या वयानुसार आपली कथेविषयीची रुची बदलत जाते. मोठेपणी नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका, वेब स्टोरी अशी कथांची वर्गवारी होते. पण मूळ कथा तीच. ह्या कथा काही विचार देणाऱ्या, बोध करणाऱ्या. त्यांतील अगदी आजचा पर्यावरण जागृती सारखा विषय सुद्दा ह्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोचविता येतो. ह्या कथांतून सांगितलेले सार, तात्पर्य आचरणांत आणण्यासाठीच ह्या कथांचे प्रयोजन. जगण्याचे धडे देणाऱ्या ह्या कथा. अगदी लहान वयात ऐकलेली लाकूडतोड्याची गोष्ट जर आयुष्यभर  अंमलात आणली तरीही पुरे. जी वस्तू आपली नाही त्याचा प्रामाणिकपणे त्याग करायचा ह्यात हि खूप मोठे मूल्य आहे. 

 कथांमधून भाषा विकास साधता येतो. संवादाचे एक उत्कृष्ट साधन म्हणजे  कथा. मुलाप्रमाणेच मोठ्याना  खिळवून ठेवणाऱ्या, मनोरंजन करणाऱ्या. अनादी काळापासून सांगितल्या जाणाऱ्या रामायण - महाभारतातील कथा ह्या जीवन मूल्यांचे संवर्धन करतात. आपल्या संस्कृतीचे, परंपरांचे दर्शन घडवितात. जिजाऊसाहेबांनी शिवबाना घडवले ते ह्या नीतिकथांतूनच. 

 भागवतात श्रीकृष्णाच्या लीलांचे मनोहारी वर्णन आहे.पुराणांत अनेक कथांचा समावेश आहे. कीर्तनातून समाज जागृती व्हावी ह्या उद्देशाने तत्वज्ञान सोप्या भाषेत कथांच्या माध्यमांतून पोचवले जाते. सद्गुरू दासगणू महाराज हे अलीकडील संतकवी. त्यांनी अनेक  रसाळ कीर्तनाची निर्मिती केली आणि त्यातून समाजाला बोध केला. त्यांचीच परंपरा  त्यांचे शिष्योत्तम स्वामी वरदानंद  भारतीनी सुद्धा पुढे चालू ठेवली. 

पूर्वी घरातील मोठी माणसे आजी-आजोबा, ताई-दादा गोष्ट सांगायचे. पुढे हि जागा कॅसेट ने घेतली. छान छान गोष्टीच्या अनेक ऑडिओ कॅसेट मुलांसाठी उपलब्ध होत्या. अगदी घरातील मंडळीच  गोष्टी सांगत आहेत असा भास व्हायचा. काही संस्कार वर्गातून गोष्टी सांगण्याचे उपक्रम सुरु झाले. आधुनिक काळांत छोट्या कुटुंब पध्दतीत  पालक मुलांना वेळ देऊ शकत नसल्याने ह्या गोष्टींची आवश्यकता भासू लागली. साधने बदलली तरीही गोष्टींची आवड मात्र कायम आहे. 

दूरदर्शनवर  लागणाऱ्या कार्टून कथाही अशाच मुलांना वेड लावणाऱ्या. आता मोबाईल, लॅपटॉप, संगणक, टॅब इ. विविध आधुनिक साधने अगदी बालगोपाळांच्या हातात सामावलेली असतात कि त्यांना त्याचे व्यसनच लागते. त्यापासून दूर करणे कठीण जाते. अगदी दोन वर्षांपासूनची बालके सुद्धा सतत मोबाईल हातात धरून बसलेली असतात. 

काही वर्षांपूर्वी व.पु.काळे, गिरीजा कीर, माडगुळकर, मिरासदार ह्यांच्या कथाकथनाचे दर्जेदार कार्यक्रम खूपच लोकप्रिय होते. आज अभावानेच हे कार्यक्रम होतात. 

