Friday, January 2, 2026

 ।।  श्री शंकर ।। 


माझा देश माझा धर्म  


कॅलेंडर नूतन वर्ष २०२६ च्या सर्वांना शुभेच्छा . नवीन वर्ष सुरु झाले की प्रत्येक जण काही ना काही संकल्प करतोच. काही वैयक्तिक तर काही समाजासाठी. कुटुंबातील व्यक्ती , मित्रपरिवार ह्यांच्यावर प्रेम करायला, त्यांची काळजी घ्यायला कोणाला सांगावे लागत नाही. पण समाजातील विविध घटक ,समाजाला सुस्थितीत ठेवणाऱ्या निसर्ग , प्राणी ,परिसराची स्वच्छता ह्या गोष्टींवर पण प्रत्यकाने आपले योगदान देणे हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे . तोच संकल्प ह्या वर्षासाठी केला तर ? 

प्रत्येक समाजाचा, राष्ट्राचा  महत्वाचा घटक म्हणजे नागरिक . समाज  किंवा राष्ट्राचा विकास / उत्कर्ष साधायचा असेल , राज्य सुस्थितीत चालवायचे असेल तर काही नियमांची / कायद्यांची  आवश्यकता असते. ह्या नियमांचे पालन करणे म्हणजेच नागरिक धर्माचे पालन. 

धर्माची व्याख्या काय ? ... धारण करतो तो धर्म. धर्माचे पालन केल्याने समाजाची धारणा होते. विशिष्ट परिस्थितीत  वैयक्तिक आणि समाजाचे हित  राखले जावे म्हणून जे नियम , कायदे केलेले असतात त्यांचे पालन करणे म्हणजे धर्म. व्यष्टि धर्मापेक्षा ( व्यक्ति ) - समष्टी धर्म ( समाज ) अधिक व्यापक  असतो. पण नीती-- नियम तेच. ज्या समाजांत , गावांत , देशांत आपण राहतो त्या समाजातील नागरिक म्हणून त्या देशाच्या घटनेचे पालन करणे आणि इतरांनाही तसे वागायला प्रवृत्त करणे , त्यासाठी समाज जागृती करणे आवश्यक आहे. 

नागरिक धर्माचे पालन  रोजच्या जीवनांत सुद्धा आपण करतच असतो.आणि ते करायलाच हवे.  

 उदाहरणच  द्यायचे तर ..  आपल्या  रोजच्या व्यवहारांतील जगण्यासाठी आवश्यक घटक  ...  अन्न ,वस्त्र,निवारा ... ह्या  मूलभूत गरजा. आपण लहानपणी शाळेत हे  शिकलोय   ... जसजसे वयाने मोठे होतो , तेव्हा जाणवते ते ह्या मूलभूत गरजांमागे असलेले सृष्टी रचनेचे महान तत्व. आपला जीवनाचा आधार म्हणजे   पांच  तत्वे. म्हणजेच पंचमहाभूते. निसर्गाने आपल्याला  बहाल केलेली ही  तत्वे .  त्याचे महत्व प्रत्येक व्यक्तीने / भूतमात्राने जाणायला हवे. 

पंचमहाभूते म्हणजे ... 
१ ) पृथ्वी--स्थिरता   २ ) आप -- पाणी ३ ) तेज - प्रकाश ४ ) वायू -- हालचाल, चैतन्य ५ ) आकाश -- पोकळी ,शब्द 

 पंचमहाभूते आपल्याला  रोजचे जीवन जगण्यासाठी  साहाय्य करतात.ह्यांच्या शिवाय आपले जगणे अगदी अशक्य आहे.  ही पंचतत्वे  म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेले  वरदान.तेही  अगदी मुबलक प्रमाणांत आणि विनामूल्य.  ह्या पंचतत्वांचा  समतोल राखला तरच सृष्टीचे चक्र अव्याहतपणे सुरळीत  चालू राहील. 

ही  जी  पांच तत्वे आहेत  त्यांचा योग्य वापर ,त्यांचे रक्षण , संवर्धन  ही  सुजाण नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे. आपले कर्म हे सुयोग्य म्हणजे धर्माच्या सुविहीत चौकटीत बांधलेले असावे आणि त्यासाठी विवेक बुद्धीचा वापर करणे गरजेचे असते. .   

वसुंधरेला आपण धरणीमाता म्हणतो .तिला वंदन करून  तिची पूजा करतो. तिला  सुजलाम , सुफलाम बनवणे, पर्यावरणाचे रक्षण करणे , प्लास्टिक चा अतिवापर टाळणे आणि प्रदूषणापासून तिला मुक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. 

नद्यांना पण आपण मातृस्वरूप मानतो. जल म्हणजेच जीवन. जलाचा वापरण्यायोग्य  साठा  मर्यादित आहे. जलाअभावी मानवसृष्टीचा अंत होईल. आपल्या आवश्यकतेनुसार काटकसरीने  पाणी वापरणे, त्याचे प्रदूषण थांबवणे हे गरजेचे आहे.  आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा स्वच्छ ,शुद्ध  पाणी मिळणे  महत्वाचे आहे. 

सद्य परिस्थितीत राहणीमान उंचावले आहे. विषयोपभोगांत वाढ झाली आहे. चंगळवादाचा पुरस्कार वाढला आहे.त्याचे अनिष्ट परिणाम आपल्याला आणि तरुण पिढीला भोगावे लागणार आहेत. दासबोधांत समर्थांनी सांगितले आहे ... " वाया दवडणे हा धर्म नव्हे " ... हे नैसर्गिक साठे  काळजीपूर्वक वापरायला हवेत.  

ऐहिक विकास साधतांना नैतिक मूल्यांचे पालन ही  आपली सर्वांची नागरिक म्हणून जबाबदारी आहे. ईश्वराकडून फक्त माणसालाच  मन ,बुद्धी आणि विचारांची देणगी लाभली आहे.त्याचा वापर धर्मपालनासाठी करायला हवा.  उत्तम संस्कारांच्या बळावर मानवता धर्माचे पालन करणे आणि " खरा माणूस " बनणे  हा आपला धर्म आहे. 

देशांवर कोणतीही आपत्ती आली तर ह्या धर्माचे पालन अधिक  जागरूकतेने व्हायला  हवे. पांच वर्षांपूर्वी केवळ आपल्या देशांवर नाही तर सर्व जगावर आलेल्या महामारीच्या काळांत , अतिशय बिकट परिस्थितीत आपण नागरिकांनी अतिशय धैर्याने ह्या संकटाचा सामना केला ही  अभिनास्पद घटना आहे. 

