आज २१ जून, वर्षांतला सर्वांत मोठ्ठा दिवस. मित्रा, आज तुझा सहवास आम्हाला जास्त वेळ लाभणार. या दिवसाचे हे महत्व लक्षांत घेऊन आम्ही आंतरराष्ट्रीय योगदिवस जगभर साजरा करतो.
उद्यापासून तू दक्षिणायनात प्रवेश करणार. दिवस लहान आणि रात्र मोठी होणार. सहा महिन्यांनी तू पुनः उत्तरायणांत प्रवेश करशील. त्यावेळी आम्ही संक्रांत आणि रथसप्तमीचा सण उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतो.
हे नारायणा, तुझे तेजोबिंब सकाळच्या प्रहरी दश-दिशांना उजळवीत क्षितिजाची सीमा पार करून वर येते तेव्हा होणारा आनंद आगळाच असतो. जणू काही मायेचं ( तिमिर ) अस्तित्व लोप पावते आणि परमेश्वराचे सत्य स्वरूप याची देही, याची डोळा पाहता येतं.
खरं तर आपली भेट रोज ठरलेली. पण तरीही रामप्रहरी तू येण्याची चाहूल लागताच डोळे तुझ्या आगमनाकडे लागतात. किती तुझ्या स्वागताचा थाट! भूपाळी, ओव्या... माऊली सकाळी सकाळी जात्यावर बसून ह्या ओव्या गात असत... ह्या गोड ओव्या सकाळच्या प्रसन्नतेत भर घालत.
सात घोड्यांच्या रथांवर बसून स्वारी अवतीर्ण होते, तेव्हा मन प्रसन्न होते. ह्या रथाला एकच चाक आहे. रथाचा सारथी पांगुळा आहे. ह्या रथाला कोणताही आधार नाही. भूमी नाही आणि आकाशही नाही. अधांतरीच हा रथ धावत असतो. "केयूरवान मकरकुंडलवान किरिटी हारी हिरण्मय वपुरधृत शंखचक्र:" असे तुझे रूप. सहस्र किरणांच्या, सहस्र शाखांमधून तू प्रगट होतोस.
अरुणोदय होताच रुबाबदार पावलं टाकत अवघे आकाश पादाक्रांत करतोस तेव्हा हे आरक्तवर्णी, आल्हाददायी रूप मन प्रसन्न करते. तिमिर हरुनी देई प्रकाश, देई अभय... ते कोवळं, लडिवाळ रूप नजरेत बंदिस्त करे करे पर्यंतच किती रंग -रूप पालटतोस. दिवसभरात वेगवेगळी रूपं धारण करतोस, आणि संध्याकाळी परत एकदा आरक्तवर्ण. त्यावेळचं तुझं रूप बघायलाही सगळ्यांनाच आवडतं. पण सकाळी तुझ्याकडे बघून वाटणारा उत्साह संध्याकाळी मात्र मन उदास करतो. कातरवेळी मन जुन्या आठवणींनी भरून येते. मधल्या वेळेत तुझं रूप कर्तव्य प्रखर, सन्मार्गाचा मार्ग दाखवणारं. पण दुपारी तेजाच्या उग्र रुपापुढे मात्र कोणी डोळ्याला डोळा भिडवू शकत नाही तुझ्या. तुझा प्रकाश इतका निर्मळ, पावन, पारदर्शी, आम्ही सत्याला ही तुझ्या प्रकाशाची उपमा देतो.
विधात्याने सृष्टी निर्माण केली तेव्हाच ह्या नभामध्ये तुझं आणि चंद्राचे सुबक झुंबर छताला लावले. ज्यायोगे तुझ्यामुळे दिवसा प्रकाशमान झालेले जग रात्री शांतपणे चंद्राच्या निळ्या प्रकाशात विश्रांती घेऊ शकेल.
