Saturday, June 20, 2020

Prasid Mam Bhaskar ( प्रसीद मम भास्कर )

                                                                 ।। श्री शंकर ।।
                              
                                                             प्रसीद  मम भास्कर 

आदिदेव नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर | दिवाकर नमस्तुभ्यं प्रभाकर नमोस्तुते || 

    आज २१ जून, वर्षांतला सर्वांत मोठ्ठा दिवस. मित्रा, आज तुझा सहवास आम्हाला जास्त वेळ लाभणारया दिवसाचे हे महत्व लक्षांत घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय योगदिवस जगभर साजरा करतो. 

उद्यापासून तू दक्षिणायनात प्रवेश करणार. दिवस लहान आणि रात्र मोठी होणार. सहा महिन्यांनी तू पुनः उत्तरायणांत प्रवेश करशील. त्यावेळी आम्ही संक्रांत आणि रथसप्तमीचा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो.

हे नारायणातुझे तेजोबिंब सकाळच्या प्रहरी दश-दिशांना उजळवीत क्षितिजाची सीमा पार करून वर येते तेव्हा होणारा  आनंद आगळाच असतो. जणू काही मायेचं ( तिमिर ) अस्तित्व लोप पावते आणि परमेश्वराचे सत्य स्वरूप याची देहीयाची डोळा पाहता येतं.

खरं तर आपली भेट रोज ठरलेली. पण तरीही रामप्रहरी तू येण्याची चाहूल लागताच डोळे तुझ्या आगमनाकडे लागतात. किती तुझ्या स्वागताचा थाट! भूपाळीओव्या... माऊली सकाळी सकाळी जात्यावर बसून ह्या ओव्या गात असत... ह्या गोड ओव्या सकाळच्या प्रसन्नतेत भर घालत.  

सात घोड्यांच्या रथांवर बसून स्वारी अवतीर्ण होतेतेव्हा मन प्रसन्न होते. ह्या रथाला एकच चाक आहे. रथाचा सारथी पांगुळा आहे. ह्या रथाला कोणताही आधार नाही. भूमी नाही आणि आकाशही नाही. अधांतरीच हा रथ धावत असतो. "केयूरवान मकरकुंडलवान किरिटी हारी हिरण्मय वपुरधृत शंखचक्र:" असे तुझे रूप. सहस्र किरणांच्यासहस्र शाखांमधून तू प्रगट  होतोस.

अरुणोदय होताच रुबाबदार पावलं टाकत अवघे आकाश पादाक्रांत करतोस  तेव्हा हे आरक्तवर्णीआल्हाददायी रूप मन प्रसन्न करते. तिमिर हरुनी देई प्रकाशदेई अभय... ते कोवळंलडिवाळ रूप नजरेत बंदिस्त करे करे पर्यंतच किती रंग -रूप पालटतोस. दिवसभरात वेगवेगळी रूपं धारण करतोस, आणि संध्याकाळी परत एकदा आरक्तवर्ण. त्यावेळचं तुझं रूप बघायलाही सगळ्यांनाच आवडतं. पण सकाळी तुझ्याकडे बघून वाटणारा उत्साह संध्याकाळी मात्र मन उदास करतो. कातरवेळी मन जुन्या आठवणींनी भरून येते.  मधल्या वेळेत तुझं रूप कर्तव्य प्रखरसन्मार्गाचा मार्ग दाखवणारं. पण दुपारी तेजाच्या उग्र रुपापुढे मात्र कोणी डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही तुझ्या. तुझा प्रकाश इतका निर्मळपावनपारदर्शी, आम्ही सत्याला ही तुझ्या प्रकाशाची उपमा देतो. 

    


विधात्याने सृष्टी निर्माण केली तेव्हाच ह्या नभामध्ये तुझं आणि चंद्राचे सुबक झुंबर छताला लावले. ज्यायोगे तुझ्यामुळे दिवसा प्रकाशमान झालेले जग रात्री शांतपणे चंद्राच्या निळ्या प्रकाशात विश्रांती घेऊ शकेल.   

चंद्रसूर्याना केवळ ग्रह न मानता मानवाने त्यांना देवत्व ही बहाल केलेआहे. "आदित्य" हिंदू धर्माची मुख्य देवता. जणू ब्रह्माचे चैतन्यरुपी मूर्त स्वरूप. नवग्रहांपैकी हा स्वयंप्रकाशी ग्रह आपल्याला आकाशांत सहज बघता येतो. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका आहे त्यांना हे परमेश्वराचे  सगुण रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येते. सूर्यालाही जगाचा डोळा म्हटले आहे. " नमः सवित्रे जगदेकचक्षुषे ". एवढेच नाही तर जगाची उत्पत्तीस्थितीलय करणाराब्रह्मविष्णूमहेश रूपांत असणारा हा सूर्यच आहे.

सौर सूक्तसूर्यमंडल स्तोत्रांत तुझ्या ह्या दीप्तिमानसतेज रूपाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. 

ह्या विशालतेजस्वी प्रभामंडल असणाऱ्या रत्नमंडित रूपाची पूजा आम्ही करतो. तुझं श्रेष्ठ तेज प्राप्त व्हावे अशी इच्छा करतो. देवब्राह्मणसंतमहात्मे तुझ्या पूजनात दंग असतात. तू ज्ञानाने परिपूर्ण आहेसअनादी आहेस आणि अगम्य आहेस हे ज्ञानी जाणतात. भू, भुवः आणि स्व: ह्या तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझ्या तेजामुळे हे तिन्ही लोक प्रकाशित होतात. 

हे सूर्या तुझ्या उपासनेमुळे ज्ञान प्राप्त होते. पापांचा, व्याधींचा नाश होतो. शरीरसंपदा आणि ऐहिक वैभव प्राप्त होते. सूर्य नमस्कार ही प्राचीन भारतीय परंपरा आजही टिकून आहे. अकाल मृत्यू हरणं, सर्वव्याधी विनाशनंअशी ह्या सूर्यनमस्काराची महती सांगितली आहे. 

तुझी १२ नांवे ही अर्थपूर्ण आहेत.ही विष्णुंचीच विविध रूपे आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने विभूती योगांतमी स्वतः ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य आहेअसे सांगितले आहे."आदित्यनामहं विष्णुरज्योतिषां रविरंशुमान" सर्व प्रकाशमान वस्तूत  भगवंताचे हे  रूप सर्वश्रेष्ठ आहे. .

अशा तेजस्वी रूपाची उपासना सकाळच्या वेळी केली तर पूर्ण दिवस आनंदातउत्साहात पार पडतो. काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. नकारात्मक विचार नाहीसे होतात. आणि अर्थातच व्यक्तीचे जीवनमान सुधारतेत्याला मान सन्मान, यश प्राप्त होते. म्हणूनच तुला मित्र हे नाव असावे. 

सूर्यवंशात जन्माला आलेल्या श्री रामांचे चरित्र तुझ्यासारखे  तेजस्वी आहे.

