Sunday, June 28, 2020

Ye Dil Mange More...( ये दिल मांगे मोअर )

                                                                   ।। श्री  शंकर  ।।


                                                       ये  दिल  मांगे  मोअर 


मंडळी , आज  सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय ...रसना  ... 

कालपासून  चातुर्मासाची सुरवात झाली  ...  आता चार महिने रीतिरिवाज, उपवास , व्रतवैकल्य.  ह्या सर्वांना आपल्या परंपरेत महत्वाचे स्थान आहे. . त्यानिमित्ताने आपल्या आहाराचे आणि उपवासाचे महत्व अधोरेखित केलं आहे. 

तर मंडळी, आपल्या मूलभूत गरजांपैकी एक " अन्न  ". देहधारणेसाठी आपल्याला अन्न पाण्याची स्वाभाविक गरज असतेच. व्यक्तीनुसार  आणि वयोमानानुसार  प्रत्येकाची रुचि भिन्न भिन्न . गरज वेगवेगळी. घरांतल्या स्त्रीचा बराचसा वेळ हा स्वयंपाक घरांत विविध पदार्थ बनवण्यातच जात असतो . जात असे...  असे म्हणायला हरकत नाही.  ह्या गरजेचाच पुढे विस्तार किती होतो हे आपल्याला माहितीच आहे . सध्याच्या  काळांत हॉटेल्स, फूड मॉल्स, जॉईंट्स,ऑनलाईन रेसिपि ह्या सगळ्यांच प्रकारांना खूप महत्व आले आहे. एकंदर जीवनशैली खूप बदलली आहे आणि ह्याचे परिणाम सामाजिक स्वास्थ्यावर होत आहेत.  

ह्या रसनेची तृप्ती सहजासहजी  होणे कठीणच ,म्हणूनच " दिल मांगे मोर " असं म्हणत आहारावर  नियंत्रण न ठेवता सेवन करतच राहतो.       

एका सुभाषितकाराने म्हटले आहे ,
जामाता जठरम जाया जातवेदो जलाशयः ।पुरिता नैव   पूर्यन्ते जकारः पंचदुर्भर : ।।
जावई ,जठर ,पत्नी,अग्नि  आणि पाणी  ह्यांची तृप्ती कधीच होत नाही.

आपल्या संस्कृतीत अन्नाला परब्रह्म म्हटले आहे. ।। जीवन करी जीवित्वा ,अन्न हे पूर्णब्रह्म ।।                               
अन्नग्रहण करणे हा  एक यज्ञ आहे. 
भगवद्गीतेत  आहारविहाराविषयी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, ।। युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टयस्य कर्मसु ।।
आहार  योग्य वेळी, योग्य मात्रेत, नियमितपणे सेवन करावा.

केवळ जिभेला रुचकर ते आरोग्याला चांगले असतेच असे नाही. जीवनाचा रस टिकवणारे, देहाचे आणि मनाचे पोषण करणारे अन्न सेवन करावे.

सात्विक श्रद्धा निर्माण होण्यासाठी सात्विक आहाराचे महत्व सांगितले आहे. आहारानुसार माणसाचा  स्व-भाव बनत असतो. मनुष्य ज्याप्रमाणे सत्व, रज, तम गुणांनी युक्त असेल त्याप्रमाणे त्याची रुची असते. सत्वगुणी लोकांना आयुष्य, बुद्धी, बळ वाढवणारा रसयुक्त ,स्निग्ध, ताजा आहारचं प्रिय असतो. रजोगुणी लोकांना चमचमीत पदार्थ आवडतात तर तमोगुणी अर्धवट शिजलेले, शिळे पदार्थ सेवन करतात. त्याप्रमाणेच आचार विचार, मनोवृत्ती घडत असते. 

आषाढ महिना सुरु झाला कि वेध लागतात ते चातुर्मासाचे. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे चार महिने म्हणजे सणवार, उत्सव, व्रतवैकल्य  जोरात सुरु . बदललेले पावसाळी ऋतुमान आणि त्याला अनुसरुन आहार विहार आणि   उपासतापास. 

आपल्या पचनसंस्थेलाअधूनमधून  विश्रांती मिळावी म्हणून उपवासाची योजना आपल्या पूर्वजांनी केली असावी. ह्या चार महिन्यांत अनेक व्रतांसाठी उपवास  करावे असे सुचवले आहे. ह्या विशिष्ट काळांत काय खावं काय नको ह्याचे नियम आहेत. प्रत्येक प्रांतानुसार ते वेगवेगळेही आहेत. पण मूळ उद्देश बाजूला राहून त्याचेही बरेच स्तोम माजलेलं आपण बघतो. आणि त्यातलं पावित्र्य नष्ट होऊन त्याची खिल्लीच जास्त उडविली जाते. पु.ल. च्या पाठयपुस्तकांत समाविष्ट असलेल्या " उपवास " ह्या लघुनिबंधाची आठवण येते. 