लोकशाही मध्ये आपल्याला सर्व गोष्टी करण्याचे  " स्वातंत्र्य " मिळाले आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा केला.  आपल्या मर्यादा सांभाळून ह्या स्वातंत्र्याचा  उपभोग स्वविकास आणि देशाच्या प्रगतीसाठी होणे अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षांत असे घडते का ? नागरिकशास्त्र आपण शाळेत शिकतो पण प्रत्यक्ष  जीवन व्यवहारांत ते शास्त्र आचरणांत आणले जात नाही. रस्त्यावरील रहदारीचे नियम हे सर्वांच्या फायद्यासाठीच केले असले तरी त्याचे योग्य रितीने पालन होते नाही आणि अनेकांना अपघाताला  सामोरे जावे लागते. 

प्रत्येक  नागरिकाला सुख ,शांतीपूर्ण जीवन जगावे असे वाटत असते.  आपले कर्तव्य प्रत्येकाने चोख बजावले तर समाजांत / देशांत आनंदी वातावरण राहील. ' सबका साथ ... सबका विकास ' ... साधायचा तर नागरिक म्हणून हा विश्वास आपण सार्थ  करायला हवा. घटना , कायदे कितीही केले तरी जोपर्यंत आपल्या मनांत आपल्या देशाविषयी प्रेमभावना निर्माण होत नाही आणि देशबांधवांसाठी करूणा  उत्पन्न होत नाही तोपर्यंत कवियत्री बहिणाबाईंच्या प्रश्नाचे उत्तर आपण देऊ शकणार नाही.बहिणाबाई त्यांच्या कवितेत म्हणतात ..... 

 " मानसा ! मानसा ! कधी व्हशील मानूस ? ? "

एक नागरिक म्हणून मानवता धर्माचे पालन करणे  हा आपला सर्वश्रेष्ठ धर्म आहे. सर्वतोपरी त्याचे पालन आपण  सर्वजण  करूया. 


सौ . स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई.. 

मोबाईल नं . ९८३३०१७०७४

०२/०१/२०२६







Wednesday, June 25, 2025

महाकवी कालिदास विरचित : श्यामला दंडक स्तोत्र

       ।।  श्री शंकर  ।।

श्यामला दंडक स्तोत्र 

" षाढस्य प्रथम दिवसे " ... हा दिवस आपण महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा करतो. 

प्राचीन भारतांतील सर्वांत महान कवी आणि नाटककार म्हणून  संस्कृत वाङ्मयांत कालिदासाचे स्थान सर्वोच्च आहे. त्याच्या साहित्यांत सुंदर निसर्ग वर्णन आढळते. तसेच हिंदू पुराण  आणि तत्वज्ञानाचा मिलाफ दिसतो.   शाकुंतल, कुमारसंभवम , मेघदूत  आदी त्याचे साहित्य हे उत्कृष्ट प्रतिभेचे शिखर  आहे. कालिदासाचा  काळ हा चौथ्या - पाचव्या शतकातला आहे. पण त्याच्या साहित्याचा प्रभाव आजही जवळजवळ दोन हजार वर्षांनंतर जनमानसावर  दिसून येतो. 

मंडळी , आज सर्वजण महाकवी कालिदास , कविकुलगुरू  म्हणून त्याचा सन्मान करतात.पण  कालिदासाचा हा साहित्यसम्राटापर्यंत पोचण्याचा प्रवास अजिबातच सोप्पा नव्हता बरं का ! त्याच्या ह्या प्रवासातील अनेक सुरस , रम्य कथा प्रसिद्ध आहेत. 

 धनगर जातीतला कालिदास , ( खरं तर त्याचं मूळ नांव , गांव ह्याची नक्की माहिती उपलब्ध नाही ) अक्षरशत्रू होता. गाईगुरे चरायला नेताना तो रस्त्यावर फिरत असे.  तिथल्या राजाची राजकन्या  फार अहंकारी होती  , तिला तिच्या विद्वत्तेचा खूप गर्व होता  ..  आपल्या प्रश्नांना योग्य उत्तरे देणाराच पती मला मिळावा अशी तिची अपेक्षा होती . अनेक विद्वानाना सुद्धा ती पती म्हणून  नाकारते. शेवटी प्रधानजी म्हणतात एखादा  अक्षरशत्रूच हिला पती म्हणून मिळावा. कालिदास रानांत गुराखी म्हणून गुरांना चरण्यासाठी नेत  असताना  प्रधानजी त्याच्या जवळ जातात. त्याला राजपुत्राचा पोशाख घालून राजकन्येचा विवाह त्याच्याशी लावून देतात .विवाहापूर्वी राजकन्या कालिदासाची परीक्षा घेते.  कालिदास मानेनेच राजकन्येच्या प्रश्नांची हो / नाही उत्तरे देतो  , त्याची बरीचशी   उत्तरे नेमकी बरोबर येतात . राजकन्येला वाटते  हा खूप हुषार  ,व्यासंगी आहे.विवाहानंतर तिला कळून चुकतं की आपला पती निरक्षर आहे.त्याला " साहित्य " म्हणजे काय हेही माहित नाही. हे समजताच राजकन्या त्याची खूप निर्भत्सना करते. आणि राजमहालातून  त्याला बाहेर काढते. कालिदास हा अपमान सहन करून  तिथून निघून  जातो. तो थेट कालीमातेचे मंदिरात पोचतो. तिथे तो तिची दीर्घ काळ  घोर उपासना करतो . जोपर्यंत देवी संतुष्ट होत नाही तोपर्यंत तो स्वतःला तिथे कोंडून घेतो.  त्याची श्रद्धा आणि निष्ठा बघून कालीमाता त्याच्यावर अतिशय प्रसन्न होते. कालीमाता त्याला विचारते, तुला काय हवं ? कालिदास अतिशय नम्रपणे म्हणतो , मी निरक्षर आहे.तू सरस्वती रूपाने  माझ्या जिव्हाग्री  वसती कर .  सरस्वती त्याची इच्छा पूर्ण करते. वाणीचा विलास करणारी " वाग्विलासिनी " त्याच्यावर कृपेचा वर्षाव करते. कालीचा  उपासक म्हणून ते  - कालीचा सेवक - काली दास - कालिदास " नांव धारण करतात  . तिच्या कृपेला पात्र ठरल्यावर कालिदास  तिचे  स्तुतीपर कवन  रचतो. तेच  " श्यामला दंडक " स्तोत्र .

 आजच्या दिवसाचे औचित्य साधून ह्या स्तोत्राचा  थोडा परिचय करून देत आहे.  हे स्तोत्र अतिशय नादमय , रसाळ , अनुप्रासयुक्त आहे.अनेक उपमा आणि रूपकांचे प्रयोग  महाकवी कालिदासांनी इथे  केले आहेत.  .  

मी गेल्या वर्षी प्रथमच  हे स्तोत्र  ऐकले .  त्या स्तोत्राची मोहिनी जबरदस्त होती. हे स्तोत्र मोठे आहे.  संस्कृत भाषा आणि कालिदासाचे शब्दसामर्थ्य. त्यामुळे  म्हणायला अवघड. एकेक पल्लेदार वाक्य म्हणताना श्वास रोखून  धरावा लागतो. ( Breathless ) पण तरीही  हे स्तोत्र नियमितपणे  म्हणण्याचा प्रघात ठेवला आहे . 