समर्थ रामदास स्वामींनी सूर्य उपासना, गायत्री पुरश्चरण अविरत बारा वर्षे केले. त्या अनुष्ठानामुळे झालेले त्यांचे तेज:पुंजशक्तिशाली रूप मनावर प्रभाव टाकते. जनसामान्यांचा उद्धार करणारे त्यांचे कार्य डोळे दीपवून टाकते.   

शंकराचार्य म्हणतात: आत्मस्वरूप तेजाचे स्मरण केल्यामुळे अज्ञानरूपी अंधार नाहीसा होऊनज्ञानरूपी  सूर्यप्रकाशामुळे स्वस्वरूपाचे ज्ञान होईल आणि बुद्धी आनंदी राहील सूर्याला उदय-अस्त आहे, त्यालाही ग्रहण लागतेपण ज्ञानसूर्याला उदय अस्त नाही. उपासनेमुळे आत्मज्ञान होणे हीच खरी पहाट. 

सद्गुरूंचे प्रखर रूपही सूर्याप्रमाणेच असते. ज्ञानाचे अंजन शिष्याच्या डोळ्यांत घालून सद्गुरू अज्ञानाचा नाश करतात. सद्गुरूंना सूर्याची यथार्थ उपमा दिली आहे. 

सूर्याची उगवती दिशा, पूर्व दिशेला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या,ही जगाची रीत आहे. हे जाणून व्यवहार केले तर दुःख पदरात पडत नाही. 

सूर्यप्रकाशाचे वरदान लाभल्यामुळे आपले जीवन आनंदी झाले आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे सौर ऊर्जेचा (Solar Energy)  वापर दैनंदिन जीवनांत मोठ्या प्रमाणांवर केला जाऊ लागला आहे.

पृथ्वीआपतेज, वायूआकाश ह्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीवर मिळणाऱ्या तेजाचा आणि प्रकाशाचा मुख्य स्रोत "सूर्य" म्हणजे तूच. अग्नितत्वामुळे आपले जीवन विकसित होते, वनस्पतीप्राणिमात्र ह्या सर्वांनाच ही ऊर्जा आवश्यक असते. सर्व चराचराचा  हा अन्नदाता. सृष्टीचे जीवनचक्र सूर्यामुळेच अखंड चालू राहते.

रविवार हा तुझा वार. नवीन सप्ताहासाठी लागणारी ऊर्जा सूर्य उपासना करून मिळवावी म्हणूनच रविवारच्या सुट्टीचे प्रयोजन असावे. प्रत्यक्षांत मात्र हा दिवस आळसातउशिरा उठूनच वाया जातो. 

अंधःकार रुपी दुःखाचा विनाश होऊन प्रकाश रुपी सुखाचा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो म्हणूनच तुझी प्रार्थना ……. 

असतो मा सद्गमयतमसो मा ज्योतिर्गमय ।।

 

  

स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ( पूर्व ) , मुंबई 

sneha8562@gmail.com 

Monday, June 8, 2020

Jewel Of Mysore ( Visit to Heritage Site )

                                                    ।।     श्री    शंकर   ।।
                              
                                               Jewel  of  Mysore


 मे महिना … पर्यटनाचा  हा महिना सलग दोन वर्ष अगदीच बंदिस्त चौकटीत , आपापल्या घरातच पार पडला. सुट्टीच्या केलेल्या विविध प्लॅन्स चा अगदी फज्जा उडाला. 

वैशाख वणव्याने पेटलेला गुलमोहोर आपली टपोरी रक्तवर्णी फुलं मिरवीत दिमाखात उभा आहे. माझ्या  घरातूनच मी त्याचे हे रूप न्याहाळतेय. हा गुलमोहोर  मला सारखा हिणवतोय. मे महिना,सुट्टी आणि छोटा मोठा प्रवास हे आज अनेक वर्षांचं समीकरण. सुट्टीचं आयोजन करायला अगदी जानेवारी पासून सुरवात. प्रवासाची तयारी मग, कॅलेंडरची पाने अधीर होऊन उलटवत प्रवासाला राहिलेले दिवस मोजत राहायचे. कधी कौटुंबिक तर कधी Travel Company बरोबर सहल ठरायची. अश्या ह्या  प्रवासांत साथ असायची ती त्या लालचुटुक गुलमोहोराची. 

अरे हो , हा गुलमोहोर मला दोन वर्षं मागे घेऊन गेला. ... 

विमानाने आकाशात उड्डाण केले, सहप्रवाशांबरोबर बेंगळुरूला कधी येऊन पोचलो कळलंच नाही. दुपारच्या रणरणत्या उन्हांत मिनी बस मधून आमचा प्रवास म्हैसूरच्या दिशेने सुरु झाला. 

वाटेत स्पेशल मधुर वड्याचा आस्वाद घेऊन म्हैसूर मुक्कामी पोहोचलो. थोड्याच वेळांत गडगडाटांसह जोरदार पाऊस आमच्या स्वागताला हजर. त्याच्या आगमनाने आनंद तर झालाच पण पुढच्या स्थळदर्शनाबद्द्ल मन साशंक झालं. हा पाऊस आपल्या ट्रीपमध्ये  विघ्न तर आणणार नाही ना ?

सकाळी हवेतल्या गारव्याने लवकरच जाग आली . नेहमीच्या सवयीने प्रभात फेरीला बाहेर पडलो.म्हैसूर 
Heritage City असल्याने त्याविषयी मनांत उत्सुकताही होतीच. हॉटेलच्या समोरच असलेला कोर्टाचा विस्तीर्ण परिसर मोठमोठ्या  हिरव्या वृक्षांनी वेढलेला होता. नवीन शहराचे दर्शन घेत पुढे जात असतांना अहाहा ... गुलमोहोर आमची वाट पाहत उभाच होता. मातीचा लालभडक  रंग आणि वेगळ्या लाल छटेचा गुलमोहोर. गर्द हिरवी पाने. वळणदार काळभोर रस्ते. वाट इथे स्वप्नातील ... रस्त्याच्या दुतर्फा अदबीने उभे असलेले ते गुलमोहोर. हे वृक्ष हि ह्या शहराची विशेष ओळख. .ते दृश्य आजही नजरेसमोरून हटत नाही. म्हैसूर शहराचा हा भाग खूपच आवडला. 

लवकरच तयार होऊन sight seeing साठी बाहेर पडलो. आजचा आकर्षण बिंदू होता " Heritage Site - Mysore Palace "  म्हैसूरच्या वाडियार साम्राज्याचा राजमहाल. कर्नाटक राज्याचा महत्वाचा मानबिंदू. हिंदू यदुवंशीय साम्राज्याची राजधानी. सन १३९९ ते अगदी भारताच्या स्वातंत्र्यानंतर सन १९५० पर्यंत यादवांनी इथे राज्य केले. म्हैसूर त्यावेळी कर्नाटकचे सांस्कृतिक केन्द्र म्हणून प्रसिद्धीच्या झोतात होते. गायक, वादक, नर्तक तसेच लेखक, चित्रकार ह्या सारख्या विविध कलाकारांना  राजाचा उदार आश्रय लाभला होता. 

