Monday, October 14, 2024

मार्ग सुखाचा

 

ll    श्री शंकर  ll

 

         

मार्ग सुखाचा

 

गाडीने नुकतेच कल्याण स्थानक सोडून दादरच्या दिशेने प्रस्थान केले. आळोखेपिळोखे देतच  ती उठली.           लो गरम चाय.. गाडीत विक्रेत्यांची ये जा सुरु झाली होती.तो आवाज , वर्दळ . मुंबईत पाऊल टाकल्यापासून  गजबजाट सुरु ...दोन दिवस किती आनंदात गेले

तिची नजर घड्याळाकडे गेली. सात वाजले की ! तिने खिडकीतून बाहेर डोकावले ...आज सूर्यनारायण हरवले कुठे ? एक क्षण काळ थांबलाय असा तिला भास झाला. दादर आलं तशी ती गाडीतून उतरली पण कशातच लक्ष नव्हतं. मन सैरभैर झालं होतं .असं काय होतंय आज ? तिच्या मनाचा थांग तिलाच लागत नव्हता. 

  तिला आठवलं , आईला फोन करून खुशाली विचारायची आहे. निघताना जरा बरं नाही असं म्हणाली होती.पंढरपूरचा सगळा वृत्तांत सांगायचाय तिला. मी कुठे बाहेरगावी जाणार की माझ्या परतीच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असते. माझा फोन आला की कोण आनंद होतो तिला ...

तिचे विचारचक्र चालूच होते .टॅक्सी ...तिने टॅक्सी थांबवली . तेवढ्यात अचानक भावाचा फोन आला आणि ती भानावर आली..काय ??? ती जोरात ओरडलीच.ह्या अनपेक्षित धक्क्यातून सावरणे खूपच कठीण होते. आईsss ,अगं ,अशी अचानक तू ??  दोन दिवसांच्या आनंदावर असं विरजण पडेल असं मनांत सुद्धा आलं नव्हतं.



लाडक्या विठुरायाला भेटायची ओढ नकळत तिला लागली होती .आयुष्यात पहिल्यांदाच ती पंढरपूरला आली होती. पौर्णिमेचा दिवस. चंद्राचे भलेमोठे पूर्ण प्रतिबिंब चंद्रभागेत पडले होते ..किनाऱ्यावरच असलेले पुंडलिकाचे देऊळ. तिथे जाऊन दर्शन घेताना तिला आईची मनोमन आठवण झाली. प्रत्यक्ष पांडुरंगाला तिष्ठत ठेवून आई वडिलांची सेवा करणारा भक्त पुंडलिक. त्याच वेळी  मंदिरातील घंटानादाने अंतर्बाह्य नादवलय निर्माण झाले. प्रवाहातील द्रोणात सोडलेले हेलकावे खात दूर दूर जाणारे दिवे ती बराच वेळ न्याहाळत होती.त्या ज्योतीशी तिची आत्मज्योत एकरूप झाल्याचं भास तिला झाला. आणि पांडुरंगाचे ते दुरून घेतलेले  तरीही पारणं फेडणारे  दर्शन. वैकुंठपूरी ती हीच. इतका आनंद ,समाधान तिला कधीच लाभलं नव्हतं.

जेमतेम घरी सामान टाकून धावतच ती माहेरी पोचली. पाझरणारे डोळे पुसतच ती घरात गेली. विझून गेलेली आईची नजर तिलाच शोधतेय असा भास  झाला. माझ्याशी  बोलण्यासाठी तिचे ओठ विलग झालेत ? किती शांत चेहरा ! अर्धोन्मीलित डोळे !   क्षीरसागरात पहुडलेल्या विठूरायाचाच भास तिला झाला.आईच्या पायाला तिने मिठी मारली..मात्यापित्याचं छ्त्र हरवलेली ती... आपण आता पोरके झालो…उराशी असलेल हे दुःख तिला सहन होत नव्हतं . 

पंढरपूरला जाऊन भेटलीस ना त्या माऊलीला ? तोच खरा जगताचा आधार. आता पुढची वाटचाल करायची ती त्याच्या सोबतच. सुखाचा शाश्वत मार्ग दाखवण्यासाटी मीच तुला पंढरपूरला पाठवलं होतं ...आईचा आवाज तिच्या कानांत घुमत होता. 

