Wednesday, May 13, 2020

Akashashi Jadale Nate....( आकाशाशी जडले नाते )

                                                         
 ll श्री  शंकर  ll

आकाशाशी जडले नाते

                  

                 नीले गगन के तले ,धरती का प्यार पले ..... 


अगदी आपल्या जन्मापासून आपल्या मृत्यूपर्यंत आपली कायम सोबत कोण करतं ? एक जमीन (पृथ्वी) आणि दुसरे आकाश  आपल्या  सर्वांना कायमच  साथ देणारं, छाया देणारं, माया देणारं.  

माणसाला नेहेमीच भव्य- दिव्य आवडते. अमर्याद, विशाल वस्तूंचे त्याला आकर्षण असते. अथांग समुद्राच्या किनारी जाऊन त्याच्या खोलीचा वेध घेणे त्याला आवडते तसेच विस्तीर्ण आकाश त्याला भुरळ घालते. ह्या निसर्ग रूपांत त्याला एक वेगळीच अनुभूती मिळते आणि काही क्षण शांतता लाभते. 


जगाच्या कोणत्याही टोकाला आपण असलो तरीं आकाश तेच, One & Only One. आपल्या जन्मांपासूनच ह्या आकाशाशी आपले नाते जोडले जाते. सध्याच्या शांत, निवांत वातावरणांत आकाशाचे अनेक विभ्रम मला न्याहाळता आले आणि आकाशाशी असलेले  हे नाते अधिक दृढ झाले. 

आकाश हि एक पोकळी आहे. ते स्थिर (अचल) विशाल, अनंत, अमर्याद आणि अलिप्त आहे. त्याच्यावर पसरणारे सर्व रंग सूर्य चंद्र,नक्षत्र चांदण्यांना आपल्यात विनातक्रार सामावून घेणारे.      

         घट घट मैं पंछी बोलता ..... प्रत्येक घटात हे आकाश स्थित असतं. अगदी आपल्या आजूबाजूला, घरांत सगळया पोकळींत हे आकाश तत्व भरून राहिलेलं असतं फक्त अतिपरिचयात अवज्ञा, ह्या न्यायाने आपल्याला त्याची जाणीव होत नाही.आपण उच्चारतो तो शब्दं ह्या आकाशाचाच गुण. त्यामुळे तो शब्द ह्या आकाशाच्या पोकळीत जाऊन, मग प्रतिध्वनीत होतो. आपलं शरीर हाही पंचतत्वांनी भरलेला एक घटच आहे. हा घट जेव्हा फुटतो तेव्हा तो आकाश तत्वाशी एकरूप होतो. 

आकाश आपल्याला जरी डोळ्यांनी दिसत असले, तरीही ती एक अमूर्त कल्पना (Abstract)आहे. आकाश आणि धरणीचे मिलन होते असे आपण म्हणतो. ह्यालाच आपण क्षितिज म्हणतो. पण तीही  केवळ एक कल्पनाच आहे.

" आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे ,स्वयंवर झाले सीतेचे , स्वयंवर झाले सीतेचे ।। "

  
     हे दृढ नाते रामायणांत दिसून येते. 

ह्या आकाशाची किती विविध रूपे आपण पाहतो?

     गगन सदन तेजोमय , तिमिर हरुनी दे प्रकाश, देई अभय .... 

रोजच्या दिनक्रमानुसार वेगवेगळ्या प्रहरांत, विविध रूपांचे, रंगछटांचे दर्शन आपल्याला आकाशांत  घडते. निसर्गचक्रानुसार, ऋतुमानाप्रमाणे हे आकाश विविध साज चढवते. 

पृथ्वी दिवसभर फिरून दमून जाते, पण आभाळ मात्र लांबूनच, स्थिर राहून, तिची गम्मत तटस्थ पणे बघत असते. हे नभ स्थितप्रज्ञ वाटले तरी मायाळू असते हं. सगळ्या जगावर त्यानें आपल्या मायेचे पांघरूण आच्छादलेले असते. 
        
       आकाश पांघरोनी,जग शांत झोपले हे । घेऊन एकतारी गातो कबीर दोहे ।।

पावसाळ्यात  ह्या नभाची आणखी विलोभनीय रूपे आपल्याला भुरळ घालतात. 

