Wednesday, February 3, 2021

स्वकर्म कुसुमांची माला

।। श्री शंकर  ।।

                                    स्वकर्म कुसुमांची माला

" बिकट वाट वहिवाट नसावी। धोपटमार्गा  सोडू नको " सर्वसाधारणपणे सामान्य जन  कोणतीही जोखीम न पत्करता साधारण मार्गाचा अवलंब करून जीवन सुखी करण्याचा ( जास्तीत जास्त  साधनसंपत्ती मिळवण्याचा  ) प्रयत्न करतात.  काही असाधारण व्यक्ती मात्र स्वतःचे इप्सित साध्य करण्यासाठी बिकट मार्गानेच वाटचाल करतात, तोच त्यांचा जीवनमार्ग असतो. समाजाचे कल्याण  हेच त्यांचे ध्येय असते.  

कै . त्रिंबक हरी भाटवडेकर ह्यांचे कलाकार सुपुत्र प्रख्यात बासरीवादक कै. कमलाकांत भाटवडेकर ह्यांचे शालिन सुपुत्र " हेमंत भाटवडेकर " ह्यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ह्या अवलियाचा थोडक्यात घेतलेला हा वेध ....   

 खरं तर हे अतिशय अवघड काम... अवघड अशासाठी कि त्यांच्या अथांग व्यक्तिमत्वाचा थांग आज ३८ वर्षे त्यांच्यासमवेत कायम राहूनही मला लागलेला नाही. " मी जन्माला आलो तेव्हा प्रत्यक्ष ब्रह्मदेवही घोटाळ्यात पडला असावा " मिश्किल हसत हेमंत स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाकडे त्रयस्थपणे पाहत टिप्पणी करतात. लग्नाआधी दक्षिण ध्रुवावर असलेले हेमंत नंतर स्वाभाविक वृत्तीने उत्तर ध्रुवावर प्रवेश करतात. अर्थात हेमंतच हि प्रांजळ कबुली देतात.   हेमंतच्या व्यष्टी आणि समष्टी धर्मात असलेली मोठी  तफावत हेही ह्याचे मुख्य कारण ...   हे हेमंत खरे कि ते असा प्रश्न पडावा !

  वैयक्तिक आयुष्यात कोणतीही गोष्ट ते गंभीरपणे मनावर घेत नाहीत. स्वतःचा व्यवसाय असो, कि अन्य काही .. . मात्र ह्याच्या बरोबर विरुद्ध स्थिती सामाजिक जीवनात ... अहोरात्र ते कामांत, विचारांत व्यग्र असतात. कठोर परिश्रम घेऊन वेगवेगळे प्रोजेक्ट्स मार्गी लावण्यांत निमग्न असतात. त्यांच्या विशेष बुद्धिमत्तेची चमक ह्या सर्व प्रोजेक्टसमधे बघायला मिळते.

 सोलापूर ग्रामी ०२/०२/१९५७ रोजी जन्मलेले हे बालक जन्मानंतरची ५/६ वर्षे तिथेच वाढले. तिथल्या मातीची अनावर ओढ आजही त्याच्या मनात तेवढीच घट्ट रुजलेली आहे. सर्वच भाटवडेकर कुटुंबीय मुळात क्रीडाप्रेमी आणि कलाप्रेमी ( मुख्यतः संगीतकलेकडे सर्वांचा ओढा ). ती आवड हेमंतच्या नसानसांत आजही भिनलेली आहे. स्वतः कलाकार नसला तरी त्यांच्यात सुप्त रूपांत एका निष्णात कलावंताचे बीज दडलेले आहे. त्यांनी साकारलेले अनेक उपक्रम ह्याची साक्ष देतात. अनेक कलाकारांना, त्यांची कला-क्रीडा  वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणारा, त्यांचे तोंड भरून कौतुक करणारा हेमंत ... 


सोलापूर नंतर पार्ल्यात कायम वास्तव्यास आल्यावर मोठ्या एकत्र कुटुंबात राहूनही "एकाकी,अलिप्त " राहणारा हेमंत. एकत्र कुटुंबात ज्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले, कदाचित त्यातूनच त्यांचे मन संसारी जीवनांविषयी  सखोल विचारी झाले, उदासीन झाले. स्वतःच्या वाटचालीचा पाया ह्या चिंतनातून  रचला  आणि स्वतःचा वेगळा मार्ग त्यांनी स्वतंत्रपणे तयार केला. 

पार्ले टिळक ह्या प्रथितयश शाळेत आधी विद्यार्थी म्हणून आणि आता संचालक म्हणून शाळेशी असलेले नाते  अधिकाधिक दृढ आणि व्यापक होत गेले.  मॅट्रिक झाल्यावर पुढे बी. कॉम. आणि मग १९८२ साली अतिशय अवघड अशी C. A. ची परीक्षा देऊन अल्पावधीतच C. A. झाले. घरात खरंतर शैक्षणिक वाढीसाठी ( कलेची विशेष आवड  असल्यामुळे )  पोषक वातावरण नसताना, कोणाचेही मार्गदर्शन नसताना स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर हि पदवी प्राप्त करणारा भाटवडेकर आणि सासरच्या  कुटुंबातील एकमेव सदस्य . 

पारल्यासारख्या ठिकाणी स्वतःचे ऑफिस सुरु करून प्रॅक्टिसला जोरदार सुरुवात  झाली खरी .... पण खऱ्या अर्थाने हेमंत ह्या पोटापाण्याच्या व्यवसायांत कधीच रमले नाहीत.  हा व्यवसाय आजही त्याच सचोटीने  ३८ वर्षे चालू असला तरी त्यांचं कार्यक्षेत्र मुळात वेगळंच ... येणाऱ्या clients ना व्यावहारिक सल्ला देताना त्यांना मात्र लौकिक अर्थाने जीवन व्यवहार सांभाळणे जमले नाही. आज सगळं जग पैशाच्या ( लक्ष्मीच्या ) मागे धावताना हेमंतनी मात्र सरस्वतीची कास धरली आणि हा सरस्वतीपुत्र स्वतःच्या  शाळेच्या( पार्ले टिळक विद्यालय ) प्रांगणात इतका रमला कि शाळेसाठी तन - मन अर्पून  शाळेचा स्तर उंचावण्यासाठीच अहोरात्र प्रयत्न सुरु झाले. . विविध  उपक्रम त्यांनी गेल्या अनेक वर्षांत राबविले आणि तेही अगदी निरपेक्षपणे, निःस्वार्थीपणे.  सतत ध्यास शाळेचा मी, माझे स्वास्थ्य ,माझे कुटुंब हा विचारही त्यांच्या मनांत येत नाही. 