अगदी थोड्या वेळातच शहराच्या मध्यवर्ती भागांत असलेल्या  एका शानदार, भव्य  राजवाड्याच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो.Security check formalities  नंतर गाईड बरोबर आम्ही त्या महालाशी येऊन त्याचे बाह्य सौन्दर्य न्याहाळू लागलो.             

विस्तीर्ण पटांगणावर उभ्या असलेल्या ह्या तीन मजली महालाची वास्तुशैली हिंदू, मुघल, राजपूत आणि गॉथिक ह्या सर्व पद्धतीचे एकत्र संमिश्रण आहे. ह्या महालाच्या बांधकामात ग्रे ग्रेनाईटचा वापर केलेला आहे आणि जवळजवळ पांच मजले इतकी उंची असलेल्या मनोऱ्यांसाठी गुलाबी संगमरावरचा उपयोग केलेला आहे. आजूबाजूचा सर्व परिसर सुंदर बगीच्यांनी सजला आहे. सर्व परिसर स्वच्छ आणि टापटीप आहे. त्याची देखभाल उत्तम रीतीने केली आहे. मन त्यामुळे एकदम प्रसन्न होते. उजव्या बाजूला चामुंडा देवीचे मंदिर आहे. चामुंडा हिल समोर हा महाल दिमाखांत उभा आहे. 

देश विदेशातील अनेक पर्यटक ह्या महालाला भेट देतात. ताजमहाल खालोखाल ह्या महालाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे. भारतांत ह्या बाबतीत ह्या महालाचा दुसरा क्रमांक लागतो. 

मुघल आक्रमणानंतर काही काळ हा महाल  टिपू सुलतानाच्या साम्राज्याची राजधानी होता.  हि जागा नंतर परत   वाडियार राजाकडे आली आणि त्याने ह्या महालाचा कायापालट केला.वाडियार साम्राज्याच्या मालकीचा, ऐतिहासिक महत्व असलेला हा राजवाडा १९१२ साली बांधून पूर्ण झाला. अंदाजे तेरा वर्षं हे बांधकाम सुरु होते आणि त्यावेळी अंदाजे ४२ लाख रु. खर्च  आला होता. आजही महालाच्या काही भागांत राजपरिवाराचे वास्तव्य आहे . 
 
आता आम्ही महालांत प्रवेश केला. सुरवातीलाच समईंच्या ज्योतींच्या प्रकाशांत उजळलेल्या चामुंडा देवीचे दर्शन घेतले. नंतर एकेका दालनांत फेरफटका मारला. भूतकाळात राजपरिवाराने वापरलेल्या वस्तूंचे संग्रहालय (Museum ) इथे  पाहायला मिळते. 

महालांत पूर्वी वास्तव्य केलेल्या  राजांचे फोटो, पेन्टिंग्ज  त्या राजांच्या वैभवाची साक्ष देतात. काही पेन्टिंग्ज  त्यांच्या Three -D Effect मुळे खूप जिवंत वाटतात. राजांचे पोशाख, जडजवाहीर, विविध वस्तू बघून डोळ्यांचे पारणे फिटते. विविध दालनांत मांडलेली सर्व स्मृतिचिन्ह चित्ताकर्षक आहेत. सर्व दालने प्रशस्त हवेशीर आहेत. stained ग्लासचा वापर खिडक्या, तावदाने आणि छतासाठी केलेला आहे. महालांतील रंगसंगती, कोरीवकाम, हस्तिदंताचा वापर करून चितारलेल्या ऐतिहासिक कथा, त्यातही शेषशायी विष्णूची छतावरील कोरीव मूर्ती, सगळेच विलोभनीय आहे. तिथल्या जवळपासच्या जंगलांत हत्तींचा भरपूर वावर असल्याने त्यांच्या संपूर्ण  सुळ्यांचा वापर सजावटीत अनेक ठिकाणी केलेला दिसतो. शिकारीत मारलेले प्राणी  इथे ठेवलेले आहेत. शिकार करून मारलेल्या हत्तीची तोंडे मुखवट्यासारखी इथे भिंतीवर लावलेली आहेत.. 

चांदीच्या खुर्च्यांबरोबरच, ८५ किलो सोन्याचा वापर करून  महाराजांना बसण्यासाठी केलेली " Elephant  Seat " पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे . राजेरजवाड्यांच्या विवाह समारंभासाठी खास  बनविलेला stained  glass  चा रंगीबेरंगी " कल्याण मंडप " सुद्धा प्रेक्षणीय आहे. एखादा लग्नसोहळा तिथे आत्ता सुरु आहे असा भास होतो.   त्याबरोबरच दरबार हॉल, कुस्तीचा आखाडा सुद्धा खूपच प्रशस्त आणि  विशेष दर्शनीय आहेत. प्रेक्षकांना उपस्थित राहून बघण्यासाठी मोठी गॅलरी आहे . 

विविध कमानी, संगमरवरी खांब, छतावर लटकलेली झुंबरं ह्यामुळे महालाचा सगळा look एकदम भारदस्त वाटतो. 

हा महाल ज्या कारागिरांनी निर्माण केला त्यांच्या कलेचं कसब त्यांनी पणाला लावलं आहे. ह्या महालाचे  ऐतिहासिक महत्व ही तेव्हढेच मोठे आहे.त्यामुळेच ह्या वास्तूचे  रूप  मनांत दीर्घकाळ रेंगाळत राहते. मर्यादित वेळेत एवढ्या सगळ्या गोष्टी बघणे कठीणच. त्यामुळे  काहीशा अनिच्छेनेच आपण  ह्या महालाबाहेर पडतो. बाहेरच्या मोकळ्या विस्तीर्ण मैदानांतून  सलग ( २४५ ft. ) ह्या भव्य राजमहालाचे दर्शन घेणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो.
 
