Tuesday, January 14, 2025

चल, चल मेरे भाई

       || श्री शंकर ||


 चल, चल मेरे भाई 


नवीन कॅलेण्डर  वर्ष येतं ते नवीन संकल्प घेऊनच.वातावरणातील आल्हाददायी गारवा अधिकच उत्साह निर्माण करणारा . त्यात विलेपार्ले सारख्या मुंबईच्या सांस्कृतिक राजधानीत ,रविवार ,सुट्टीचा दिवस असला की अनेक कार्यक्रम खुणावत असतात.

विलेपार्ले पूर्व येथे जेष्ठ नागरिकांसाठी वॉकेथॉन आयोजित केलेली असते, पार्ले टिळक शाळेच्या भव्य पटांगणावर " कौशिकीच्या" मधुर स्वर मंडळाचे जबरदस्त आकर्षण असते आणि असेच अनेक रंगतदार कार्यक्रम आपल्या आयुष्यात रंग भरत असतानाच, काही संस्था सामाजिक जाणिवेतून काही उपक्रम लोकहितासाठी राबवतात.

१२ जानेवारी, स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून , पार्ले पश्चिमेला असलेल्या स्वामी विवेकानंद मार्गावर आयोजित केलेल्या एका " वॉक " ने माझे लक्ष वेधुन घेतले.

" Walk for the social cause " -- to enhance the quality of life in Mumbai...

"Project Mumbai " ह्या सामाजिक संस्थेच्या विद्यमाने हा वॉक सकाळी १० वाजता सुरू झाला.एक तासाच्या ह्या वॉकमधे रस्त्यावर चालताना मुंबईकरांना अनेक समस्यांना जे तोंड द्यावे लागते त्यांची नव्याने ओळख झाली.



रस्त्यावर जागोजागी थांबून तिथल्या रस्ते आणि पदपथांच्या बिकट अवस्थेची जाणीव करून देणाऱ्या आमच्या ग्रुप लिडरला पाहून अनेक जण उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे ह्या वॉकमधे सहभागी झाले.

मुंबई उपनगरातील " स्वामी विवेकानंद मार्ग " हा सर्वात लांब रस्ता ( २३.६ कि.मी.) आहे.अतिशय गजबजलेल्या, वर्दळीच्या ह्या रस्त्यावर दोन्ही बाजूला अनेक इमारती, ऑफिसेस, दुकाने, मॉल्स तर आहेतच पण शाळा,विद्यालये, महाविद्यालय,देवळे,चर्च ,हॉस्पिटल आहेत.त्यामुळे लहान मुलांपासून अगदी वयस्कर, रूग्ण इ.ची ये-जा सतत चालूच असते.त्यातच सध्या अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकासाची , रस्त्यांचे कॉक्रिटीकरण इ .  कामेही वेगाने सुरू आहेत.

अशा वेळी गर्दीचे लोंढे चुकवत, रहदारीतून वाट काढत स्वतःच्या जीव कसाबसा वाचवत पादचारी मार्गक्रमण करत असतात .त्यांच्यासाठी आरक्षित असलेल्या फुटपाथांची अवस्था , रस्त्यांप्रमाणेच दयनीय आहे.अनेक ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत.पेव्हर ब्लॉक वरखाली झाले आहेत.एका ठिकाणी तर एक मोठे स्कॅफोल्डिंग बिल्डरने अगदी फुटपाथवरच उभे केले आहे. धार्मिक स्थळे , जी एक  संवेदनशील गोष्ट, त्यांनी जागा व्यापली आहे. फुटपाथवरच बसथांबे ही आहेत. ह्या थांब्यावर काही जणांनी स्वतःचा चक्क संसारही थाटला आहे.

रस्त्यावर चालताना किंवा तो ओलांडताना ह्या सर्व गोष्टी आपल्याला नेहमीच दिसत असतात  , पण आपण त्याकडे बघूनही दुर्लक्ष करतो.आहे त्याचा स्वीकार करून पुढे जातो. हे सर्व नित्याचे असल्याने अंगवळणी पडले आहे किंवा हे असेच असणार,आपण सामान्य नागरिक , आपण काय करणार असा विचार करून ह्या गोष्टींना गृहीतच धरले आहे.   रस्त्यावरून चालताना होणाऱ्या अनेक अपघाताच्या घटना (जोपर्यंत आपल्यावर कठीण प्रसंग ओढवत नाही) वर्तमानपत्रांत वाचतो पण  आपण त्याकडे गांभीर्याने बघत नाही.

पादचाऱ्यांसाठी सुरक्षित रस्ते हा आपला अधिकार नाही का ? त्यासाठी नागरिकांनी प्रशासनावर दबाव आणला तर त्यातून काही चांगला मार्ग निघेल का ? इतर नागरिक ह्या मोहिमेत सहभागी होऊन हा प्रकल्प यशस्वी करु शकतील का ? असे अनेक मुद्दे ह्या वॉकच्या निमित्ताने highlight झाले.

स्वामीजी म्हणतात " We aim to channel our hard work into serving humanity" ... त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी दाखविलेल्या प्रकाशवाटा उजळून निघाव्या...हीच प्रेरणा घेऊन ,जबाबदार नागरिक ह्या नात्याने,  मुंबईतील अनेक समस्यांना नुसते सामोरे जाण्याऐवजी त्यावर उपाययोजना करण्याऱ्या संस्थांना आपल्या परीने मदत करणे ही आपलीही जबाबदारी नाही का ? असा विचार  मनाशी बाळगून अशाच उपक्रमाच्या निमित्ताने पुन्हा भेटायचं ठरवून समूहाचा निरोप घेतला.


 सौ.स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले, मुंबई 

१४/०१/२०२५



1 comment: