Wednesday, October 14, 2020

नाते विश्वबंधुत्वाचे ( Vishvabandhutva )

                                                 || श्री शंकर ||

                           नाते विश्वबंधुत्वाचे  


११ सप्टेंबर १८९३ हा दिवस जगाच्या इतिहासातील एक संस्मरणीय दिवस. शिकागो येथील धर्मसभेत भिन्न भिन्न धर्माचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी एका विराट सभेच्या निमित्ताने एकत्र जमले होते. ह्या सभेत स्वामी विवेकानंदानी श्रोत्यांना संबोधित करताना " माझ्या बंधुनो आणि भगिनींनो "असे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधीच्या हृदयाचा ठाव घेणारे ते शब्द होते ....ह्या शब्दांची मोहिनी आज १२७ वर्षांनंतरही जनमानसावर कायम आहे. स्वामींचे नाव विश्वबंधुत्वाशी जोडले गेले ते कायमचेच. त्या शब्दांचे एवढे सामर्थ्य कशात होते ?.  

स्वामींच्या शब्दात निष्कपट प्रेम होते. करुणा होती. प्रेमभावनेची आकांक्षा असलेल्या जनतेला त्यांच्या विचारांनी प्रेरित केले. हिंदू धर्माचा प्रभाव सर्वावर पडला. आपले भारतीय  तत्वज्ञान थोर आहे आणि विवेकानंदानी त्याचा प्रचार केल्यामुळे त्याचे महत्व विशेष प्रस्थापित झाले.

स्वामी रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे अध्यात्मिक गुरु. विश्वप्रेमाची मूळ संकल्पना हि रामकृष्णांची. त्यांचीच विचारपताका विवेकानंदानी सातासमुद्रापार फडकवली. भारतभ्रमण करताना स्वामीजींना आपल्या देशबांधवांचे दैन्य, दारिद्र्य बघितले. त्यांचे संवदेनशील मन ह्यामुळे व्यथित झाले. रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी ह्या बांधवांसाठी सेवाकार्याची सुरवात केली. आणि विश्वबंधुत्वाचा पाया रचला. आपले तत्वज्ञान केवळ पोथ्यापुराणात न ठेवता स्वतः आचरण करून ते राष्ट्रवादाशी जोडले.

योगीजनांना समदर्शीं  तत्वामुळे सगळीकडे एकाच तत्वाची अनुभूती येते. सगळ्याप्रती सारखा भाव त्यांच्या अंतःकरणात असतो. संतांच्या आचरणातून हा प्रत्यय आपल्याला येतो. समाजाच्या उद्धाराची तळमळ त्यांना असते. त्यांचे हृदय वात्सल्याने काठोकाठ भरलेले असते. तळागाळातील लोकांबरोबर बंधुत्वाच्या नात्याने ते जोडले जातात. त्यांचे कल्याण व्हावे ह्या एकाच हेतूने ते कार्यरत असतात. विवेकानंदांच्या चरित्रातील अनेक प्रसंग ह्या दृष्टीने उद्बोधक आहेत. आपल्याला प्रेरणा देणारे आहेत.


श्रीमद्भगवद्गीतेत बंधुत्वाची व्याख्या केली आहे. बंधू म्हणजे भाऊ एवढा मर्यादित अर्थ नसून आप्त, नातेवाईक ह्या सर्वाशी ज्या बंधनाने आपण जोडले जातो ते म्हणजे बंधुत्व. त्या नात्यात प्रेम, आपुलकी, जबाबदारी, कर्तव्य, सर्व काही आले. आप्तस्वकीयांची देखभाल आपली जबाबदारी ह्या नात्याने आपण प्रेमाने करतच असतो,.आजकाल स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीप्रती स्नेह, आदर, सेवाभाव ह्या गोष्टीही दुर्मिळ होत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वतःच्या परिवाराबाहेर जाऊन बंधुभाव जोपासणे हि तर फारच अवघड गोष्ट आहे.  

