Monday, June 1, 2020

Soubhagya Dayini Ganga ( सौभाग्यदायिनी गंगा )

                                                             ।।  श्री  शंकर  ।।

                                                         सौभाग्यदायिनी  गंगा 

भारतातील  सर्वात पूज्य मानली  जाणारी नदी....गंगानदी...आपण तिला वत्सल मातेच्या रूपात बघतो. म्हणूनच तिला गंगामैया म्हणून संबोधतो. 
.
"स्रोतसामस्मि  जान्हवी " असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. सर्व नद्यांमध्ये भागीरथी गंगा हे माझेच रूप आहे असे भगवान सांगतात.
 " गंगेसारखे तीर्थ नाही" ह्या उक्तीनुसार जे कोणी जीव ह्या गंगेत स्नान करतात त्यांचे पापक्षालन हि मातृवत गंगा नदी करते, वामन अवतारांत  गंगा नदी  निर्माण झाली ती विष्णूच्या पायापासून. म्हणून तिला " विष्णुपदी " असेही म्हणतात. मोक्ष मिळवण्यासाठी धडपडणारे जीव गंगेकडेच आकर्षित होतात. तिच्या तटावर बसून ते साधना करतात आणि मोक्षपदाला प्राप्त होतात. " गमयति भगवत्पदमीती गंगा "...  हीच गंगा मनुष्याला भगवत  पदापर्यंत पोचवते.

गंगेला भागीरथी ह्या नावानेही संबोधतात. सगरपुत्रांच्या उद्धारासाठी कपिल मुनींनी दिलीपचा पुत्र भगीरथ ह्याला तपाचरण करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेण्यास सांगितले. घोर तप करून भगीरथाने  शंकरांना प्रसन्न करून घेतले.  भगीरथाने स्वर्गातील गंगेला पृथ्वीवर आणण्यासाठी शंकरांना विनंती केली. शंकराने गंगेला स्वतःच्या जटेत धारण करून मग तिचा प्रवाह पृथ्वीवर आणला. मधेच तिला जन्हु ऋषींनी अडविले आणि मग परत एकदा भगीरथाने तप करून तिला परत आणले. जन्हु ऋषींच्या कानातून निघालेली हि पुढे जान्हवी म्हणून ओळखली जाऊ लागली. गंगा नदी स्वर्गांतून उतरून पृथ्वीवर येते आणि मग पाताळात जाते म्हणून तिला त्रिपथगामिनी असेही म्हणतात. पृथ्वीवर  उतरतांना हिमालयात गोमुख ( गंगोत्री ) येथे ती अवतीर्ण झाली. 

गंगा हि हिमालयाची कन्या आणि शंकराची पत्नी. शंकराने तिला आपल्या मस्तकावर धारण केल्यामुळे पार्वतीचा सवतीमत्सर उफाळून आला. 
गंगा हि शंतनू राजाची पत्नी आणि भीष्माचार्यांची आई  असा हि  उल्लेख पुराणकथांत आढळतो . 

गौतम मुनींनी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न केले. आणि शंकराच्या जटेतून दुसरा प्रवाह निघाला. गौतम ऋषींना गोहत्येचे जे पाप लागले होते ते ह्या पुण्य तीर्थातील  स्नानाने नाहीसे झाले. 

अशा अनेक आख्यायिका गंगेच्या अवतरणावर प्रसिध्द आहेत.   

लोकांचा उद्धार  करण्यासाठीच ह्या नद्या अवतीर्ण होतात. गंगा नदीच्या  स्नानाने दहा प्रकारच्या पातकांचा  नाश होतो. म्हणूनच सर्व भारतात हिची पूजा केली जाते.. प्रत्यक्ष दत्तगुरु सुद्धा नित्य जान्हवीचे स्नान करतात असा उल्लेख आहे. 

सर्व दृष्टीने आपल्या देशांत  ह्या नदीचा प्रथम क्रमांक आहे. 
 गंगेचा विस्तार खूप मोठा आहे. १५५० कि .मी. प्रवास करून ती शेवटी बंगालच्या उपसागराला मिळते. वाटेत तिला अलकनंदा, मंदाकिनी अश्या नावांनीही ओळखतात. आपल्या देशाला सुजलां ,सुफलां करणारी ही महत्वाची नदी. 

गंगाजल हे शुद्धी करणारे तसेच शरीर शक्ती वाढवणारे आहे. ह्या पाण्यात जंतू टिकत नाहीत. त्यामुळे औषध म्हणूनही ह्या जलाचा वापर करतात. तसेच अनेक वर्षं हे पाणी खराब होत नाही. 