आजन्म आपल्या लेकरांची काळजी वाहणारं अथांग , आभाळभर पसरलेलं ते मातृत्व ...त्या चिरंतन मायेचा साक्षात्कार त्या दुःखद क्षणीही तिला दिलासा देऊन गेला..

 

 

स्नेहा हेमंत भाटवडेकर

विलेपार्ले पूर्व

१५/१०/२०२४




Wednesday, October 2, 2024

navratriche nau rang... नवरात्रीचे नवरंग

                                                                 ।। श्री शंकर ।।

                   नवरात्रीचे नवरंग 

उद्यापासून सुरु होणाऱ्या शारदीय नवरात्रीच्या ( आश्विन शुध्द प्रतिपदा ते नवमी ) 

 सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा ... 

सरस्वती ! नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणि । कार्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा ।।

बुद्धीची देवता श्री महागणपती आणि कार्यशक्तीला चालना देणारी ती महासरस्वती ... ह्या आदिशक्तीची विविध रूपे आपण नवरात्रीच्या नऊ दिवसांत पाहतो. ही निसर्गातील सृजनशक्तीला प्रेरणा देणारी. मातीची घट रूपाने होणारी पूजा ,त्यांत विविध धान्य पेरून  आलेली ती हिरवी रोपं हे आपल्या कृषिप्रधान देशाचं प्रतिनिधित्व करणारी  . 

कुमारिका पूजन ( अप्रगट शक्ति ) अथवा सुवासिनी पूजन ( प्रगट शक्ति ) हा शास्त्रविधी म्हणजे स्त्रीशक्ती अथवा मातृशक्तीचं पूजन. तिच्या विषयी वाटणारा आदर व्यक्त करताना होणारी तिची पूजा. घरासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या ,त्या स्त्रीचे कौतुक व्यक्त करण्याची ही सुयोग्य संधी. त्या आदिशक्ति रूपांत स्त्रीच्या विविध नात्यातील रूपांचे, गुणांचे साधर्म्य  बघायला मिळते. आणि तिची अलौकिक अशी मातृत्व शक्ती, वत्सलता . 

नवरात्रीत देवीला वेगवेगळ्या फुलांच्या माळा घालायची प्रथा आहे. विविध रंगगंधांनी घरातले वातावरण सुद्धा प्रफुल्लित होते. विविध प्रकारचे  नैवेद्य अर्पण केल्यामुळे षड्रस निर्माण होऊन  आपलीही क्षुधा शांत होते. रसनिर्मिती होते. 

नवरात्रीत नऊ दिवस घरांत आपण अखंड दीपप्रज्वलन करतो. दीप हे तेजाचे प्रतीक. दीप तेवत ठेवल्यामुळे वायूमंडलातील शक्तीतत्त्व लहरींचे घरांत संक्रमण होऊन आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते. आणि ह्या जीवाला ' चलते रहो  ' चा संदेश मिळतो.  आपल्या देहाचा अज्ञानरूपी घट नऊ दिवस तेलवात लावून ज्ञानरूपी प्रकाशाने उजळून टाकावा ह्यासाठी करायची ही उपासना.ह्या उपासनेमुळे मन शांत ,प्रसन्न आणि स्थिर होतं . देवीची कृपा झाली कि सुख ,शांती आणि समाधान लाभते. हि आदिशक्ती दुर्जनांचा नाश करणारी आणि सज्जनांचे रक्षण करणारी आहे. 

 मनामनांत दबा धरून बसलेले षड्रिपू मारून दहाव्या दिवशी त्याच्यावर विजय मिळवायचा आणि बावनकशी सोनं लुटायचं , सिमोल्लंघन करायचं . आहारविहाराचं पथ्य ह्यावेळी पाळलं की देहाबरोबर मनांत सुद्धा सत्व प्रवृत्ती जागृत होते आणि हे क्षेत्र ( देह ) सुपीक ,सुफल होतं . मग खरा आनंदोत्सव साजरा होतो. 


