Wednesday, October 14, 2020

नाते विश्वबंधुत्वाचे ( Vishvabandhutva )

                                                 || श्री शंकर ||

                           नाते विश्वबंधुत्वाचे  


११ सप्टेंबर १८९३ हा दिवस जगाच्या इतिहासातील एक संस्मरणीय दिवस. शिकागो येथील धर्मसभेत भिन्न भिन्न धर्माचे सर्वश्रेष्ठ प्रतिनिधी एका विराट सभेच्या निमित्ताने एकत्र जमले होते. ह्या सभेत स्वामी विवेकानंदानी श्रोत्यांना संबोधित करताना " माझ्या बंधुनो आणि भगिनींनो "असे आवाहन केले. उपस्थित प्रतिनिधीच्या हृदयाचा ठाव घेणारे ते शब्द होते ....ह्या शब्दांची मोहिनी आज १२७ वर्षांनंतरही जनमानसावर कायम आहे. स्वामींचे नाव विश्वबंधुत्वाशी जोडले गेले ते कायमचेच. त्या शब्दांचे एवढे सामर्थ्य कशात होते ?.  

स्वामींच्या शब्दात निष्कपट प्रेम होते. करुणा होती. प्रेमभावनेची आकांक्षा असलेल्या जनतेला त्यांच्या विचारांनी प्रेरित केले. हिंदू धर्माचा प्रभाव सर्वावर पडला. आपले भारतीय  तत्वज्ञान थोर आहे आणि विवेकानंदानी त्याचा प्रचार केल्यामुळे त्याचे महत्व विशेष प्रस्थापित झाले.

स्वामी रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे अध्यात्मिक गुरु. विश्वप्रेमाची मूळ संकल्पना हि रामकृष्णांची. त्यांचीच विचारपताका विवेकानंदानी सातासमुद्रापार फडकवली. भारतभ्रमण करताना स्वामीजींना आपल्या देशबांधवांचे दैन्य, दारिद्र्य बघितले. त्यांचे संवदेनशील मन ह्यामुळे व्यथित झाले. रामकृष्ण मिशनची स्थापना करून त्यांनी ह्या बांधवांसाठी सेवाकार्याची सुरवात केली. आणि विश्वबंधुत्वाचा पाया रचला. आपले तत्वज्ञान केवळ पोथ्यापुराणात न ठेवता स्वतः आचरण करून ते राष्ट्रवादाशी जोडले.

योगीजनांना समदर्शीं  तत्वामुळे सगळीकडे एकाच तत्वाची अनुभूती येते. सगळ्याप्रती सारखा भाव त्यांच्या अंतःकरणात असतो. संतांच्या आचरणातून हा प्रत्यय आपल्याला येतो. समाजाच्या उद्धाराची तळमळ त्यांना असते. त्यांचे हृदय वात्सल्याने काठोकाठ भरलेले असते. तळागाळातील लोकांबरोबर बंधुत्वाच्या नात्याने ते जोडले जातात. त्यांचे कल्याण व्हावे ह्या एकाच हेतूने ते कार्यरत असतात. विवेकानंदांच्या चरित्रातील अनेक प्रसंग ह्या दृष्टीने उद्बोधक आहेत. आपल्याला प्रेरणा देणारे आहेत.


श्रीमद्भगवद्गीतेत बंधुत्वाची व्याख्या केली आहे. बंधू म्हणजे भाऊ एवढा मर्यादित अर्थ नसून आप्त, नातेवाईक ह्या सर्वाशी ज्या बंधनाने आपण जोडले जातो ते म्हणजे बंधुत्व. त्या नात्यात प्रेम, आपुलकी, जबाबदारी, कर्तव्य, सर्व काही आले. आप्तस्वकीयांची देखभाल आपली जबाबदारी ह्या नात्याने आपण प्रेमाने करतच असतो,.आजकाल स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीप्रती स्नेह, आदर, सेवाभाव ह्या गोष्टीही दुर्मिळ होत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत स्वतःच्या परिवाराबाहेर जाऊन बंधुभाव जोपासणे हि तर फारच अवघड गोष्ट आहे.  