 दसरा पूजेनिमित्त प्रतिवर्षी इथे होणारी  भव्य मिरवणूक जगप्रसिद्ध आहे. हा एक प्रेक्षणीय  सोहोळा असतो. अनेक पर्यटक देश-विदेशातून ह्या सोहोळ्याला आवर्जून उपस्थित राहतात. दसऱ्यानिमित्त चामुंडा देवीची पालखी निघते.  राजघराण्यातील व्यक्ती ह्या मिरवणुकीत सहभागी होतात.  अनेक हत्ती ह्या मिरवणुकीत विविध  अलंकारांनी सुशोभित  होऊन हजेरी लावतात.  आम्हांला  प्रत्यक्ष हा अनुभव घेता आला नाही पण महालात लावलेल्या मिरवणुकीच्या पैंटिंग्स वरून ह्या शाही सोहोळ्याची थोडीशी झलक अनुभवता आली . जगभरातून ह्या मिरवणुकीला लाखोंची उपस्थिती असते. ह्या वेळी करण्यात येणाऱ्या  विद्युत रोषणाईने  डोळ्यांचे  पारणे फिटते.  . 
रोज  संध्याकाळी  विद्युत रोषणाईचा आणि लाईट साऊंड शो चा आनंद पर्यटकांना घेता येतो. पर्यटकांसाठी काही विशेष  सोयी इथे उपलब्ध आहेत.  विशेषतःअंध  व्यक्तींसाठी brail guide ची सोय आहे.  
भारतीय संस्कृतीच्या वैभवाला उजाळा देणारी अशी अनेक स्थळे आपल्या देशांत  आपला वारसा दिमाखाने जपत आहेत. पर्यटनाच्या निमित्ताने आपला पूर्वेतिहास पुन्हा आठविता येतो. तो जागविण्याचा थोडासा प्रयत्न करता येतो. 
एखाद्या वास्तूचे सांस्कृतिक ,सामाजिक आणि ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन त्याची योग्य देखभाल व्हावी आणि हा वारसा पिढ्यांपिढ्या अबाधित राहावा म्हणून  वारसा स्थळाची घोषणा सरकारतर्फे  केली जाते. केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता  अशा वास्तूंचे योग्य प्रकारे जतन  करणे आणि आपला समृद्ध वारसा जोपासणे हे नागरिक/पर्यटक  म्हणून आपलेही  सर्वांचे उत्तरदायित्व आहे.  मानवी अतिक्रमणांपासून ह्या वास्तूंचे  योग्य सरंक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. ह्या वास्तूंची लोकप्रियता लक्षांत घेऊन पर्यटकांची प्रचंड वर्दळ इथे असते. त्याचा विपरित  परिणाम ह्या ठिकाणांच्या सौन्दर्यावर होऊ नये म्हणूनही काही उपाय योजावे लागतात. त्या नियमांचे पालन आपण सर्वानीच करायला हवे. 

प्रेरणादायी इतिहास जिथे घडला,अशी स्थळे भावी पिढीला  दाखवून भविष्यात गौरवशाली  इतिहास निर्माण करण्यासाठी तरुणांना  प्रोत्साहित करणे हे सद्यस्थतीत आपले महत्वाचे कर्तव्य आहे सर्वानी मिळून ते  पुढे न्यायला  हवे. 

म्हैसूर चंदनासाठी सुप्रसिद्व आहे. चंदनाचे खोड  सुवासिक आणि पवित्र असते . त्याचा दरवळ कायम रेंगाळत राहतो. जिभेवर स्वादिष्ट म्हैसूर वडीची  चव आणि चंदनाचा हा परिमळ मनांत ओतप्रोत भरून घेतला... 

घरासमोरच्या गुलमोहोरावर बसून  तार  स्वरांत गाणाऱ्या कोकिळेच्या तानांनी मी  स्वप्नरंजनातून जागी झाले आणि  माझ्या  घरट्यांत परतले .... 

Sneha Bhatawadekar 
Vileparle , Mumbai


Monday, June 1, 2020

Soubhagya Dayini Ganga ( सौभाग्यदायिनी गंगा )

                                                             ।।  श्री  शंकर  ।।

                                                         सौभाग्यदायिनी  गंगा 

भारतातील  सर्वात पूज्य मानली  जाणारी नदी....गंगानदी...आपण तिला वत्सल मातेच्या रूपात बघतो. म्हणूनच तिला गंगामैया म्हणून संबोधतो. 
.
"स्रोतसामस्मि  जान्हवी " असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. सर्व नद्यांमध्ये भागीरथी गंगा हे माझेच रूप आहे असे भगवान सांगतात.
 " गंगेसारखे तीर्थ नाही" ह्या उक्तीनुसार जे कोणी जीव ह्या गंगेत स्नान करतात त्यांचे पापक्षालन हि मातृवत गंगा नदी करते, वामन अवतारांत  गंगा नदी  निर्माण झाली ती विष्णूच्या पायापासून. म्हणून तिला " विष्णुपदी " असेही म्हणतात. मोक्ष मिळवण्यासाठी धडपडणारे जीव गंगेकडेच आकर्षित होतात. तिच्या तटावर बसून ते साधना करतात आणि मोक्षपदाला प्राप्त होतात. " गमयति भगवत्पदमीती गंगा "...  हीच गंगा मनुष्याला भगवत  पदापर्यंत पोचवते.

गंगेला भागीरथी ह्या नावानेही संबोधतात. सगरपुत्रांच्या उद्धारासाठी कपिल मुनींनी दिलीपचा पुत्र भगीरथ ह्याला तपाचरण करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यास सांगितले. घोर तप करून भगीरथाने  शंकरांना प्रसन्न करून घेतले.  भगीरथाने स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी शंकरांना विनंती केली. शंकराने गंगेला स्वतःच्या जटेत धारण करून मग तिचा प्रवाह पृथ्वीवर आणला. मधेच तिला जन्हु ऋषींनी अडविले आणि मग परत एकदा भगीरथाने तप करून तिला परत आणले. जन्हु ऋषींच्या कानातून निघालेली हि पुढे जान्हवी म्हणून ओळखली जाऊ लागली. गंगा नदी स्वर्गांतून उतरून पृथ्वीवर येते आणि मग पाताळात जाते म्हणून तिला त्रिपथगामिनी असेही म्हणतात. पृथ्वीवर  उतरतांना हिमालयात गोमुख ( गंगोत्री ) येथे ती अवतीर्ण झाली. 

गंगा हि हिमालयाची कन्या आणि शंकराची पत्नी. शंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केल्यामुळे पार्वतीचा सवतीमत्सर उफाळून आला. 
गंगा हि शंतनू राजाची पत्नी आणि भीष्माचार्यांची आई  असा हि  उल्लेख पुराणकथांत आढळतो . 

गौतम मुनींनी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले. आणि शंकराच्या जटेतून दुसरा प्रवाह निघाला. गौतम ऋषींना गोहत्येचे जे पाप लागले होते ते ह्या पुण्य तीर्थातील  स्नानाने नाहीसे झाले. 

अशा अनेक आख्यायिका गंगेच्या अवतरणावर प्रसिध्द आहेत.   

लोकांचा उद्धार  करण्यासाठीच ह्या नद्या अवतीर्ण होतात. गंगा नदीच्या  स्नानाने दहा प्रकारच्या पातकांचा  नाश होतो. म्हणूनच सर्व भारतात हिची पूजा केली जाते.. प्रत्यक्ष दत्तगुरु सुद्धा नित्य जान्हवीचे स्नान करतात असा उल्लेख आहे. 

सर्व दृष्टीने आपल्या देशांत  ह्या नदीचा प्रथम क्रमांक आहे. 
 गंगेचा विस्तार खूप मोठा आहे. १५५० कि .मी. प्रवास करून ती शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेत तिला अलकनंदा, मंदाकिनी अश्या नावांनीही ओळखतात. आपल्या देशाला सुजलां ,सुफलां करणारी ही महत्वाची नदी. 