शाळेप्रमाणेच पार्ल्यातील "पार्ले हिंदू देवालय मंडळ" ह्या संस्थेचे विश्वस्तपद भूषविताना असेच जीव ओतून अतिशय प्रामाणिकपणे, निष्ठेने केलेले काम. तिथेही दैनंदिन कामकाजात  सुधारणा करून विविध उपक्रम गेल्या काही वर्षांत सुरु  केले आहेत. समाजपयोगी कार्यक्रमांद्वारे तळागाळातील जनतेसाठी मदत कार्य सुरु आहे.  हा  सर्व कामाचा व्याप ते शांत राहून अगदी लीलया  पेलतात, कुठेही दिखाऊपणा नाही कि प्रसिद्धीचा हव्यास  नाही. हे सर्व त्यांना कसं काय साधतं हे  मला अद्याप  न उलगडलेलं कोडं आहे.

ह्याच कारण अर्थातच त्यांच्या मधील अनेक सत्व गुण . . " वैराग्य " हा अलंकार त्यांनी  परिधान केला आहे. एक सहप्रवासी म्हणून हेमंतच्या व्यक्तिमत्वात ठळकपणे काही उणीवाही जाणवतात. हेमंत खूप जिद्दी  आहेत . मितभाषी आहेत. स्वतःच्या मनातील विचार शेअर करायला ते विशेष उत्सुक नसतात.  त्यांच्या मनाचा तळ शोधणं ,विचारांचा अंदाज येणं खूप  कठीण  असते. 

  तरुण वयातच हेमंत त्यांच्या सासऱ्यांचे (कै .विष्णू पांडुरंग किंजवडेकर) पारमार्थिक अनुकरण करते झाले. " विष्णुसहस्र  नामाची " अखंड  साधना, सद्गुरूंच्या वचनावर  असलेला त्यांचा दृढ  विश्वास. सामाजिक जीवन आणि परमार्थ ह्याचा उत्तम समतोल साधताना हित / अहिताची जाणीव ठेवून शांततेच्या मार्गाने जीवन सफलतेचा प्रवास करत आहेत. अर्थात सफलतेची व्याख्या प्रत्येकाची वेगळी.  

ज्ञानेश्वरीतील  एक ओवी सुपरिचित आहे. " जयाचे ऐहिक धड नाही । तयाचे परत्र पुससी काई ।। " ध्येयनिष्ठ कर्ममार्गामुळे हेमंतनी त्यांची पुढची गती आधीच निश्चित केली आहे आणि म्हणूनच त्यांचे ऐहिक त्या ईश्वरानेच सांभाळले ह्या विचाराने मन भरून येते ( योगक्षेमं वहाम्यहं )  हाच त्यांच्या कार्याचा मिळालेला प्रसाद आहे असे वाटते. 

कोमल कायेप्रमाणेच मनानेही अतिशय भावनाप्रधान, संवेदनशील असलेले हेमंत. कोणताही उत्तम कलाविष्कार  अनुभवताना त्यांचे नेत्र अविरत पाझरतात. हे सर्व कार्य करताना अनेक मान -अपमान सहन करावे लागतात. कौतुकाचा शब्द अभावानेच वाट्याला येतो. काही वेळा पदरी निराशाच येते. त्यांच्या कोमल, दुखऱ्या  मनावर हळुवार फुंकर घालण्याचे काम मग माझे असते. त्यांच्या एवढ्या मोठ्या कार्यात माझा एवढाच काय तो सहभाग. 

 वाढत्या वयाबरोबर समाज कार्याची एव्हढी मोठी जबाबदारी पेलताना त्यांचा जीव काही वेळा थकून जातो. लोकांच्या अपेक्षांचा भार सहन करणे कठीण होते. अतिश्रमाने शरीर साथ देत नाही. " प्रीतीचा लाभलेला हा कल्पतरू ", त्याचा प्रेमाने, मायेने सांभाळ करण्याची  जबाबदारी  मी आनंदाने स्वीकारते. त्यांची सावली होऊनच राहते. 

स्वकर्म कुसुमांची माला अर्पण करून ईश्वराला संतुष्ट करण्यासाठी सतत कार्यमग्न असणारे " कर्मयोगी हेमंत ", त्यांना निरामय आरोग्य लाभावे , त्यांचे इच्छित कार्य पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने बळ द्यावे हीच सदिच्छा त्यांच्या वर्धापनदिनी व्यक्त करते ....  


स्नेहा ... 

०२/०२/२०२१







Saturday, January 23, 2021

संतकवि दासगणू महाराज( SANTKAVI DASGANU MAHARAJ )

                                                                  ।। श्री शंकर  ।।

                                                                                                               पौष शु. एकादशी ,शके १९४२

                                                    संतकवि  दासगणू  महाराज 


संतकवि दासगणू महाराज ह्यांच्या जयंती उत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या साहित्यातील शैलीचा आढावा घेण्याचा अल्पसा प्रयत्न करून त्यांची स्मृती ह्या लेखातून  जागविली आहे.  

प.पू अप्पांनी भावमुक्तावलीत सद्गुरू प्रार्थनेत, दासगणू महाराजांच्या लेखणीचे महत्व अतिशय समर्पक शब्दांत व्यक्त केले आहे. हृदयातील भक्तिभाव, अलौकिक बुद्धिमत्ता, सद्गुणांची खाण आणि सदा परमेश्वर चरणाशी लीन झालेला भाव, ह्यामुळेच महाराजांचे सर्व काव्य हे तुळशीच्या मंजिऱ्यांप्रमाणे अतिशय पवित्र आहे. त्यांत्च्या साहित्याचा उगम थेट हृदयांतून झालेला आहे. त्याचा प्रत्यय त्यांचे साहित्य वाचतांना भाविकांना अनुभविता येतो.

प.पू . साईबाबांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने दासगणू महाराजांनी ओवीबद्ध रचना करण्यास सुरवात केली आणि विपुल साहित्याची निर्मिती केली. सर्व संत हे जणू परमेश्वराचा दुसरा अंशच आहेत. अशा अनेकविध परिचित आणि अपरिचित संतांच्या चरित्रांचा वेध अपार मेहनत घेऊन महाराजांनी आपल्या भक्ती लिलामृत आणि भक्तीसारामृत ह्या ग्रंथांत घेतला आहे. 

दादांच्या कीर्तन आणि इतर काव्यातील उत्कटता रसिकांच्या मनाचा ठाव घेते  ती  त्यातील विलक्षण भावामुळेच. म्हणूनच त्यांच्या शब्दांचा परिमळ सतत अवतीभोवती पसरलेला असतो. इतकी अवीट गोडी ह्या सर्व साहित्यात चाखायला मिळते. आणि हे सर्व अगदी सोप्या सहज भाषेत. ह्या प्रसाद गुणामुळेच हे सर्व लेखन आपल्याला अगदी जवळचे वाटते. पांडुरंग स्तोत्र हे ह्या दृष्टीने सर्वांच्याच नित्य पठनात असल्याने परिचयाचे आहे. 

भक्ती रसाबरोबरच करुण  रसाचा परिपोष त्यांनी रचलेल्या  कीर्तनातून अनुभविता  येतो. अनेक वर्षे वारंवार हि कीर्तने ऐकूनही त्यातील समरसता जराही कमी होत नाही हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य. शुचिता, वैराग्य, मधुर, सात्विक भाव त्यांच्या व्यक्तिमत्वातील ह्या गुणांचा परिपोष त्यांच्या लेखणीतून झिरपला नाही तर नवलच. 

महाराजांच्या अप्रकाशित वाङ्मयातील पुरवणी खंड जेव्हा मला  वाचनासाठी मिळाला, तेव्हा त्यांतील त्यांनी हाताळलेल्या  विविध साहित्य प्रकारांनी मन अचंबित झाले. कीर्तनातील पूर्वरंगासाठी उपयुक्त अशी उपदेशपर पदे  विविध वृत्तांत  आणि चालीत बांधलेली आहेत. रसाळ आणि भक्तिरसपूर्ण अशी हि पदे वाचायला आणि ऐकायलाही गोड वाटतात. त्याला दिलेल्या चालीही कर्णमधुर आहेत.  ह्या पदांप्रमाणेच फटके, कटाव, पोवाडा अशी विविध काव्य प्रकारांची रचना त्यांनी केली आहे. स्तवने, अभंग, आरत्या ह्यांचीही रचना आढळते. सगळ्या साहित्य प्रकारांत  त्यांच्या शब्द सामर्थ्याचा प्रत्यय येतो. 

वेगळ्या विषयावरील चहाचे अष्टक आपले लक्ष वेधून घेते. " चहा ना  बरा हा महा दुःखकरी । करी हाच उत्पन्न रोगां  शरीरी ।।" ह्या पेयाच्या प्राशनाचे विविध तोटे महाराज आपल्याला सांगतात. लोकांना सद्बुद्धी मिळावी आणि  चहापासून लांब राहावे अशी पांडुरंग चरणी प्रार्थना त्यांनी केली आहे. 

ह्याच ग्रंथातील एक पद मला आवडले. त्यातील साध्या सोप्या आशयाने मनाला आकर्षित केले. त्याचे थोडक्यात विवेचन  :

हे पद " फटका " ह्या काव्यप्रकारांत मोडते. एखादी गंभीर गोष्ट कठोर भाषेत लोकांना समजावून सांगणे म्हणजे साहित्यांतून फटकारणे. अनंत फ़ंदी हे ह्या फटक्यांचे जनक. त्यानी रचलेले फटके सुप्रसिद्ध आहेत. ते लोकांना उपदेशपर आहेत. लोकांना अज्ञान  निद्रेतून जागे करण्यासाठी हा  फटका महाराजांनी रचलेला आहे.गाताना हा फटका जोशपूर्ण वाटतो. अवघ्या नऊ कडव्यांत आणि अतिशय थोडक्या शब्दात अतिशय प्रभावीपणे समाज मनाची नस ओळखून लोकांना , व्यवहारांत कसे वागावे, आचरण कसे असावे हे समजावून सांगितले आहे. त्यांनी भक्तिमार्गाचा पुरस्कार केला आहे. उत्तम नीतिमूल्यं अंगी बाणवावीत म्हणून योग्य मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या सुक्ष्म  निरीक्षण शक्तीचा प्रत्यय काव्य वाचताना अनुभविता  येतो. लोकांच्या समाजात मिरवण्याचा उपहास करतांना ते स्पष्ट शब्दात म्हणतात,  " मृण्मय देहा  घालुनी कपडे । बैलोबापरी सजू नको ।।

मुळात सज्जन असलेले हे मन अनेक विकारांमुळे स्व स्वरुपापासून दूर जाते. अहंकार, ममत्व, सद्वृत्तीचा विसर, वृथा अभिमान, वाणीवर नसलेले नियंत्रण ह्यामुळे भक्तीमार्गात रमत नाही. दुसर्यांचा द्वेष - मत्सर करण्यांत, निंदा करण्यात, अशुभ चिंतण्यात वेळ विनाकारण वाया जातो. महाराजांना दांभिकपणाची खूप चीड आहे. परमार्थमार्गात साधेपणाने जीवन जगावे असा मोलाचा सल्ला ते साधकांना देतात. 

नरदेहाचे महत्व प .पू .दादांनी वारंवार प्रकट केले आहे. पण ह्या नरदेहाचे खरे सार्थक कशात आहे हे आपल्याला कळत नाही. नरदेह परमेश्वराच्या भक्तीचे प्रमुख साधन आहे.  आपण प्रपंचात नको तेव्हढे गुंतत जातो आणि मग दुःख भोगावे लागते.दासगणु महाराजांसारखे  संत निःस्पृह आणि निस्वार्थी असतात. लोकहिताची तळमळ त्यांना असते. लोकांना भक्तिमार्गाला लावून शाश्वत सुखाचा मार्ग दाखविणे, मनाची शक्ती वाढविणे हे काम ते आपल्या साहित्यातून करत असतात. 

" अमोल ऐशा नरदेहाला येऊनि वाया जाऊ नको । दासगणूचा ऐकुनी फटका तसे चालण्या चुकू नको ।। "'

महाराजांच्या साहित्याच्या अभ्यासाने " आधुनिक महिपती " हि त्यांना दिलेली पदवी कशी सार्थ आहे हे समजून आपले मन त्यांच्या चरणाशी सहजच  नतमस्तक होते... 

( सोबत मूळ काव्य जोडले आहे .. )





                                                                                                                                   स्नेहा भाटवडेकर 
                                                                                                                                     ९८३३०१७०७४

Wednesday, January 13, 2021

MAKARSANKRAMAN ( गोड गोड बोला ..... )

                                                        ।। श्री शंकर ।।

                                                                                                           मकरसंक्रांती ,१४/०१/२०२१

                                                     गोड गोड बोला ..... 


                              भोगावया मकरराशीस सूर्य आला । तेणे आनंद अवघ्या जगतास झाला ।।

                                                                                                        संतकवि दासगणु महाराज ..

नमस्कार मंडळी ,

२०२१ ह्या कॅलेण्डर  वर्षातला पहिला सण " मकरसंक्रांत " ,वर्षाची  सुरवातच गोड बोलण्याचा संदेश देऊन  होते . व्यवहारांत गोड  बोलूनच कामे होतात ना  ? तर अशा ह्या मकरसंक्रांतीच्या सर्वाना गोड शुभेच्छा . 