बंधुत्वाचा  विस्तार जेव्हा कुटुंबाच्या पलीकडे होतो तेव्हा त्याचे स्वरूप आणखीन व्यापक होते. समाजाभिमुख होते. आजही काही व्यक्ती प्रेमभावनेने बंधुत्वाची जोपासना समाजासाठी करीत आहेत. ह्यासाठी विश्वबंधुत्वाचा अर्थ तुमच्या आचरणात पूर्णतः झिरपलेला असावा लागतो.

गीतेच्या सहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी ह्या व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. भगवान म्हणतात शत्रू, मित्र, पुण्यवान, पापी ह्या सर्वाशी हा माणूस समबुद्धीने वागतो. त्यांच्यात भेद करत नाही. अनासक्त, निष्काम, निर्लोभी आणि निस्वार्थी मनुष्यच समाजासाठी आपले कर्तव्यकर्म चोख रीतीने पार  पाडत असतो.

सर्वसामान्य माणसाला अंतःकरणातील राग द्वेष, आसक्ती, चीड, संताप ह्यामुळे सगळ्यांशी सारखेपणाने वागणे जमत नाही. आपली बुद्धी स्वार्थप्रवण  असते. हे बंधुत्वाचे नाते जपणे आपल्यासारख्याना अवघड वाटते.

याला काही अपवाद असतातच. काही व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गरजूना मदत करीत असतात. अगदी छोट्या छोट्या कृतीतूनही हा भाव जोपासता येतो. दुसऱ्यांचे दुःख हलके करता येते. काही सामाजिक संघटना तर विविध आपत्तीच्या काळांत अशी जबाबदारी स्वीकारून समाजोपयोगी कामे तन -मन -धन वेचून निस्वार्थीपणे करतच असतात. महामारीच्या ह्या आपत्तीत संघाच्या कार्यकर्त्यांनी जे अमूल्य योगदान केले आहे त्याला तोड नाही.

समाजातील अशाच हीन- दीन, पतित लोकांसाठी कळवळणारे अतिशय कोमल हृदय असणारे साने गुरुजी आपल्या काव्यात म्हणतात ' समस्ता बंधू मानावे । जगाला प्रेम अर्पावे ।। " त्यांचे हे शब्द आपल्या मनाचा ठाव घेतात .

" आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः " आपणच आपले बंधू ( आप्त / मित्र ) असतो किंवा शत्रू असतो. स्वतःच्या आत्म्याशी बंधुत्व भाव जोडून आपणच आपला उद्धार केला पाहिजे. समाजाशी नाते जोडताना आपल्या हृदयस्थित परमेश्वराला विसरून कसे चालेल ? वरवर सोपे वाटले तरी आचरण्यास अतिशय कठीण असे हे तत्वज्ञान आहे.

बंधुत्वाची भावना जोपासली गेली तर जीवनातील अनेक ताणतणाव कमी होतील. स्त्रियांकडे बघायची दृष्टी बदलली तर त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील. दहशतवादासारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत.

ईश्वराला आपण " लोकबंधु " म्हणतो. सर्वांचा आधार ,हितकर्ता तो लोकबंधु. जगाच्या कल्याणासाठी त्या विश्वात्मक ईश्वराची प्रार्थना करूया.

बंधुत्वाची प्रेरणा देणाऱ्या सर्व शक्तींना अभिवादन करतानाच हे नाते जपण्याचा मनोमन निश्चय करूया.


स्नेहा भाटवडेकर

sneha8562@gmail.com



Wednesday, September 9, 2020

जीवन साधना ( Jeevan Sadhana )

                                                                ।।श्री शंकर ।।

                                                                 जीवन साधना 

 छोटा - मोठा ,जवळचा -लांबचा किंवा देश- परदेशातला, प्रवासाला निघताना आपल्याला तयारी करावीच लागते. जिथे जायचे त्या ठिकाणाची  पूर्ण माहिती करून घ्यावी लागते. 

नेहेमी लागणाऱ्या सर्व वस्तुंबरोबरच,औषधें, जिथे जायचे त्यानुसार काही विशिष्ट गोष्टी हि घ्याव्या लागतात. तिकीट, परवाना ( Passport , Visa ),वेळेचे नियोजन ... सर्व आखणी व्यवस्थित झाली कि प्रवासाचा आनंद मिळतो. ज्या मुक्कामी जाणार ते वास्तव्य हि छान होते आणि आनंदात भर पडते. 