बंधुत्वाचा  विस्तार जेव्हा कुटुंबाच्या पलीकडे होतो तेव्हा त्याचे स्वरूप आणखीन व्यापक होते. समाजाभिमुख होते. आजही काही व्यक्ती प्रेमभावनेने बंधुत्वाची जोपासना समाजासाठी करीत आहेत. ह्यासाठी विश्वबंधुत्वाचा अर्थ तुमच्या आचरणात पूर्णतः झिरपलेला असावा लागतो.

गीतेच्या सहाव्या अध्यायात श्रीकृष्णांनी ह्या व्यक्तीची लक्षणे सांगितली आहेत. भगवान म्हणतात शत्रू, मित्र, पुण्यवान, पापी ह्या सर्वाशी हा माणूस समबुद्धीने वागतो. त्यांच्यात भेद करत नाही. अनासक्त, निष्काम, निर्लोभी आणि निस्वार्थी मनुष्यच समाजासाठी आपले कर्तव्यकर्म चोख रीतीने पार  पाडत असतो.

सर्वसामान्य माणसाला अंतःकरणातील राग द्वेष, आसक्ती, चीड, संताप ह्यामुळे सगळ्यांशी सारखेपणाने वागणे जमत नाही. आपली बुद्धी स्वार्थप्रवण  असते. हे बंधुत्वाचे नाते जपणे आपल्यासारख्याना अवघड वाटते.

याला काही अपवाद असतातच. काही व्यक्ती वैयक्तिक पातळीवर गरजूना मदत करीत असतात. अगदी छोट्या छोट्या कृतीतूनही हा भाव जोपासता येतो. दुसऱ्यांचे दुःख हलके करता येते. काही सामाजिक संघटना तर विविध आपत्तीच्या काळांत अशी जबाबदारी स्वीकारून समाजोपयोगी कामे तन -मन -धन वेचून निस्वार्थीपणे करतच असतात. महामारीच्या ह्या आपत्तीत संघाच्या कार्यकर्त्यांनी जे अमूल्य योगदान केले आहे त्याला तोड नाही.

समाजातील अशाच हीन- दीन, पतित लोकांसाठी कळवळणारे अतिशय कोमल हृदय असणारे साने गुरुजी आपल्या काव्यात म्हणतात ' समस्ता बंधू मानावे । जगाला प्रेम अर्पावे ।। " त्यांचे हे शब्द आपल्या मनाचा ठाव घेतात .

" आत्मेव ह्यात्मनो बंधुरात्मेव रिपुरात्मनः " आपणच आपले बंधू ( आप्त / मित्र ) असतो किंवा शत्रू असतो. स्वतःच्या आत्म्याशी बंधुत्व भाव जोडून आपणच आपला उद्धार केला पाहिजे. समाजाशी नाते जोडताना आपल्या हृदयस्थित परमेश्वराला विसरून कसे चालेल ? वरवर सोपे वाटले तरी आचरण्यास अतिशय कठीण असे हे तत्वज्ञान आहे.

बंधुत्वाची भावना जोपासली गेली तर जीवनातील अनेक ताणतणाव कमी होतील. स्त्रियांकडे बघायची दृष्टी बदलली तर त्यांच्यावरील अत्याचार कमी होतील. दहशतवादासारख्या दुर्दैवी घटना घडणार नाहीत.

ईश्वराला आपण " लोकबंधु " म्हणतो. सर्वांचा आधार ,हितकर्ता तो लोकबंधु. जगाच्या कल्याणासाठी त्या विश्वात्मक ईश्वराची प्रार्थना करूया.

बंधुत्वाची प्रेरणा देणाऱ्या सर्व शक्तींना अभिवादन करतानाच हे नाते जपण्याचा मनोमन निश्चय करूया.


स्नेहा भाटवडेकर

sneha8562@gmail.com



2 comments:

  1. धीर गंभीर विवेक विचार,समस्त विश्व यांना नमन करते

    ReplyDelete
  2. Thanks for the reply,please mention your name / mobile / email

    ReplyDelete