दंडक हा एक छंद आहे. त्यात १० मात्रl  असतात. काही वेळा ओळीत २६ पेक्षा जास्त अक्षरे असतात. लयबद्ध , प्रभावशाली असा हा छंद आहे. स्तोत्र पठाण करताना त्या नादब्रह्मात आपणही  तल्लीन होतो. 

स्तोत्रांतील पहिल्या ४  चरणांत देवीचे नमन केले आहे.  देवीच्या विभिन्न रूप आणि गुणांचे यथार्थ  वर्णन केले आहे. विश्वाच्या सर्व वस्तुमात्रात असलेले तिच्या  अस्तित्वाचे , सर्वसर्वात्मिके , वर्णन आहे . शेवटी तिचा जयजयकार करून तिची कृपा संपादन व्हावी म्हणून प्रार्थना केली आहे.  अशी ह्या स्तोत्राची ढोबळ रचना. 

सरस्वती देवीचे सौंदर्य , तिची शक्ती , तिची कृपा ह्याचे अतिशय समर्थ शब्दांत  वर्णन केले आहे. श्यामला म्हणजे नीलवर्णी अशी ही  देवी कदंब वनांत वास करते. पृथ्वी हेच तिचे आसन आहे. नीलमण्याप्रमाणे तिचे मुख सुंदर , तेजस्वी आहे. ती शुकप्रिया आहे. तिच्या कपाळावर कस्तुरी तिलक आहे. हातात कमलपुष्प आहे. तिची दंतपंक्ती म्हणजे जणू चमेलीच्या पुष्पांची मालाच .तिचे कटिसूत्र कामदेवाच्या धनुष्यापेक्षाही अधिक  उजवे आहे.. आकर्षक आणि लयबद्ध  अशी तिची चाल  ,( चांदणे उधळीत जाशी चालता  तू चंचले .. ह्या काव्यपंक्तींची आठवण इथे होते ) . अशा अनेक उपमा इथे मुक्तहस्ताने उधळल्या आहेत. पठण करताना ते काव्य अतिशय मधुर आणि रंजक वाटते. वानगीदाखल त्यांतील  काही ओळी उद्धृत केल्या आहेत ... 

" सर्वसिद्ध्यात्मिके कालिके मुग्धमन्दस्मितोदारवक्त्रस्फुरत् पूगताम्बूलकर्पूरखण्डोत्करे ज्ञानमुद्राकरे सर्वसम्पत्करे पद्मभास्वत्करे श्रीकरे, कुन्दपुष्पद्युतिस्निग्धदन्तावलीनिर्मलालोलकल्लोलसम्मेलन स्मेरशोणाधरे चारुवीणाधरे पक्वबिम्बाधरे " 

शारदा  ही संगीत , कला , ज्ञानाची देवी .. ती वीणा , पुस्तक धारिणी आहे. शीतलता , शांतता प्रदान करणारी आहे.  समस्त कलांची मूर्ती आहे. तीनही लोकांत ती पूजनीय आहे. इंद्र, यक्ष , गंधर्व ,ऋषी , तपस्वी, साधू तिची पूजा करतात. सर्वाना क्रियाशील करण्याचे सामर्थ्य  तिच्यात आहे. 

" पंचबाणात्मिके " पंचबाण धारण करणारी ( शब्द, स्पर्श, रूप ,रस गंध ह्या पांच तन्मात्रा ) ही जगन्मातृका . अखिल विश्वाची  ही जननी.ही  प्रेमदेवता आहे. मन्मथ आणि रतीदेवी  वसंत ऋतूच्या आगमनसमयी हिची पूजा करतात.   

कलावंतांना सुयश प्राप्त करून देणारी ही  विश्वमोहिनी आहे.  संसारी लोकांच्या सर्व कामना पुरविणारी, त्यांना धन- सुख प्रदान करणारी देवता. 

ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत ह्या वाग्विलासिनीचे सौंदर्य त्यांच्या नमनाच्या  ओव्यांमध्ये प्रकट केले आहे. माऊली म्हणतात : ती सृजनाची देवता आहे. वाणीविलास करणारी , वाणी नियंत्रित करणारी , चतुर आणि सहज क्रीडा करणारी आहे. 

संतकवी दासगणू महाराजांनी तिची कृपा झाली असता  " मुकाही वदे  वेदांत गहन " असे सरस्वतीचे वर्णन केले आहे. 

तिची कृपा प्राप्त झाल्यावर कालिदासाचे व्यक्तिमत्व किती प्रभावी झाले हे आपण जाणतोच.

 तेलंगणा प्रांतातील " बासर " येथील सुप्रसिद्ध शारदेच्या प्रागंणात काही दिवसांपूर्वी माझ्या काही गीताव्रती सख्यांबरोबर  हे स्तोत्र पठण करण्याची संधी मिळाली. त्या स्तोत्राची शक्ती, दिव्यत्वाची अनुभूती घेता आली.

ह्या दिव्य शक्तीचा अनुभव घेऊन आपले जीवनही क्रियात्मक आणि कलात्मक व्हावे अशी ,शरदांतील पूर्णबिंब चंद्राप्रमाणे विकसित मुख असलेल्या , परब्रह्मस्वरूपिणी शारदा  मातेला मनोभावें  प्रार्थना :
सर्वसर्वात्मिके ! हे जगन्मातृके , पाही मां  , पाही मां , पाही मां ... 
 देवी तुभ्यं नमो । देवी तुभ्यं नमो । देवी तुभ्यं नम: ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले , मुंबई 

आषाढ शु. प्रतिपदा शके १९४७ 


https://vignanam.org/samskritam/shyamala-dandakam.html

( स्तोत्राची लिंक दिली आहे. )  

Saturday, April 19, 2025

नमामी देवी नर्मदे...

                            ।।  श्री शंकर ।। 


                            नमामी  देवी नर्मदे


चैत्र महिन्यातील विशेष पुण्यदायी मानल्या गेलेल्या उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेसाठी आम्ही म्हणजे माझी मैत्रीण स्मिता आणि इतर परिक्रमावासी गुजरात मधील  तिलकवाडा येथे जमलो होतो.बांद्रा बरोडा तिलकवाडा असा प्रवास करून आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी ७ वाजता पोचलो. एक दिवसाची ही  परिक्रमा साधारण २१ कि. मी. पायी करायला प्रत्येकाच्या क्षमतेनुसार ७ ते ८ तास लागतात. ही  परिक्रमा उत्तर तट ते दक्षिण तट आणि पुन्हा उत्तर तटावर येणे अशी वर्तुळाकार असते. 

 सलग आलेल्या सुट्टयांमुळे परिक्रमा मार्गावर खूप गर्दी आहे असे समजल्यामुळे जेवण झाल्यावर परिक्रमेचा संकल्प करून आम्ही अजिबात विश्रांती न घेता  रात्री ११.३० वाजताच परिक्रमेला उत्तरतटावरून  सुरुवात केली. 