एकदा गंमत झाली. मी प्रवासांत कंगवाच घ्यायला विसरले. तशी साधीशीच गोष्ट. प्रवासांत मला कुठेही कंगवा मिळाला नाही. जिथे गेले तेही अगदी खेडेगाव. त्यामुळे "ना धड वेणी, ना धड फणी", अशा अवस्थेतच दिवस काढावा लागला. सांगितलं एवढ्याचसाठी कि अगदी छोट्याशा गोष्टीने सुद्धा किती अडचण होते ह्याचा अनुभव आला.  पुढच्या वाटचालीच्या  दृष्टीने हे असे प्रसंग खूप  काही शिकवून जातात. 

आपला जीवन प्रवास अगदी असाच असतो. छोटा प्रवास करताना आपण सगळी काळजी घेतो , मग हा तर दीर्घ प्रवास. किती काळजीपूर्वक हे सर्व नियोजन व्हायला हवं, की नाही ?आणि कुठे पोचायचे हे ध्येय ठरवावे लागते.  प्रत्यक्षात मात्र तसे घडत नाही. कठीण प्रसंग आल्यावर अगदी ऐनवेळी धावपळ होते. कोणतेही कर्म करायचे तर त्यासाठी योग्यता, पात्रता असावी लागते. असलेली योग्यता वेळोवेळी मिळवावी लागते, त्यात वाढ करावी लागते. प्रत्यक्ष जीवन व्यवहार करताना जर काही तत्वांचे पालन केले, जीवनशैलीचा योग्य अंगिकार केला, तर पश्चाताप करायची वेळ फार कमी येते. हे सर्व  जीवनसूत्र ,भगवद्गीतेत सापडते. अभ्यासाने ते उलगडत जाते. 

श्रीमदभगवद्गीता हा भारतीय तत्वज्ञानातील एक अद्वितीय ग्रंथ. त्यामधील भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला केलेला उपदेश अलौकिक आहे. 

योगेश्वर श्रीकृष्णांनी अर्जुनाला रणभूमीवर हा उपदेश केला आहे. मोह्ग्रस्त होऊन अर्जुन स्वतःचे कर्तव्य विसरला. किंकर्तव्यमूढ अर्जुनाला श्रीकृष्णांनी त्याच्या कर्तव्याची जाणीव करून दिली." करिष्ये वचनं तव " म्हणून  अर्जुन पुन्हा सामर्थ्याने युद्धभूमीवर उभा ठाकला. विजयश्री त्याच्या बाजूने खेचून आणली. धर्माचे राज्य प्रस्थापित केले. आणि अधर्माचा नाश केला. 

अर्जुनाला रणभूमीवर युद्ध करायचे होते. आपल्याला मात्र दैनंदिन जीवनात अनेक युद्धप्रसंगांना सामोरे जावे लागते. तुकाराम महाराज म्हणतात," रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग " घरांत किंवा समाजात वावरताना मनामध्ये  द्वंद्व चाललेले असते.हे करू का ते करू, योग्य काय अयोग्य काय, ह्याचा निर्णय पटकन घेता येत नाही.  ह्या सर्व प्रसंगात गीतेतील तत्वज्ञान आपल्याला मदत करते, मार्ग दाखवते. जीवनातील ध्येय गाठायला मदत करते. आपल्यासारख्या संसारी लोकांना अचूक मार्गदर्शन गीतेत मिळते. ह्या तत्वज्ञानाचे आचरण केले कि जीवन उन्नत होते. 

त्यासाठी अर्थातच गीतेचा परिचय करून घेणे आवश्यक आहे. ज्याला संसारात सुखस्वास्थ्य हवे आहे, उत्साहाने आयुष्य जगायचे आहे तर मग गीता हवीच. आणि हि ओळख सुद्धा शक्य तितक्या लवकर तरुण वयातच व्हायला हवी. चांगले संस्कार जितक्या लहान वयांत होतील, तेवढे ते लाभदायक ठरतात. त्या वयात ते महत्व कळत नाही, पण नंतर मात्र, अरे हे आपल्याला आधीच कळलं असतं तर, अशी रुखरुख वाटत राहते. 