नऊ दिवस नऊ विविध रंगांची वस्त्रे परिधान करावी का ह्यावरून अलीकडे  बराच उहापोह होत आहे. हे केवळ मार्केटिंग करता पसरवले जात आहे, ह्यांत व्यावसायिक लागेबांधे आहेत  आणि विविध प्रसारमाध्यमे ह्याला जबाबदार आहेत वगैरे वगैरे .अगदी कष्टकरी महिला ते उच्चपदस्थ ,कर्तबगार महिला त्या रंगांची वस्त्रे घालून जाताना दिसतात. त्यानिमित्ताने त्या दिवसाच्या रंगाची साडी परिधान करून वर्तमानपत्रांला आपली छबी पाठवणे आणि अनेकांची छबी तिथे  न्याहाळणे हा स्त्रीवर्गाचा नवरात्रीतील  आवडता उपक्रम. त्यानिमित्ताने वस्त्र - अलंकार उद्योगाची एकंदरच उलाढाल कल्पनेपलीकडे वाढली आहे . एखाद्या स्त्रीने " रंग माझा वेगळा " म्हणत दुसरा रंग निवडला तर अनेकांच्या भुवया उंचावतात असाही अनुभव आहे. 

नवरात्राचा आणि ह्या रंगांचा काही संबंध नाही ,काही मंडळी हे षडयंत्र मुद्दाम रचत आहेत असा  आरोप - प्रत्यारोपांचा खेळ रंगात ह्या निमित्ताने रंगात येतो.  

हल्ली बऱ्याच social  events मध्ये ठराविक रंगांचे कपडे परिधान करावेत अशी आवर्जून प्रेमळ  सूचना असते. आणि बरेच जण त्याला अनुसरून तसा dress code follow करतात. तो समूह अशा सारख्या रंगसंगतीतील पेहेरवामुळे उठून  दिसतो. फोटोना / सेल्फिना  उधाण येते. पती पत्नी सुद्धा twinning करतात. आजच्या जमान्याचा हा trend आहे.

मी माझा अनेक वर्षांचा वस्त्र-रंग परिधानाचा अनुभव ह्यानिमित्ताने इथे शेअर करतेय ज्याचा मला स्वतःला फायदा झाला. 

वीसपंचवीस  वर्षांपूर्वीची ही  गोष्ट असेल. आम्हा मैत्रिणींचा गप्पांचा फड मस्त रंगात आला होता. ग्रह ,तारे ,नक्षत्र, ज्योतिष असे त्या ठराविक तरुण वयांत भुरळ घालणारे विषय. एक मैत्रीण म्हणाली , रोजच्या वारानुसार ,ज्या ग्रहाचा जो  वार असतो , त्या ग्रहाच्या रंगाचे वस्त्र परिधान केले की त्याचा आपल्याला लाभ होतो. उदा. सोमवारी सोम ग्रह - त्याचा सफेद रंग म्हणून  पांढरे  , मंगळ ग्रह लाल असतो ,म्हणून मंगळवारी लाल वस्त्र परिधान केले की ते फ़ायदेशीर होते. काम चांगले होते, दिवस चांगला  जातो ,कामात व्यत्यय येत नाही इत्यादी इत्यादी ... झालं ...अस्मादिकांनी ते  नियमितपणे आचरणांत आणले.अगदी आजही .  ह्याचा  व्यावहारिक फायदा मला नक्कीच झाला. बघा हं ... रोज काय ड्रेस घालायचा हा प्रश्न पडलाच नाही .कारण सात रंगांचे सात कपडे माझ्याकडे होते. त्यामुळे वारांनुसार तो रंग घालायचा , वेळेची बचत. गरजा कमी झाल्या. कारण ठराविक रंगांचे ठराविकच कपडे. अगदी लग्न कार्यांत सुद्धा मी हा नियम अंमलात आणला. आज मी पिवळा ड्रेस घातलाय म्हणजे आज गुरुवार हेही सहजच लक्षांत यायचे. काहीं वेळा मह्त्वाच्या कामाला जातानाही मला ह्याचा चांगला अनुभव आला. 