नृत्याच्या माध्यमातून कथा  लोकांपर्यंत पोचतात. " कथा कहे  सो कथक " कथक नृत्याचे मूळ ह्या कथाकथनातच दडलेले आहे. अनेक नृत्यशैलीतून विविध चरित्रआणि पौराणिक कथा रसिकांना मंत्रमुग्ध करतात.  

 बाकीच्या आक्रमणामुळे दिवसेंदिवस वाचन संस्कृती लोप पावत आहे असा ओरडा ऐकू येतो. माध्यम बदलले तरी मूळ कथा केंद्रस्थानी आहेच. 

मनुष्यप्राणी मुळातच गोष्टीवेल्हाळ. त्यामुळे कोणतीही गोष्ट त्याला चघळायला आवडते. दुसऱ्यांच्या गुजगोष्टींत तर सर्वांना  भलताच रस. तिखटमीठ लावून, वर झणझणीत तडका  देऊन गावगॊष्टी वाऱ्यासारख्या  पसरायच्या. आज मोबाईल किंवा फेसबुक वर ह्याच गोष्टी क्षणांत जगभर पसरतात आणि व्हायरल होतात. आमचा एक मित्र भेटायला आला कि दोन तीन तासाची निश्चिन्ती. सगळ्या दुनियेचे विषय त्याच्या पोतडीत सामावलेले असत. मुंबई हिंदीत हातवारे करून, डोळे बारीक करून, हातावर टाळी देत, गडगडाटी हसत तो गप्पात इतकं अडकवून टाकायचा कि वेळ कसा जायचा समजायचेही  नाही.  

महाराष्ट्राची अस्मिता जोपासणारी आपली मराठी भाषा.आपला स्वाभिमान जागृत करणारी. तिला  समृद्ध करणे हि तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी. बाकी भाषांचे अतिक्रमण थोपवून तिला प्रवाही ठेवणे हे आद्य कर्तव्य. खरंतर आपल्या श्वासाएव्हढीच महत्वाची आपली भाषा. तिला सन्मानित करणं आपल्याच हातात. पण हे होत नाही. बाकी भाषांचे महत्व व्यवहारांत नक्कीच आहे. पण इतर भाषांच्या आक्रमणापुढे तिची दुर्दशा  होऊ नये हेही खरे.  ह्या गौरव दिनाचे हेच महत्वाचे कारण . पण  केवळ एक दिवस हे करून न थांबता उत्तरोत्तर आपली भाषेची आवड  वृद्धिंगत व्हावी असे प्रयत्न करण्याची आण आपण ह्या निमित्ताने  वाहूया . मराठी पाऊल  पडते पुढे हे सर्वार्थाने सार्थ करूया. 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

२७ /०२/२०२१


Wednesday, February 3, 2021

स्वकर्म कुसुमांची माला

।। श्री शंकर  ।।

                                    स्वकर्म कुसुमांची माला

" बिकट वाट वहिवाट नसावी। धोपटमार्गा  सोडू नको " सर्वसाधारणपणे सामान्य जन  कोणतीही जोखीम न पत्करता साधारण मार्गाचा अवलंब करून जीवन सुखी करण्याचा ( जास्तीत जास्त  साधनसंपत्ती मिळवण्याचा  ) प्रयत्न करतात.  काही असाधारण व्यक्ती मात्र स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी बिकट मार्गानेच वाटचाल करतात, तोच त्यांचा जीवनमार्ग असतो. समाजाचे कल्याण  हेच त्यांचे ध्येय असते.  

कै . त्रिंबक हरी भाटवडेकर ह्यांचे कलाकार सुपुत्र प्रख्यात बासरीवादक कै. कमलाकांत भाटवडेकर ह्यांचे शालिन सुपुत्र " हेमंत भाटवडेकर " ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ह्या अवलियाचा थोडक्यात घेतलेला हा वेध ....   