देह आहे तोपर्यंत कर्म करावेच लागते. कोणीही ह्यातून सुटलेले नाही. ते कर्म नित्य नैमित्तिक असते, विहित असते किंवा प्रासंगिक असते. आपले रोजचे जीवन व्यवहार सोडून काही कर्तव्यकर्म संसार म्हटलं कि आलीच. सणवार , कुळाचार, कुळधर्म हि काही विशेष कर्म, हे सर्व करावं लागतं. हे  करताना जेव्हढी शास्त्रसंमत कर्म करता येतील तेव्हढी  केली तर ते कर्म यथासांग पार पडते. स्वामी चिन्मयानंद म्हणतात " Living the right values of Life is like building a dam across a  river". आचार विचार, नीतिमूल्य ह्यांचं योग्य पालन करावं लागतं. तरच कर्म यथासांग घडतं आणि त्याचे फळंही गोड असतं. 

अर्थात गीतेने फक्त तुमचं कर्म योग्य करा, हेच सांगितलंय ." दैवं चैवात्र पंचमम "तुम्हाला मिळणारे फळ हे तुमच्या दैवावर किंवा प्रारब्धावर अवलंबून असतं. फळाची आसक्ती न ठेवता कर्म करा असा उपदेश भगवंतांनी केला आहे. कर्म करण्यापूर्वी त्या कर्माची योग्य जाणीव निर्माण होणं आणि त्यानुसार आपल्याकडे उपलब्ध साधने कोणती आहेत, आपण कोणत्या दिशेने, कसे प्रयत्न करावेत, ह्या सर्वांचा विचार करावा. 

अगदी आपल्या घरातलं रोजचं उदाहरण घेतलं तरी हे स्पष्ट होईल. स्वयंपाक करताना आपण वेळ, हेतू, उपलब्ध साधनं, त्यासाठी करावे लागणारे प्रयत्न ह्या सगळ्याचा विचार करतो. अर्थात वर्षानुवर्षे केल्यामुळे हे सगळं अंगवळणी पडलेलं असतं, त्यामुळे त्याची जाणीव होत नाही इतकंच. हे सर्व नियोजन  करून केलेला पदार्थ सगळ्यांच्या पसंतीला पडेल का नाही हे पूर्णतः दैवाधीन असतं. सर्व घटकांचा  उत्तम समतोल साधला गेला कि पदार्थ चांगला बनतोच. त्यातही स्वकर्म काय हे समजून आपण स्वतः ते काम केलं तर सोने पे सुहागा. ज्ञानेश्वर माउलींनी स्वकर्माने केलेली पूजा ईश्वराला फार प्रिय आहे असं सांगितलंच आहे.  स्वकर्म हीच खरी पूजा, वेगळी पूजा करण्याचीही आवश्यकता नाही. 

हे स्वकर्म कसे  : " योगः कर्मसु कौशलम ", कोणतेही कर्म मनापासून, पूर्ण एकाग्र होऊन, निष्ठेने करावे. जमेल तेव्हढ्या कौशल्याचा वापर करावा. म्हणजे ते कर्म उत्तम होते आणि ईश्वरार्पण होते. हि सुद्धा एक साधनाच आहे. 

आपल्या बुद्धीचा प्रभाव कर्मावर होत असतो. आधी केलेल्या कर्मानुसार बुद्धी आचरण करते आणि शुद्ध बुद्धीने चांगले कर्म घडते असे चक्र चालू असते. जन्मजात सत्व, रज आणि तमाचा प्रभाव आपल्यावर असतो. त्यानुसार आपले कर्म घडते. कर्म करताना वाईटाकडून, चांगल्याकडे आणि चांगल्याकडून अधिक चांगल्याकडे होणारा प्रवास म्हणजे" साधना " बुद्धी सुसंस्कारीत  झाली कि योग्य वाटचाल होते. म्हणजेच तमोगुणांचा, रजोगुणांचा  प्रभाव कमी होऊन सत्वगुण वाढीला लागतो. बुद्धी सुसंस्कारीत होण्यासाठी चांगल्या ग्रंथांचे वाचन, मनन, चिंतन, सत्पुरुषांचा सहवास, नामजप इ. साधनांचा वापर उपयुक्त ठरतो. सज्जन व्यक्तींचा आदर्श संसार हाच पुढे परमार्थात परिणत होतो. अशा घरातच वेदांत खरा उमगतो. परमार्थ करायचा म्हणजे संसाराचा त्याग करायचा असं अजिबातच नाही बरं ! तर तो नेटका करायचा. 