हा उत्सव सूर्य देवतेचा. सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाला सुरवात होते. शेताशेतांत पिके तयार झालेली असतात. हवा मस्त थंड असते. पूर्वजांनी ऋतुमान ,परंपरा आणि धर्म ह्यांची छान सांगड घालून अनेक सण ,उत्सवांची परंपरा निर्माण केली. रोजच्या जीवनमानात बदल आणि त्याबरोबरच धर्म ,आरोग्य ह्यांची जोपासना. भारतात प्रांतानुसार ह्या सणांचे स्वरूप वेगवेगळे असले तरीही उद्देश एकच. नात्यातील कटुता कमी होऊन एकी निर्माण व्हावी ,स्नेहवृद्धी  व्हावी. तीळ आणि गुळ हे ह्या स्निग्धतेचे प्रतीक. थंडीच्या दिवसात ,तिळगुळ बल -ऊर्जा निर्माण करणारा .परस्परांना तिळगुळ देऊन नात्यातील गोडवा वृद्धिंगत करणारा .  पोस्टाने घरोघरी तिळगुळ आणि शुभेच्छा संदेश पाठविणारी पूर्वापार परंपरा आज खंडित झाली आहे. पण आमच्या गोरट्याच्या आश्रमांतून न चुकता येणारा तिळगुळ आणि संदेश आमचे गुरुपरिवाराशी असलेले  नाते अधिक दृढ करणारा . अनेक वर्षे सातत्याने चालू असलेली हि परंपरा. 

संतकवि दासगणु महाराज त्यांच्या आर्येत म्हणतात : 

                         गोडी मधुर उपजे । जेवीं या तीळ नी गुळांठायी ।

                         तैसा मत्सर जाता आपणातील । तेच घडुनिया येई ।। 

पुढे ते म्हणतात परस्परांतील प्रेमामुळे सुखाचे भांडारच  लाभते . सुकीर्ती वाढते. 

ह्या पुण्य पर्वात नदीस्नानाचे ,दान धर्माचे ,पूजा- उपासनेचे महत्व सांगितले आहे. महिला ह्या दिवशी सुगडाची पूजा करतात. हळदीकुंकू करून वस्तू लुटतात. अशा रीतीने सामाजिक बंधही दृढ होतात. 


संक्रांतीच्या दिवशी सूर्य  उपासना विशेष फलदायी ठरते . सूर्यनारायणाच्या उपासनेचे अनेक फायदे आहेत. आरोग्य ,तेज,बल वाढविण्यासाठी सूर्यनमस्कार ,गायत्री मंत्र उपासना केली जाते.

शारिरीक बलामुळेच जीवनधारणा होते. उन्नती होते. दुर्बल माणसाकडे शक्तीचा अभाव असल्यामुळे ,त्याला कायम अन्याय सहन करावा लागतो. त्याचे समाजाकडून शोषण होते. शारिरीक ,बौद्धिक,आर्थिक,चारित्रिक बळ सूर्य उपासनेमुळेच लाभते. मकरसंक्रातीच्या निमित्ताने हा महत्वाचा संदेश आपल्याला मिळतो . 

 सृष्टीतील चराचराचे संवर्धन सूर्यप्रकाशामुळे होते. आदित्य हे साक्षांत नारायणाचे रूपच आहे जे आपण स्वतः डोळ्यांनी बघू शकतो." नमः सवित्रे जगदेकचक्षु : " सूर्यनारायण  जगाचा अक्षु ,नेत्र आहे आणि जगाच्या सगळ्या व्यवहारांवर त्याचे लक्ष असते . लोकांना सन्मार्ग दाखविण्याचे काम हा  सूर्य आपला मित्र होऊन करतच असतो. 

महाराजांनी त्यांच्या आणखी एका श्लोकांत ह्या सणाचे महत्व प्रतिपादिले आहे. 

                               आला अजी मकर राशीस हा तमारि ।हा भर्गदेव सविता अशिवा निवारी ।।

                                    सूर्यासवे जशि प्रभा उदयास येते । हे भर्ग चिंतन कधी नच व्यर्थ जाते ।।

अंधःकाराचा तसेच वाईट वृत्तींचा नाश करणारी अशी परमात्म्याची  शक्ति म्हणजे " भर्ग  ". हि शक्ती मनुष्याचे आयुष्य प्रदीप्त ,उज्वल करून त्याला संतुष्ट करते .  आसुरी वृतीचे दमन  करणे, दुर्गुणांचा नाश  करणे मानव कल्याणासाठी हिताचे आहे. गायत्री उपासना आपण सर्वश्रेष्ठ उपासना मानतो. ह्या उपासनेद्वारे ईश्वराचा तेजस्वी ,श्रेष्ठ अंश आपल्यात धारण करून क्षात्रतेज वाढविता येते. 

हे तेज वृद्धिंगत करून अविद्येचा नाश होऊन हळूहळू ज्ञानाचा उगम होतो. ब्रह्मतेजाचा साक्षात्कार होतो. शांततेज वाढते."  नमः शान्ताय तेजसे "  हे शांततेज उग्र तेजाहून प्रभावी असते. शाकुन्तलात महाकवि कालिदासाने म्हटले आहे " शमप्रधानेषु  तपोधनेषु गूढं हि दाहात्मकमस्ति तेजः " 

                मकरसंक्रमणाच्या पुण्यदायी पर्वात आपणा  सर्वांचे तेज वृद्धिंगत होवो हि त्या नारायणाला प्रार्थना .... 


स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com


                       

Sunday, December 20, 2020

कृष्णमाय ( गीताव्रती सुलभताई फळणीकर )

                                                                          ।। श्री शंकर ।।             

                                                                                                                   गीताजयंती २५/१२/२०२०


                                                                       कृष्णमाय  


" आधी आई मधे मी कृष्णाला पाहत होते, आता मला त्या कृष्णामधे माझ्या आईचाच भास होतो " भावुक होऊन सुषमाताई माझ्या जवळ त्यांच्या आईचा जीवनप्रवास उलगडून दाखवत होत्या. सुषमाताई पुढे म्हणाल्या "आई गेली आणि हा दुःखावेग सहन करण कठीण  झालं. पण एकाएकी एक गुपित मला समजलं आणि माझं मन मोकळं झालं. कृष्ण रूपांत पूर्णपणे एकरूप झालेली आई आता कृष्ण रूपाने आमच्या सर्वांच्या पाठीशी उभी आहे. आईच्या जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीत मला जीवनाचा खरा अर्थ उलगडला. गीता हि अनेकांना जीवनाधार देते ".  

सुषमाताईंची आई गीताव्रती होती. संपूर्ण आयुष्य त्यांनी गीतेला वाहून घेतले होते. 