चंद्र, सूर्याना केवळ ग्रह न मानता मानवाने त्यांना देवत्व ही बहाल केलेआहे. "आदित्य" हिंदू धर्माची मुख्य देवता. जणू ब्रह्माचे चैतन्यरुपी मूर्त स्वरूप. नवग्रहांपैकी हा स्वयंप्रकाशी ग्रह आपल्याला आकाशांत सहज बघता येतो. ज्यांना ईश्वराच्या अस्तित्वाविषयी शंका आहे त्यांना हे परमेश्वराचे सगुण रूप प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येते. सूर्यालाही जगाचा डोळा म्हटले आहे. " नमः सवित्रे जगदेकचक्षुषे ". एवढेच नाही तर जगाची उत्पत्ती, स्थिती, लय करणारा, ब्रह्म, विष्णू, महेश रूपांत असणारा हा सूर्यच आहे.
सौर सूक्त, सूर्यमंडल स्तोत्रांत
तुझ्या ह्या दीप्तिमान, सतेज रूपाची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
ह्या विशाल, तेजस्वी प्रभामंडल असणाऱ्या रत्नमंडित रूपाची पूजा आम्ही करतो. तुझं श्रेष्ठ तेज प्राप्त व्हावे अशी इच्छा करतो. देव, ब्राह्मण, संतमहात्मे तुझ्या पूजनात दंग असतात. तू ज्ञानाने परिपूर्ण आहेस, अनादी आहेस आणि अगम्य आहेस हे ज्ञानी जाणतात. भू, भुवः आणि स्व: ह्या तिन्ही लोकांमध्ये तुझी पूजा केली जाते. तुझ्या तेजामुळे हे तिन्ही लोक प्रकाशित होतात.
हे सूर्या तुझ्या उपासनेमुळे ज्ञान
प्राप्त होते. पापांचा, व्याधींचा
नाश होतो. शरीरसंपदा आणि ऐहिक वैभव प्राप्त होते. सूर्य नमस्कार ही प्राचीन भारतीय
परंपरा आजही टिकून आहे. अकाल मृत्यू हरणं, सर्वव्याधी विनाशनं, अशी ह्या सूर्यनमस्काराची महती सांगितली आहे.
तुझी १२ नांवे ही अर्थपूर्ण आहेत.ही विष्णुंचीच विविध रूपे आहेत. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने विभूती योगांत, मी स्वतः ज्योतींमध्ये किरणांनी युक्त सूर्य आहे, असे सांगितले आहे."आदित्यनामहं विष्णुरज्योतिषां रविरंशुमान" सर्व प्रकाशमान वस्तूत भगवंताचे हे रूप सर्वश्रेष्ठ आहे. .
अशा तेजस्वी रूपाची उपासना सकाळच्या वेळी केली तर पूर्ण दिवस आनंदात, उत्साहात पार पडतो. काम करण्यासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. नकारात्मक विचार नाहीसे होतात. आणि अर्थातच व्यक्तीचे जीवनमान सुधारते, त्याला मान सन्मान, यश प्राप्त होते. म्हणूनच तुला मित्र हे नाव असावे.
सूर्यवंशात जन्माला आलेल्या श्री रामांचे चरित्र तुझ्यासारखे तेजस्वी आहे.
समर्थ रामदास स्वामींनी सूर्य उपासना, गायत्री पुरश्चरण अविरत बारा वर्षे
केले. त्या अनुष्ठानामुळे
झालेले त्यांचे तेज:पुंज, शक्तिशाली रूप मनावर प्रभाव टाकते. जनसामान्यांचा उद्धार करणारे त्यांचे कार्य डोळे दीपवून टाकते.
शंकराचार्य म्हणतात: आत्मस्वरूप तेजाचे स्मरण केल्यामुळे अज्ञानरूपी अंधार नाहीसा होऊन, ज्ञानरूपी सूर्यप्रकाशामुळे स्वस्वरूपाचे ज्ञान होईल आणि बुद्धी आनंदी राहील सूर्याला उदय-अस्त आहे, त्यालाही ग्रहण लागते. पण ज्ञानसूर्याला उदय अस्त नाही. उपासनेमुळे आत्मज्ञान होणे हीच खरी पहाट.