गंगाजल हे शुद्धी करणारे तसेच शरीर शक्ती वाढवणारे आहे. ह्या पाण्यात जंतू टिकत नाहीत. त्यामुळे औषध म्हणूनही ह्या जलाचा वापर करतात. तसेच अनेक वर्षं हे पाणी खराब होत नाही. 

अनेक साहित्यकांना  हि नदी साहित्य  निर्मितीसाठी  प्रेरणा देते. ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीत गंगेचे अनेक दृष्टांत दिले आहेत. जगन्नाथ पंडितांची इथे आठवण होणे स्वाभाविकच आहे. त्यांनी  रचलेले अतीव मधुर, गंगेवरील प्रेम व्यक्त करणारे," गंगालहरी" स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यांनी रचलेल्या प्रत्येक श्लोकाबरोबर गंगामाई एकेक पायरीने वर चढत होती  आणि शेवटी तिनेजगन्नाथ पंडिताला  प्रत्यक्ष दर्शन दिले. 
गंगालहरीत ते गंगेची स्तुती करताना  म्हणतात, पृथ्वीच्या कपाळावरील कुंकुम तिलक ( सौभाग्य) तूच आहेस. ह्या वसुधेला तुझ्या मुळेच समृद्धी प्राप्त झाली आहे. सर्व अमंगल आणि अशुभाचा नाश करून पुन्हा पावन  करणारी तूच  आहेस. 
अशा जीवनदायिनी गंगेचा पृथ्वीवरील अवतरण दिवस म्हणजे जेष्ठ महिन्यातील दशमी.
म्हणजेच गंगा दशहरा.   हा दिवस पुण्यकारक समजला जातो. 
 गंगा दशहरा हा उत्सव अनेक ठिकणी साजरा करून गंगेची पूजा ,आरती केली जाते.ह्या दिवशी गंगेत किंवा अन्य तीर्थात स्नान करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर दानाचेही महत्व सांगितले आहे. हरिद्वारला संध्याकाळी होणारी गंगेची आरती बघण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येतात. 

आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद  भारती ह्यांना गंगेची विलक्षण ओढ होती. तिच्या तटावरच  त्यांनी साधना करून नारायणाला आपलेसे करून घेतले. आणि शेवटी आपला देह सुद्धा गंगेतच विसर्जित केला. 
त्यांच्या कृपा प्रसादाने आम्हालाही गंगेच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. तिच्या शुभ्र धवल ,निर्मळ जलाचा स्पर्श अनुभवता आला. हिमालयातील चारधाम यात्रेत गंगेचे भव्य स्वरूप पाहता येते. काही ठिकाणी मंजुळ कलरव करणारे  तर काही ठिकाणी वेगाने गर्जत जाणारे नदीचे हे रूप आपल्याला दिसते .  

 नदीकिनारे हि आपली तीर्थक्षेत्रं आहेत. अनेक संतमाहात्मे ह्या नदीतीरावर राहिले आणि समाजाच्या उद्धाराचे व्रत अंगिकारले. ह्या नद्यांनीच आपली संस्कृती घडवली. आपल्याला समृद्ध जीवन दिले.

गंगेला आपण माता म्हणतो. देवी म्हणून तिची पूजा करतो. तिची स्तोत्राद्वारे स्तुती करतो. मग ती मलिन होणार नाही अशी काळजी आपण घ्यायला नको का ?
परमपावन अशा ह्या गंगेने एकदा खंत व्यक्त केली कि सर्व पापाचरणी लोक येऊन माझ्या प्रवाहात अंघोळ करतात आणि मला मलिन करतात. ह्या वेळी भगवंतांनी तिचे सांत्वन केले. ते म्हणतात जेव्हा जेव्हा संत महात्मे तुझ्या पात्रांत स्नान करतात तेव्हा तेव्हा हे पाप आपोपाप धुतले जाते आणि तू पुन्हा पवित्र होतेस. भागवतांत असा उल्लेख आहे.
 आपल्याला गंगामातेने  जे भरभरून जीवनसौख्य  दिले आहे त्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरेच आहेत.  . 

आज ह्या गंगा मातेकडे  सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करूया.
 
नमामि गंगे तव पादपङ्कजं । सुरासुरै वंदित दिव्य रूपं ।।
भुक्तीचं मुक्तीचं दधासी नित्यं । भावानुसारे सदा नराणां  ।।

जय जय गंगे , भागीरथी... 


Wednesday, May 27, 2020

Aum Namoji Vitthala ॐ नमोजी विठ्ठला

                                   

                                                    ||  श्री शंकर  ||                                                          


                             

                          नमोजी  विठ्ठला

 

सकाळची प्रसन्न वेळ.घंटेचा नाद सभागृहांत घुमतो. सूर्याची चमचमणारी कोवळी किरणे अलगद मंदिराच्या प्रवेशद्वाराशी थबकतात.बाहेर लागूनच उभा असलेला सर्वसाक्षी पिंपळ आपल्या पानांची सळसळ थांबवून सज्ज होतो आणि सर्व भाविक सभागृहात शिस्तबद्ध रीतीने आसनस्थ होतात.अगदी वेळेत ,एकसुरात प्रातःस्मरणाला सुरवात होते.गेली अनेक वर्षे अखंडपणे सुरु असलेली हि परंपरा. नांदेड जवळील उमरी पासून काही अंतरावर असलेले गोरठा. ह्या छोट्याश्या खेडेगावांतली मंडळी बहुतांशी अक्षर ओळखही नसलेली, शाळकरी मुलं, नित्यनेमाने सकाळी इथे येऊन दासगणू महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन , प्रातःस्मरणाने आपल्या दिवसाची मंगलमय सुरवात करतात आणि मगच कामाला लागतात.

आधुनिक महिपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संत कवी दासगणू महाराजांची हि कर्मभूमी. आणि आता महाराजांची वस्त्र समाधी तिथे आहे.ह्या खेड्याचे भाग्य थोर म्हणूनच इथे संतपरंपरा रुजली, वाढली आणि त्याचा सुगंध आजही आसमंतात दरवळतो आहे.आपल्या प्रसादमय, भक्ती रसाने चिंब भिजलेल्या काव्याने महाराजांनी जनमानसात भक्तिप्रेमाची गुढी उभारली. भक्ती- सामर्थ्याने प्रेरित असलेली हि चळवळ आजही तेवढ्याच उत्साहाने जोपासली जात आहे.

विठ्ठलाच्या नावाचा गजर होतो आणि महाराजांनी रचलेल्या रसाळ स्तोत्रांची मालिकाच सुरु होते. घनगंभीर आवाज सभागृहांत निनादत राहतो. आपण हि त्या प्रवाहात कधी मिसळून जातो समजत नाही.