" सुलभाताई  फळणीकर "......माहेरच्या प्रभुदेसाई. कोकणात राजापूर जवळ तळवडे  येथे राहणाऱ्या.  त्यांचा जन्म १९ ऑगस्ट, १९२७ चा. शालेय शिक्षण जेमतेम तिसरीपर्यंत. सुरवातीला काही वर्षे त्यांच्या मोठ्या बहिणीकडे शिपोशीला राहत होत्या आणि नंतर मामांकडे .  मामांचा त्यांना मोठा आधार लाभला. मामा मुंबईत दादरला राहत होते. अशा रितीने सुलभाताई मुंबईत दाखल झाल्या. 

लग्नानंतर सुलभाताई बॉम्बे सेंट्रलला रिझर्व्ह बँक स्टाफ कॉलनीत  स्थायिक झाल्या. संसारात स्थिरस्थावर होऊन मुले मोठी झाल्यावर त्या गिरगाव येथील ब्राह्मण सभेच्या सभासद झाल्या. सुलभाताईंचा पिंड मुळातच खूप हौशी. उत्साहाचा झरा त्यांच्यात कायमच वाहत असे. त्यामुळेच ब्राह्मण सभेच्या विविध स्पर्धात त्यांचा सहभाग असायचा. विविध पाककला स्पर्धात त्या भाग घेत. शिवणकाम करताकरता त्यांना बाहुल्या बनवण्याचा छंद जडला. ह्या निमित्ताने दूरदर्शन वर त्यांची मुलाखत प्रक्षेपित झाली होती. 

संसारी जीवनांत विविध छंद जोपासत असतानाच त्यांना भगवद्गीतेच्या पठणाचा छंद जडला. मैत्रिणीबरोबर त्या ललिताबाई गोडबोले ह्यांच्याकडे जाऊन गीतेची संथा घेऊ लागल्या. त्यासुमाराला त्यांचे वय होते ४५. तेव्हा त्यांना गीतेचा ध्यास लागला तो अगदी अखेरचा  श्वास घेईपर्यंत कायम होता.संपूर्ण गीता त्यांना पाठ होती.  गीतेच्या विविध  पाठांतर स्पर्धात त्या भाग घेत आणि त्यांचे  स्पष्ट शब्दोचार, म्हणण्याची पद्धत आणि गीतेला साजेसे त्यांचे सोज्वळ रूप ह्याची मोहिनी परीक्षकांवर न पडली तरच नवल. सलग तीन वर्ष ह्या स्पर्धेत बक्षिस म्हणून मिळालेली ट्रॉफी, म्हणजेच अर्जुनाचे सारथ्य करताना, गीतेचा उपदेश करताना रथारूढ असलेली श्रीकृष्णाची मूर्ती त्यांच्या घरात विराजमान होती . मुंबईत अनेक ठिकाणी तसेच पुण्यात  गीतेच्या स्पर्धेच्या निमित्ताने जाऊन त्या बक्षिस घेऊन येत असत. यजमानांचा त्यांना भक्कम पाठिंबा होता आणि त्यांची हि आवड जोपासायला कुटुंबातील सभासद तत्पर असत.आजही त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांचा गीतेचा वारसा पुढे चालवत आहेत.त्यांची कन्या श्रीमती इला जठार ह्याही आई प्रमाणेच विविध कलांमध्ये प्रवीण आहेत.   

यजमान निवृत्त झाले आणि कायमस्वरूपी सुलभाताई  पार्ल्यात " स्नेहधारा  " मध्ये राहायला आल्या. स्नेहधारातील स्नेह त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वात उतरला आणि त्यांचे जीवन अधिक बहरले. अनेक जणांना त्यांनी  हसत हसत गीता शिकवली. कोणी गीता शिकायची इच्छा प्रकट केली कि बाई अगदी त्यांच्या घरी जाऊन त्यांना मनापासून शिकवीत. पार्ले टिळक शाळेतील मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन केले. हे सर्व अगदी आनंदाने आणि निरपेक्षपणे. कोणताही मोबदला न घेता. त्यांच्या ह्या कार्याची दखल घेऊन" उत्तम वरिष्ठ नागरिक " ( Best Senior Citizen ) हा पुरस्कार त्यांना मुंबई महापालिकेच्या के पूर्व विभागातर्फे देण्यात आला. त्यावेळचे तत्कालीन आयुक्त श्री. शरद काळे ह्यांनी बाईंच्या निःस्वार्थी  कार्याचा खूप गौरव केला. शालेय शिक्षण कमी आहे, म्हणून कुठेही मागे न राहता बाईंनी धडाडीने, आत्मविश्वासाने गीता प्रसाराचे महनीय कार्य केले ह्याचे त्यांनी कौतुक केले. 


पार्ल्यातील नामांकित जुनी संस्था म्हणजे " टिळक मंदिर ". ह्या संस्थेत त्यांनी गीतापठणाचे वर्ग सुरु केले. अनेक वर्षे हा उपक्रम सातत्याने चालू होता. साधी नऊवारी साडी, कपाळावर मोठे कुंकू आणि गळ्यात   काळ्या मण्यांची पोत. दर शनिवारी बरोबर पाच वाजता बाईची  प्रसन्नवदना  मूर्ती क्लास मध्ये हजार झाली कि वेगळेच चैतन्य प्रगट होत असे. सुषमाताईंशी बोलताना त्या म्हणाल्या " कृष्ण आपली वाट बघत असतो आणि आपल्याला मार्ग दाखवत असतो ". ह्या त्यांच्या शब्दांचा प्रत्यय म्हणजेच बाईंशी झालेली माझी भेट. त्यांच्यामुळेच मी तिशीतच गीता शिकले आणि आजही त्यांची हि शिकवण मला जीवनात मिळालेली  मोठी  ठेव आहे असे मी समजते .  बाईंच्या मृदू ,निगर्वी  स्वभावाची, साधेपणाची, त्यांच्या गीता प्रेमाची माझ्या  मनावर मोहिनी कायम आहे. रोज गीता वाचताना मला बाईंची खूप आठवण  येते. 

गेले काही वर्षे बाई आजारी आहेत, उठू  शकत नाही असे ऐकून होते. दुखण्याने त्या त्रस्त  होत्या कंटाळला होत्या. पण मुखात , कानात आणि मनांत सतत गीताचं होती. अनेक दिवसात त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही. मध्यंतरी  सुषमाताईकडून  बातमी समजली आणि मन बेचैन झाले. १५ ऑगस्ट २०२०, स्वातंत्र्यदिन आणि अजा  एकादशीच्या दिवशीच बाई  देहबंधनातून स्वतंत्र होऊन कृष्ण रूपात एकरूप झाल्या. 