 खरं तर हे अतिशय अवघड काम... अवघड अशासाठी कि त्यांच्या अथांग व्यक्तिमत्वाचा थांग आज ३८ वर्षे त्यांच्यासमवेत कायम राहूनही मला लागलेला नाही. " मी जन्माला आलो तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही घोटाळ्यात पडला असावा " मिश्किल हसत हेमंत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे त्रयस्थपणे पाहत टिप्पणी करतात. लग्नाआधी दक्षिण ध्रुवावर असलेले हेमंत नंतर स्वाभाविक वृत्तीने उत्तर ध्रुवावर प्रवेश करतात. अर्थात हेमंतच हि प्रांजळ कबुली देतात.   हेमंतच्या व्यष्टी आणि समष्टी धर्मात असलेली मोठी  तफावत हेही ह्याचे मुख्य कारण ...   हे हेमंत खरे कि ते असा प्रश्न पडावा !

  वैयक्तिक आयुष्यात कोणतीही गोष्ट ते गंभीरपणे मनावर घेत नाहीत. स्वतःचा व्यवसाय असो, कि अन्य काही .. . मात्र ह्याच्या बरोबर विरुद्ध स्थिती सामाजिक जीवनात ... अहोरात्र ते कामांत, विचारांत व्यग्र असतात. कठोर परिश्रम घेऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावण्यांत निमग्न असतात. त्यांच्या विशेष बुद्धिमत्तेची चमक ह्या सर्व प्रोजेक्टसमधे बघायला मिळते.

 सोलापूर ग्रामी ०२/०२/१९५७ रोजी जन्मलेले हे बालक जन्मानंतरची ५/६ वर्षे तिथेच वाढले. तिथल्या मातीची अनावर ओढ आजही त्याच्या मनात तेवढीच घट्ट रुजलेली आहे. सर्वच भाटवडेकर कुटुंबीय मुळात क्रीडाप्रेमी आणि कलाप्रेमी ( मुख्यतः संगीतकलेकडे सर्वांचा ओढा ). ती आवड हेमंतच्या नसानसांत आजही भिनलेली आहे. स्वतः कलाकार नसला तरी त्यांच्यात सुप्त रूपांत एका निष्णात कलावंताचे बीज दडलेले आहे. त्यांनी साकारलेले अनेक उपक्रम ह्याची साक्ष देतात. अनेक कलाकारांना, त्यांची कला-क्रीडा  वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारा, त्यांचे तोंड भरून कौतुक करणारा हेमंत ... 


सोलापूर नंतर पार्ल्यात कायम वास्तव्यास आल्यावर मोठ्या एकत्र कुटुंबात राहूनही "एकाकी,अलिप्त " राहणारा हेमंत. एकत्र कुटुंबात ज्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, कदाचित त्यातूनच त्यांचे मन संसारी जीवनांविषयी  सखोल विचारी झाले, उदासीन झाले. स्वतःच्या वाटचालीचा पाया ह्या चिंतनातून  रचला  आणि स्वतःचा वेगळा मार्ग त्यांनी स्वतंत्रपणे तयार केला. 

पार्ले टिळक ह्या प्रथितयश शाळेत आधी विद्यार्थी म्हणून आणि आता संचालक म्हणून शाळेशी असलेले नाते  अधिकाधिक दृढ आणि व्यापक होत गेले.  मॅट्रिक झाल्यावर पुढे बी. कॉम. आणि मग १९८२ साली अतिशय अवघड अशी C. A. ची परीक्षा देऊन अल्पावधीतच C. A. झाले. घरात खरंतर शैक्षणिक वाढीसाठी ( कलेची विशेष आवड  असल्यामुळे )  पोषक वातावरण नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हि पदवी प्राप्त करणारा भाटवडेकर आणि सासरच्या  कुटुंबातील एकमेव सदस्य . 