वाटेत लागणाऱ्या मंदिरांचे दर्शन घेत मजल दरमजल करत  आम्ही आता मैयेच्या किनाऱ्यावर येऊन पोचलो होतो.मैयेचे पात्र मोठे होते. नुकतीच पौर्णिमा झाली होती. आकाशातील  पूर्ण  चंद्राचे प्रतिबिंब नदीत पडले होते. चंद्राची शांत शीतल साथ चालताना मनामध्ये आनंदाच्या लाटा उसळवित होती. चालत होतो तो  रस्ता मातीचा , सरळ आणि मोठा होता. आजूबाजूला बरेच भिक्षेकरी रात्रीची वेळ असूनही भिक्षा मागत होते. मार्गक्रमण  करीत आम्ही नंदीघाटावर पोचलो. तिथे विविध मोठ्या आकारातील  शिवलिंगे खास परिक्रमेच्या निमित्ताने  बनविली होती . अनेक भक्त ह्या ठिकाणी फोटो घेण्यात मग्न होते. इथूनच पुढे आता बोटीने उत्तर तट ओलांडून रामपूरा  इथे म्हणजे दक्षिण तटावर जायचे होते. जवळजवळ अर्धी परिक्रमा मैयेच्या कृपेमुळे पार पडली होती. 

हळूहळू रात्रीचा अंधार विरघळत होता.  सगळा  आसमंत केशरमिश्रित लाल भगवा होऊ लागला  होता . चराचर सृष्टी अरुणोदयाच्या प्रतीक्षेत होती. नर्मदा  मैयेचा उत्तरतट पार करून आम्ही परिक्रमावासी आता माईच्या अगदी निकट आलो होतो.तट परिवर्तन केल्यावर प्रथम स्नान केले. नर्म आणि शर्म असे नर्मदा नदीचे केलेले वर्णन अगदी योग्यच आहे. उदरांत क्रूर आणि अजस्त्र मगरींना  आश्रय देऊनही ती माउली अगदी शांतपणे वाहात  असते. नर्मदा कन्या  रूपांत प्रगट  झाली आहे. तरीही ही  बालिका अवखळ नाही तर धीर गंभीर आहे. 

 माईच्या  स्पर्शाची ऊब अनुभवायला आता आम्ही उत्सुक होतो. किनाऱ्यावरच पथारी  पसरून बरोबर आणलेले पूजेचे सर्व साहित्य मी बाहेर काढले. हळदीकुंकू वाहून मातेची साडी चोळीने ओटी भरली. प्रसाद दाखविला. अलगद तिच्या पात्रांत दीप सोडले. दिव्याची ज्योत प्रज्वलित करताना प्रत्येक दिव्याबरोबर त्या त्या व्यक्तीच्या आठवणीने उर भरून येत होता. हेलकावे खात दिवे लांब वरच्या प्रवासाला निघाले होते. साश्रू नयनांनी मी ते मनोहर दृश्य डोळ्यांत सामावून घेत होते. 

घाटावर अनेक भाविकांची गर्दी झाली होती.कोणालाच वेळकाळाचे भान नव्हते.  सगळेच मय्येचे पूजन करण्यात मग्न होते. सेवेकऱ्यांचे अनेक स्टॉल बाजूला होते आणि परिक्रमा करणाऱ्या भक्तांसाठी चहा , नाश्ता विनामूल्य पुरवत होते. त्यांच्या सेवाभावाला  आणि डोळ्यात तेल घालून स्वतःचे कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलिसांना मनोमन वंदन  करून आता पुढची वाट चालायला सुरवात केली . आधीचे  अंतर माऊलीचा पदर धरून कसे पार झाले ते कळलेही नाही. आता पुढचे काही  अंतर पक्क्या सडकेवरून पार करायचे होते. 

ह्या मार्गावर दुतर्फा हिरव्यागार केळीच्या दाट  बागा नजरेस पडत होत्या.कच्ची केळी , केळफूल आणि केळीची भलीमोठी पाने...केळीच्या वासाने हवेत एक वेगळाच गंध  पसरला होता. कापसाची झाडेही बरीच होती.  अधून मधून तयार झालेल्या कापसाच्या बोन्डातून शुभ्र कापूस बाहेर डोकावत होता.रस्त्यावर अनेक भलेमोठे वटवृक्ष दिसले. अनेक लोम्बणाऱ्या पारंब्या रस्त्याला स्पर्श करत होत्या. ध्यानस्थ ऋषींप्रमाणे हे वटवृक्ष साधनेला बसले आहेत असे वाटत होते.  वाटेत छोटी छोटी  गांवे ,अनेक देवळे आणि आश्रम होते. वाटेवर बसलेल्या  निराधार स्त्रिया लहान मुलांना घेऊन त्या आड वेळीही आमच्याकडे मदतीची याचना करीत होत्या. जमेल तशी मदत करत  आम्ही पुढे पुढे चालत होतो.  टाळ आणि नाम गजरांत  अनेक समूह परिक्रमेची वाट तल्लीन होऊन चालत होते. आता आमच्या  पायांची गती  हळूहळू कमी कमी होऊ लागली. पायातली चेतना हरवल्यासारखे पाय जड झाले होते. पण मनातल्या मनांत भोले - शंकर आणि नर्मदे हर चा जप चालू होता. तोच जप मार्गक्रमण करण्यासाठी बळ देत होते. 

सीताराम बापूंच्या आश्रमात पोचलो तेव्हा तिथे घंटानाद चालू होता.तिथल्या मंदिरात  हनुमानाचे दर्शन घेतले. चहा घेऊन थोडी तरतरी आली आणि पायऱ्या उतरून पुन्हा माईच्या प्रवाहाबरोबर पाऊले पुढची वाट चालू लागली. परिक्रमेचा पुढचा आणि शेवटचा दोन कि.मी.चा टप्पा आता समोर दिसत होता. पण हा अंतिम मार्ग आक्रमित करायला जरा जास्तच वेळ लागला. पलीकडच्या तटावर जाण्यासाठी भव्य कमान भाविकांच्या सेवेसाठी उभारली होती. प्रातःसमयीची आरती घाटावर चालू होती. धूप दीपांचा संमिश्र वास दरवळत होता. बरेच चालल्यामुळे झालेली थकावट  सर्वांच्याच चेहेऱ्यावर दिसत असली तरी परिक्रमा पूर्ण करण्याचा उत्साह आणि जिद्दही  दिसत होती. वयस्कर मंडळींबरोबरच तरुण जोडपी मुलाबाळांसहित सहभागी झाल्याचे पाहून आनंद वाटला. 