तर मंडळी ! असे हे माझे रंगसंगती पुराण .नवरात्र जवळ आले की  विविध रंगांच्या कपड्यावरून चर्चेला उधाण येते. मला त्यांत योग्य का अयोग्य ह्या वादांत पडायचे नाही. माझी भूमिका मी मांडण्याचा प्रयत्न केला इतकेच.  कोणाला ह्यात अंधश्रद्धा वाटेलही . माझ्याकडे बघून काहीजणींना माझे तेच तेच कपडे घालणे खटकलेही असेल पण मला तरी माझी ह्यामुळे  मोट्ठी सोय झाली असेच वाटते.

  " अंदाज अपना अपना !!! नाही का .. 

चला तर मग ह्या सणाचा, उत्सवाचा आनंद वादविवाद टाळून  आपापल्या परीने लुटुया. जीवनाचा खराखुरा आस्वाद घेऊया. अंतिम ध्येय शांती आणि समाधान जे दुर्मिळ आहे ते मिळावे म्हणून मनापासून देवीची प्रार्थना करूया. 

या देवी सर्व भुतेषु शान्तिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

 जगदंब उदयोस्तु उदयोस्तु ।।


स्नेहा हेमंत भाटवडेकर , विलेपार्ले ,मुंबई 

०२/१०/२०२४



Thursday, August 8, 2024

बहरला पारिजात दारी

।।   श्री शंकर  ।।


बहरला पारिजात दारी 

पहाट नुकतीच फटफटत होती . पूर्व दिशेने रक्तवर्णी लालिम्याचे मळवट भरले होते. हळूहळू वर येणाऱ्या सूर्याला आलिंगन द्यायला स्त्रीत्वाचे लेणे लेवून ती सज्ज झाली होती. रोजचीच कहाणी , तरीही नव्याने सुरु होणारी ... नवा दिवस ,नवा अध्याय .. आलेल्या दिवसाला सामोरे जाताना पुढे काय घडणार आहे याची पुसटशी कल्पनाही  नसते आपल्याला 

सकाळची शांत वेळ निशाला खूप आवडायची. बाहेरच्या जगातला कोलाहल आता  तिला अस्वस्थ करीत असे. तिची बंगलीही अलीकडे  शांत शांत असायची. एकाकीपणाची आणि भयाण शांततेची तिला सवय झाली होती , नाही करून घ्यावी लागली होती. 

घराबाहेर अंगणात तिच्या निगराणीतून फुललेली बागच तिची मनोवृत्ती प्रसन्न करीत असे. पहाटेच्या मंद गारव्यात ,धूसर प्रकाशांत ह्या बागेतून फेरफटका मारताना तिची मरगळ थोडी कमी व्हायची. दवबिंदूचे प्राशन करत हळूहळू उमलणाऱ्या फुलांकडे बघताना तिच्या तृप्त संसाराचे चित्र तिच्या नजरेसमोर साकारत असे. 

नीरजला जाऊन आता वर्षं झाले असेल नाही ... पण निशा ते मानायला तयार नव्हती. घरी दारी ,अंगणात ,बागेत , फुलापानांत ,प्रत्येक वाटेवर,वळणावर तिला नीरजची आठवण यायची. नीरजची आपल्याला साथ आहे आणि त्याच्या संगतीनेच ही  वाटचाल सुरु आहे अशी तिची भावना होती. पण कधीतरी वास्तवाची जाणीव झाली की मग मात्र निशा उदास व्हायची. 

" बहरला पारिजात दारी ,फुले का पडती शेजारी ... "

गाण्याच्या ह्या ओळी निशाच्या मनाला  डसत होत्या. तिचं मन सैरभैर झालं होतं . विचार करून करून डोक्यात गुंता झाला होता. सोन्यासारखा संसार असा एका क्षणांत विस्कटावा हे काही केल्या तिच्या  मनाला पटत नव्हतं . कुठे कमी पडलो आपण ? नीरज ला असा मार्ग निवडताना आपला पूर्ण विसर पडावा ? मग इतके दिवस होतं ते सगळं नाटकंच होतं ? निशा वारंवार हे विचार बाजूला सारायचा  प्रयत्न करत होती. पण कधीतरी पुन्हा सगळा  प्रसंग उसळी मारून वर यायचा. आजही मनाच्या तळाशी ठेवलेल्या आठवणी पुन्हा वर आल्या. सख्खी  शेजारीण असलेल्या आपल्या प्रिय मैत्रिणीबरोबर नीरजची झालेली अनपेक्षित जवळीक . आणि त्याचं तिच्याबरोबर तडकाफडकी निघून जाणं ... तिला झेपलंच नाही हे सगळं .. 