पारल्यासारख्या ठिकाणी स्वतःचे ऑफिस सुरु करून प्रॅक्टिसला जोरदार सुरुवात  झाली खरी .... पण खऱ्या अर्थाने हेमंत ह्या पोटापाण्याच्या व्यवसायांत कधीच रमले नाहीत.  हा व्यवसाय आजही त्याच सचोटीने  ३८ वर्षे चालू असला तरी त्यांचं कार्यक्षेत्र मुळात वेगळंच ... येणाऱ्या clients ना व्यावहारिक सल्ला देताना त्यांना मात्र लौकिक अर्थाने जीवन व्यवहार सांभाळणे जमले नाही. आज सगळं जग पैशाच्या ( लक्ष्मीच्या ) मागे धावताना हेमंतनी मात्र सरस्वतीची कास धरली आणि हा सरस्वतीपुत्र स्वतःच्या  शाळेच्या( पार्ले टिळक विद्यालय ) प्रांगणात इतका रमला कि शाळेसाठी तन - मन अर्पून  शाळेचा स्तर उंचावण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न सुरु झाले. . विविध  उपक्रम त्यांनी गेल्या अनेक वर्षांत राबविले आणि तेही अगदी निरपेक्षपणे, निःस्वार्थीपणे.  सतत ध्यास शाळेचा मी, माझे स्वास्थ्य ,माझे कुटुंब हा विचारही त्यांच्या मनांत येत नाही. 

शाळेप्रमाणेच पार्ल्यातील "पार्ले हिंदू देवालय मंडळ" ह्या संस्थेचे विश्वस्तपद भूषविताना असेच जीव ओतून अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने केलेले काम. तिथेही दैनंदिन कामकाजात  सुधारणा करून विविध उपक्रम गेल्या काही वर्षांत सुरु  केले आहेत. समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे तळागाळातील जनतेसाठी मदत कार्य सुरु आहे.  हा  सर्व कामाचा व्याप ते शांत राहून अगदी लीलया  पेलतात, कुठेही दिखाऊपणा नाही कि प्रसिद्धीचा हव्यास  नाही. हे सर्व त्यांना कसं काय साधतं हे  मला अद्याप  न उलगडलेलं कोडं आहे.

ह्याच कारण अर्थातच त्यांच्या मधील अनेक सत्व गुण . . " वैराग्य " हा अलंकार त्यांनी  परिधान केला आहे. एक सहप्रवासी म्हणून हेमंतच्या व्यक्तिमत्वात ठळकपणे काही उणीवाही जाणवतात. हेमंत खूप जिद्दी  आहेत . मितभाषी आहेत. स्वतःच्या मनातील विचार शेअर करायला ते विशेष उत्सुक नसतात.  त्यांच्या मनाचा तळ शोधणं ,विचारांचा अंदाज येणं खूप  कठीण  असते. 

  तरुण वयातच हेमंत त्यांच्या सासऱ्यांचे (कै .विष्णू पांडुरंग किंजवडेकर) पारमार्थिक अनुकरण करते झाले. " विष्णुसहस्र  नामाची " अखंड  साधना, सद्गुरूंच्या वचनावर  असलेला त्यांचा दृढ  विश्वास. सामाजिक जीवन आणि परमार्थ ह्याचा उत्तम समतोल साधताना हित / अहिताची जाणीव ठेवून शांततेच्या मार्गाने जीवन सफलतेचा प्रवास करत आहेत. अर्थात सफलतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी.  

ज्ञानेश्वरीतील  एक ओवी सुपरिचित आहे. " जयाचे ऐहिक धड नाही । तयाचे परत्र पुससी काई ।। " ध्येयनिष्ठ कर्ममार्गामुळे हेमंतनी त्यांची पुढची गती आधीच निश्चित केली आहे आणि म्हणूनच त्यांचे ऐहिक त्या ईश्वरानेच सांभाळले ह्या विचाराने मन भरून येते ( योगक्षेमं वहाम्यहं )  हाच त्यांच्या कार्याचा मिळालेला प्रसाद आहे असे वाटते. 