नभ मेघांनी आक्रमिले  किंवा घनघन माला नभी दाटल्या , आकाशातून पडणाऱ्या जलधारांचा वर्षांव सुखविणारा, तर कधीतरी बिजलीचा चमचमाट आकाश उजळवून टाकणारा.  पण जेंव्हा पाऊस दडी  मारून बसतो तेव्हा सगळ्यांचेच डोळे, विशेषतः शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागतात आणि पावसाची चातकाप्रमाणे वाट बघतात. आपल्या पूर्वजांची स्मृती जागृत होते तेव्हा आपली नजर आकाशातच त्यांचा शोध घेते आणि तिथूनच  ते आपल्यावर मायेचा वर्षाव करतायत असे जाणवत राहते. आणि नकळत त्या आकाशाकडे बघून हात जोडले जातात. 

कवी कल्पनेने तर हे आभाळ इतकं भरून येतं, अगदी मायेचा पाझरचं फुटतो त्याला.. आभाळमाया .. आपली आई सुद्धा अशीच आभाळागत माया करणारी ... 

 पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. ही पंचमहाभूते क्रमाने अधिक सूक्ष्म आणि व्यापक होत जातात. ह्या पांच भुतांचा परस्पर संबंध निसर्गाचा उत्तम समतोल साधत असतो. पंचमहाभूतांच्या संयोगातूनच सर्व वस्तुजात निर्माण होते. आणि आपले दैनंदिन जीवन ह्या रचनेमुळेच सुरळीत चालू असते आणि त्याही पुढे ह्या सर्व सृष्टीचा निर्माता, जो ह्या पंचमहाभूतांनाही नियंत्रित करतो, त्याचा शोध घेणे अनिवार्य आहे असे वाटते. 

आकाशांत पतितं तोयं ,यथा गच्छति सागरं... हे सर्व निसर्गचक्र अव्याहतपणे चालू राहते, ते परमेश्वराच्या अस्तित्वामुळे. तो परमेश्वर आहे कसा? तर अगदी आकाशसारखा, निळा, अनंत, अमर्याद ,अमूर्त . 

   मनाच्या श्लोकांत समर्थ रामदास म्हणतात  " नभासारिखे रूप ह्या राघवाचे " सर्वांना व्यापून असणारे हे ब्रह्म आकाशसारखेच व्यापक, आधारभूत. तिथे दुजाभाव नाहीच. विष्णूचे एक नांव  'विहायगती ' असं आहे. आकाश हेच ज्याचे आश्रय स्थान आहे किंवा आकाशही ज्याच्या मध्ये लिन होते असा तो. 

अशा परमात्म्याने आकाश निर्माण तरी कसं केलंय ? " स्तंभावांचूनि हे उभे नभ असे "

आकाश स्वतः कोणत्याही आधाराशिवाय उभे आहे, पण तरीही सर्वाना आधारभूत मात्र आहे. 

गरुड आकाशांत उंच भरारी मारतो. झाडें उंचच उंच आकाशात झेपावतात. हिमालयासारखें ऊत्तुंग पर्वत नभाला स्पर्श करतात. आपण जेव्हा ह्या पर्वतावर असतो तेव्हा आकाशाच्या अगदी जवळ गेल्याचा भास होतो. विमानांत बसून जेव्हा आपण आकाशात उड्डाण करतो तेव्हाचा आनंद अवर्णनीय असतो. 

अनेक संत महात्म्यांचे चरित्र आपण वाचतो तेव्हा त्यांच्या कार्याचा विस्तार आपल्याला आकाशासारखा विशाल भासतो. ।। अणू रेणूहूनि थोकडा , तुका आकाशाएवढा ।।


निसर्गापेक्षा माणसाची क्षमता कमी असली तरी त्याच्या बुद्धीने तो आकाशालाही  गवसणी घालतो. अनेक थोर व्यक्तींचा आदर्श ठेऊन त्याने आपले कर्तृत्व सिद्ध केले तर नक्कीच तो आकाशापलीकडे (Beyond The Skies) पोहोचू शकतो हे अनेकांनी सिध्द केले आहे. त्यासाठी ध्येय मात्र उत्तुंग हवे.  

आकाशांत सप्तरंगांची उधळण करणारे इंद्रधनुष्य आपल्याला दिसते. त्याचे दर्शन आपल्याला नेत्रसुख देते, आनंदीत करते. पुनःपुन्हा ते दृश्य आपल्याला बघावेसे वाटते. 
    
निसर्गातील सर्वच घटकांचे शुद्ध सात्विक निर्मल रूप जपले तरच पंचमहाभूतांचे आशीर्वाद आपल्याला लाभतील . आणि इंद्रधनुष्याप्रमाणे आपल्याही जीवनांत सप्तरंगांची उधळण होईल ,नाही का ? 




स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com 








































No comments:

Post a Comment