गीताव्रती सुलभाताई नुसत्याच गीता शिकवत नव्हत्या तर गीता प्रत्यक्ष जगत होत्या. मुक्तहस्ते हे देणं समाजात वाटून स्वतःबरोबर दुसर्यांनाही आनंद देत होत्या. सदोदित प्रसन्न राहून, हसतमुखाने माणसांना जोडून ठेवत होत्या. अशा काही व्यक्तींच्या कार्यामुळेच समाजधारणा होत असते. समाजाचे उन्नयन होते. 

गीतेतील एक श्लोक त्यांच्या कार्याची  ओळख करून द्यायला पुरेसा आहे. 

                             कर्मण्ये वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन । मा कर्मफल  हेतुर्भूर्मा  ते संगोSस्त्व कर्मणी ।। 

आपल्या कामाची कोणतीही वाच्यता न करता ,फळाची अपेक्षा न ठेवता कार्यरत असणारी जुनी- जाणती पिढी स्वतःच्या पाऊलखुणा पायवाटेवर ठसवत अस्तंगत होत आहे. आज प्रत्येक गोष्ट सोशल  मीडियावर शेअर  करणाऱ्या भावी पिढीला ह्या पिढीकडून खूप शिकण्यासारखे आहे. 

बाई !! अखेरच्या दिवसात तुमची भेट झाली नाही तरी हि शब्दरूपी भेट तुमच्या पर्यंत पोचवावी म्हणून मी  लिहिती झाले.गीताजयंतीच्या निमित्ताने  श्रद्धांजली अर्पण करून तुमच्या कार्याची थोडक्यात ओळख करून द्यायचा हा अल्पसा प्रयत्न.  टिळकमंदिरात अनेक वर्षे मी तुमच्यासोबत संपूर्ण १८ अध्याय दर एकादशी आणि गीताजयंतीला म्हणत आले आहे. मी तो परिपाठ आजही चालू ठेवलाय बाई. आणि हो ! तुमचे कार्य थोडक्या अंशाने का होईना सुरु ठेवलेय.   
हे सगळं जरी असलं तरी संपूर्ण गीता कंठस्थ व्हावी हे माझं स्वप्नं आहे पण आजही ते पुरे करू शकले नाही. तुमच्या आशीर्वादाने माझं हे स्वप्न पूर्ण होईल अशी मला खात्री आहे. 

श्रीकृष्णार्पणमस्तु .... 


सौ .. स्नेहा भाटवडेकर 

sneha8562@gmail.com





Saturday, December 12, 2020

Gruha Saukhya (गृहसौख्य )......

                                                                       ।। श्री  शंकर  ।।

गृहसौख्य 

कॅलेंडर वर्ष  २०२० मध्ये तुम्हाला अनपेक्षित  गृहसौख्याचा लाभ होणार आहे असे कोणी ज्योतिषाने सांगितले  असते तर तुम्ही विश्वास ठेवला असता का ? अहो, आपल्या वास्तूच्या चार भिंतींचे महत्व किती अनन्य साधारण आहे  हे कळावं, म्हणूनच करोना  विषाणूचा फ़ैलाव एवढ्या वेगाने झाला असावा. ह्या साथीने  संपूर्ण जग हादरलं. स्तब्ध झालं. ह्या संकटाचा सामना करण्यासाठी सुरवातीला काही महिने स्वतःच्या घरीच राहा. अगदी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका असा संदेश अगदी पंतप्रधानांपासून अनेकांनी  दिला. आपापल्या घरामध्येच मग सर्वजण बंदिवान झाले. ऑफिसच्या कामापासून  शक्य  तेव्हढे  सर्व जीवनव्यवहार  घरातूनच व्हायला सुरवात झाली . 


सुरवातीला मर्यादित  काळापुरताच lockdown असेल असं वाटत असताना हा कालावधी  खूप वाढत गेला. त्यामुळे वास्तूचे सुख आम्ही अनुभवले आणि आमच्या सहवासाने वास्तू  आनंदीत झाली. घराला घरपण देणारी सर्व माणसे पूर्ण वेळ घरातच होती ना? ह्या सर्व काळांत वास्तूचं अंतरंग अनुभवलं. ऑफिसच्या धावपळीमुळे घरातील वास्तव्य अनुभवता येत नव्हते ह्या काळांत ते उपभोगता आले.                                                                                                                                           
भरपूर वेळ मिळाल्यामुळे  स्वैपाकघरांत अनेकानेक प्रयोग करून बघितले. बैठकीच्या खोलीचा वापर तर फिरत्या रंगमंचासारखा झाला. ऑफिसचे काम ,मिटींग्स ,घरच्या मंडळींसोबत गप्पाटप्पा तर कधी योगासने, व्यायाम, शतपावली हाच हॉल कधी नाटकाचा रंगमंच तर कधी सिनेमा हॉल. हळूहळू ऑनलाईन कार्यक्रम सुरु झाले. मग  गाण्याच्या कार्यक्रमांचा आस्वादही  घेतला. भजन, कीर्तन रसांत मनसोक्त डुंबलो. 

गुढीपाडव्यापासून सुरु होणारे अनेक सण घरातंच  साजरे झाले. रामनवमीला बारा तास अखंड रामनामाचा नाद  ह्याच वास्तूत घुमला. अनेक स्तोत्रांच्या पठणाने वास्तूचेही कान तृप्त झाले. घरातच मंदिराचा अनुभव घेतला. ह्या सगळ्यांत वेळ कसा तो पुरतच नव्हता.

मनातल्या भावना व्यक्त करण्याची प्रेरणा मला माझ्या वास्तुतच मिळाली आणि त्यानुसार ब्लॉग लिहिणे चालू झाले.  Bucket list मधील अनेक स्वप्नांची पूर्तता अशा रितीने  ह्या काळात झाली. 

मुंबई सारख्या शहरांत एवढी  असीम शान्तता प्रथमच अनुभवायला  मिळाली. स्वतःच्या मनांत डोकावून बघायला हाच उत्तम काळ होता. " If you cannot go outside, go inside " ह्या tagline ने लक्ष वेधून घेतले. वाचन, मनन, चिंतन  ह्यासाठी वेळ देता आला. भीषण आपत्तीच्या काळांत  मानसिक बळ मिळाले ते ह्यामुळेच.
 
मनांत दाटलेले कारुण्य मोकळे झाले ह्याच वास्तूत. सकाळी गच्चीवर फेऱ्या मारतांना चराचर  उजळवून टाकणारा सूर्यप्रकाश मनावर आलेले निराशेचे मळभ क्षणार्धात दूर करत असे. घराभोवतालचा निसर्ग सुद्धा मनाची मरगळ घालवून मनाच्या प्रसन्नतेत भर घाले.    