कोमल कायेप्रमाणेच मनानेही अतिशय भावनाप्रधान, संवेदनशील असलेले हेमंत. कोणताही उत्तम कलाविष्कार  अनुभवताना त्यांचे नेत्र अविरत पाझरतात. हे सर्व कार्य करताना अनेक मान -अपमान सहन करावे लागतात. कौतुकाचा शब्द अभावानेच वाट्याला येतो. काही वेळा पदरी निराशाच येते. त्यांच्या कोमल, दुखऱ्या  मनावर हळुवार फुंकर घालण्याचे काम मग माझे असते. त्यांच्या एवढ्या मोठ्या कार्यात माझा एवढाच काय तो सहभाग. 

 वाढत्या वयाबरोबर समाज कार्याची एव्हढी मोठी जबाबदारी पेलताना त्यांचा जीव काही वेळा थकून जातो. लोकांच्या अपेक्षांचा भार सहन करणे कठीण होते. अतिश्रमाने शरीर साथ देत नाही. " प्रीतीचा लाभलेला हा कल्पतरू ", त्याचा प्रेमाने, मायेने सांभाळ करण्याची  जबाबदारी  मी आनंदाने स्वीकारते. त्यांची सावली होऊनच राहते. 

स्वकर्म कुसुमांची माला अर्पण करून ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी सतत कार्यमग्न असणारे " कर्मयोगी हेमंत ", त्यांना निरामय आरोग्य लाभावे , त्यांचे इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने बळ द्यावे हीच सदिच्छा त्यांच्या वर्धापनदिनी व्यक्त करते ....  


स्नेहा ... 

०२/०२/२०२१







Saturday, January 23, 2021

संतकवि दासगणू महाराज( SANTKAVI DASGANU MAHARAJ )

                                                                  ।। श्री शंकर  ।।

                                                                                                               पौष शु. एकादशी ,शके १९४२

                                                    संतकवि  दासगणू  महाराज 


संतकवि दासगणू महाराज ह्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील शैलीचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न करून त्यांची स्मृती ह्या लेखातून  जागविली आहे.  

प.पू अप्पांनी भावमुक्तावलीत सद्गुरू प्रार्थनेत, दासगणू महाराजांच्या लेखणीचे महत्व अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केले आहे. हृदयातील भक्तिभाव, अलौकिक बुद्धिमत्ता, सद्गुणांची खाण आणि सदा परमेश्वर चरणाशी लीन झालेला भाव, ह्यामुळेच महाराजांचे सर्व काव्य हे तुळशीच्या मंजिऱ्यांप्रमाणे अतिशय पवित्र आहे. त्यांत्च्या साहित्याचा उगम थेट हृदयांतून झालेला आहे. त्याचा प्रत्यय त्यांचे साहित्य वाचतांना भाविकांना अनुभविता येतो.

प.पू . साईबाबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने दासगणू महाराजांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरवात केली आणि विपुल साहित्याची निर्मिती केली. सर्व संत हे जणू परमेश्वराचा दुसरा अंशच आहेत. अशा अनेकविध परिचित आणि अपरिचित संतांच्या चरित्रांचा वेध अपार मेहनत घेऊन महाराजांनी आपल्या भक्ती लिलामृत आणि भक्तीसारामृत ह्या ग्रंथांत घेतला आहे. 

दादांच्या कीर्तन आणि इतर काव्यातील उत्कटता रसिकांच्या मनाचा ठाव घेते  ती  त्यातील विलक्षण भावामुळेच. म्हणूनच त्यांच्या शब्दांचा परिमळ सतत अवतीभोवती पसरलेला असतो. इतकी अवीट गोडी ह्या सर्व साहित्यात चाखायला मिळते. आणि हे सर्व अगदी सोप्या सहज भाषेत. ह्या प्रसाद गुणामुळेच हे सर्व लेखन आपल्याला अगदी जवळचे वाटते. पांडुरंग स्तोत्र हे ह्या दृष्टीने सर्वांच्याच नित्य पठनात असल्याने परिचयाचे आहे. 

