Thursday, November 5, 2020

                                                                ।।  श्री शंकर  ।।


                                                      परिस्थितीचे जरा भान ठेवा  


" जल्लोष  आहे आता उधाणलेला ! " ह्या मथळ्याची बातमी महाराष्ट्र टाइम्स च्या ५ ऑक्टोबरच्या अंकात वाचनात आली. करोनाच्या वैश्विक  संकटाने  संपूर्ण देशाचे प्रकृतीमान  बिघडले आहे आणि अशा परिस्थितीत "जिवाची मुंबई" करण्यासाठी तरुण, तरुणींनी पर्यटनासाठी मुंबई बाहेर धाव घेतली आहे, ह्या  बातमीने मन विषण्ण झाले.  

करोनाचा प्रादुर्भाव होऊन निर्बंध लागू झाले त्याला आता  सहा महिने होऊन गेले. पायरीपायरीने लॉक डाउन  शिथिल होत आहे, जीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. पण आगीची धग अजूनही जाणवतेय. अनेकांची उपजीविकेची साधनेच हिरावली गेली आहेत. त्यामुळे आयुष्याची घडी विस्कटली आहे. अनेक उदयोगधंद्यांची वाताहत झाली आहे. . 

पर्यटन व्यवसायालाही अर्थातच मोठ्ठा फटका बसला आहे. त्यांचा सुगीचा काळ लॉक डाउनने हिरावला. राज्य शासनाने हॉटेल, रेस्टॉरंट्सना परवानगी दिल्यामुळे आता ह्या व्यावसायिकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. उत्पन्नाचे त्यांचे साधन चालू होणे अगदी गरजेचे आहे. त्या एका उद्योगावर बाकी अनेक लहान मोठे व्यावसायिक अवलंबून असतात. 

पर्यटनासाठी बाहेर जाणाऱ्या कुटुंबीयांनी चेंज म्हणून घराबाहेर  पडताना सर्व परिस्थितीचा विचार करणे आवश्यक आहे.स्वतःचे आणि  कुटुंबाचे आरोग्य, सरकारी व्यवस्थेवर येणारा ताण, आर्थिक बाबींचा  विचार, मुलांची शाळा  (ऑनलाईन  असली तरी ), त्यांचे झालेले  शैक्षणिक नुकसान, ह्याचा जबाबदार पालक म्हणून विचार करणे गरजेचे  आहे. 

हॉटेलमालक स्वतःचा बुडलेला धंदा सावरण्यासाठी पर्यटकांना विविध प्रलोभनांचे आमिष दाखवत आहेत. ह्या प्रलोभनांना आपण बळी पडणार नाही ह्यासाठी पर्यटकांनी (ग्राहकांनी ) सतर्क राहणे गरजेचे आहे. 

तरुण, तरुणींचा पर्यटनाचा उत्साह ह्यावर काय बोलावे ? आजची  तरुण मंडळी ( काही अपवाद वगळता ) फारच बिंदास्त वावरत आहेत. विकेंड ला अनेक हॉटेल्स/ रिसॉर्ट्स फुल्ल असतात. आजचे  नकारात्मक वातावरण  केवळ पर्यटनाने दूर  होईल असा भाबडा विचार ते करतात का ? त्यांच्या  सळसळत्या उत्साही जीवनांत  विधायक कामे करून सकारात्मकता आणता  येणार नाही का ? ज्याची आज समाजाला खरी गरज आहे. 

सुरक्षेच्या कारणास्तव खाजगी वाहनाने प्रवास करण्याला पर्यटक पसंती देत आहेत. पण रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे  आधीच  प्रचंड ताण  असणाऱ्या पोलिसांवर/ आस्थापनांवर  अतिरिक्त कामाचा बोजा आपण टाकत तर नाही ना ह्याचा सुजाण पर्यटक विचार करतील का ? उपासमारीच्या संकटामुळे गुन्हेगारीतही लक्षणीय वाढ झाली आहे. रस्त्यांत  अनेकांना लुटल्याचे प्रकार वाचनात  येतात. तीही खबरदारी प्रवास करताना घेणे आवश्यक आहे.  

  अलीकडे  बातम्यांची शीर्षकं, नवनवीन तयार करण्यात येणारे शब्द, वाचकांच्या हळूहळू पचनी पडू लागले आहेत. ."उधाणलेला " शब्द त्याचेच छापील  उदाहरण.  बातम्या प्रसारित करताना भाषा शुद्ध असावी ह्याचा  विचार वार्ताहर करतील का ?

 नागरिकांनो तुमच्या उत्साहामुळे " आमचा जीव जातो " असे म्हणण्याची वेळ आणू नका.  बिघडलेल्या परिस्थितीचे  गांभीर्य ओळखून जरा जबाबदारीने वागा .... . 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर 

मेल : sneha8562@gmail.com

09/10/2020


2 comments:

  1. सुंदर लिखाण, खरोखरच बिघडलेल्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागण्याची गरज आहे

    ReplyDelete