सद्गुरूंचे प्रखर रूपही सूर्याप्रमाणेच असते. ज्ञानाचे अंजन शिष्याच्या डोळ्यांत घालून सद्गुरू अज्ञानाचा नाश करतात. सद्गुरूंना सूर्याची यथार्थ उपमा दिली आहे.
सूर्याची उगवती दिशा, पूर्व दिशेला आपल्याकडे अनन्य साधारण महत्व आहे. जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवी मावळत्या,ही जगाची रीत आहे. हे जाणून व्यवहार केले तर दुःख पदरात पडत नाही.
सूर्यप्रकाशाचे वरदान लाभल्यामुळे आपले
जीवन आनंदी झाले आहे. आज विज्ञानाच्या प्रगतीमुळे सौर ऊर्जेचा (Solar Energy) वापर
दैनंदिन जीवनांत मोठ्या प्रमाणांवर केला जाऊ लागला आहे.
पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्या पंचमहाभूतांपैकी पृथ्वीवर मिळणाऱ्या तेजाचा आणि प्रकाशाचा मुख्य स्रोत "सूर्य" म्हणजे तूच. अग्नितत्वामुळे आपले जीवन विकसित होते, वनस्पती, प्राणिमात्र ह्या सर्वांनाच ही ऊर्जा आवश्यक असते. सर्व चराचराचा हा अन्नदाता. सृष्टीचे जीवनचक्र सूर्यामुळेच अखंड चालू राहते.
रविवार हा तुझा वार. नवीन सप्ताहासाठी लागणारी ऊर्जा सूर्य उपासना करून मिळवावी म्हणूनच रविवारच्या सुट्टीचे प्रयोजन असावे. प्रत्यक्षांत मात्र हा दिवस आळसात, उशिरा उठूनच वाया जातो.
अंधःकार रुपी दुःखाचा विनाश होऊन प्रकाश रुपी सुखाचा मार्ग प्रत्येकालाच हवा असतो म्हणूनच तुझी प्रार्थना …….
असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय
।।
स्नेहा हेमंत भाटवडेकर
विलेपार्ले ( पूर्व ) , मुंबई
sneha8562@gmail.com
विनोबा नी,म्हणूनच अकर्म हे सूर्याचे उत्तम आणि उदात्त उदाहरण सांगितलं आहे,निरपेक्ष,नियमित जगाला प्रकाश ऊर्जा देणे,तो आला की अंधःकार जाणारच,त्याला तमा ही नाही त्याची!
ReplyDeleteविनोबा नी,म्हणूनच अकर्म हे सूर्याचे उत्तम आणि उदात्त उदाहरण सांगितलं आहे,निरपेक्ष,नियमित जगाला प्रकाश ऊर्जा देणे,तो आला की अंधःकार जाणारच,त्याला तमा ही नाही त्याची!
ReplyDeleteYes , very true...
ReplyDeleteKishori khup sunder oghavti bhasha ani tu kelelya afat vachanachi janiv hote lihit raha
ReplyDeleteKishori commendable Job!! You have written it very beautifully ❤
ReplyDeleteकिशोरी, खूपच छान ! फार सुंदर लिहितेस तू !
ReplyDeleteअसंच कसदार लेखन तुझ्या हातून लिहिले जावो.
वा.!खूपच छान.
ReplyDeleteThanks Dhananjay & all ,for your encouraging words.
ReplyDeleteसुनंदा महाजन
ReplyDeleteसूर्याची नवीन रूपे स्मरली,, स्व स्वरूप,आणि सद्गुरू,ते ही नवीन प्रकाश च दाखवतात
सुरेख आशय पूर्ण विवेचन.
ReplyDeleteजीते रहो , लिखते रहो👍
फारच अप्रतिम व सुंदर लेखन
ReplyDelete