आता पांडुरंग स्तोत्राला सुरवात होते. मंगलाचरण होऊन, सद्गुरू आणि संतसज्जनाचे आशीर्वाद घेऊन महाराज विठ्ठलाला साद घालतात.

हे चराचरव्यापक उदारा , पांडुरंगा , रुक्मिणीपती ...

महाराजांच्या डोळ्यासमोर पांडुरंग स्तोत्र रचताना पंढरपूरचा विठ्ठल तर होताच ,त्याचबरोबर परमेश्वराचे व्यापक रूप ते ह्या पांडुरंगात पाहत होते.

मत्स्य कच्छ,वराह नरहरी | वामन ,परशुराम रावणारी |

कृष्ण ,बौद्ध ,कलंकी या परी | नाना रूपे धरिलींस  ||

महाराज वर्णन करतात , भक्तांच्या रक्षणासाठी युगांनयुगे विविध अवतार धारण करून , वेगवेगळ्या  लीला करणारा तूच.

पुढे ते म्हणतात ...

नाना मते नाना पंथ जरी जगती अस्तित्वात | परी अवघ्यांचे सार सत्य एक तूच अससी कि ||

शैव असो किंवा वैष्णव हे पंथ दिसताना वेगळे दिसले तरी त्यामध्ये सामावलेला तूच आहेस.अद्वैत सिद्धांत महाराजांनी इथे अगदी सहजपणे मांडलेला आहे.

विठ्ठल ,परमेश्वराचा हा "नववा अवतार" भक्तांचा उद्धार करण्यासाठीच झालेला आहे. तरी महाराज म्हणतात, "जगदारंभापासून भक्त तुझे गाती गुण", यातून त्यांना प्रत्यक्ष परब्रह्म म्हणजेच त्याचे सगुण रूप " पांडुरंग" अभिप्रेत आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत असलेला हा पंढरपुरी निवास करणारा चित्तचोर. ज्यांनी ज्यांनी आपल्या अनन्य भक्तीने त्या पांडुरंगावर प्रेम केले त्या भक्तांसाठी हा धावून जातो.

ह्या लडिवाळ भक्तांची नांवे तरी किती सांगावीत ? दामाजीपंत,नरसी मेहेता, बोधले बुवा किंवा जनाबाई ,कान्होपात्रा.भगवंताशी आपुलकीच्या नात्याने  जोडल्या गेलेल्या आपल्या भक्तांचा तारणहार हाच. निजभक्तांच्या रक्षणासाठी हाच कटीवर हात ठेवून विटेवर उभा आहे.

हा विठ्ठल आहे तरी कसा ?

 आब्रह्मस्तंबपर्यंत तूच एक रुक्मिणीकांत " चराचरांत व्यापलेला ,घटाघटांत सामावलेला विविध रूपांत वावरणारा तो हाच. आकाशासारखे  अमर्याद,विशाल असे हे परब्रह्म प्रत्यक्षात जरी निर्गुण असले तरी जडमूढ जीवांसाठी ते सगुण झाले." रूप पाहता लोचनी ,सुख झाले हो साजणी

त्याच्या रूपाचे वर्णन करताना शब्द अपुरेच पडतात,

ते हे रुपडे मनोहर | 
  गळा घवघवीत तुळसीहार ||


हा  विठ्ठल जणू मदनाचा पुतळाच.मनोमन विठ्ठलाचे हे देखणे रूप मनःपटलावर कोरले जाते.
शब्द ,स्पर्श,रूप,रस,गंध हि भुतांची तन्मात्रे.त्याचे प्रतीक म्हणजेच विठ्ठलाच्या गळ्यातील वैजयंतीमाला. त्या तुलसीदलांचा सुवास आसमंत भारून टाकतो.आपल्या मनाचा गाभाराही व्यापून टाकतो. मूर्तीत प्रगटलेलें चैतन्य भक्तांची चेतना जागृत करते.

आता साक्षात हा विठ्ठल समोर उभा ठाकलाय, पण त्याची पूजा करू तरी कशाने ? सगळ्या निसर्गावर मालकी तर त्याचीच. मग माझे बोलणे, हिंडणे- फिरणे सर्व काही त्याच्याच पायाशी अर्पण करतो.माझी प्रत्येक कृती हि त्याच्याच प्रेरणेने झाली आहे. विठ्ठल भेटीसाठी व्याकुळ झालेले महाराजांचे मन सतत त्याचा धावा करतेय.माझ्या गुणदोषांसकट माझा स्वीकार कर,म्हणून महाराज त्या  विठू  माऊलीला आर्ततेने हाक मारतात. महाराज  " अक्षर रुपी" वाङ्मयसेवा " अक्षर " विटेवर उभ्या असलेल्या पांडुरंगाला समर्पित करतात.

अर्थात माऊलीच ती. भक्ताचा भाव जाणून इच्छित फळ त्याला देतेच.संसार तापाने पोळलेल्या सामान्य जनांना हवे असेल ते सर्व ह्या विठ्ठलाची भक्ती आणि ह्या स्तोत्राचे पठण केल्यास प्राप्त होते.फक्त हवा प्रामाणिकपणा,श्रद्धा , निष्ठा. तो परमेश्वर  मग तुमच्यावर कृपेचा वर्षाव करतो.

महाराजांनी सुमारे एकशेदहा वर्षांपूर्वी रचलेले हे पांडुरंग स्तोत्र. ह्या स्तोत्राचे मनोभावे केलेले पारायण तुमच्या देहबुद्धीचा नाश करून त्या वैकुंठनायकाची भेट नक्की घडवील असा विश्वास महाराज व्यक्त करतात .

हे स्तोत्र त्यातील शब्द जिव्हाळ्यामुळे भाविकांना आकर्षित करते.दिवसभर त्यातील शब्दांचे गुंजन मनांत चालू राहते.वेदांत तत्वज्ञान अगदी सोप्या भाषेत इथे प्रगट होते. अवीट गोडीचे हे स्तोत्र  सामान्य भक्तालाही आपले वाटते.

माझ्यासारख्या प्रापंचिक गृहिणीला महाराजांचे शब्दवैभव,तत्वज्ञान,काव्याची ओघवती भाषा,त्यातील प्रसाद गुण,लालित्य सर्वच मोहात पाडते.आजही ते स्तोत्र म्हणताना नित्यनूतनच भासते.

ह्या भक्तिरसात डुंबण्यासाठी महाराज म्हणतात त्याप्रमाणे ….

                                       पारायण हीच वारी | करा अत्यादरे निर्धारी |

                   भक्तिपताका स्कंधावरी |  घेऊनिया भाविक हो ||

पुंडलिक वरदा हरी विठ्ठल....

 


Sunday, May 17, 2020

HELLO...HELLO..... हॅलो ... हॅलो ...

                                  ।।      श्री   शंकर   ।।

                                         हॅलो  .... हॅलो .... 