दक्षिण तट ओलांडून आम्ही आता पुन्हा तात्पुरत्या  बांधलेल्या पुलावरून  उत्तर तटावर पोचलो होतो.  समोर पायऱ्या पायऱ्यांची डोंगरावरील वाट दिसत होती. पण हे अंतर पार करणे सुद्धा आता कष्टाचे वाटत होते.  'जड झाले ओझे ' स्वतःचेच ओझे वाहून नेणे आता नकोसे वाटत होते. पण मैंयेने दिलेल्या बळावर  आम्ही वासुदेव कुटीर ह्या पवित्र वास्तूत प्रवेश केला आणि रामदास स्वामी स्थापित हनुमानाच्या मूर्तीसमोर नतमस्तक झालो.तिथेच प. पू .वासुदेवानंद सरस्वती स्वामींचेही दर्शन घेतले.आम्ही इतके दमलो होतो की आता इथून अजिबात हलूच  नये असे वाटत होते. पण थोडी विश्रांती आणि चहा नाश्ता घेऊन परत मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो. इथे आल्यावर नर्मदा माईचे प्रतिकात्मक पूजन म्हणजेच  ११ कन्यांचे पूजन केले आणि आमच्या परिक्रमेची सांगता झाली. 

नर्मदा मैंयेच्या कृपेमुळेच सुमारे २१ कि. मी. चा परिक्रमा मार्ग आम्ही आठ तासात पूर्ण केला होता. आणि असाध्य वाटणारी गोष्ट साध्य करता आली , ह्याचा आनंद मनात दाटून आला होता. परिक्रमेला निघण्यापूर्वी साशंक असलेले मन आता निश्चिन्त झाले होते. आणि मैयेवरची श्रद्धा दृढतम झाली होती. तिच्याविषयी कृतज्ञता मनात दाटून आली .तिच्या प्रत्येक बिंदूत असलेले शिवतत्व जाणताना , तिचा  शांत प्रवाह  नजरेत साठवतांना ती दुःख निवारण करणारी देवी कित्येकांची आश्रयदाती  आहे हे समजून  मुखातून सहजोद्गार निघाले ... 

 " त्वदीय पादपङ्कजं नमामि देवी नर्मदे "

ह्या पुण्यप्रद , मनोहारी तीर्थाची परिक्रमा करताना अनोख्या अद्भुत शक्तीचा प्रत्यय आपल्याला येतो. इतके अंतर चालण्याची   खरं तर आपली शारीरिक आणि मानसिक पात्रता नसते.  सर्व भार तिच्यावर  सोडून , तिला शरण जाऊन सत्संकल्पाने बिकट वाट सुलभ कधी होते ह्याची जाणीवही तिच्या काठावरून तिच्या सोबतीने  चालताना होत नाही. अंगवळणी पडलेल्या शहरी जीवनाची झूल तिच्या सहवासात गळून पडते आणि तनामनाने आपण फक्त  तिचे होऊन जातो. 

रोजचे जीवन जगताना सुद्धा हेच परमेश्वराचे अस्तित्व , श्रेष्ठत्व आणि कर्तृत्व मान्य करून त्याचा हात धरून जीवनाची परिक्रमा केली तर सगळेच क्लेश मिटतील नाही का ?

जगताचे जीवन सुसह्य करणाऱ्या ह्या नद्यांचे  पावन आशीर्वाद ह्या निमित्ताने घ्यावेत , आपल्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडावे आणि जीवन आनंदी व्हावे हीच नर्मदा मातेकडे प्रार्थना... 

नमामी  देवी नर्मदे । नमामी  देवी नर्मदे ।।



सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

१९/०४/२०२५


Tuesday, January 14, 2025

चल, चल मेरे भाई

       || श्री शंकर ||


 चल, चल मेरे भाई 


नवीन कॅलेण्डर  वर्ष येतं ते नवीन संकल्प घेऊनच.वातावरणातील आल्हाददायी गारवा अधिकच उत्साह निर्माण करणारा . त्यात विलेपार्ले सारख्या मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीत ,रविवार ,सुट्टीचा दिवस असला की अनेक कार्यक्रम खुणावत असतात.

विलेपार्ले पूर्व येथे जेष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन आयोजित केलेली असते, पार्ले टिळक शाळेच्या भव्य पटांगणावर " कौशिकीच्या" मधुर स्वर मंडळाचे जबरदस्त आकर्षण असते आणि असेच अनेक रंगतदार कार्यक्रम आपल्या आयुष्यात रंग भरत असतानाच, काही संस्था सामाजिक जाणिवेतून काही उपक्रम लोकहितासाठी राबवतात.

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून , पार्ले पश्चिमेला असलेल्या स्वामी विवेकानंद मार्गावर आयोजित केलेल्या एका " वॉक " ने माझे लक्ष वेधुन घेतले.

" Walk for the social cause " -- to enhance the quality of life in Mumbai...

"Project Mumbai " ह्या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने हा वॉक सकाळी १० वाजता सुरू झाला.एक तासाच्या ह्या वॉकमधे रस्त्यावर चालताना मुंबईकरांना अनेक समस्यांना जे तोंड द्यावे लागते त्यांची नव्याने ओळख झाली.



रस्त्यावर जागोजागी थांबून तिथल्या रस्ते आणि पदपथांच्या बिकट अवस्थेची जाणीव करून देणाऱ्या आमच्या ग्रुप लिडरला पाहून अनेक जण उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे ह्या वॉकमधे सहभागी झाले.

मुंबई उपनगरातील " स्वामी विवेकानंद मार्ग " हा सर्वात लांब रस्ता ( २३.६ कि.मी.) आहे.अतिशय गजबजलेल्या, वर्दळीच्या ह्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक इमारती, ऑफिसेस, दुकाने, मॉल्स तर आहेतच पण शाळा,विद्यालये, महाविद्यालय,देवळे,चर्च ,हॉस्पिटल आहेत.त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयस्कर, रूग्ण इ.ची ये-जा सतत चालूच असते.त्यातच सध्या अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकासाची , रस्त्यांचे कॉक्रिटीकरण इ .  कामेही वेगाने सुरू आहेत.

अशा वेळी गर्दीचे लोंढे चुकवत, रहदारीतून वाट काढत स्वतःच्या जीव कसाबसा वाचवत पादचारी मार्गक्रमण करत असतात .त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या फुटपाथांची अवस्था , रस्त्यांप्रमाणेच दयनीय आहे.अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.पेव्हर ब्लॉक वरखाली झाले आहेत.एका ठिकाणी तर एक मोठे स्कॅफोल्डिंग बिल्डरने अगदी फुटपाथवरच उभे केले आहे. धार्मिक स्थळे , जी एक  संवेदनशील गोष्ट, त्यांनी जागा व्यापली आहे. फुटपाथवरच बसथांबे ही आहेत. ह्या थांब्यावर काही जणांनी स्वतःचा चक्क संसारही थाटला आहे.