उपासनेमुळे बुद्धी हळूहळू स्थिरावत जाते. रागद्वेष, हवे नको, मानापमान, अहंकार हे सर्व लयाला जाण्यास सुरवात होते. अंतःकरणाची प्रसन्नता लाभते. साधनामार्गावरील हा टप्पा गाठला कि आलेल्या निवांतपणामुळे कृतकृत्यता येते. 

श्रीकृष्णांनी अर्जुनाला उपदेश केला आहे : सर्वभावाने ईश्वराला शरण गेले कि ईश्वरी प्रसादाचा लाभ होतो आणि आत्यंतिक शांतता मिळून शाश्वत पद प्राप्त होते. 

आपले जीवन हि एक साधना बनून हि अवस्था प्राप्त व्हावी हि श्रीचरणीं प्रार्थना ... 


संदर्भ : जीवन साधना . ( गीता १८ वा अध्याय )

विवेचन : सद्गुरू स्वामी वरदानंद भारती  ( अनन्त दामोदर आठवले )

Friday, August 21, 2020

गणपती : एक स्मरणरंजन ( Down The Memory Lane : Celebration of Ganesh Festival )

                                                            ।।  श्री शंकर ।।

                                              गणपती : एक स्मरणरंजन 

माणूस मुळातच उत्सवप्रिय. सध्याच्या धावपळीच्या आयुष्यातही आपल्या सणासमारंभासाठी आवर्जून वेळ काढून, आनंदाने सण  साजरा करायला तो उत्सुक असतो . घरांत त्या निमित्ताने होणारी तयारी असो, कि गणपती निमित्ताने कोणाकडे जाणे असो, एक वेगळाच उत्साह त्याच्या ठिकाणी अवतरतो . 

ह्या वर्षी सगळ्या परिस्थितीत  आमूलाग्र बदल झालाय. नेहेमीचा उत्साह मावळलाय.माहेरी जायची तयारी नाही.  कि कोणाकडे जाणे येणे नाही 

हा बदल स्वीकारणं अपरिहार्य आहे ,पण प्रत्यक्षांत मात्र मन व्याकुळ झालंय ...गेल्या अनेक वर्षांच्या आठवणी फेर धरून नाचतायतं ...  

 ह्या एकाकी दिवसांत  स्मरणरंजनातूनच ही बीते हूए यादोंकी बारात ... 

माझ्या माहेरी आधी  गणपती बसवला जात नसे. गावीच काकांकडे गणपती असायचा, पण गाव लांब ,आणि शाळा चुकवून जाणे कधीच झाले नाही. इतर मैत्रिणींकडे गणपती असायचा आणि आपल्याकडे नाही ह्या विचाराने त्यावेळी  वाईट वाटायचे. गणपती बाप्पाने माझा रुसवा दूर करायचे बहुधा ठरवले असावे. गावाचे काका आजारी झाले आणि त्यांना सगळी जबाबदारी पेलणे  शक्य नसल्यामुळे, सर्व सण माझ्या बाबांनी स्वतः जबाबदारी घेऊन साजरे करायचे ठरविले. त्यांचा सळसळता उत्साह अजूनही आठवतो. केवढी हौस त्यांना सगळ्याची.  कुटुंबावर असलेल्या प्रेमापोटी सगळ्यांना ह्या गणपतीउत्सवाची आमंत्रणे जात, त्यांत प्रेमाची धमकीच असायची. एवढे मोठे आमचे कुटुंब. पण बाबांच्या आग्रहाने दिलेल्या आमंत्रणाला  मान देऊन अगदी लांबून लांबून  नातेवाईक ह्या कार्यक्रमाला हजेरी लावत. ह्या निमित्ताने शनिवार-रविवार असे जोडून एक स्नेह संमेलन असे. जवळ जवळ ७०-७५ नातेवाईक एकत्र जमत. सगळ्यांची राहायची, जेवणा- खाण्याची , अगदी चोख व्यवस्था.आलेल्या पाहुण्यांचा सर्व कार्यक्रमांत सहभाग असे. एक काका आर्टिस्ट, ते सुंदर मखर बनवीत तर दुसरे काका नेत्रदीपक रोषणाई करत.  तबल्याच्या साथीबरोबर होणारी आरती तासभर देहभान हरपून चढ्या आवाजात  गायली जात असे. 