        आज जागतिक दूरसंचार दिन.  त्या निमित्ताने काही स्मृती सचेतन झाल्या.

"STAY CONNECTED " ह्या भावनेंत  Telecommunication चे सामर्थ्य दडलेलं  आहे. आज घराबाहेर पडायची बंदी असतांना समाजांशी प्रत्यक्ष जोडण्याचे काम ह्या Communication Network मुळे शक्य झाले.
घरातला बंदिवास सुसह्य झाला. " Thanks World Telecommunication "

मुंबई महानगरावर  अधिराज्य गाजवणाऱ्या आणि संपूर्ण जगाशीं संपर्क असलेल्या M.T.N.L. ची आज प्रकर्षाने आठवण झाली. सुरवातीला बॉम्बे टेलिफोन्स ह्या नावाने असलेल्या संस्थेचे रूपांतर पुढे महानगर टेलिफोन लि .मुंबई मध्ये झाले.ते वर्षं होतं १९८६.

सुमारे १८८२  मध्ये स्थापन झालेली " पोस्ट आणि टेलिकम्युनिकेशन" च्या सेवेअंतर्गत सामावणारी टेलिफोन सेवा मुंबईच्या जडघडणीत एक महत्वाचा टप्पा ठरली. मुंबईनंतर दिल्लीत हि सेवा सुरु झाली. ब्रिटिशांनी मुंबई बंदराचे व्यापारी महत्व चाणाक्ष नजरेने केव्हाच हेरले होते. त्यामुळेच बॉम्बे टेलिफोन्स  ची घोडदौड इथे सुरु झाली. जनसंपर्क आणि अर्थातच पुढे व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने हे जाळे वाढू लागले.आणि पुढे त्याचे महाजालात रूपांतर कधी झाले ते समजलेच नाही. विस्तारणाऱ्या  अफाट मुंबईला सेवा पुरविण्यासाठी अनेक दूरभाष केंद्रांची स्थापना झाली. ह्या केंद्रात कामकाजासाठी असलेला ऑपरेटर आणि इतर कर्मचारी वर्ग वाढत होता. लाईनमन" फिल्ड वर्क" साठी नियुक्त केले गेले. हि संख्या हजारोंच्या घरात पोहोचली.

मला आठवतं ,मी स्वतः फोन  साठी अर्ज केला तेव्हा मला ७ वर्षे फोनची वाट बघावी लागली होती. नंबर लागल्यावर कोण आनंद झाला होता. तेव्हा मुंबई बाहेर फोन  लावायचा म्हणजे एक दिव्यच असे. परदेशात फोन करण्यासाठी मग विदेश संचार निगम ची स्थापना झाली. ह्या सगळ्या सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेला उत्तम चालना  मिळाली.  १ Rs .ची टेलिफोन बूथची त्या वेळेला खूपच चलती  होती आणि सर्वसाधारण जनतेला ह्या फोनचा खूप आधार वाटत असे. अनेक अपंग व्यक्तींना ह्याद्वारे रोजगाराचे साधनही उपलब्ध झाले होते.

सर्व जगांत तंत्रज्ञानाची क्रांती झाली ती २००० सालच्या आगमनाबरोबरच  . १९९५ साली संगणक अवतरले.त्या पाठोपाठ इंटरनेट .आणि आता तर मोबाईल मुळे सर्व जगच 'अपनी मुठ्ठीमें ' अशी परिस्थिती आहे.

अनेक खाजगी कम्पन्यांनी globalisation policy ला अनुसरून टेलिफोन विश्वात धडक मारली ;स्पर्धा वाढू लागली .बाहेरच्या जगांत घडणाऱ्या अफाट घडामोडीना  तोंड देण्याचे सामर्थ्य कदाचित कमी पडले असावे. ह्या आक्रमणाने  M.T.N.L.ची हळूहळू घडी विस्कटत  गेली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक पर्यायी मार्गांचा अवलंब करूनही फारसे यश मिळाले नाही आणि हळूहळू नवरत्नांपैकी एक असलेली हि कंपनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडू लागली." कालाय तस्मै नमः "

जानेवारी २०२० मध्ये आलेल्या Compulsory  Retirment Scheme  मुळे आज अगदी अपुऱ्या मनुष्य बळावर Telephone Ex. चालवली जात आहेत.

आजवर अनेक कुटुंबाना पोसणारी  MTNL " कुणी फोन घेता का फोन" असा आर्त सवाल करतेय भारतीय अर्थव्यवस्थेत कार्यरत असणाऱ्या निम सरकारी कंपन्यांपैकी हि एक आघाडीची कंपनी, अहोरात्र अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांपकी एक. अवघ्या मुंबापुरीची हेल्पलाइन

परवा  कामानिमीत्त टेलिफोन केंद्रात  जायची वेळ आली.  MTNL चे  पूर्वीचं वैभव आठवून जीव कासावीस झाला. सगळी इमारत अगदी शांत ,स्तब्ध .

एकेकाळी चैतन्याने सळसळणारी  आपली" संवादिनी "आज अशी मूक झालेली  बघून मन अबॊल झालं .
पुनःश्च हरिओम ह्या न्यायाने पुन्हा एकदा ह्या सेवेला झळाळी प्राप्त होईल आणि हि केंद्रे पुन्हा नवीन जोमाने कार्यरत होतील ... मन में हैं विश्वास ,पुरा है विश्वास ...

Wednesday, May 13, 2020

Akashashi Jadale Nate....( आकाशाशी जडले नाते )

                                                         
 ll श्री  शंकर  ll

आकाशाशी जडले नाते

                  

                 नीले गगन के तले ,धरती का प्यार पले ..... 


अगदी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपली कायम सोबत कोण करतं ? एक जमीन (पृथ्वी) आणि दुसरे आकाश  आपल्या  सर्वांना कायमच  साथ देणारं, छाया देणारं, माया देणारं.  

माणसाला नेहेमीच भव्य- दिव्य आवडते. अमर्याद, विशाल वस्तूंचे त्याला आकर्षण असते. अथांग समुद्राच्या किनारी जाऊन त्याच्या खोलीचा वेध घेणे त्याला आवडते तसेच विस्तीर्ण आकाश त्याला भुरळ घालते. ह्या निसर्ग रूपांत त्याला एक वेगळीच अनुभूती मिळते आणि काही क्षण शांतता लाभते. 


जगाच्या कोणत्याही टोकाला आपण असलो तरीं आकाश तेच, One & Only One. आपल्या जन्मांपासूनच ह्या आकाशाशी आपले नाते जोडले जाते. सध्याच्या शांत, निवांत वातावरणांत आकाशाचे अनेक विभ्रम मला न्याहाळता आले आणि आकाशाशी असलेले  हे नाते अधिक दृढ झाले. 

आकाश हि एक पोकळी आहे. ते स्थिर (अचल) विशाल, अनंत, अमर्याद आणि अलिप्त आहे. त्याच्यावर पसरणारे सर्व रंग सूर्य चंद्र,नक्षत्र चांदण्यांना आपल्यात विनातक्रार सामावून घेणारे.      