रस्त्यावर चालताना किंवा तो ओलांडताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीच दिसत असतात  , पण आपण त्याकडे बघूनही दुर्लक्ष करतो.आहे त्याचा स्वीकार करून पुढे जातो. हे सर्व नित्याचे असल्याने अंगवळणी पडले आहे किंवा हे असेच असणार,आपण सामान्य नागरिक , आपण काय करणार असा विचार करून ह्या गोष्टींना गृहीतच धरले आहे.   रस्त्यावरून चालताना होणाऱ्या अनेक अपघाताच्या घटना (जोपर्यंत आपल्यावर कठीण प्रसंग ओढवत नाही) वर्तमानपत्रांत वाचतो पण  आपण त्याकडे गांभीर्याने बघत नाही.

पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते हा आपला अधिकार नाही का ? त्यासाठी नागरिकांनी प्रशासनावर दबाव आणला तर त्यातून काही चांगला मार्ग निघेल का ? इतर नागरिक ह्या मोहिमेत सहभागी होऊन हा प्रकल्प यशस्वी करु शकतील का ? असे अनेक मुद्दे ह्या वॉकच्या निमित्ताने highlight झाले.

स्वामीजी म्हणतात " We aim to channel our hard work into serving humanity" ... त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दाखविलेल्या प्रकाशवाटा उजळून निघाव्या...हीच प्रेरणा घेऊन ,जबाबदार नागरिक ह्या नात्याने,  मुंबईतील अनेक समस्यांना नुसते सामोरे जाण्याऐवजी त्यावर उपाययोजना करण्याऱ्या संस्थांना आपल्या परीने मदत करणे ही आपलीही जबाबदारी नाही का ? असा विचार  मनाशी बाळगून अशाच उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भेटायचं ठरवून समूहाचा निरोप घेतला.


 सौ.स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले, मुंबई 

१४/०१/२०२५



Monday, October 14, 2024

मार्ग सुखाचा

 

ll    श्री शंकर  ll

 

         

मार्ग सुखाचा

 

गाडीने नुकतेच कल्याण स्थानक सोडून दादरच्या दिशेने प्रस्थान केले. आळोखेपिळोखे देतच  ती उठली.           लो गरम चाय.. गाडीत विक्रेत्यांची ये जा सुरु झाली होती.तो आवाज , वर्दळ . मुंबईत पाऊल टाकल्यापासून  गजबजाट सुरु ...दोन दिवस किती आनंदात गेले

तिची नजर घड्याळाकडे गेली. सात वाजले की ! तिने खिडकीतून बाहेर डोकावले ...आज सूर्यनारायण हरवले कुठे ? एक क्षण काळ थांबलाय असा तिला भास झाला. दादर आलं तशी ती गाडीतून उतरली पण कशातच लक्ष नव्हतं. मन सैरभैर झालं होतं .असं काय होतंय आज ? तिच्या मनाचा थांग तिलाच लागत नव्हता. 

  तिला आठवलं , आईला फोन करून खुशाली विचारायची आहे. निघताना जरा बरं नाही असं म्हणाली होती.पंढरपूरचा सगळा वृत्तांत सांगायचाय तिला. मी कुठे बाहेरगावी जाणार की माझ्या परतीच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असते. माझा फोन आला की कोण आनंद होतो तिला ...

तिचे विचारचक्र चालूच होते .टॅक्सी ...तिने टॅक्सी थांबवली . तेवढ्यात अचानक भावाचा फोन आला आणि ती भानावर आली..काय ??? ती जोरात ओरडलीच.ह्या अनपेक्षित धक्क्यातून सावरणे खूपच कठीण होते. आईsss ,अगं ,अशी अचानक तू ??  दोन दिवसांच्या आनंदावर असं विरजण पडेल असं मनांत सुद्धा आलं नव्हतं.



लाडक्या विठुरायाला भेटायची ओढ नकळत तिला लागली होती .आयुष्यात पहिल्यांदाच ती पंढरपूरला आली होती. पौर्णिमेचा दिवस. चंद्राचे भलेमोठे पूर्ण प्रतिबिंब चंद्रभागेत पडले होते ..किनाऱ्यावरच असलेले पुंडलिकाचे देऊळ. तिथे जाऊन दर्शन घेताना तिला आईची मनोमन आठवण झाली. प्रत्यक्ष पांडुरंगाला तिष्ठत ठेवून आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक. त्याच वेळी  मंदिरातील घंटानादाने अंतर्बाह्य नादवलय निर्माण झाले. प्रवाहातील द्रोणात सोडलेले हेलकावे खात दूर दूर जाणारे दिवे ती बराच वेळ न्याहाळत होती.त्या ज्योतीशी तिची आत्मज्योत एकरूप झाल्याचं भास तिला झाला. आणि पांडुरंगाचे ते दुरून घेतलेले  तरीही पारणं फेडणारे  दर्शन. वैकुंठपूरी ती हीच. इतका आनंद ,समाधान तिला कधीच लाभलं नव्हतं.

जेमतेम घरी सामान टाकून धावतच ती माहेरी पोचली. पाझरणारे डोळे पुसतच ती घरात गेली. विझून गेलेली आईची नजर तिलाच शोधतेय असा भास  झाला. माझ्याशी  बोलण्यासाठी तिचे ओठ विलग झालेत ? किती शांत चेहरा ! अर्धोन्मीलित डोळे !   क्षीरसागरात पहुडलेल्या विठूरायाचाच भास तिला झाला.आईच्या पायाला तिने मिठी मारली..मात्यापित्याचं छ्त्र हरवलेली ती... आपण आता पोरके झालो…उराशी असलेल हे दुःख तिला सहन होत नव्हतं . 

पंढरपूरला जाऊन भेटलीस ना त्या माऊलीला ? तोच खरा जगताचा आधार. आता पुढची वाटचाल करायची ती त्याच्या सोबतच. सुखाचा शाश्वत मार्ग दाखवण्यासाटी मीच तुला पंढरपूरला पाठवलं होतं ...आईचा आवाज तिच्या कानांत घुमत होता. 

आजन्म आपल्या लेकरांची काळजी वाहणारं अथांग , आभाळभर पसरलेलं ते मातृत्व ...त्या चिरंतन मायेचा साक्षात्कार त्या दुःखद क्षणीही तिला दिलासा देऊन गेला..

 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर

विलेपार्ले पूर्व

१५/१०/२०२४




Wednesday, October 2, 2024

navratriche nau rang... नवरात्रीचे नवरंग

                                                                 ।। श्री शंकर ।।

                   नवरात्रीचे नवरंग 

उद्यापासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या ( आश्विन शुध्द प्रतिपदा ते नवमी ) 

 सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा ... 

सरस्वती ! नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि । कार्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।

बुद्धीची देवता श्री महागणपती आणि कार्यशक्तीला चालना देणारी ती महासरस्वती ... ह्या आदिशक्तीची विविध रूपे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांत पाहतो. ही निसर्गातील सृजनशक्तीला प्रेरणा देणारी. मातीची घट रूपाने होणारी पूजा ,त्यांत विविध धान्य पेरून  आलेली ती हिरवी रोपं हे आपल्या कृषिप्रधान देशाचं प्रतिनिधित्व करणारी  . 