भक्ती रसाबरोबरच करुण  रसाचा परिपोष त्यांनी रचलेल्या  कीर्तनातून अनुभविता  येतो. अनेक वर्षे वारंवार हि कीर्तने ऐकूनही त्यातील समरसता जराही कमी होत नाही हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. शुचिता, वैराग्य, मधुर, सात्विक भाव त्यांच्या व्यक्तिमत्वातील ह्या गुणांचा परिपोष त्यांच्या लेखणीतून झिरपला नाही तर नवलच. 

महाराजांच्या अप्रकाशित वाङ्मयातील पुरवणी खंड जेव्हा मला  वाचनासाठी मिळाला, तेव्हा त्यांतील त्यांनी हाताळलेल्या  विविध साहित्य प्रकारांनी मन अचंबित झाले. कीर्तनातील पूर्वरंगासाठी उपयुक्त अशी उपदेशपर पदे  विविध वृत्तांत  आणि चालीत बांधलेली आहेत. रसाळ आणि भक्तिरसपूर्ण अशी हि पदे वाचायला आणि ऐकायलाही गोड वाटतात. त्याला दिलेल्या चालीही कर्णमधुर आहेत.  ह्या पदांप्रमाणेच फटके, कटाव, पोवाडा अशी विविध काव्य प्रकारांची रचना त्यांनी केली आहे. स्तवने, अभंग, आरत्या ह्यांचीही रचना आढळते. सगळ्या साहित्य प्रकारांत  त्यांच्या शब्द सामर्थ्याचा प्रत्यय येतो. 

वेगळ्या विषयावरील चहाचे अष्टक आपले लक्ष वेधून घेते. " चहा ना  बरा हा महा दुःखकरी । करी हाच उत्पन्न रोगां  शरीरी ।।" ह्या पेयाच्या प्राशनाचे विविध तोटे महाराज आपल्याला सांगतात. लोकांना सद्बुद्धी मिळावी आणि  चहापासून लांब राहावे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना त्यांनी केली आहे. 

ह्याच ग्रंथातील एक पद मला आवडले. त्यातील साध्या सोप्या आशयाने मनाला आकर्षित केले. त्याचे थोडक्यात विवेचन  :

हे पद " फटका " ह्या काव्यप्रकारांत मोडते. एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत लोकांना समजावून सांगणे म्हणजे साहित्यांतून फटकारणे. अनंत फ़ंदी हे ह्या फटक्यांचे जनक. त्यानी रचलेले फटके सुप्रसिद्ध आहेत. ते लोकांना उपदेशपर आहेत. लोकांना अज्ञान  निद्रेतून जागे करण्यासाठी हा  फटका महाराजांनी रचलेला आहे.गाताना हा फटका जोशपूर्ण वाटतो. अवघ्या नऊ कडव्यांत आणि अतिशय थोडक्या शब्दात अतिशय प्रभावीपणे समाज मनाची नस ओळखून लोकांना , व्यवहारांत कसे वागावे, आचरण कसे असावे हे समजावून सांगितले आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला आहे. उत्तम नीतिमूल्यं अंगी बाणवावीत म्हणून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सुक्ष्म  निरीक्षण शक्तीचा प्रत्यय काव्य वाचताना अनुभविता  येतो. लोकांच्या समाजात मिरवण्याचा उपहास करतांना ते स्पष्ट शब्दात म्हणतात,  " मृण्मय देहा  घालुनी कपडे । बैलोबापरी सजू नको ।।

मुळात सज्जन असलेले हे मन अनेक विकारांमुळे स्व स्वरुपापासून दूर जाते. अहंकार, ममत्व, सद्वृत्तीचा विसर, वृथा अभिमान, वाणीवर नसलेले नियंत्रण ह्यामुळे भक्तीमार्गात रमत नाही. दुसर्यांचा द्वेष - मत्सर करण्यांत, निंदा करण्यात, अशुभ चिंतण्यात वेळ विनाकारण वाया जातो. महाराजांना दांभिकपणाची खूप चीड आहे. परमार्थमार्गात साधेपणाने जीवन जगावे असा मोलाचा सल्ला ते साधकांना देतात. 