 सकाळची तिची ही आवडती वेळ.श्रावणातला ऊनपावसाचा खेळ सुरु झाला होता. पावसाच्या शिडकाव्याने झाडं  किती तजेलदार दिसत होती . श्रावणात प्राजक्त केव्हढा बहरला होता . फुलांचा सडा पडला होता. अशा प्रसन्न वातावरणांत बागेत फेरफटका मारताना , फुलांचं उमलणं न्याहाळायचं  ,त्यांचा मंद सुवास श्वासात भरून घ्यायचा . 

 पण आज  तिचे पाय जडावलेले होते. तिची उदासी कशानेच कमी होत नव्हती.मनावरची मरगळ दूर होत नव्हती. तशाच मनःस्थितीत ती तिच्या लाडक्या प्राजक्ताजवळ आली आणि तिथेच मटकन बसली. नीरजची कांती ह्या फुलांसारखीच सुकोमल ,तेजस्वी. त्याच्या सहवासांत जाणवणारा प्राजक्तासारखा मंद दरवळ ,सहजीवनांत अनुभवलेले सुंदर क्षण ... पण आता मात्र रिकामी झालेली सुगंधी कुपी ... सगळं धूसर झालंय आता. मनावर पुन्हा मरगळ दाटून आली . 

हिरव्या पर्णसंभारातून पांढरा ,टपोरी उठावदार फुलांचा आकर्षक कशिदा ,आणि मधेच केशराची जडीबुट्टी. ह्या विलक्षण रंगसंगतीत ती हरवून गेली. मंद वाऱ्याच्या लहरींबरोबर गिरक्या घेत घेत ती सोनुली जमिनीच्या कुशीत अलगद विसावत होती. स्वतःला  विसरून भूमातेला शरण जात होती. 

अनावर ओढीने ती त्या फुलांकडे बघत त्यांना निरखत होती. तिच्या मनांत चलबिचल सुरु होती. काहीशा निश्चयाने तिने प्राजक्ताच्या फुलांनी ओंजळ भरली . मनांत मृत्युन्जय मंत्राचा अनाहत नाद कधी सुरु झाला तेही तिला कळले नाही. 

ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् | उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीयमाऽमृतात् || ...

झाडापासून अगदी सहजपणे विलग होऊन बंधनातून मुक्त होणाऱ्या त्या फुलांप्रमाणे हातातली ओंजळ वर येणाऱ्या सूर्यनारायणाला समर्पित करताना स्वतःच्या देहाची ओंजळही त्याच्याच चरणकमळाशी तिने रीती केली. प्राजक्ताप्रमाणे तीही त्या मातीशी एकरूप झाली. त्याच्याप्रमाणेच भगव्या विरक्त रूपांत ती अनंतात विलीन होण्याच्या मार्गावर वाटचाल करू लागली. 

मूकपणे तिचा लाडका प्राजक्त तिला सुमनांजली अर्पित करीत होता. 


सौ. स्नेहा हेमंत भाटवडेकर 

विलेपार्ले ,मुंबई 

०८/०८/२०२४

 .

Tuesday, March 5, 2024

जनीं जाणता पाय त्याचे धरावे

।।  श्री शंकर ।।


जनीं जाणता पाय त्याचे धरावे 


शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे । वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे ।।

कवि वाल्मीकासारिखा मान्य ऐसा । नमस्कार माझा सद्गुरू रामदासा ।।


आज माघ वद्य नवमी , दासनवमी .. सज्जनगड स्थित समर्थ रामदास स्वामी ह्यांच्या पुण्यस्मरणाचा हा दिवस. मानवाच्या कल्याणासाठी संत,सद्गुरु आपल्यासारख्या सामान्य जनांना तळमळीने उपदेश करीत असतात. समर्थांनी आपल्या वाङ्मयातून आपल्यासारख्या सामान्य लोकांचे  जीवन भव्य दिव्य ,उदात्त व्हावे ,मनाला शांतता प्रसन्नता लाभावी म्हणून मार्गदर्शन केले आहे. 

मनाचे श्लोक ही त्यांची रचना म्हणजे आपल्या उत्कर्षाकरितां साध्या -सोप्या भाषेत आपल्या मनाला केलेले उत्तम मार्गदर्शनच आहे. आपले मन स्थिरावलेले असेल तरच संसार आणि परमार्थ ह्याची उत्तम सांगड घालता येते.     जन्म - बंधनाच्या फेऱ्यांतून सुटका होणे हेच मनुष्य जन्माचे अंतिम ध्येय असते. त्यासाठी मनाची भूमिका अतिशय महत्वाची आहे . हे जाणूनच समर्थांनी सुमारे ५०० वर्षांपूर्वी मनाचे श्लोक रचले. 

मनाच्या श्लोकांची रचना वरवर पाहता अगदी सोपी,सहज.पण त्यात दडलेला भावार्थ हा विचार ,मनन ,चिंतन ,आचरण करण्यासारखा. अगदी शालेय जीवनांत आपण ह्या श्लोकांचे स्पर्धेसाठी पाठांतर करतो.त्यावेळी त्याचा अर्थ त्या बालवयात कळत नाही. आणि पुढे हे श्लोक विस्मरणातही जातात. खरं तर आयुष्यभर ह्या श्लोकांमधील उपदेश व्यावहारिक आणि पारमार्थिक पातळीवर आचरणांत आणणे अगदी आवश्यक. समर्थ स्वतः अतिशय तेजस्वी. तेच तेज त्यांच्या भाषेत प्रगटले आहे. श्लोक ऐकताना , म्हणताना एक जोश, आवेश आपल्यालाही जाणवतो. 

बारा वर्षं तपाचरण करून समर्थांनी लहान वयातच त्यांचे आराध्य दैवत प्रभू रामचंद्रांना आपलेसे करून घेतले. ऐहिक संसाराचा त्याग करून परमार्थ मार्गाचा अंगीकार केला. रामरायाने त्यांना जगदुद्धार करण्याचा आदेश दिला. ह्या आदेशाचे पालन करून लोकहितासाठी त्यांनी पूर्ण आयुष्य वेचले. आधी कठोर उपासनेने स्वतःला सिद्ध केले .त्यामुळे त्यांच्या शब्दांत ते जाज्वल्य  सामर्थ्य प्रगट होते . 

मनाच्या श्लोकांतील १४१ व्या श्लोकांत समर्थ आपल्याला सांगतात , जनीं  जाणता पाय त्याचे धरावें ... 

जाणता कोण ? ज्ञानी ,संत,सत्पुरुष ,सद्गुरु , आत्मज्ञानी वा साक्षात्कारी पुरुषोत्तम  म्हणजे " जाणता " .... ज्याला सामान्य लोकांच्या हिताची , कल्याणाची तळमळ आहे. अशा व्यक्तिचे पाय धरावे असे समर्थ म्हणतात.                  " धरावे ते पाय आधी आधी " ... म्हणजे त्यांना शरण जा. पूर्ण  शरणागती .त्यांच्या समोर नम्रपणे वागा. अहंकार बाळगू नका. त्यांचे मार्गदर्शन घ्या आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करा. जाणत्या व्यक्तीचा  सल्ला हा नेहमीच मोलाचा ,आपल्या कल्याणाचा . 

आई जशी लेकराचे गुण- दोष बरोब्बर ओळखून असते त्याप्रमाणे जाणत्या व्यक्तीलाही समोरच्या व्यक्तीला त्याच्या कुवतीप्रमाणे कोणता बोध करायचा ते बरोबर  कळते. ही  जाणीव असणारा तो " जाणता ".