कुमारिका पूजन ( अप्रगट शक्ति ) अथवा सुवासिनी पूजन ( प्रगट शक्ति ) हा शास्त्रविधी म्हणजे स्त्रीशक्ती अथवा मातृशक्तीचं पूजन. तिच्या विषयी वाटणारा आदर व्यक्त करताना होणारी तिची पूजा. घरासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या ,त्या स्त्रीचे कौतुक व्यक्त करण्याची ही सुयोग्य संधी. त्या आदिशक्ति रूपांत स्त्रीच्या विविध नात्यातील रूपांचे, गुणांचे साधर्म्य  बघायला मिळते. आणि तिची अलौकिक अशी मातृत्व शक्ती, वत्सलता . 

नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे. विविध रंगगंधांनी घरातले वातावरण सुद्धा प्रफुल्लित होते. विविध प्रकारचे  नैवेद्य अर्पण केल्यामुळे षड्रस निर्माण होऊन  आपलीही क्षुधा शांत होते. रसनिर्मिती होते. 

नवरात्रीत नऊ दिवस घरांत आपण अखंड दीपप्रज्वलन करतो. दीप हे तेजाचे प्रतीक. दीप तेवत ठेवल्यामुळे वायूमंडलातील शक्तीतत्त्व लहरींचे घरांत संक्रमण होऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि ह्या जीवाला ' चलते रहो  ' चा संदेश मिळतो.  आपल्या देहाचा अज्ञानरूपी घट नऊ दिवस तेलवात लावून ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून टाकावा ह्यासाठी करायची ही उपासना.ह्या उपासनेमुळे मन शांत ,प्रसन्न आणि स्थिर होतं . देवीची कृपा झाली कि सुख ,शांती आणि समाधान लाभते. हि आदिशक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी आहे. 

 मनामनांत दबा धरून बसलेले षड्रिपू मारून दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवायचा आणि बावनकशी सोनं लुटायचं , सिमोल्लंघन करायचं . आहारविहाराचं पथ्य ह्यावेळी पाळलं की देहाबरोबर मनांत सुद्धा सत्व प्रवृत्ती जागृत होते आणि हे क्षेत्र ( देह ) सुपीक ,सुफल होतं . मग खरा आनंदोत्सव साजरा होतो. 


नऊ दिवस नऊ विविध रंगांची वस्त्रे परिधान करावी का ह्यावरून अलीकडे  बराच उहापोह होत आहे. हे केवळ मार्केटिंग करता पसरवले जात आहे, ह्यांत व्यावसायिक लागेबांधे आहेत  आणि विविध प्रसारमाध्यमे ह्याला जबाबदार आहेत वगैरे वगैरे .अगदी कष्टकरी महिला ते उच्चपदस्थ ,कर्तबगार महिला त्या रंगांची वस्त्रे घालून जाताना दिसतात. त्यानिमित्ताने त्या दिवसाच्या रंगाची साडी परिधान करून वर्तमानपत्रांला आपली छबी पाठवणे आणि अनेकांची छबी तिथे  न्याहाळणे हा स्त्रीवर्गाचा नवरात्रीतील  आवडता उपक्रम. त्यानिमित्ताने वस्त्र - अलंकार उद्योगाची एकंदरच उलाढाल कल्पनेपलीकडे वाढली आहे . एखाद्या स्त्रीने " रंग माझा वेगळा " म्हणत दुसरा रंग निवडला तर अनेकांच्या भुवया उंचावतात असाही अनुभव आहे. 

नवरात्राचा आणि ह्या रंगांचा काही संबंध नाही ,काही मंडळी हे षडयंत्र मुद्दाम रचत आहेत असा  आरोप - प्रत्यारोपांचा खेळ रंगात ह्या निमित्ताने रंगात येतो.  

हल्ली बऱ्याच social  events मध्ये ठराविक रंगांचे कपडे परिधान करावेत अशी आवर्जून प्रेमळ  सूचना असते. आणि बरेच जण त्याला अनुसरून तसा dress code follow करतात. तो समूह अशा सारख्या रंगसंगतीतील पेहेरवामुळे उठून  दिसतो. फोटोना / सेल्फिना  उधाण येते. पती पत्नी सुद्धा twinning करतात. आजच्या जमान्याचा हा trend आहे.

मी माझा अनेक वर्षांचा वस्त्र-रंग परिधानाचा अनुभव ह्यानिमित्ताने इथे शेअर करतेय ज्याचा मला स्वतःला फायदा झाला. 

वीसपंचवीस  वर्षांपूर्वीची ही  गोष्ट असेल. आम्हा मैत्रिणींचा गप्पांचा फड मस्त रंगात आला होता. ग्रह ,तारे ,नक्षत्र, ज्योतिष असे त्या ठराविक तरुण वयांत भुरळ घालणारे विषय. एक मैत्रीण म्हणाली , रोजच्या वारानुसार ,ज्या ग्रहाचा जो  वार असतो , त्या ग्रहाच्या रंगाचे वस्त्र परिधान केले की त्याचा आपल्याला लाभ होतो. उदा. सोमवारी सोम ग्रह - त्याचा सफेद रंग म्हणून  पांढरे  , मंगळ ग्रह लाल असतो ,म्हणून मंगळवारी लाल वस्त्र परिधान केले की ते फ़ायदेशीर होते. काम चांगले होते, दिवस चांगला  जातो ,कामात व्यत्यय येत नाही इत्यादी इत्यादी ... झालं ...अस्मादिकांनी ते  नियमितपणे आचरणांत आणले.अगदी आजही .  ह्याचा  व्यावहारिक फायदा मला नक्कीच झाला. बघा हं ... रोज काय ड्रेस घालायचा हा प्रश्न पडलाच नाही .कारण सात रंगांचे सात कपडे माझ्याकडे होते. त्यामुळे वारांनुसार तो रंग घालायचा , वेळेची बचत. गरजा कमी झाल्या. कारण ठराविक रंगांचे ठराविकच कपडे. अगदी लग्न कार्यांत सुद्धा मी हा नियम अंमलात आणला. आज मी पिवळा ड्रेस घातलाय म्हणजे आज गुरुवार हेही सहजच लक्षांत यायचे. काहीं वेळा मह्त्वाच्या कामाला जातानाही मला ह्याचा चांगला अनुभव आला. 

तर मंडळी ! असे हे माझे रंगसंगती पुराण .नवरात्र जवळ आले की  विविध रंगांच्या कपड्यावरून चर्चेला उधाण येते. मला त्यांत योग्य का अयोग्य ह्या वादांत पडायचे नाही. माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला इतकेच.  कोणाला ह्यात अंधश्रद्धा वाटेलही . माझ्याकडे बघून काहीजणींना माझे तेच तेच कपडे घालणे खटकलेही असेल पण मला तरी माझी ह्यामुळे  मोट्ठी सोय झाली असेच वाटते.

  " अंदाज अपना अपना !!! नाही का .. 

चला तर मग ह्या सणाचा, उत्सवाचा आनंद वादविवाद टाळून  आपापल्या परीने लुटुया. जीवनाचा खराखुरा आस्वाद घेऊया. अंतिम ध्येय शांती आणि समाधान जे दुर्मिळ आहे ते मिळावे म्हणून मनापासून देवीची प्रार्थना करूया. 

या देवी सर्व भुतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

 जगदंब उदयोस्तु उदयोस्तु ।।


स्नेहा हेमंत भाटवडेकर , विलेपार्ले ,मुंबई 

०२/१०/२०२४



Thursday, August 8, 2024

बहरला पारिजात दारी

।।   श्री शंकर  ।।


बहरला पारिजात दारी 

पहाट नुकतीच फटफटत होती . पूर्व दिशेने रक्तवर्णी लालिम्याचे मळवट भरले होते. हळूहळू वर येणाऱ्या सूर्याला आलिंगन द्यायला स्त्रीत्वाचे लेणे लेवून ती सज्ज झाली होती. रोजचीच कहाणी , तरीही नव्याने सुरु होणारी ... नवा दिवस ,नवा अध्याय .. आलेल्या दिवसाला सामोरे जाताना पुढे काय घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही  नसते आपल्याला 

सकाळची शांत वेळ निशाला खूप आवडायची. बाहेरच्या जगातला कोलाहल आता  तिला अस्वस्थ करीत असे. तिची बंगलीही अलीकडे  शांत शांत असायची. एकाकीपणाची आणि भयाण शांततेची तिला सवय झाली होती , नाही करून घ्यावी लागली होती. 

घराबाहेर अंगणात तिच्या निगराणीतून फुललेली बागच तिची मनोवृत्ती प्रसन्न करीत असे. पहाटेच्या मंद गारव्यात ,धूसर प्रकाशांत ह्या बागेतून फेरफटका मारताना तिची मरगळ थोडी कमी व्हायची. दवबिंदूचे प्राशन करत हळूहळू उमलणाऱ्या फुलांकडे बघताना तिच्या तृप्त संसाराचे चित्र तिच्या नजरेसमोर साकारत असे. 

नीरजला जाऊन आता वर्षं झाले असेल नाही ... पण निशा ते मानायला तयार नव्हती. घरी दारी ,अंगणात ,बागेत , फुलापानांत ,प्रत्येक वाटेवर,वळणावर तिला नीरजची आठवण यायची. नीरजची आपल्याला साथ आहे आणि त्याच्या संगतीनेच ही  वाटचाल सुरु आहे अशी तिची भावना होती. पण कधीतरी वास्तवाची जाणीव झाली की मग मात्र निशा उदास व्हायची. 

" बहरला पारिजात दारी ,फुले का पडती शेजारी ... "

गाण्याच्या ह्या ओळी निशाच्या मनाला  डसत होत्या. तिचं मन सैरभैर झालं होतं . विचार करून करून डोक्यात गुंता झाला होता. सोन्यासारखा संसार असा एका क्षणांत विस्कटावा हे काही केल्या तिच्या  मनाला पटत नव्हतं . कुठे कमी पडलो आपण ? नीरज ला असा मार्ग निवडताना आपला पूर्ण विसर पडावा ? मग इतके दिवस होतं ते सगळं नाटकंच होतं ? निशा वारंवार हे विचार बाजूला सारायचा  प्रयत्न करत होती. पण कधीतरी पुन्हा सगळा  प्रसंग उसळी मारून वर यायचा. आजही मनाच्या तळाशी ठेवलेल्या आठवणी पुन्हा वर आल्या. सख्खी  शेजारीण असलेल्या आपल्या प्रिय मैत्रिणीबरोबर नीरजची झालेली अनपेक्षित जवळीक . आणि त्याचं तिच्याबरोबर तडकाफडकी निघून जाणं ... तिला झेपलंच नाही हे सगळं .. 

 सकाळची तिची ही आवडती वेळ.श्रावणातला ऊनपावसाचा खेळ सुरु झाला होता. पावसाच्या शिडकाव्याने झाडं  किती तजेलदार दिसत होती . श्रावणात प्राजक्त केव्हढा बहरला होता . फुलांचा सडा पडला होता. अशा प्रसन्न वातावरणांत बागेत फेरफटका मारताना , फुलांचं उमलणं न्याहाळायचं  ,त्यांचा मंद सुवास श्वासात भरून घ्यायचा . 

 पण आज  तिचे पाय जडावलेले होते. तिची उदासी कशानेच कमी होत नव्हती.मनावरची मरगळ दूर होत नव्हती. तशाच मनःस्थितीत ती तिच्या लाडक्या प्राजक्ताजवळ आली आणि तिथेच मटकन बसली. नीरजची कांती ह्या फुलांसारखीच सुकोमल ,तेजस्वी. त्याच्या सहवासांत जाणवणारा प्राजक्तासारखा मंद दरवळ ,सहजीवनांत अनुभवलेले सुंदर क्षण ... पण आता मात्र रिकामी झालेली सुगंधी कुपी ... सगळं धूसर झालंय आता. मनावर पुन्हा मरगळ दाटून आली . 

हिरव्या पर्णसंभारातून पांढरा ,टपोरी उठावदार फुलांचा आकर्षक कशिदा ,आणि मधेच केशराची जडीबुट्टी. ह्या विलक्षण रंगसंगतीत ती हरवून गेली. मंद वाऱ्याच्या लहरींबरोबर गिरक्या घेत घेत ती सोनुली जमिनीच्या कुशीत अलगद विसावत होती. स्वतःला  विसरून भूमातेला शरण जात होती. 

अनावर ओढीने ती त्या फुलांकडे बघत त्यांना निरखत होती. तिच्या मनांत चलबिचल सुरु होती. काहीशा निश्चयाने तिने प्राजक्ताच्या फुलांनी ओंजळ भरली . मनांत मृत्युन्जय मंत्राचा अनाहत नाद कधी सुरु झाला तेही तिला कळले नाही. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीयमाऽमृतात् || ...

झाडापासून अगदी सहजपणे विलग होऊन बंधनातून मुक्त होणाऱ्या त्या फुलांप्रमाणे हातातली ओंजळ वर येणाऱ्या सूर्यनारायणाला समर्पित करताना स्वतःच्या देहाची ओंजळही त्याच्याच चरणकमळाशी तिने रीती केली. प्राजक्ताप्रमाणे तीही त्या मातीशी एकरूप झाली. त्याच्याप्रमाणेच भगव्या विरक्त रूपांत ती अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागली. 

मूकपणे तिचा लाडका प्राजक्त तिला सुमनांजली अर्पित करीत होता. 


सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

०८/०८/२०२४

 .