ll श्री शंकर ll
ll छंद हाच रे दिवस - यामिनी ll
धडधडत Deccan Queen
पुण्याकडे
निघून गेली. नक्की सहा वाजले
असणार. घरी जायलाच हवे, नाईलाजानेच रंगात आलेला खेळ आवरता घेतला. सवंगड्यांचा निरोप घेऊन
घराकडे धूम ठोकली, हो नाहीतर मार मिळेल. हातपाय धुवून काकाआजोबांच्या खोलीत गेले.
करड्या नजरेने आजोबानी माझ्याकडे बघितले. नावाप्रमाणेच नरसिंह आजोबा
कडक शिस्तीचे होते. "हं, चला करा सुरुवात" परवचा
म्हणायला सुरवात झाली. शुभंकरोती कल्याणम पासून रामरक्षेपर्यंत ओळीने सर्व स्तोत्रे
ते म्हणून घेत. आजोबा स्वतः विद्वान पंडित होते, सर्व स्तोत्रे
मुखोद्गत होती. त्यांच्यामुळे अगदी लहान वयातच आमची बरीचशी स्तोत्रे पाठ झाली
होती. ह्या पाठांतराचा शाळेत मला फायदाच होई. कधी ऑफ पीरेडला वर्गात मला हि स्तोत्रे
म्हणायची संधी मिळत असे आणि त्यानंतर पाठीवर कौतुकाची थाप पडली कि अस्मादिकांची
कॉलर एकदम ताठ.
![]() |
वचनं मधुरं l चरितं मधुरं ll
मधुराधिपते l अखिलं मधुरं ll
|
यथावकाश मुलींना पार्ल्यातच भिडे बाईंच्या संस्कार वर्गात घातले. तिथे
त्यांनी संस्कृत संभाषण आणि विविध स्तोत्रे मुलींना शिकवली. माझ्या वाढत्या वयाबरोबर ह्या स्तोत्रांकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन
बदलला. स्तोत्रांचे अर्थ, त्यातील भावोत्कटता आणि रोजच्या
व्यवहाराशी त्यांची सांगड ह्याकडे मी
विशेष लक्ष द्यायला सुरवात केली. दैनंदिन जीवनात हि स्तोत्रे कशी आचरणात आणता येतात
ह्याचा प्रत्यय येऊ लागला.
पुढे फळणीकर बाईंची भेट झाली. त्या चौथी पर्यंतच शिकल्या होत्या,
पण
गीतेवर मात्र त्यांचे प्रभुत्व होते. त्यांच्याकडे
मी भगवद - गीतेची संथा घेतली. आपल्या संस्कृतीचा हा अमृततुल्य ठेवा,
त्याच्या
पठणात आता मी स्वतःला हरवून बसले. सतत तोच छंद लागला. गीतेच्या पाठांतराबरोबरच
त्याच्या तत्वज्ञानाचीही गोडी लागली आणि मग वेळ कमीच पडू लागला.
१९९४ सालं तर आमच्या साठी विशेष महत्वाचे ठरले. सद्गुरू वरदानंद भारतींची भेट झाली. त्यांचा भर विष्णुसहस्र नाम स्तोत्रावर होता. त्याचे महत्व खूप होते आणि आता नित्य
पठणात त्याचा समावेश होता. दिवसभर तुम्ही कितीही, कधीही, कुठेही हे स्तोत्रं
म्हणा. त्याला बंधन कुठलेच नाही. पण आम्ही
मात्र त्याच्या बंधनात इतके अडकलो कि आता तो आमचा श्वास झालाय. त्यामुळे कधीच
एकटेपणा वाटत नाही कि कसला कंटाळा येत नाही. नारायणाचे सतत स्मरण राहते. सहस्रनामाचे उच्चारण म्हणजे
चौरस आहार, जीवनाचा भक्कम
आधारच..
काही बायका श्रीसूक्त म्हणताना ऐकले आणि आपल्याला
हे यायला हवे, असे मनोमन वाटले. शिवमहिम्न स्तोत्रं हि असेच ऐकून छान वाटले, पण ते हि खूप
कठीण असल्यामुळे कोणीतरी शिकवायला पाहिजे होते. माझी हि इच्छा उशिरा का होईना पूर्ण
झाली. बाबांनी त्यांच्या अगदी अखेरच्या दिवसांत आम्हांला आयुष्यभर पुरेल अशी हि
शिदोरी दिली.
असा माझा छंद मला दिवस रात्र वेड लावतो आहे. त्या नित्य पठणाबरोबरच मी
सतत नवीन काही शिकण्याचा ध्यास घेते. सध्या सूर्य मंडळ ह्या स्तोत्राने मला झपाटले
आहे. मी अगदी त्याच्या प्रेमातच आहे इतके मला ते आवडलंय.शंकराचार्याचीही अशी अनेक
स्तोत्रे मनाला भुरळ घालतात. म्हणायला, पाठ करायला अतिशय कठीण असलेली हि
स्तोत्रे खूप आशयगर्भ आहेत. आचार्यांनी इतक्या लहान वयात हि कशी रचली असतील ह्याचे
आश्चर्य वाटते. त्यांत विविधताही खूप आहे.

मन चिंतेत असेल, अस्वस्थ असेल तेव्हा हि ठेव आपल्याला
आश्वस्त करते. आज बाहेरच्या भीषण परिस्थितीत मनाचा समतोल साधता येतो तो
ह्यामुळेच. हा कठीण काळ स्तोत्रं पठणात कधी आणि केव्हा संपून जातो ते समजतही नाही.
पुढे उतार वयात बाकी सगळी इंद्रिये अकार्यक्षम झाली, तरी मनोमन सामावलेले हे नाम, आपत्काळात आपल्याला उपयोगी ठरेल हा
विश्वास नक्कीच आहे.
भवभय हरण करणारा, सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा दुसरा छंद असू शकेल का ?
Sneha Bhatawadekar
sneha8562@gmail.com
No comments:
Post a Comment