ही  जाणती व्यक्ती आपल्या डोळ्यांत अंजन घालते. अंजनाचे वैशिष्ट्य हे की आपली दृष्टी त्यामुळे साफ होते. देहबुद्धीचा निरास होऊन आत्मज्ञान होण्यासाठी जाणत्या माहात्म्याचा अनुग्रह घ्यायला हवा. त्यासाठी आधी त्या महात्म्याचे मोठेपण कळायला हवे. ह्या जाणत्या व्यक्तीला शिष्याचें नेमकेपण माहित असते. त्याचा स्वभाव ,त्याची परमार्थाची आवड ,त्याची कुवत जाणूनच तो मार्गदर्शन करत असतो. ही ज्ञानदृष्टी गुरुकडे असते. ह्या जाणत्या व्यक्तीने सांगितलेली उपासना करताना स्वतःचा " स्व ",अहंकार बाजूला ठेवावा लागतो आणि गुरु म्हणतील तेच योग्य ह्या मार्गाने साधना एकरूपतेने ,निष्ठेने  करावी लागते. " सदा संगती सज्जनाची धरावी " ...संत ,सज्जनांच्या सहवासांत नियमितपणे राहिले की  आत्मस्वरूपाचा शोध लागतो . सत्यदर्शन होते. 

समर्थानी दासबोधातील दशक १८ ,दुसऱ्या समासात  " जाणता " ह्या शब्दावरच लिहिले आहे.   ते म्हणतात ,जाणत्याची संगती धरावी आणि त्याची  सेवा करावी,आपले शरीर त्याच्यासाठी  झिजवावे. जाणत्याचे ज्ञान पाहून आपला अंतरात्मा जाणावा. 

माणसाला नेहेमीच कोणाच्या तरी मार्गदर्शनाची आवश्यकता असते. माणूस जरी बुद्धिमान असला तरी नैसर्गिक प्रेरणेने त्याला फार थोडे साधते. माणसाला स्वतःचे श्रेठत्व सिद्ध करण्यासाठी जाणत्याचे पाय धरावेच लागतात. तरच त्याला आपली प्रगती , उन्नती साधता येते. पण ह्या पाय धरण्यात केवळ शिष्टाचार नसावा.तर नम्रता असावी. त्या व्यक्तीविषयी मनांत आदराची भावना असावी. 

पाय हे आपल्या शरीरातील निकृष्ट अंग. आणि डोकं हे उत्तम अंग. जाणत्या व्यक्तीच्या पायाशी आपले मस्तक ठेवणे म्हणजे आपले उत्तम अंग त्यांच्या स्वाधीन करणे. त्यामुळे स्थिरता , तृप्ती लाभते. अर्थात त्यासाठी मनाचा निग्रह हवा. मगच त्या शाश्वत तत्वाची,आनंदाची  प्राप्ती होते. 

भगवद्गीतेत अर्जुनाच्या मनांतील संभ्रम दूर करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याच्यासारख्या थोर योध्यालाही उपदेश केला .  अर्जुनाची नेमकी मनःस्थिती श्रीकृष्णांनी जाणली. त्यानुसार त्याला योग्य मार्गदर्शन केले आणि त्यामुळे अर्जुनाचा मोह नष्ट झाला.तो योगेश्वर श्रीकृष्णांना शरण गेला. 

 शिवाजी महाराजांना आपल्या प्रजेची अचूक जाण होती म्हणूनच त्यांना आदराने आपण " जाणता  राजा " म्हणतो. समर्थच त्यांचे गुरु होते. जाणत्या गुरूंमुळे ते स्वतःही जाणते झाले. 

परमार्थ मार्गांत चरणसेवा ,चरण धरणे, ह्याला खूप महत्व दिले आहे. सद्गुरु चरण हे श्रुतिरूप श्रेष्ठ रत्नांनी सुशोभित आहेत.ते वेदान्ताच्या अर्थांचे वक्ते आहेत.त्यांच्या चरणांना गंगोदकाची उपमाही दिली आहे. गुरुचरणांची सेवा हे  तीर्थच आहे.  ह्या चरणांच्या आश्रयाने शिष्याची सर्व पापे दूर होतात ,अज्ञान नाहीसे होते आणि शिष्यही पवित्र होऊन ब्रह होतो. 

पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे चरणकमल धरायला आपण उत्सुक असतो. त्या चरणांना मिठी मारली की ह्या भवसागरातून आपण नक्की तरुन  जाऊ हा विश्वास भक्ताच्या मनांत असतो. तसाच विश्वास जाणत्याच्या पायावर डोकं ठेवताना असला तर आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही हे निर्विवाद सत्यच आहे. 

जय जय रघुवीर समर्थ !!!!


स्नेहा हेमंत भाटवडेकर 

दासनवमी  २०२४...