शरीर आणि मनाला विसावा देणारं हे आपलं घर. बाहेरच्या कठीण परिस्थितीत ह्या वास्तूचा आधार मनाला खूप  दिलासा देणारा होता. करोनाच्या विषाणूंना घराबाहेरच थांबवण्याचे सामर्थ्य ह्या भक्कम वास्तुतच आहे ह्याची जाणीव खूपच सुखावणारी होती. ही वास्तू अशीच कायम आनंदी राहावी, सौख्यदायी व्हावी अशी मनोभावे प्रार्थना केली.  ... वास्तूदेवतेनेही आशीर्वाद दिले ...  तथास्तु ...  तथास्तु... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर 
sneha8562@gmail.com

Friday, November 13, 2020

Jyotis Milalya Jyoti ( ज्योतीस मिळाल्या ज्योती )

                                                       ।। श्री शंकर ।।

                                           ज्योतीस मिळाल्या ज्योती 

लीस ग बाई तू ... यावर्षी थोड्या उशीरानेच आलीस खरी ...आम्हां सर्वांच्या अंतःकरणात लावायला आशेचा दीप घेऊनच आलीस ... घनतमी मनामनांत प्रकाशाची ज्योत उजळायचे सामर्थ्य तुझेच ... आबालवृद्ध सर्वांचीच तर तू लाडकी.. सर्वावर तुझी मोहिनी स्वार  होते ... अशी तू मनमोहिनी .. सर्वानाच  रिझवणारी  !

ह्यावर्षी खरं तर सगळी जीवनघडी पार विस्कटलेली ! त्यामुळे तुझं स्वागत कसं होतयं ह्याची खरं तर चिंताच होती .पण आम्ही सर्व उत्सवप्रिय. सणवार ,परंपरा उत्साहाने सांभाळतो . तो उत्साह आता वातावरणांत  जाणवतोय . हे उत्फुल्ल वातावरण पाहिलं कि जगायला एक वेगळच बळ मिळतं .  

अगं केव्हढं तुझं ते जोरदार स्वागत !आम्ही  घराघराचा कोपरा आणि कोपरा झाडून पुसून लखलखीत करतो. दुकानांत हिsss गर्दी करून खरेदी. वेगवेगळे गोड तिखटाचे फराळाचे  पदार्थ. केव्हढी हौसेने सगळी तयारी . घराच्या सारवलेल्या अंगणात नक्षीदार रंगीबेरंगी रांगोळीचे ठिपके. नाजूक हाताने काढलेल्या रेषा आणि भरलेले रंग ,जणू नात्यातलेच  मधुर भावबंध.सुगंधी अत्तर ,तेल उटणे लावून केलेली अंघोळ सगळा  शीण  घालवणारी  , मला माझ्या आजीची तीव्रतेने आठवण करून देणारी हि पहाटेची अंघोळ. अगदी थरथरता  हात कसा मायेने फिरायचा  अंगावर ,तेल उटणं लावताना.  ह्या सणाच्या दिवसांत  पाहुण्यांची उठबस ,गोडधोड पक्वानांचे जेवण ,भेटवस्तूंची देवाणघेवाण . 

नरकासुराचा वध  करून आनंद साजरा करायचा,सुगृहिणीच्या पाककौशल्याचा आस्वाद घ्यायचा .  घरीदारी वसणाऱ्या वैभवाची ,धनाची पूजा करून, अलक्ष्मीला दूर लोटायचे. हे करताना मनाला हि निर्मळ करायचे . नवरा बायकोतला स्नेह वाढवायचा आणि भाऊ- बहिणीच्या मायेचा गोडवा गायचा हि करामत तूच करू शकतेस बाई .. चार दिवस कसे आनंदाचे , मौजमजेचे .. चिंता, क्लेश ,दुःख सारे काही  विसरायचे ,जीवनातली लौकिक आणि पारलौकिक कसरत सांभाळणारी तर तूच. 

लवकर पडणाऱ्या गडद अंधाराच्या पार्श्वभूमीवर आकाशांत हळुवार ,मंद हेलकावे खाणारा आकाशदिवा आपल्या मनातही आनंदाचे कितीतरी तरंग उमटवीत असतो नाही. आणि त्याच्या जोडीला काळोखाचा छेद घेणारी तेजाची ज्योत , पणत्या ,मेणबत्या , त्यातही आता किती नाविन्य ..रंगीबेरंगी दारूकाम ..  हौसेला मोल नाही हेच अगदी खरं ... एकेका ज्योतीने दुसरी ज्योत लावून ओळीने लावलेले दिवे हीच तर तुझी खासियत . दिपावली ... 


आत्ता मला कुसुमाग्रजांची एक सुंदर कविता आठवली. आकाशातल्या चांदण्या हि परमेश्वराचीच पाऊलचिन्ह आहेत. तो सतत फिरणारा प्रवासी. दिवाळीच्या दिवसांत पृथ्वीवरील सौन्दर्य टिपण्यासाठी दिवे बनून हि प्रकाशाची वाट दाखवायला तर तो येत  नसेल ना ?  तुझी भुरळ त्यालाही पडतेच तर !मग आम्हां सामान्यांची काय कथा ! 

ऋतूबदलामुळे वातावरणांत होणारे बदल,सुखावणारा गारवा आणि अश्या पहाटेच्या वेळी कानावर पडणारे मैफिलीतले सूर... अहाहा .. कलावंतांची कला अशा वेळी बहरते . कलाकारांना जसं प्रोत्सहन मिळतं तसंच अनेक उद्योग व्यवसायांना तुझ्या आगमनाने उर्जितावस्था येते. थोडक्यात काय सगळ्यांना अगदी भरभरून आनंद देतेस. आपलं मन ,वृत्ती तरल असली कि अगदी मनसोक्त हा आनंद लुटता येतो .

 हीच वृत्ती भगवंतापाशी स्थिरावली कि मग काय बारा महिने दिवाळीच. त्या आनंदाला ओहोटी लागतच नाही. त्यासाठी अंतरात्म्यांत दीप प्रज्वलीत करायचा सकारात्मतेचा . आणि ह्या ज्ञानदीपाने अज्ञानाचा अंधःकार दूर करायचा . देहाचा दीप करून तोच परमेश्वराच्या भक्तिसाठी जाळणाऱ्या आणि "क्षणभर उघड नयन देवा " अशी त्याची आळवणी करणाऱ्या साधिकेची प्रतिमा डोळ्यासमोर उभी राहिली बघ .  

इतकी वर्ष सातत्याने येतेस . तुझ्या  भरपूर आठवणी, भेटीदाखल मिळालेल्या वस्तूंचा,  खजिना जमा होतो    ह्या खजिन्याच्या मालकीच्या  भावनेनेच (  ( Pleasure of  possession ) आम्ही  सुखी, आनंदी होतो. एक प्रसंग आठवला बघ  ह्यावरून.... 