         घट घट मैं पंछी बोलता ..... प्रत्येक घटात हे आकाश स्थित असतं. अगदी आपल्या आजूबाजूला, घरांत सगळया पोकळींत हे आकाश तत्व भरून राहिलेलं असतं फक्त अतिपरिचयात अवज्ञा, ह्या न्यायाने आपल्याला त्याची जाणीव होत नाही.आपण उच्चारतो तो शब्दं ह्या आकाशाचाच गुण. त्यामुळे तो शब्द ह्या आकाशाच्या पोकळीत जाऊन, मग प्रतिध्वनीत होतो. आपलं शरीर हाही पंचतत्वांनी भरलेला एक घटच आहे. हा घट जेव्हा फुटतो तेव्हा तो आकाश तत्वाशी एकरूप होतो. 

आकाश आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत असले, तरीही ती एक अमूर्त कल्पना (Abstract)आहे. आकाश आणि धरणीचे मिलन होते असे आपण म्हणतो. ह्यालाच आपण क्षितिज म्हणतो. पण तीही  केवळ एक कल्पनाच आहे.

" आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ,स्वयंवर झाले सीतेचे , स्वयंवर झाले सीतेचे ।। "

  
     हे दृढ नाते रामायणांत दिसून येते. 

ह्या आकाशाची किती विविध रूपे आपण पाहतो?

     गगन सदन तेजोमय , तिमिर हरुनी दे प्रकाश, देई अभय .... 

रोजच्या दिनक्रमानुसार वेगवेगळ्या प्रहरांत, विविध रूपांचे, रंगछटांचे दर्शन आपल्याला आकाशांत  घडते. निसर्गचक्रानुसार, ऋतुमानाप्रमाणे हे आकाश विविध साज चढवते. 

पृथ्वी दिवसभर फिरून दमून जाते, पण आभाळ मात्र लांबूनच, स्थिर राहून, तिची गम्मत तटस्थ पणे बघत असते. हे नभ स्थितप्रज्ञ वाटले तरी मायाळू असते हं. सगळ्या जगावर त्यानें आपल्या मायेचे पांघरूण आच्छादलेले असते. 
        
       आकाश पांघरोनी,जग शांत झोपले हे । घेऊन एकतारी गातो कबीर दोहे ।।

पावसाळ्यात  ह्या नभाची आणखी विलोभनीय रूपे आपल्याला भुरळ घालतात. 

नभ मेघांनी आक्रमिले  किंवा घनघन माला नभी दाटल्या , आकाशातून पडणाऱ्या जलधारांचा वर्षांव सुखविणारा, तर कधीतरी बिजलीचा चमचमाट आकाश उजळवून टाकणारा.  पण जेंव्हा पाऊस दडी  मारून बसतो तेव्हा सगळ्यांचेच डोळे, विशेषतः शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात आणि पावसाची चातकाप्रमाणे वाट बघतात. आपल्या पूर्वजांची स्मृती जागृत होते तेव्हा आपली नजर आकाशातच त्यांचा शोध घेते आणि तिथूनच  ते आपल्यावर मायेचा वर्षाव करतायत असे जाणवत राहते. आणि नकळत त्या आकाशाकडे बघून हात जोडले जातात. 

कवी कल्पनेने तर हे आभाळ इतकं भरून येतं, अगदी मायेचा पाझरचं फुटतो त्याला.. आभाळमाया .. आपली आई सुद्धा अशीच आभाळागत माया करणारी ... 

 पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूते क्रमाने अधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जातात. ह्या पांच भुतांचा परस्पर संबंध निसर्गाचा उत्तम समतोल साधत असतो. पंचमहाभूतांच्या संयोगातूनच सर्व वस्तुजात निर्माण होते. आणि आपले दैनंदिन जीवन ह्या रचनेमुळेच सुरळीत चालू असते आणि त्याही पुढे ह्या सर्व सृष्टीचा निर्माता, जो ह्या पंचमहाभूतांनाही नियंत्रित करतो, त्याचा शोध घेणे अनिवार्य आहे असे वाटते. 

आकाशांत पतितं तोयं ,यथा गच्छति सागरं... हे सर्व निसर्गचक्र अव्याहतपणे चालू राहते, ते परमेश्वराच्या अस्तित्वामुळे. तो परमेश्वर आहे कसा? तर अगदी आकाशसारखा, निळा, अनंत, अमर्याद ,अमूर्त . 

   मनाच्या श्लोकांत समर्थ रामदास म्हणतात  " नभासारिखे रूप ह्या राघवाचे " सर्वांना व्यापून असणारे हे ब्रह्म आकाशसारखेच व्यापक, आधारभूत. तिथे दुजाभाव नाहीच. विष्णूचे एक नांव  'विहायगती ' असं आहे. आकाश हेच ज्याचे आश्रय स्थान आहे किंवा आकाशही ज्याच्या मध्ये लिन होते असा तो. 

अशा परमात्म्याने आकाश निर्माण तरी कसं केलंय ? " स्तंभावांचूनि हे उभे नभ असे "

आकाश स्वतः कोणत्याही आधाराशिवाय उभे आहे, पण तरीही सर्वाना आधारभूत मात्र आहे. 

गरुड आकाशांत उंच भरारी मारतो. झाडें उंचच उंच आकाशात झेपावतात. हिमालयासारखें ऊत्तुंग पर्वत नभाला स्पर्श करतात. आपण जेव्हा ह्या पर्वतावर असतो तेव्हा आकाशाच्या अगदी जवळ गेल्याचा भास होतो. विमानांत बसून जेव्हा आपण आकाशात उड्डाण करतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. 

अनेक संत महात्म्यांचे चरित्र आपण वाचतो तेव्हा त्यांच्या कार्याचा विस्तार आपल्याला आकाशासारखा विशाल भासतो. ।। अणू रेणूहूनि थोकडा , तुका आकाशाएवढा ।।


निसर्गापेक्षा माणसाची क्षमता कमी असली तरी त्याच्या बुद्धीने तो आकाशालाही  गवसणी घालतो. अनेक थोर व्यक्तींचा आदर्श ठेऊन त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले तर नक्कीच तो आकाशापलीकडे (Beyond The Skies) पोहोचू शकतो हे अनेकांनी सिध्द केले आहे. त्यासाठी ध्येय मात्र उत्तुंग हवे.  

आकाशांत सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य आपल्याला दिसते. त्याचे दर्शन आपल्याला नेत्रसुख देते, आनंदीत करते. पुनःपुन्हा ते दृश्य आपल्याला बघावेसे वाटते. 
    
निसर्गातील सर्वच घटकांचे शुद्ध सात्विक निर्मल रूप जपले तरच पंचमहाभूतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील . आणि इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्याही जीवनांत सप्तरंगांची उधळण होईल ,नाही का ? 




स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com