Tuesday, April 28, 2020

|| Jai Jai, Jai Shankar ||



                                                      
           ll   श्री शंकर  ll

                                              
|| जय जयजय शंकर ||


आज वैशाख शुद्ध पंचमी. आत्ताच श्री शंकराचार्य चरित्र पोथीच्या पारायणाची समाप्ती झाली.सद्गदित होऊन मी नमस्कार केला आणि आचार्यांचा जीवनपट डोळ्यासमोर साकार झाला.  
                   

आचार्यांचे सर्व चरित्र अतिशय अद्भुत आहे, साधारण बाराशे वर्षांपूर्वी केरळ राज्यांत, कालडी ग्रामांत, पूर्णा नदीच्या तटावर आचार्यांचा जन्म झाला. प्रत्यक्ष शंकर महादेवच जणू शिवमणी आणि अंबा मातेच्या पोटी जन्माला आले. तत्कालीन परिस्थतीत ऐहिक सुखाला हपापलेल्या समाजामध्ये कर्मकांडाला महत्व प्राप्त झाले होते, नास्तिकतेचा पुरस्कार याच कालावधीत अतिशय प्रभावीपणे केला गेला. नाना पंथ धर्म या काळात उदयाला आले, या सर्वांचे तत्वज्ञान वैदिक धर्माविरुद्ध होते. वैदिक धर्माचा ऱ्हास होत होता आणि समाज अवनतीच्या मार्गाने चालला होता. आणि म्हणूनच शंकराने हा अवतार घेतला असे मानले जाते. त्यांचे नामकरणही "शंकर" असेच करण्यात आले. पुढे आद्य शंकराचार्य म्हणून सर्व जगामध्ये ते मान्यता पावले.

लहान वयातच शंकरला पितृवियोगाला सामोरे जावे लागले. शंकर
चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं 
अगदी जात्याच बुद्धिमान होता.
त्यामुळे सर्व शास्त्रांचे  अध्ययन लहान वयातच झाले. ते मातृभक्त होते. मातृसेवेहून दुसरे मोठे पुण्य नाही असे ते मानीत असतआईसाठी त्यांनी पूर्णा नदीचा प्रवाह वळवून अगदी घराजवळ आणला असं म्हणतात.

श्री शंकराचार्यांचा जन्म वैदिक धर्माची पुनर्स्थापना करून त्याचे गतवैभव त्याला प्राप्त करून देणे आणि त्यायोगे जगदोध्दार करणे यासाठी झाला होता. त्यासाठीच वयाच्या आठव्या वर्षी आईला राजी करुन संन्यास घेण्यासाठी ते घराबाहेर पडले. नर्मदातीरावर त्यांना त्यांचे गुरु गुरुगोविंदपद भेटले आणि त्यांचा अनुग्रह प्राप्त झाला. गुरूंनी त्यांना त्यांच्या कार्याची जाणीव करून दिली आणि पुढील आयुष्याची दिशा दाखवली.

त्यानंतर आचार्य भारत भ्रमणासाठी सज्ज झाले.काश्मीर पासून अगदी दक्षिणेपर्यंत त्यांनी वैदिक धर्माचा प्रसार आणि विकास व्हावा म्हणून सर्व आयुष्य खर्ची घातले. चार दिशांना चार मठांची स्थापना केली. ह्या  मठांच्या स्थापनेमुळे सामाजिक समरसता संपादून, भारताला एका तत्वात एकत्र जोडता आले. संसारापासून पूर्ण अलिप्त राहून त्यांनी वैदिक धर्म प्रसारासाठी स्वतःला  वाहून घेतले. स्वतःचे अद्वैत मत प्रतिपादन केले. ब्रह्मसूत्र, उपनिषदे, प्रस्थानत्रयी, दर्शने ह्यासारखे विदवत्तापूर्ण ग्रंथ लिहिले.

आचार्यांच्या अद्वैत तत्वज्ञानाला ( अहं ब्रम्हास्मि ) आणि  ( ब्रह्म सत्यंजगत मिथ्या ) मायावादाला समाजातील इतर प्रवाहांकडून खूप विरोध झाला. बौद्ध ,जैन,मीमांसक,सांख्य ह्या प्रतिपक्षांनी त्यांच्या मतावर जोरदार टीका केली. त्यांच्यात वारंवार शाब्दिक लढाया झाल्या. पण आचार्यांनी सर्व वैदिक धर्म विरोधी मतांचे खंडन करून वैचारिक क्रांती घडवून आणली.