दिवाळीच्या  निमित्ताने काकासाहेब दीक्षित ह्यांच्या घरचं वातावरण आनंदाने फुलले होते. बरीच पाहुणे मंडळी त्यांच्याकडे आली होती. दासगणु  महाराज सुद्धा त्यांच्याच घरी उतरले होते. साईबाबांविषयी वाटणाऱ्या प्रेमामुळे , गुरुप्रेमाच्या ओढीने यांच्यात अनोखे स्नेहबंध निर्माण झाले होते. 

दिवाळीचा सण असल्यामुळे काकासाहेबांच्या  घरातील सर्व बायका नवे वस्त्र -अलंकार घालून मिरवित होत्या.  अंगावर जुनेर कसबसं गुंडाळलेली त्या घरांत काम करणारी पोरसवदा मुलगी कारुण्यपूर्ण आवाजात कोणतेतरी गाणे गुणगुणत होती. तिच्या स्वरातील कारुण्याने दासगणू महाराज अस्वस्थ झाले. महाराजांनी  त्या मुलींसाठी नवे कपडे आणवले आणि  दिवाळीची भेट म्हणून तिला दिले. . 

दुसऱ्या दिवशी ती मुलगी मोठ्या आनंदात कामाला  आली.अंगावर जुनीच वस्त्रे होती पण काल  मिळालेल्या भेटीचा आनंद आज  तिच्या गाण्यातून ओसंडून वाहत होता. आपल्याजवळ असलेल्या वस्तूच्या मालकीचा हा आनंद होता.   कालचा करूण  रस कुठच्याकुठे पळाला होता. 

आजूबाजूला असणाऱ्या आपल्याच बांधवांच्या आयुष्यात असाच तेजाचा एखादा दीप आपणही लावला तर त्या  छोट्याश्या कृतीने तुलाही आनंदच होईल ... जाता  जाता  तुही  मोहरून जाशील ... 

. ज्योत से ज्योत लगाते चलो, प्रेम कि गंगा बहाते चलो ... ह्याचा प्रत्यय घ्यायला मग  काय हरकत आहे ? 

दीपावली आणि नूतन वर्षाचे अभिष्टचिंतन ... 


स्नेहा हेमंत भाटवडेकर

sneha8562@gmail.com 




Thursday, November 5, 2020

                                                                ।।  श्री शंकर  ।।


                                                      परिस्थितीचे जरा भान ठेवा  


" जल्लोष  आहे आता उधाणलेला ! " ह्या मथळ्याची बातमी महाराष्ट्र टाइम्स च्या ५ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली. करोनाच्या वैश्विक  संकटाने  संपूर्ण देशाचे प्रकृतीमान  बिघडले आहे आणि अशा परिस्थितीत "जिवाची मुंबई" करण्यासाठी तरुण, तरुणींनी पर्यटनासाठी मुंबई बाहेर धाव घेतली आहे, ह्या  बातमीने मन विषण्ण झाले.  

करोनाचा प्रादुर्भाव होऊन निर्बंध लागू झाले त्याला आता  सहा महिने होऊन गेले. पायरीपायरीने लॉक डाउन  शिथिल होत आहे, जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण आगीची धग अजूनही जाणवतेय. अनेकांची उपजीविकेची साधनेच हिरावली गेली आहेत. त्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली आहे. अनेक उदयोगधंद्यांची वाताहत झाली आहे. . 

पर्यटन व्यवसायालाही अर्थातच मोठ्ठा फटका बसला आहे. त्यांचा सुगीचा काळ लॉक डाउनने हिरावला. राज्य शासनाने हॉटेल, रेस्टॉरंट्सना परवानगी दिल्यामुळे आता ह्या व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्पन्नाचे त्यांचे साधन चालू होणे अगदी गरजेचे आहे. त्या एका उद्योगावर बाकी अनेक लहान मोठे व्यावसायिक अवलंबून असतात. 

पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या कुटुंबीयांनी चेंज म्हणून घराबाहेर  पडताना सर्व परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.स्वतःचे आणि  कुटुंबाचे आरोग्य, सरकारी व्यवस्थेवर येणारा ताण, आर्थिक बाबींचा  विचार, मुलांची शाळा  (ऑनलाईन  असली तरी ), त्यांचे झालेले  शैक्षणिक नुकसान, ह्याचा जबाबदार पालक म्हणून विचार करणे गरजेचे  आहे. 

हॉटेलमालक स्वतःचा बुडलेला धंदा सावरण्यासाठी पर्यटकांना विविध प्रलोभनांचे आमिष दाखवत आहेत. ह्या प्रलोभनांना आपण बळी पडणार नाही ह्यासाठी पर्यटकांनी (ग्राहकांनी ) सतर्क राहणे गरजेचे आहे. 

तरुण, तरुणींचा पर्यटनाचा उत्साह ह्यावर काय बोलावे ? आजची  तरुण मंडळी ( काही अपवाद वगळता ) फारच बिंदास्त वावरत आहेत. विकेंड ला अनेक हॉटेल्स/ रिसॉर्ट्स फुल्ल असतात. आजचे  नकारात्मक वातावरण  केवळ पर्यटनाने दूर  होईल असा भाबडा विचार ते करतात का ? त्यांच्या  सळसळत्या उत्साही जीवनांत  विधायक कामे करून सकारात्मकता आणता  येणार नाही का ? ज्याची आज समाजाला खरी गरज आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव खाजगी वाहनाने प्रवास करण्याला पर्यटक पसंती देत आहेत. पण रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे  आधीच  प्रचंड ताण  असणाऱ्या पोलिसांवर/ आस्थापनांवर  अतिरिक्त कामाचा बोजा आपण टाकत तर नाही ना ह्याचा सुजाण पर्यटक विचार करतील का ? उपासमारीच्या संकटामुळे गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यांत  अनेकांना लुटल्याचे प्रकार वाचनात  येतात. तीही खबरदारी प्रवास करताना घेणे आवश्यक आहे.  

  अलीकडे  बातम्यांची शीर्षकं, नवनवीन तयार करण्यात येणारे शब्द, वाचकांच्या हळूहळू पचनी पडू लागले आहेत. ."उधाणलेला " शब्द त्याचेच छापील  उदाहरण.  बातम्या प्रसारित करताना भाषा शुद्ध असावी ह्याचा  विचार वार्ताहर करतील का ?

 नागरिकांनो तुमच्या उत्साहामुळे " आमचा जीव जातो " असे म्हणण्याची वेळ आणू नका.  बिघडलेल्या परिस्थितीचे  गांभीर्य ओळखून जरा जबाबदारीने वागा .... . 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर 

मेल : sneha8562@gmail.com

09/10/2020