त्यातही काही विशेष कार्यक्रमांचे आयोजन. सगळ्या बालगोपाल, तरुण मंडळींचा परफॉर्मन्स must.अनेक जणांनी इथे आपली कला सादर करून ,पुढील आयुष्यात ह्याचा खूप फायदा झाल्याचे नेहमीच नमूद केले.  वर्षभरात  विशेष कौतुकास्पद कामगिरी केली असेल तर त्यांचा घरातील सर्वात वयोवृद्ध आजीच्या हस्ते सत्कार . 

धार्मिक प्रथेप्रमाणे पूजा अर्चा, सहस्रावर्तने, मंत्रपुष्प हे सगळं यथोचित व्हायलाच हवे. कुठेही  शॉर्टकट नाही. पाहुण्यांच्या आदरातिथ्यात कोणतीही उणीव नाही. प्रेम, आपुलकी, आग्रह अगदी ओथंबलेला आणि सर्वांवर त्याचा सारखाच वर्षाव. मायेचा ओलावा जपताना व्यवहार कधीच आड आल्याचं,किंवा मतभेद झाल्याचे , मला इतक्या वर्षांत जाणवलं नाही. 

आईवर केव्हढी मोट्ठी जबाबदारी असायची ते त्या वयात नाही कळले.  नंतर मी संसारात पडल्यावर तिच्या शांत राहून स्वयंपाक घरांतील  सर्व कामे  नेटाने पार पाडण्याच्या हिंमतीचे कौतुक वाटले. 


ह्या उत्सवाच्या निमित्ताने इतके मोठं कुटुंब एकदिलाने एकत्र यायचं. चाळीस वर्षांनंतरही ही गणेशोत्सवाची  आठवण नेहमीच चर्चेचे  मुख्य आकर्षण असते. कुटुंबातील सर्व  व्यक्तींच्या हा उत्सव म्हणजे मर्मबंधातील ठेव आहे.

खरंतर हा आमचा कौटुंबिक गणपती, पण त्याचं स्वरूप मात्र भव्य -दिव्य, एखाद्या सार्वजनिक गणपती सारखं . नातेवाईकांशिवाय इतर अनेक स्नेहीजन आमच्या गणपतीला आवर्जून भेट देत असत.  

कार्यक्रमांची सर्व तयारी करताना  बाबांच्या तालमीत मीही अगदी तयार झाले.  हा कार्यक्रम म्हणजे इव्हेंट मॅनॅजमेण्ट चा ( त्या वेळी असे शब्द सुद्धा माहित नव्हते ) अगदी योग्य वस्तुपाठ होता. आमंत्रणे, खरेदी, सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी, आलेल्या नातेवाईक मंडळींशी संवाद कसा साधायचा , किती म्हणून सांगावे ? अगदी आजही ह्या सर्व गोष्टींचा व्यवहारांत खूप फायदा होतोय.आयुष्यभराची हि शिदोरीच ... 

सलग २५ वर्षे हा उत्सव अशाच पद्धतीने साजरा झाला. बाबांनी निवृत्तीनंतर कोकणांत वास्तव्य करायचे ठरवले आणि  ह्या उत्सवाचे स्वरूप बदलले. 