आचार्यांच्या पूर्ण जीवन चरित्रात अनेक चमत्कार घडलेले दिसून येतात. लोकांना त्यांच्या महानतेची जाणीव झाली. जनमानसात त्यांचा दबदबा वाढला , त्यातूनच आचार्यांना धर्मप्रसार करणे शक्य झाले. ते धर्मयोद्धा होते. आज इतक्या वर्षांनंतरही त्यांच्या ह्या कार्याचा अनुभव घेता येतो.

आचार्यांचा जीवनकाल अवघा ३२ वर्षांचा आहे. ३२ व्या वर्षी केदारनाथ येथे कैलासगमन केले . 

Life of Shankaracharya - The Adventures of a Poet Philosopher
Four Shakti Peethas 
by Adi Shankaracharya
आपल्यासारख्या सामान्य लोकांना आदी शंकराचार्यांची ओळख त्यांच्या अनेक श्लोक / स्तोत्रांमुळे झालेली आहेच. त्यांनी अनेक अष्टके रचली. भज गोविन्दम, चिदानंद रूपः शिवोहं शिवोहं, कनकधारा स्तोत्र, पांडुरंगाष्टक अशी अनेक स्तोत्रे सर्वांना परिचित आहेत. ही सर्व स्तोत्रे प्रवाही, रसाळ, अर्थगर्भ तर आहेतच पण त्याला गेयताही आहे. त्यामुळे म्हणतांना एक वेगळाच आनंद मिळतो. अगदी सामान्य लोकांनाही परमार्थाचा शुद्ध, सोपा मार्ग समजावा म्हणून म्हणूनच ह्या स्तोत्रांद्वारे भक्तिभाव, श्रद्धा जनमानसांत रुजविण्याचा प्रयत्न त्यांनी केला.

आपल्याला त्यांच्याकडून मिळालेली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पंचायतन पूजा. विविध पंथांमुळे निर्माण झालेला उपासनाभेद टाळता यावा आणि त्यातून निर्माण होणारे तंटे सोडवावेत म्हणून त्यांनी पंचायतन पूजा सुरु करण्यास लोकांना प्रवृत्त केले. हाच समन्वय त्यांनी अनेक ठिकाणी साधला आहे.

साधनेच्या बळावर सत्य सिद्धांत शोधून काढणारे, लोकांना ज्ञान देणारे, सदाचार, सन्नीती ह्यांचा आदर्श असणारे हे प्रेरणादायी चरित्र. 


माणसाने अशी थोरवी संपादन केली पाहिजे की पिढ्यानपिढ्या हे गुण गात राहावे. सर्व विश्वाचे मंगल करण्यासाठी पृथ्वीतलावर अवतार घेतलेले सर्व संत मायेच्या वात्सल्याने समाज घडवीत असतात. आचार्यांप्रमाणेच संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास ह्या सर्व संतांनी आजवर केलेल्या तपश्चर्येवरच आज आपण सुसह्य जीवन जगत आहोत.

आचार्यांच्या जयंती दिनानिमित्ताने, आधुनिक महिपती संतकवी दासगणू महाराज ह्यांनी लिहिलेल्या रसाळ, प्रासादिक शंकराचार्य चरित्रामुळे एका अलौकिक, अद्भुत योग्याचा जीवन परिचय करून घेता आला. इतक्या वर्षांनंतरही   शंकराचार्यांचे कार्य अजूनही कसे टिकून आहे या उत्सुकतेपोटी त्यांचे चरित्र आणि वाङ् मय अभ्यासले तर आत्मानंदाची अनुभूती नक्कीच येईल.



स्नेहा भाटवडेकर 
विलेपार्ले ,मुंबई 
sneha8562@gmail.com


















3 comments:

  1. सुंदर मांडलय संक्षीप्त सारांश वाचुन चरीत्र वाचनाची प्रेरणा मिळते.

    ReplyDelete
  2. अतीव स्तुत्य उपक्रम

    ReplyDelete
  3. सुंदर लिहिले आहेस .पोथी कुठली?

    ReplyDelete