नरदेहाचे महत्व प .पू .दादांनी वारंवार प्रकट केले आहे. पण ह्या नरदेहाचे खरे सार्थक कशात आहे हे आपल्याला कळत नाही. नरदेह परमेश्वराच्या भक्तीचे प्रमुख साधन आहे.  आपण प्रपंचात नको तेव्हढे गुंतत जातो आणि मग दुःख भोगावे लागते.दासगणु महाराजांसारखे  संत निःस्पृह आणि निस्वार्थी असतात. लोकहिताची तळमळ त्यांना असते. लोकांना भक्तिमार्गाला लावून शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणे, मनाची शक्ती वाढविणे हे काम ते आपल्या साहित्यातून करत असतात. 

" अमोल ऐशा नरदेहाला येऊनि वाया जाऊ नको । दासगणूचा ऐकुनी फटका तसे चालण्या चुकू नको ।। "'

महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासाने " आधुनिक महिपती " हि त्यांना दिलेली पदवी कशी सार्थ आहे हे समजून आपले मन त्यांच्या चरणाशी सहजच  नतमस्तक होते... 

( सोबत मूळ काव्य जोडले आहे .. )





                                                                                                                                   स्नेहा भाटवडेकर 
                                                                                                                                     ९८३३०१७०७४

Wednesday, January 13, 2021

MAKARSANKRAMAN ( गोड गोड बोला ..... )

                                                        ।। श्री शंकर ।।

                                                                                                           मकरसंक्रांती ,१४/०१/२०२१

                                                     गोड गोड बोला ..... 


                              भोगावया मकरराशीस सूर्य आला । तेणे आनंद अवघ्या जगतास झाला ।।

                                                                                                        संतकवि दासगणु महाराज ..

नमस्कार मंडळी ,

२०२१ ह्या कॅलेण्डर  वर्षातला पहिला सण " मकरसंक्रांत " ,वर्षाची  सुरवातच गोड बोलण्याचा संदेश देऊन  होते . व्यवहारांत गोड  बोलूनच कामे होतात ना  ? तर अशा ह्या मकरसंक्रांतीच्या सर्वाना गोड शुभेच्छा . 

हा उत्सव सूर्य देवतेचा. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरवात होते. शेताशेतांत पिके तयार झालेली असतात. हवा मस्त थंड असते. पूर्वजांनी ऋतुमान ,परंपरा आणि धर्म ह्यांची छान सांगड घालून अनेक सण ,उत्सवांची परंपरा निर्माण केली. रोजच्या जीवनमानात बदल आणि त्याबरोबरच धर्म ,आरोग्य ह्यांची जोपासना. भारतात प्रांतानुसार ह्या सणांचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही उद्देश एकच. नात्यातील कटुता कमी होऊन एकी निर्माण व्हावी ,स्नेहवृद्धी  व्हावी. तीळ आणि गुळ हे ह्या स्निग्धतेचे प्रतीक. थंडीच्या दिवसात ,तिळगुळ बल -ऊर्जा निर्माण करणारा .परस्परांना तिळगुळ देऊन नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा .  पोस्टाने घरोघरी तिळगुळ आणि शुभेच्छा संदेश पाठविणारी पूर्वापार परंपरा आज खंडित झाली आहे. पण आमच्या गोरट्याच्या आश्रमांतून न चुकता येणारा तिळगुळ आणि संदेश आमचे गुरुपरिवाराशी असलेले  नाते अधिक दृढ करणारा . अनेक वर्षे सातत्याने चालू असलेली हि परंपरा. 