अनेक साहित्यकांना  हि नदी साहित्य  निर्मितीसाठी  प्रेरणा देते. ज्ञानेश्वरांनीही ज्ञानेश्वरीत गंगेचे अनेक दृष्टांत दिले आहेत. जगन्नाथ पंडितांची इथे आठवण होणे स्वाभाविकच आहे. त्यांनी  रचलेले अतीव मधुर, गंगेवरील प्रेम व्यक्त करणारे," गंगालहरी" स्तोत्र प्रसिद्ध आहे. त्यांनी रचलेल्या प्रत्येक श्लोकाबरोबर गंगामाई एकेक पायरीने वर चढत होती  आणि शेवटी तिनेजगन्नाथ पंडिताला  प्रत्यक्ष दर्शन दिले. 
गंगालहरीत ते गंगेची स्तुती करताना  म्हणतात, पृथ्वीच्या कपाळावरील कुंकुम तिलक ( सौभाग्य) तूच आहेस. ह्या वसुधेला तुझ्या मुळेच समृद्धी प्राप्त झाली आहे. सर्व अमंगल आणि अशुभाचा नाश करून पुन्हा पावन  करणारी तूच  आहेस. 
अशा जीवनदायिनी गंगेचा पृथ्वीवरील अवतरण दिवस म्हणजे जेष्ठ महिन्यातील दशमी.
म्हणजेच गंगा दशहरा.   हा दिवस पुण्यकारक समजला जातो. 
 गंगा दशहरा हा उत्सव अनेक ठिकणी साजरा करून गंगेची पूजा ,आरती केली जाते.ह्या दिवशी गंगेत किंवा अन्य तीर्थात स्नान करण्याची पद्धत आहे. त्याचबरोबर दानाचेही महत्व सांगितले आहे. हरिद्वारला संध्याकाळी होणारी गंगेची आरती बघण्यासाठी देश विदेशातून अनेक पर्यटक येतात. 

आमचे सद्गुरू स्वामी वरदानंद  भारती ह्यांना गंगेची विलक्षण ओढ होती. तिच्या तटावरच  त्यांनी साधना करून नारायणाला आपलेसे करून घेतले. आणि शेवटी आपला देह सुद्धा गंगेतच विसर्जित केला. 
त्यांच्या कृपा प्रसादाने आम्हालाही गंगेच्या दर्शनाचे सौभाग्य लाभले. तिच्या शुभ्र धवल ,निर्मळ जलाचा स्पर्श अनुभवता आला. हिमालयातील चारधाम यात्रेत गंगेचे भव्य स्वरूप पाहता येते. काही ठिकाणी मंजुळ कलरव करणारे  तर काही ठिकाणी वेगाने गर्जत जाणारे नदीचे हे रूप आपल्याला दिसते .  

 नदीकिनारे हि आपली तीर्थक्षेत्रं आहेत. अनेक संतमाहात्मे ह्या नदीतीरावर राहिले आणि समाजाच्या उद्धाराचे व्रत अंगिकारले. ह्या नद्यांनीच आपली संस्कृती घडवली. आपल्याला समृद्ध जीवन दिले.

गंगेला आपण माता म्हणतो. देवी म्हणून तिची पूजा करतो. तिची स्तोत्राद्वारे स्तुती करतो. मग ती मलिन होणार नाही अशी काळजी आपण घ्यायला नको का ?
परमपावन अशा ह्या गंगेने एकदा खंत व्यक्त केली कि सर्व पापाचरणी लोक येऊन माझ्या प्रवाहात अंघोळ करतात आणि मला मलिन करतात. ह्या वेळी भगवंतांनी तिचे सांत्वन केले. ते म्हणतात जेव्हा जेव्हा संत महात्मे तुझ्या पात्रांत स्नान करतात तेव्हा तेव्हा हे पाप आपोपाप धुतले जाते आणि तू पुन्हा पवित्र होतेस. भागवतांत असा उल्लेख आहे.
 आपल्याला गंगामातेने  जे भरभरून जीवनसौख्य  दिले आहे त्याबद्दल बोलण्यासाठी शब्द अपुरेच आहेत.  . 

आज ह्या गंगा मातेकडे  सौभाग्य प्राप्त व्हावे म्हणून प्रार्थना करूया.
 
नमामि गंगे तव पादपङ्कजं । सुरासुरै वंदित दिव्य रूपं ।।
भुक्तीचं मुक्तीचं दधासी नित्यं । भावानुसारे सदा नराणां  ।।

जय जय गंगे , भागीरथी... 


1 comment:

  1. खूप माहितीपूर्ण लिहिलंय.

    ReplyDelete