माझ्या मुलींनी हा उत्सव बघायला हवा होता असे मला नेहमी वाटते, त्यांच्यासाठी ह्या आठवणीच आहेत. वर्षभरात काहीतरी चांगलं काम करून कुटुंबीयांची प्रोत्साहनपर थाप पाठीवर पडावी असं खरं तर नेहेमीच वाटे पण मला तशी संधी मिळाली नाही, निदान मुलींचे कौतुक व्हावे असे वाटत असे पण तीही सुप्त इच्छा  मनातच विरून गेली. 

 आता गणपतीसाठी गावी जायला सुरवात झाली . ह्या  दिवसांत सगळीकडे गर्दी, प्रवास कठीण. तरीसुद्धा गणपती आणि माहेरच्या ओढीने जाणे व्हायचे. प्रवासाचा सगळा शीण घरी गेलं की  निघून जायचा आणि उत्साहाने बाप्पाचं स्वागत करायचं. गावच्या वातावरणाचा वेगळा उत्साह मनावर स्वार व्हायचा.आनंद मनांत काठोकाठ भरलेला असायचा . 

ह्या वर्षी ह्या आनंदाला आपण मुकणार म्हणून मन भरून आलं . इतक्या वर्षाचा मनावर  झालेल्या संस्कारांचा विसर पडणे कठीणच. 

 आणि मग मनानेच मला समजावलं ... अगं तो गणपती सुख देणारा ,तुझ्या दुःखाचं हरण तोच करणार ... त्याच्या पूजेअर्चेत मन रमले कि तो आनंद देणारच आहे.

सर्वं जगदिदंत्वत्तोजायते,सर्वं जगदिदंत्वयिप्रत्येति , त्वं भूमिरापोनलोनिलोनभः , अथर्वशीर्षांत गणपतीचं गुणवर्णन करताना म्हटलंच आहे, सर्व जगात तो व्याप्त आहे, मनातली भक्ती आपण कुठेही असलो तरी त्याच्यापर्यंत  पोचतेच. त्याचा प्रत्यय येतोच  .. मन एकदम शांत शांत झाले ..     

त्याचं स्वागत इथे घरीच उत्साहाने करायचे असा मनाशी शुभ संकल्प करून मी जोरदार  तयारीला लागले. मन आनंदाने त्याची आळवणी करू लागलं ,सर्वत्र  नाद निनादू लागला ....

मंगलमूर्ती  मोरया ,गणपती बाप्पा मोरया ...  


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com

sneha bhatawadekar sneha8562@gmail.com

10:19 PM (2 minutes ago)



Tuesday, August 18, 2020

mainkar kaka - ek athwan (माईणकर काका - एक आठवण )


 | | श्री शंकर | |


आजचा ब्लॉग जरा वेगळा आहे. आजचे लिखाण आहे आईसाठी तिच्या मुलीकडून आणि निमित्त आहे मातृदिनाचे. 

हल्ली आपल्यावर असलेला पाश्चत्य संस्कृतीचा पगडा बघता mothers day मोठ्या उत्साहात साजरा केला जातो मात्र भारतीय परंपरेत महत्त्व आहे ते श्रावण अमावास्येला साजऱ्या होणाऱ्या मातृदिनाचे. 

आई असते जन्माची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही...

आईने मला काय दिले हे शब्दात सांगता येणार नाही कारण माझ्या अस्तित्वाचा  प्रत्येक पैलू तिने घडवलेला आहे, अगदी काळजीपूर्वक आकार दिला आहे... लहानपणापासूनच कळतनकळत तिच्या प्रत्येक कृतीचे अनुकरण मी करत गेले, शिकत गेले, प्रेरणा घेत गेले..  

सध्याच्या lockdown मध्ये आईने तिची लिखाणाची आवड जोपासली आणि विविध विषयांवर लेखन चालू केले. तिच्याकडून आलेल्या प्रेरणेने मीही माझ्या भावना शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला आहे ...

हे लेखन आई वर नाही किंवा लेखनाचा विषय आई हा नाही.. तर हा मनावर प्रभाव पडलेल्या एका व्यक्तिमत्त्वाचा घेतलेला वेध आहे...