संतकवि दासगणु महाराज त्यांच्या आर्येत म्हणतात : 

                         गोडी मधुर उपजे । जेवीं या तीळ नी गुळांठायी ।

                         तैसा मत्सर जाता आपणातील । तेच घडुनिया येई ।। 

पुढे ते म्हणतात परस्परांतील प्रेमामुळे सुखाचे भांडारच  लाभते . सुकीर्ती वाढते. 

ह्या पुण्य पर्वात नदीस्नानाचे ,दान धर्माचे ,पूजा- उपासनेचे महत्व सांगितले आहे. महिला ह्या दिवशी सुगडाची पूजा करतात. हळदीकुंकू करून वस्तू लुटतात. अशा रीतीने सामाजिक बंधही दृढ होतात. 


संक्रांतीच्या दिवशी सूर्य  उपासना विशेष फलदायी ठरते . सूर्यनारायणाच्या उपासनेचे अनेक फायदे आहेत. आरोग्य ,तेज,बल वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार ,गायत्री मंत्र उपासना केली जाते.

शारिरीक बलामुळेच जीवनधारणा होते. उन्नती होते. दुर्बल माणसाकडे शक्तीचा अभाव असल्यामुळे ,त्याला कायम अन्याय सहन करावा लागतो. त्याचे समाजाकडून शोषण होते. शारिरीक ,बौद्धिक,आर्थिक,चारित्रिक बळ सूर्य उपासनेमुळेच लाभते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने हा महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो . 

 सृष्टीतील चराचराचे संवर्धन सूर्यप्रकाशामुळे होते. आदित्य हे साक्षांत नारायणाचे रूपच आहे जे आपण स्वतः डोळ्यांनी बघू शकतो." नमः सवित्रे जगदेकचक्षु : " सूर्यनारायण  जगाचा अक्षु ,नेत्र आहे आणि जगाच्या सगळ्या व्यवहारांवर त्याचे लक्ष असते . लोकांना सन्मार्ग दाखविण्याचे काम हा  सूर्य आपला मित्र होऊन करतच असतो. 

महाराजांनी त्यांच्या आणखी एका श्लोकांत ह्या सणाचे महत्व प्रतिपादिले आहे. 

                               आला अजी मकर राशीस हा तमारि ।हा भर्गदेव सविता अशिवा निवारी ।।

                                    सूर्यासवे जशि प्रभा उदयास येते । हे भर्ग चिंतन कधी नच व्यर्थ जाते ।।

अंधःकाराचा तसेच वाईट वृत्तींचा नाश करणारी अशी परमात्म्याची  शक्ति म्हणजे " भर्ग  ". हि शक्ती मनुष्याचे आयुष्य प्रदीप्त ,उज्वल करून त्याला संतुष्ट करते .  आसुरी वृतीचे दमन  करणे, दुर्गुणांचा नाश  करणे मानव कल्याणासाठी हिताचे आहे. गायत्री उपासना आपण सर्वश्रेष्ठ उपासना मानतो. ह्या उपासनेद्वारे ईश्वराचा तेजस्वी ,श्रेष्ठ अंश आपल्यात धारण करून क्षात्रतेज वाढविता येते. 

हे तेज वृद्धिंगत करून अविद्येचा नाश होऊन हळूहळू ज्ञानाचा उगम होतो. ब्रह्मतेजाचा साक्षात्कार होतो. शांततेज वाढते."  नमः शान्ताय तेजसे "  हे शांततेज उग्र तेजाहून प्रभावी असते. शाकुन्तलात महाकवि कालिदासाने म्हटले आहे " शमप्रधानेषु  तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेजः " 

                मकरसंक्रमणाच्या पुण्यदायी पर्वात आपणा  सर्वांचे तेज वृद्धिंगत होवो हि त्या नारायणाला प्रार्थना .... 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com