काहीजण खाऊन पिऊन उपास करतात तर काही हलका आहार घेणं पसंत करतात. प्रत्येकाच्या सवयीनुसार, झेपेल तसं हे उपासाचं स्वरूप असतं. काहींना अजिबात उपवास झेपतच नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती. 

भगवान शंकरांची प्राप्ती व्हावी ह्या हेतूने पार्वतीने वनांत राहून  केवळ पिकलेली झाडाची पाने चाटून व्रत केले आणि  तिच्या  तपःश्चर्येने  शंकर प्रसन्न झाले. असे अनुष्ठान फार विरळाच.
 
उपवासाचे सामान्य माणसाला होणारे फायदेही बरेच आहेत. वजन नियंत्रित  राहते हा तर मोठा फायदा आहेच. वजन कमी करण्यासाठी आज अनेक diatician  सल्ला देत असतात.   Weight Control प्रस्थ सध्या जोरात आहे. त्यासाठी भरमसाठ फी सुद्धा आकारली जाते. प्रत्यक्षांत आपले स्वतःच्या आहारावर नियंत्रण असेल तरच हे साधते. उपवासामुळे भूक सुधारते, हार्मोन्सचे कार्य चांगले होते, एकंदरच रोग कमी होऊन आरोग्यात चांगली सुधारणा होते. कमी खाण्याने ऊर्जा वाढते, उत्साह वाढतो, मन संतुलित होते. मेंदूची गती वाढते.

समर्थ रामदास स्वामी म्हणतात , देही आरोग्य नांदते , भाग्य नाही  ह्यापरते ... 


उपवास म्हणजे उप + वास . ह्या काळांत परमेश्वराच्या सान्निध्यात जास्तीत जास्त राहाणे असा ह्याचा अर्थ. आहारावर नियंत्रण ठेवून मिळालेला वेळ हा उपासनेसाठी वापरणे. हे एक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक तपचं आहे हा ईश्वराप्रत पोचण्याचा एक मार्ग. उपवासामुळे पापक्षालन होते असाही समज आहे. 
श्रद्धेने केलेल्या उपवासाने मन शुद्ध  होऊन आचार विचार सदाचाराने प्रेरित होतात . 
उपास करणे आणि उपास घडणे हा अनुभव ज्यांनी घेतला असेल आणि आहार घेणे आणि आहारी जाणे ह्यातील मर्म ज्यांनी जाणले असेल त्यांना जीवनातील समतोल साधणे अवघड नाही. 

केवळ आहारचं नाही तर हिंडणे फिरणे, झोप सर्व गोष्टीतच जर वक्तशीरपणा, शिस्त पाळली गेली तर व्यक्तीचे शारीरिक आरोग्य नीट राहीलच पण  रूप .स्पर्श , शब्द , गंध ह्या बाकीच्या विषयांवरही  नियंत्रण ठेवणे  सोपे जाईल.   
 
आज मोबाइल, फेसबुक, आदि समाज माध्यमांचे वाढते आकर्षण हाही चिंतेचा विषय आहे. एखादा दिवस तरी त्या जंजाळातून स्वतःची सुटका करणे हाही उपवास ह्या निमित्ताने करून त्याचा अनुभव घ्यायला  काय हरकत आहे ? 

अनेक संतमाहात्म्यांनी आणि थोर राष्ट्रपुरुषांनी उपोषणाचा मार्ग राष्ट्रसेवेसाठी स्वीकारला. जेव्हा राष्ट्रावर अवर्षण किंवा युद्ध यासारखी आपत्ती येते तेव्हा ह्या मार्गाने देशसेवा घडू शकते. लालबहादूर शास्त्री ह्यांची  एक गोष्ट आठवते. त्यांनी आठवड्यातील एक दिवस , एक वेळ देशासाठी उपास पाळण्याचे देशवासियांना आवाहन केले होते आणि अनेकांनी त्यांना पाठिंबा देऊन त्याचे आचरण केले. 
थोर व्यक्तींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच असे वाटते की  केवळ प्रवृत्तिपर भोगसाधनांचा उपभोग न घेता , निवृत्ती साधण्यासाठी जी साधने आहेत ती प्राप्त व्हावीत ह्यासाठी प्रयत्न करायला हवे ..  ह्या साधनांसाठी  ये दिल मांगे मोअर असे म्हणायला हवे .... . 


Sneha Bhatawadekar
sneha8562@gmail.com









 
 



3 comments:

  1. सुनंदा महाजन,,
    छान माहिती दिलीस. ��
    चातुर्मास पाळणे,म्हणजे फक्त श्रावण पाळणे,किंवा कांदा लसूण वांगी न खाणे,राहिलं आहे हल्ली.

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. खरं आहे ,पूर्वी ह्या दिवसांत अनेक व्रतवैकल्य केली जात असत.चार महिने एखादा नेम करीत.

    ReplyDelete