 

१४ ऑगस्ट ची सकाळ... सकाळीच एक बातमी कानावर आली. तबला क्षेत्रातील विचारवंत पंडित सुधीर माईणकर यांचे निधन झाले. बातमी कळली आणि मनात विचारांचे काहूर माजले.

माईणकर काकांशी माझी ओळख अगदी अलीकडची, गेल्या वर्ष दीड वर्षातली. माझे लग्न ठरले आणि माझा होणारा नवरा चिन्मय व माईणकर काकांचा चांगला परिचय होता. काही वर्षांपूर्वी काकांच्या लिखाणाच्या कामात त्यांना मदत करण्याच्या निमित्ताने चिन्मयचे काकांकडे जाणे झाले व गुरु शिष्याचे नाते कधी तयार झाले कळलेच नाही. चिन्मयच्या मनात होते की आपल्या होणाऱ्या बायकोची काकांशी भेट घडवावी आणि पुढील प्रवासासाठी त्यांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून आम्ही चारकोपला त्यांच्या राहत्या घरी गेलो. एवढ्या मोठ्या गुरूंकडे भेटायला जायचे मनावर खूप  दडपण होते मात्र काकांशी भेट झाली आणि मनातली भीती अगदी पळून गेली. इतकं प्रेमळ व्यक्तिमत्त्व. त्यांनी माझी इतकी आपुलकीने चौकशी केली, कथक नृत्यसंबंधी त्यांचे किस्से ऐकवलेच शिवाय संसारोपयोगी काही कानमंत्र देखील दिले. विचारांची शिदोरी घेऊनच आम्ही दोघं घरी परतलो.

पुढे तब्येत बरी नसतानाही काका आमच्या लग्नाला आले व आम्हाला शुभाशीर्वाद दिले.

एका प्रोजेक्ट संदर्भात काकांचे 'तबला वादन में निहित सौंदर्य' हे पुस्तक वाचनात आले व त्यावेळेस काकांच्या पांडित्याची खरी ओळख पटली. भाषा व तबला यांचा सखोल अभ्यास करून त्यावरील त्यांचे चिंतन थक्क करणारे होते. त्यानंतर कला विहार मासिकातील काकांचे इतर लेखही वाचले.

काकांची सगळ्यात स्मरणात राहील ती आठवण म्हणजे लोणावळा खंडाळा महोत्सवाची. सप्टेंबर मध्ये लोणावळा खंडाळा महोत्सवात माझा एकल नृत्याचा कार्यक्रम होता. ग्रीन रूम मध्ये घुंगरू बांधताना announcement कानावर पडली कि पंडित सुधीर माईणकर कार्यक्रमाला हजार आहेत. माझ्यासाठी हा सुखद धक्का होता. काकांसमोर माझी कला प्रस्तुत करायला मिळणार होती. कार्यक्रम छान झाला. कार्यक्रमानंतर नेमकी काकांची भेट घेता आली नाही. आपण त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलावे का असे सारखे मनात येत होते आणि दोन दिवसांनी काकांनी स्वतःहून मला फोन केला व माझ्या कार्यक्रमाचे कौतुक केले. खासकरून चक्रीच्या बोलांची तारीफ केली. इतक्या बारकाईने त्यांनी माझा कार्यक्रम पाहिला व त्यावर अभिप्राय दिला हे माझे मोठे भाग्य.

आज त्यांचे वयोमान आणि आजारपण यामुळे शरीराने ते आपल्यासोबत नाहीत. कितीही वय झाला तरी माणूस आपल्यासोबत राहावं, आपल्याला सोडून जाऊ नये अशी मनाची वेडी आशा असते पण प्रकृतीचा नियमच तो, आलेला जायचा. काका देहानी नसले तरी त्यांच्या विचाराने कायम आपल्या सोबत राहतील. त्यांच्या प्रत्येक बंदिशी वाजवताना चिन्मयला त्यांचे स्मरण होईल व त्या ऐकताना मला काकांची आठवण होईल.

काकांच्या आठवणीत हे लेखन त्यांना समर्पित.


.०८.२०२०